Monday 11 March 2024

 

ताडोबा नावाची सुसंस्कृतपणाची जंगल शाळा !









ताडोबा नावाची सुसंस्कृतपणाची जंगल शाळा !

तुम्ही जेव्हा केवळ जंगलामध्ये जाता तेव्हा तुम्हाला वन्य प्राणी किती सुसंस्कृत आहेत व आपण माणसे प्रत्यक्षात किती असंस्कृत आहोत हे समजते”…

         मी जेव्हा ताडोबामध्ये तळपत्या उन्हात, धुळ उडणाऱ्या रस्त्यांवर होतो तेव्हा माझ्या मनात हा विचार आला (म्हणजे पुन्हा एकदा आला). तुम्ही असा विचार करत असाल की आपल्या मानवजातीवर ही अचानक टीकेची झोड का, तर दरवेळी मी जेव्हा जंगलांना भेट देतो तेव्हा तिथे काहीतरी नवीन शिकायला मिळते. किंबहुना ते माहिती असते, परंतु मला ते दरवेळी नवीन प्रकारे समजले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही व हे कुणाच्याही बाबतीत होऊ शकते, आपण केवळ ज्या जंगलाला भेट देत आहोत त्याच्याशी एकरूप व्हावे लागते. आपल्या काँक्रिटच्या जंगलात तुम्हाला केवळ घोटाळे, फसवणूक, रस्त्यावर हिंसक मारामाऱ्या, अंमली पदार्थ, महिलांवरील अत्याचार (अलिकडेच आलेल्या एका बातमीमध्ये झारखंडमध्ये आपल्या देशामध्ये पाहुण्या म्हणून आलेल्या एक आंतरराष्ट्रीय महिला पर्यटकावर बलात्कार करण्यात आला), त्याचशिवाय रस्त्यावरील अपघातामध्ये वन्य प्राण्यांचा मृत्यू, तसेच वन्यजीवांच्या अधिवासावर सतत सुरू असलेले अतिक्रमण याविषयी बातम्या येत असतात. परंतु कुणीही त्याविषयी एक अवाक्षरही बोलत नाही किंवा त्याविरुद्ध आवाज उठवत नाही; आपण याला शहाणपण किंवा सुसंस्कृतपणाचे लक्षण मानू शकतो का, तर याचे उत्तर नाहीअसेच आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण, इतर माणसे चुकीच्या गोष्टी करत असल्याचे ऐकतात, पाहतात, परंतु आपण त्या गोष्टीचा भाग नाही असे म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो व पुढे चालू लागतो. माणसाची ही कृती असंस्कृतपणाची आहे असे मी म्हणेन. जंगलामध्ये जेव्हा एखादे माकड किंवा सांबर हरिण किंवा चितळ, जे वाघाचे सावज असते त्यांना आजूबाजूला वाघ असल्याचे जाणवताच त्यांच्या विशिष्ट आवाजात इतर प्राण्यांना इशारा देऊन तिथे वाघ म्हणजे धोका असल्याचा कळवतात व त्यांचे प्राण वाचविण्यास मदत करतात. जोपर्यंत वाघ त्यांच्या नजरेसमोरून लांब जात नाही तोपर्यंत ते सावधानतेचे इशारे देत राहतात व खरेतर इथे वाघाची बाजूही चूक नसते कारण वन्यप्राण्यांची शिकार करूनच तो स्वतःचे पोट भरू शकतो. तरीही इतर वन्य प्राण्यांसाठी तो धोका असतो व ते त्याच्याविरुद्ध आवाज उठवतात. प्रत्यक्षात जेव्हा एखादे सांबर किंवा चितळ किंवा माकडाला वाघ आजूबाजूला असल्याचे जाणवते तेव्हा ते एकटे असतात, ते सहजपणे पलायन करून स्वतःचा जीव वाचवू शकतात. परंतु तरीही ते इतर प्राण्यांना इशारा देण्याचा धोका पत्करतात. याचे कारण म्हणजे त्यांना माहिती असते की आज त्यांना वाघ आधी दिसला आहे परंतु उद्या दुसऱ्या एखाद्या हरिणाला वाघ आधी दिसू शकतो व एकमेकांना सावधानतेचा इशारा देऊनच ते सुरक्षित राहू शकतात!

      लोकहो, दररोज आपल्या शहरातील रस्त्यांवर आपल्याला एखादे वाहन लाल सिग्नल तोडताना दिसते, काही गुंड रस्त्यांवर शाळकरी मुलींची छेड काढत असतात, कुणीतरी रस्त्यावर ड्रग्ज सारख्या चुकीच्या वस्तु विकत असतात किंवा परवानगी शिवाय झाडे कापण्यासारखी गैरकृत्ये करत असतात, परंतु आपण त्याविरुद्ध काहीही आवाज उठवित नाही वा इशारा देत नाही व केवळ आपल्या स्वतःच्या आरामाचा विचार करतो व विसरून जातो की उद्या कदाचित आपण अशा गैरकृत्यांचे बळी ठरू. त्यावेळी आपल्याला कुणीतरी आधी इशारा दिला असता तर आपण वाचलो असतो परंतु आज जर आपण अशा गैरकृत्यांविरुद्ध आवाज उठवला असता तरच ते शक्य झाले असते, बरोबर? मी अलिकडेच ताडोबाला जाऊन आलो, या दौऱ्यात मला या गोष्टीची जाणीव झाली. आम्ही एका पाणवठ्यावर भर दुपारच्या उन्हामध्ये वाट पाहात होतो, मध्य भारतातील उन्हाळ्याची सुरुवात होती. आश्चर्य म्हणजे या पाणवठ्याव्यतिरिक्त आजूबाजूच्या भागात कुठलाही पाणवठा नसूनही इथे एकही प्राणी नव्हता. याचाच अर्थ असा होता, की जवळपास कुठेतरी वाघ होता ज्याची जाणीव हरिण व माकडांना झाली असावी, त्यामुळेच ते पाणवठ्यापासून चार हात लांब होते. आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला व आम्हाला पाणवठ्याच्या बांधाच्या भिंतीमागून एका सांबर हरिणाचा अलार्म कॉल म्हणजेच इशारा ऐकू आल्याने आमच्या निर्णयाची खात्रीच झाली. सांबर हरिणाचा इशारा (धोका असल्याचे कळविण्यासाठी प्राणी करत असलेला एक विशिष्ट आवाज) आजूबाजूला हिंस्र प्राणी असल्याची खात्रीच असते, कारण ते जोपर्यंत वाघ किंवा बिबट्या प्रत्यक्ष पाहात नाही तोपर्यंत ते धोक्याचा इशारा देत नाही. परंतु यावेळी त्याने दोनदा इशारा दिला व त्यानंतर सर्व काही स्तब्ध होते. याचा अर्थ सांबर हरिणाने वाघ पाहिला परंतु तो झोपलेला असावा त्यामुळे सांबराने इशारा देणे थांबवले परंतु तो पाणवठ्यावर आला नाही व आम्ही वाट पाहायचे ठरवले. आम्ही जवळपास तासभर वाट पाहिली व ज्याप्रमाणे ताडोबाच्या उन्हाळ्यामध्ये पाण्याची वाफ होऊन जाते, त्याप्रमाणे इतर जिप्सींचा संयम विरून गेला व बहुतेक वाहने दुसरीकडे शोध घेण्यासाठी (अर्थातच वाघाचा) इतस्ततः पांगली. परंतु आम्ही जंगलातील दुनियेच्या संस्कृतीवर (सांबराच्या इशाऱ्यावर) विश्वास ठेवायचा निर्णय घेतला व अचानक पाणवठ्याच्या बांधाच्या भिंतीवर वाघाचे डोके दिसू लागले, परंतु त्यावेळी कुणा प्राण्याने इशारा दिला नाही कारण तोपर्यंत सर्व हरिणे निघून गेली असावीत. त्यानंतर, वाघ एका तासाहून अधिक काळ पाण्यात निवांत पहुडला होता. इथेही तो जोपर्यंत पाणी पीत नाही व तीन ते चार वेळा जांभया देत नाही तोपर्यंत तो पाण्यातून उठणार नाही ही वाघाची सवय आहे व आम्ही ते होईपर्यंत वाट पाहिली. दीड तासानंतर वाघ पाणी प्यायला व त्याने जांभई दिली व तो पाण्यातून उठून बसला व पोहत आमच्या दिशेने येण्यास सुरूवात केली व अचानक आमच्या अवतीभोवती प्राण्यांचे इशारे देणारे आवाज ऐकू येऊ लागले, कारण आता धोक्याची हालचाल सुरू झाली होती, जंगलातील जीवनाचे एक अतिशय सुसंस्कृत दृश्य आम्ही अनुभवले!

     २०२४ या वर्षाची सुरुवात अशाप्रकारे झाली व जंगलामध्ये वर्षातील पहिल्या सहलीसाठी ताडोबापेक्षा दुसरी अधिक कोणती जागा चांगली होऊ शकली असती व आम्ही कोलारा प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. यातील सर्वोत्तम गोष्ट अशी होती की, गेल्या संपूर्ण वर्षभरात जंगलातील सहलींदरम्यान, प्रत्येक वेळी किमान एक दिवस तरी पाऊस पडला होता. यावेळी आकाश निरभ्र होते, परंतु जेव्हा मी ताडोबाला पोहोचलो तेव्ही तीन दिवस ते तसेच राहिले हा एक शुभशकून होता, हाहाहा. मी निसर्ग देवतेला दोष देत नाही व मला पावसातही जंगलात जायला आवडते. परंतु वरून झाकलेल्या जिप्सीमध्ये बसल्यावर, वन्यजीवनाचा आनंद घेणे थोडे अवघड होते, ही वस्तुस्थिती आहे. या सहलीतही नेहमीप्रमाणेच चढ-उतार होते, तसेच काही वेळा अगदी काही मिनिटे नशीबाने मेहेरबानी केल्यामुळे काही विशेष दृश्ये (जंगलामध्ये प्रत्येक मिनिट विशेष असतो) पाहायला मिळाली ज्यामध्ये ताडोबातील काळ्या बिबट्याचा समावेश होता. या सहलीतील आणखी काही अनुभवही आज सांगणार आहे

काळा रंगही तुमच्यासाठी नशीबवान असू शकतो...!!‍

सकाळच्या गारठ्यात, संपूर्ण जंगलात नीरव शांतता पसरलेली होती व तेवढ्यात बाजूच्या बांबूच्या वनातून एका सांबर हरिणाचा इशारा देणारा आवाज ऐकू आला, मला बाथरूमला जायचे होते म्हणून ताडोबा केंद्रात गेस्टरुमची सोय असल्याने आम्ही ज्या दिशेने हरिणाचा इशारा आला होता त्या मार्गाने तिकडे जायचे ठरवले व वळणावर आम्हाला एक काळा ठिपका रस्त्यावरून चालत येताना दिसला. तो ताडोबातील ब्लॅकी म्हणून ओळखला जाणारा काळा बिबट्या होता. इथे चालकाचा अनुभव महत्त्वाचा ठरतो, कारण त्याने उत्साहाच्या भरात थोडा वेग वाढवला त्यामुळे बिबट्यासारखा लाजाळू प्राणी लगेच सावध झाला व रस्त्यालगतच्या दाट झाडीत नाहीसा झाला, परंतु तरीही आम्ही त्याला पाहू शकलो ही अतिशय भाग्याची गोष्ट होती. जंगलामध्ये कधीही तुमच्यासमोर बिबट्या, कस्तुरी मांजर किंवा अस्वल असे प्राणी आले तर जिप्सी जिथे असेल तिथे थांबवा, लांबून छायाचित्रे घ्या व त्यानंतर हळूहळू थोडे जवळ जाण्याचा प्रयत्न करा म्हणजे अशाप्रकारे तुम्हाला किमान काही छायाचित्रे तरी मिळतात. याचे कारण म्हणजे हे प्राणी वाघासारखे नसतात ज्याला तुमच्या आजूबाजूला असण्याने काही फरक पडत नाही व तो चालत राहतो, हे प्राणी वाहनांची चाहुल लागताच झुडपात लपुन बसतात. मी ताडोबामध्ये गेल्या तीन वर्षांपासून हा काळा बिबट्या असल्याचे ऐकून होतो व मी गेल्या तीन वर्षात जवळपास दहावेळा तरी ताडोबाला भेट दिली असेल, तरीही तो दिसण्यासाठी आजचा दिवस उजाडावा लागला, जंगलातील सगळे अशाचप्रकारे चालते!

वाघाच्या वेगवेगळी मनस्थिती !

    संध्याकाळ आधीच उलटून गेली होती व आम्ही नवेगाव प्रवेशद्वाराच्या समोर होतो व आमच्यासमोर वन विभागाचे एक वाहन होते, एक नुकताच वयात आलेला वाघ, निर्धास्तपणे रस्त्याच्या मधोमध बसला होता. रेंज वन अधिकाऱ्यांनी आमचे कॅमेरे पाहिले (व आमच्या चेहऱ्यावरची काळजी पाहिली) व त्यांची गाडी कडेला घेतली व आम्हाला उदारपणे पुढे जाऊ दिले. या दृश्यावर नजर ठेवून मी वाघ कॅमेऱ्याकडे बघत असल्याचे एक छायाचित्र घेण्याचा प्रयत्न केला परंतु वाघ त्याच्याच तंद्रीत होता. मी छायाचित्र काढत राहिलो व जेव्हा मी थांबण्याचा विचार केला व मागे वळलो, तेव्हा त्याने आमची इच्छा पूर्ण केली व थेट कॅमेऱ्यात पाहिले व मला हवे असलेले छायाचित्र घेता आले. त्याने कॅमेऱ्यामध्ये पाहण्यापूर्वी त्याच्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून एक नजर माझ्याकडे पाहिले तेव्हा ते दृश्य अतिशय अद्भूत होते, जणू काही तो मला जे छायाचित्र हवे होते त्यासाठी चिडवत असावा. वाघ हा असा असतो, आपल्या नव्हे तर त्याच्या स्वतःच्या नियमांप्रमाणे जगणारा...!

     या छायाचित्रांसह अशा कितीतरी गोष्टी मी परत घेऊन आलो. माझ्या सहलीनंतर वन्यजीवनाविषयी काही रोचक घटना मी अनुभवल्या ज्या मी इथे देत आहे. फेसबुकवर कुणीतरी पिलीभीत अभयारण्याच्या मुख्य रस्त्यावर एक वाघाने एका पाळीव बैलाची शिकार केल्याची बातमी दिलेली होती व लोकांनी त्याच्या अनैतिकतेविषयी व समाज माध्यमांवर अशाप्रकारे हिंसक घटना टाकणे व त्यांचे उदात्तीकरण करणे कसे गैर आहे याविषयी लिहीले होते. यावर माझे उत्तर खालीलप्रमाणे होते

   माणसांमुळेच वाघांचा अधिवास नष्ट होत चालल्यामुळे वाघ परिस्थितीशी कसे जुळवून घेत आहेत याचे हे उत्तम उदाहरण आहे. गाय किंवा म्हैस यांच्यासारखे पाळीव प्राणी वाघाचे वास्तविक अन्न नाहीत, परंतु त्या बिचाऱ्यांकडे उघड्यावर येण्यावाचून व पाळीव प्राण्यांची शिकार करण्यावाचून दुसऱ्या कोणताही पर्याय नसतो, त्यांच्या भवितव्याविषयी पूर्णपणे आदर राखून मला हे सांगावेसे वाटते. एक लक्षात ठेवा आपण माणसे वाघापेक्षाही अधिक हिंस्र असतो ज्यांच्यामुळे त्याला हे करावे लागले आहे. मी तुमच्या भावना समजू शकतो की अशा बातम्या बघणे अतिशय क्रूर आहे परंतु माणसे त्यापेक्षा कित्येक अधिक क्रूर असतात, तुम्ही इंटरनेटवर पाहा, तुम्हाला दिसेल की अपघातस्थळी बहुतेक लोक त्या दृश्याचे चित्रकरण करण्यात व रिल्स तयार करण्यात गुंतलेले असतात व इथे जी घटना घडली ती नैसर्गिक होती.

    तसेच पुण्यामध्ये जिममध्ये व्यायाम करताना देण्यात आलेल्या मध्यंतरामध्ये एका महिला सदस्याने सांगितले की तिला वाघ पाहायची इच्छा आहे परंतु तिने जंगलात न जाण्याचा निर्णय घेतला आहे कारण आम्ही प्राणी पाहण्यासाठी जंगलात जाऊन त्यांच्या जीवनात अडथळा आणत असल्याचे तिला वाटते. वन्यजीवनाविषयी तिला असलेली काळजी व तिच्या भावनांविषयी आदर राखत मी तिला माझ्यापरीने जास्तीत जास्त चांगल्यापद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केला

       मी विदर्भाचा आहे, जेथे अजूनही माणूस रिक्षा ओढतो व तळपत्या उन्हात किंवा पावसात एक माणूस दुसऱ्या माणसाचे ओझे वाहतो हे पाहणे त्रासदायक असते. परंतु ते त्यांची उपजीविका कसे चालवतील कारण ते कोणत्याही प्रयत्नांशिवाय पैसे स्वीकारणारे भिकारी नसतात. मुंबई-पुण्याहून आमच्या घरी येणारे पाहुणे जेव्हा अशा माणसांद्वारे चालविल्या जाणाऱ्या रिक्षांमध्ये बसायला नकार देत तेव्हा मी त्यांना हेच समजून सांगत असे. त्याचप्रमाणे, जर आपल्याला वन्य प्राणी व जंगल सुरक्षित ठेवायचे असेल तर आपण या जंगलाभोवतालचे लोक जगू शकतील याची खात्री केली पाहिजे व याचा एकमेव मार्ग म्हणजे वन्यजीवन पर्यटन. एखाद्याने वाघ पाहिलाच नाही तर तो त्याच्यावर प्रेम कसा करेल व त्याचे संरक्षण करण्याचा प्रयत्न कसा करेल? आणखी एक घटक, आमच्या जंगलातील अस्तित्वामुळे एवढा अडथळा आला असता तर ताडोबामधील वाघांची संख्या कशी वाढतेय. म्हणजेच आपण काही नियमांचे पालन करून जंगलांना भेट देतो व सुरक्षित अंतर ठेवतो, जंगलाचे संरक्षण कऱणे तसेच त्यांच्या सान्निध्याचा आनंद घेणे हाच मार्ग आहे. सुदैवाने, तिला समजले व तिने मान्य केले !

    मित्रांनो, मी म्हटल्याप्रमाणे, जंगल ही दिवसाचे चोवीस-तास व वर्षाचे तिनशे-पासष्ट दिवस सुरू असलेली शाळा आहे, आपल्याला या शाळेमध्ये आपले नाव कसे व कधी नोंदवायचे आहे व आपल्याला त्यातून काय शिकायचे आहे व या ज्ञानाचा वापर कसा करायचा आहे हे आपल्यावर अवलंबून आहे; याची जाणीव होऊन मी ताडोबा जंगलाचा निरोप घेतला, पुन्हा लवकर येण्याचे आश्वासन देऊन...!

 

 संजय देशपांडे

smd156812@gmail.com















Thursday 15 February 2024


व्याघ्र प्रकल्प, लहान मुले आणि वाघांचे भवितव्य !















हे जग अधिक चांगले बनविण्यासाठी लहान मुलांच्या कुतुहलतेच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे म्हणजे आशा…”

    हे माझेच अवतरण आहे व मी जेव्हा वाघांचे संवर्धन व आपल्यासाठी त्याचे महत्त्व या विषयावरील माझे व्याख्यान संपवले तेव्हा माझ्यासमोर बसलेले चेहरे पाहून मला हेच जाणवले. संभाजीनगर (औरंगाबाद) येथील महाराष्ट्र पब्लिक स्कूलच्या जवळपास पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांसमोर बोलताना माझ्या मनात याच भावना होत्या. तुम्हाला जर असे वाटत असेल की हा मला वाघांविषयी वाटणाऱ्या तळमळीतून लिहीलेला अजुन एक भावनिक लेख आहे, तर तुमचे तसे करणे चुकीचे नाही. परंतु मला वाघांविषयी काय वाटते याविषयी हा लेख नाही, तर त्या मुलांना माझ्या वाघांविषयीच्या सादरीकरणानंतर काय वाटले याविषयी हा लेख आहे व मला असे वाटते ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे कारण त्यांच्या वाघांविषयीच्या भावना त्यांच्या प्रश्नांमध्ये दिसून येत होत्या व हे प्रश्न जणू एखाद्या नदीला पूर यावा किंवा समुद्रामध्ये त्सुनामी निर्माण व्हावी तसे होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्याआधी मला तुम्हाला त्याविषयी थोडीशी पार्श्वभूमी सांगाविशी वाटते, जंगल बेल्समध्ये (हेमांगी वर्तक व आरती कर्वे व त्यांचा चमू) महिला व लहान मुलांना वन्यजीवनाविषयी जागरुक करण्याचे काम करतो व त्यासाठी विविध उपक्रम राबवतो. त्यापैकी एक उपक्रम म्हणजे आपल्या व्याघ्र प्रकल्प ह्या संकल्पनेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आपल्या राष्ट्रीय प्राण्याविषयी म्हणजे वाघाविषयी एक ध्वनी चित्रफित आम्ही सादर करतो (व्याघ्र प्रकल्प काय आहे हे तुम्हाला माहिती नसेल तर कृपया गूगल करा). या उपक्रमांतर्गत जंगल बेल्सचा चमू विविध शाळा/शैक्षणिक संस्थांमध्ये जातो (आपल्या स्वतःच्या खर्चाने) व त्यांना एकूणच व्याघ्र प्रकल्पाविषयी व त्यांच्या संवर्धनाचे महत्त्व याविषयी समजून सांगतो व वन्यजीवनाचे संवर्धन करणे ही केवळ वन विभाग किंवा स्वयंसेवी संस्थांची जबाबदारी नसून वन्यजीवन संवर्धन ही मुलांचीही जबाबदारी आहे याची त्यांना जाणीव करून देतो.

       अलिकडेच जंगल बेल्सच्या चमूला महाराष्ट्र पब्लिक स्कूल, संभाजीनगर (औरंगाबाद) येथून आमंत्रण आले, मी देखील या चमूसोबत जाण्याची संधी घेण्याची दोन कारणे होती, एक म्हणजे या चमूचे नेतृत्व करणाऱ्या हेमांगीला घरच्या काही जबाबदाऱ्यांमुळे प्रवास करणे शक्य होणार नव्हते व दुसरे कारण म्हणजे श्रोते 2री ते 9वी पर्यंतच्या म्हणजे सात ते पंधरा वयोगटातील जवळपास पाचशे मुले होती. त्याच्यासमोर एकाचवेळी बोलणे हे एक आव्हान होते. मुख्याध्यापिका सौ. इप्सिता चौधरी यांनी स्वतः बऱ्याच जंगलांना भेट दिली होती हे समजल्यानंतर मला खरोखरच अतिशय आश्चर्य वाटले व या उपक्रमाविषयी त्या व इतर कर्मचारी अतिशय उत्साही होते. मी तुम्हाला सादरीकरणाविषयी सांगत बसणार नाही कारण तुम्ही ते लेखाच्या शेवटी दिलेल्या यूट्यूबच्या दुव्यावर तुम्ही ते पाहू शकता, परंतु या सादरीकरणानंतर जे प्रश्नोत्तराचे सत्र झाले तो या कार्यक्रमाचा सर्वात रोचक भाग होता. मुले (सगळीच्या सगळी) सादरीकरण शांतपणे व लक्ष देऊन ऐकत होती व पाहात होती (जी अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे). वाघांविषयी प्रश्न विचारण्यासाठी ती अतिशय उत्सुक होती व मी खरोखरच त्यातील काही प्रश्न ऐकून थक्क झालो. आपण अशाप्रकारे शिक्षणाद्वारेच शिकतो व मला असे वाटले ही प्रश्नोत्तरे जर लेखाच्या स्वरूपात दिली तर संवर्धनामध्ये लहान मुलांच्या बुद्धिची ताकद काय असू शकते याची जाणीव इतरांना करून देता येईल, चला तर मग ही प्रश्नोत्तर पाहू

१.      १. तुम्ही वाघ पाळू शकता का?

हा प्रश्न अतिशय नैसर्गीक होता व केवळ एक लहान मूलच असा प्रश्न गोड पण अवघड विचारू शकते. मी त्याला सांगितले की तुम्ही वाघ नक्कीच पाळू शकता, परंतु तुमचे तुमच्या पाळीव प्राण्यावर प्रेम असेल व त्याची काळजी असेल व तो आनंदी असावा असे तुम्हाला वाटत असेल, तर त्याला जे हवे आहे ते तुम्ही केले पाहिजे व वाघाला तर जंगलात राहावेसे वाटते म्हणुन तुम्ही वन अधिकारी म्हणून किंवा वन्यजीवनामध्ये करिअर घडवू शकता व त्यानंतर तुम्ही वाघ पाळू शकता म्हणजेच नेहमी त्यांच्यासोबत राहू शकता व त्यांचे रक्षण करून त्यांची काळजी घेऊ शकता!

१.    २. तुम्हाला वाघांच्या संवर्धनाची प्रेरणा कशी मिळाली?

यावर मी असे उत्तर दिले की मी विदर्भाचा आहे, जेथे फार पूर्वीपासून जंगले व वाघ दोन्ही अस्तित्वात आहेत, त्यामुळेच मला माझ्या सुदैवाने लहानपणापासूनच जंगलात वाघ पाहता आला व मी त्याच्या प्रेमातच पडलो. हे दृश्य असे असते की क्वचितच एखादा त्याच्या प्रेमात पडणार नाही व तुम्ही जे काही पाहता त्यातून तुम्हाला प्रेरणा मिळते. मलाही वाघांविषयीची प्रेरणा अशाचप्रकारे मिळाली व म्हणूनच जंगलात जाणे आवश्यक आहे, म्हणजे प्रेरणा मिळू शकेल!

३. ताडोबातील लोक वाघाला घाबरत नाहीत का, तो त्यांना खात नाही का?

हा प्रश्न थोडासा चक्रावून टाकणारा होता, आता जो तुम्हाला गट्टम करू शकतो अशा प्राण्यावर तुम्ही प्रेम करा हे तुम्ही कसे समजावून सांगणार? मी त्यांना सांगितले की औरंगाबादमध्ये दररोज दोन/तीन माणसे दुचाकी/चारचाकीच्या अपघातात मरण पावतात व पुण्यामध्ये हाच आकडा पाच ते सहा एवढा आहे. परंतु म्हणून आपण रस्त्यावर चालणे किंवा दुचाकी किंवा सायकल चालवणे थांबवतो का, तर त्याचे उत्तर नाही असे होते. मी त्यांना सांगितले की, ज्याप्रमाणे आपण व्यवस्थित काळजी घेतो व जगायला शिकतो, तेच आपण वाघांच्या बाबतीत करतो, आपण सुरक्षित अंतर ठेवले व जंगलाच्या नियमांचे पालन केले, तर आपल्याला वाघांची भीती बाळगळण्याचे कारण नाही, ताडोबातील लोक हे शिकले आहेत, म्हणुन त्यांना वाघाची भिती वाटत नाही.

४. तुम्ही वाघाचे वय कसे मोजता?

वाघांचे वय त्याच्या शरीरावरील पट्ट्यांवरून तसेच पावलांच्या ठशांवरून मोजले जाते व जंगलामध्ये सातत्याने निरीक्षण करून हे केले जाते!

. वाघीण जेव्हा दुसरा वाघ (नर) तिच्या बछड्यांना मारतो तेव्हा तिच्या बछड्यांसाठी लढत का नाही?

हा प्रश्न अतिशय मनोरंजक होता कारण मी त्यांना नर वाघ दुसऱ्या नर वाघांच्या बछड्यांना मारतो असे साधे सांगितले होते. मी उत्तर दिले की वाघीण ही अतिशय धाडसी आई असते, अगदी या मुलांच्या आईसारखीच, ती नर वाघ तिच्यापेक्षा मोठा व अधिक ताकदवान असूनही पूर्ण शक्तीनिशी त्याच्याशी लढते, परंतु तिला काहीवेळा स्वतःचा जीव वाचविण्यासाठी माघार घ्यावी लागते म्हणजे ती आणखी बछड्यांना जन्म देऊ शकेल!

. वाघ वेगाने का धावू शकत नाही?

मी त्यांना सांगितले होते की वाघाचे नशीब असेल तर तिसाहून अधिक प्रयत्न केल्यानंतर त्याला हरिण किंवा रानडुकराची शिकार करण्यात यश मिळते, त्यामुळे हा प्रश्न विचारण्यात आला. यावर मी म्हणालो, हे साधे-सरळ भौतिकशास्त्र आहे, जर वाघ वेगाने धावू शकत असता तर त्याचे वजन कमी असते, तर मग हरिण किंवा रानडुकराची शिकार करण्यासाठी लागणारी ताकद कुठून आली असती? म्हणूनच वाघाचे वजन जास्त असते व तो वेगाने धावू शकत नाही, अशाप्रकारे निसर्ग प्रत्येक प्रजातीची रचना एका विशिष्ट हेतूने करतो!”

. माया वाघीण आकाराने किती मोठी आहे?

इथे, मी जरा अडखळलो परंतु मी जरा तर्कसंगत विचार करून अंदाज बांधला व म्हणालो नाकापासून ते शेपटीपर्यंत जवळपास ११ फूट व वजन अंदाजे १७० किग्रॅ! (व माझा अंदाज जवळपास बरोबर होता)

. जंगलातल्या वाघांना नाव देणे बंधनकारक असते का?

मी माझ्या सादरीकरणामध्ये वाघांना दिलेल्या नावांचा उल्लेख करत असल्यामुळे उत्सुकतेपोटी हा प्रश्न विचारण्यात आला होता. मी त्यांना सांगितले की, वाघांची संख्या मोजण्यासाठी त्यांना टॅग लावणे आवश्यक असते, वन विभाग वाघांना टी१, टी१२ इत्यादी संख्यांनी ओळखतो, परंतु स्थानिक त्यांच्या सोयीनुसार किंवा एखाद्या गोष्टींशी त्यांच्या साधर्म्यानुसार त्यांना नावे देतात. उदाहरणार्थ एका नर वाघाला मटकासूर असे नाव देण्यात आले होते कारण त्याचे डोके मटक्यासारखे (माठासारखे) होते!

. वाघ सिंहांसारखे कळपात किंवा समूहात का राहात नाहीत?

हा खरोखर विचार करायला लावणारा प्रश्न होता व त्या लहान मुलाला माहिती नव्हते की हा वन्यजिवनाच्या सध्याच्या अभ्यासाचा विषय आहे कारण त्याचा संबंध वाघांच्या जगण्याच्या सहजप्रवृत्तीशी आहे. अर्थात मी त्यांना सांगितले की, प्रत्येक प्रजातीचा एक स्वभाव असतो व आपल्याकडे ज्याप्रकारची जंगले आहेत त्यामुळे वाघासारख्या मोठ्या प्राण्यांना तसे राहणे शक्य होत नाही. कोरड्या व उष्ण प्रदेशातील गवताळ भागासारख्या जंगलांमध्ये ते सोपे असते, त्यामुळे सिंह तशाप्रकारे राहतात!

१०. आपण वाघाला वाचवण्याचा प्रयत्न करत असलो तरीही ते आपली शिकारच करतात, आपल्याला त्यांचे रक्षण कसे करता येईल?

हा पुन्हा एकदा मूलभूत संवर्धनाविषयीची उत्सुकता, गैरसमजुती किंवा मिथकांवर आधारित प्रश्न होता. त्यावर मी उत्तर दिले की, वाघ माणसांची शिकार करतात हे चूक आहे, कारण अन्नासाठी आपण त्यांची पहिली पसंती नसतो, बहुतेकवेळा अपघाताने किंवा नैसर्गिक शिकार मिळविण्यात असमर्थ असल्यामुळे वाघ माणसांची शिकार करतो, जे त्यांना समजले!

११. जगामध्ये किती वाघ आहेत?

मी त्यांना सांगितले की, जंगलांमध्ये जवळपास पाच ते सहा हजार वाघ आहे परंतु तो एक अंदाज आहे. जंगलांचा प्रचंड विस्तार पाहता, तसेच वाघांची प्रगणना करण्यातील मर्यादा विचारात घेता त्यांची नेमकी संख्या सांगणे अवघड काम आहे. उदाहरणार्थ सैबेरियातील वाघाचा वावर १००० चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात असतो, त्यामुळे जगातील सर्व वाघ मोजणे जवळपास अशक्य काम आहे!

१२भारतामध्ये, कोणत्या राज्यात सर्वाधिक वाघ आहेत?

यावर, मी अंदाजे उत्तर दिले ज्यानुसार मध्यप्रदेशचा पहिला क्रमांक, महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक व त्यानंतर कर्नाटक व आंध्र-प्रदेशचा क्रमांक असल्याचे सांगितले.

१३. जर जुळे बछडे असतील व दोघेही दिसायला सारखे असतील तर तुम्ही त्यांना कसे ओळखाल व त्यांचे नामकरण कराल?

लहान मुलांनी त्यांच्या बालसुलभ स्वभावानुसार विचारलेला हा प्रश्न होता, ज्यावर आम्ही सगळेच हसलो, परंतु तो अतिशय मनापासून विचारलेला होता. मी त्यांना समजून सांगितले की बछडे मोठे होतात तसे त्यांच्या पट्ट्यांचे स्वरूप बदलत जाते, ज्याप्रमाणे माणसांची जुळी असली तरीही त्यांच्या बोटांचे ठसे वेगळे असतात, त्यामुळे आपण त्यांच्यात फरक करू शकतो!

१४. वाघाची छायाचित्रे कशी काढायची? तुम्ही छायाचित्रे काढत असताना वाघ तुम्हाला न्याहाळत असतो का?

मी त्यांना सांगितले की तुम्हाला वाघाचे छायाचित्र काढताना अतिशय संयम ठेवावा लागतो व जंगल तुम्हाला हेच शिकवते कारण तिथे सगळे काही वाघाच्या इच्छेनुसारच होते व हो तुम्ही वाघाची छायाचित्रे काढत असताना त्याला त्याची जाणीव असते व तुम्ही नेहमी त्याच्यापासून सुरक्षित अंतर ठेवून ती काढली तर वाघाची काही हरकत नसते!

१५. भविष्यात वाघ कसे जिवंत राहतील?

 एका दहा वर्षांच्या मुलाने विचारलेला हा प्रश्न सर्व प्रश्नांमधील सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता, त्यावर मी उत्तर दिले की मुलांनो त्यासाठीच आम्ही येथे आलो आहोत व तुम्ही सगळे या प्रश्नाचे उत्तर आहात. वाघ जिवंत राहण्यासाठी आमच्याकडे केवळ तुम्ही सगळे हेच एकमेव उत्तर आहात. तुम्हा सर्वांना वाघाचे महत्त्व समजले व त्यांचे नैसर्गिक स्वरूपात रक्षण केले पाहिजे असे तुम्हाला वाटले तरच वाघ जिवंत राहतील असा विश्वास मला वाटतो.

   असे उत्तर देऊन, मी सत्र संपवले परंतु त्यानंतरही जवळपास तीस एक विद्यार्थी हात उंचावून प्रश्न विचारण्यासाठी इच्छुक होते. मी मुख्याध्यापिका इप्सिता मॅडम यांना विनंती केली की त्यांचे प्रश्न नोंदवून घ्या व मला ईमेल करा व मी त्यांना उत्तर देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. मी त्यानंतर अतिशय आनंदाने व समाधानाने शाळेच्या परिसरातून बाहेर पडलो, वाघांच्या संवर्धनासाठी कदाचित सर्वात महत्त्वाचे साधन घेऊन, ते म्हणजे आशा

       मी पुण्याला परत आल्यानंतर, मला आणखी ईमेलद्वारे काही प्रश्न पाठवण्यात आले होते, जे शाळेच्या सूचना पेटीमध्ये जमा झाले होते, मी ते प्रश्न व त्यांना मी दिलेली उत्तरेदेखील येथे देत आहे…

* वाघावर संशोधन करणारी पहिली व्यक्ती कोण होती?

संस्कृती पवार (५वी अ)

अनौपचारिकपणे, श्री. जिम कॉर्बेट ही वाघांवर संशोधन करणारी पहिली व्यक्ती होती. त्यांनी जवळपास शंभरएक वर्षांपूर्वी हिमालयाच्या जंगलांमधील नरभक्षक वाघांची शिकार करण्याच्या त्यांच्या कामाच्या प्रक्रियेत वाघांचा अभ्यास केला. हा त्यांनी शैक्षणिक अभ्यास म्हणून केला नाही, परंतु त्यांनी वाघांचे निरीक्षण करताना जे काही अनुभवले त्या सर्वाची नोंद करून ठेवली. वाघांच्या वर्तनाचा विचार करता ती आजही खरी आहे. त्यानंतर डॉ. उल्हास कारंथ, डॉ. वाल्मिक थापर, श्री. राजेश गोपाल वगैरे लोकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वाघांचा अभ्यास केला व आता आपल्याला वाघांविषयी बरीच माहिती आहे, म्हणूनच आपण वाघांची संख्या वाढवू शकलो आहोत!

* केवळ वाघिणीच बछड्यांचे रक्षण का करतात?

(५वी क)

कारण तो वाघांचा स्वभाव आहे, निसर्गाने त्यांची रचनाच तशा प्रकारे केली आहे, ते कुटुंबासोबत राहात नसल्यामुळे जोपर्यंत बछडी स्वावलंबी होत नाहीत, कुणीतरी त्यांची काळजी घेणे आवश्यक असते व हे काम आई करते. ती काही महिन्यांची होईपर्यंत ती त्यांना दूध देते व त्यानंतर तिचे क्षेत्र नर वाघांच्या तुलनेत लहान असते, ज्यामुळे ती अधिक चांगल्याप्रकारे शिकार करू शकते. बछडी दोन वर्षे व त्याहून मोठी झाल्यानंतर वाघीणही बछड्यांना तिच्यासोबत ठेवत नाही व तिच्या क्षेत्रातून हुसकावून लावते!

* रॉयल बेंगाल वाघ व सैबेरियन वाघ यांच्यात काय फरक आहे?

(५वी अ)

रॉयल बेंगाल वाघ भारतात सापडतो व आकाराने लहान असतो. त्याचा साधारण पन्नास चौरस किलोमीटर क्षेत्रात वावर असतो. तर सैबेरियन वाघ आकाराने व ताकदीने मोठा असतो. त्याचे क्षेत्र पाचशे चौरस किलोमीटरपेक्षाही अधिक असते व बेंगाल वाघापेक्षा त्याचा रंग हलका असतो, ज्यामुळे तो बर्फाच्या पार्श्वभूमीमध्ये सहजपणे मिसळुन जाऊ शकू शकेल! सैबेरियाच्या वाघांचे डोके व जबडाही अधिक मोठा असतो, तसेच तेथील थंडीपासून संरक्षण करण्यासाठी अंगावर अधिक दाट केस असतात.

* जगभरात किती वाघ आहेत?

त्रिशा लाहोटी (५वी अ)

मी माझ्या व्याख्यानामध्ये जगभरात साधारण सात हजाराहून अधिक असतील किंवा असू शकतात असा उल्लेख केला होता व माझ्या माहितीप्रमाणे जगभरातील एकशे ऐंशी देशांपैकी केवळ आठ देशांमध्ये वाघ आढळतात, ज्यामध्ये रशिया, चीन, इंडोनेशिया, नेपाळ, भूतान, म्यानमार, बांग्लादेश व भारताचा समावेश होतो. मी म्हटल्याप्रमाणे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनही आपल्या देशातील सर्व वाघ मोजणे अतिशय अवघड असते, त्यामुळे नेमक्या आकडेवारीमध्ये दहा ते वीस टक्क्यांचा फरक असू शकतो.

* तुम्ही आयोजित करत असलेल्या सहलींना कसे येता येईल? 

तुम्ही जंगल बेल्सला त्यांच्या ईमेलवर तसेच दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करू शकता, junglebelles.pune@gmail.com / http://junglebelles.com  / ०७७५६०८१९२२

* सर्व वाघांचे अंदाजे वय किती असते?

विराज मोतिंगे (५वी क)

जंगलातील वाघांचे अंदाजे वय चौदा ते पंधरा वर्षे असते व पिंजऱ्यातील (म्हणजे प्राणी संग्रहालयातील) अठरा ते वीस वर्षे असते.

* काही लोक वाघ पाळतात, तर तो वाघ विकणाऱ्या विक्रेत्याचे वागणे चूक आहे की बरोबर?

शेख साद अहमद (५वी अ)

तुम्ही वाघाला पाळीव बनवू शकत नाही, कारण निसर्गतःच तो वन्य प्राणी आहे, अशी काही उदाहरणे आहेत म्हणजे थायलंडच्या बौद्ध मठांमध्ये पाळीव वाघ आहेत परंतु असे म्हणतात की त्यांना गुंगीची औषधे दिली जातात. आपल्या देशामध्ये वाघ पाळणे किंवा त्याला खाजगी मालकीत ठेवण्यास कायद्याने परवानगी नाही व तो गंभीर गुन्हा आहे.  

     तुम्ही संपूर्ण सादरीकरण प्रश्नोत्तरांसहित खालील यूट्यूब दुव्यावर पाहू शकता व इतर मुलांना जागरुक करण्यासाठी त्यांनाही सांगा…..

https://youtu.be/9XEor1L_VVY?si=CcvFbElB33K6YRsE   (presentataion)

https://youtu.be/CHeHr8rWyyM?si=ZxdbPQlvlhoivMj2     (Q & A)

 

संजय देशपांडे

smd156812@gmail.com