Friday 23 September 2011

अविस्मरणीय कोकण (Konkan, fogotten treasure! )



 
 
 
आपण सौंदर्य शोधण्यासाठी जगभर प्रवास केला, तरी ते आपण स्वतःपाशीच बाळगलं पाहिजे किंवा त्याचा शोध घेऊ नये.....राल्फ वॅल्डो इमर्शन

काही वेळा तुम्ही थोडे अनिच्छेने सुटीवर जाता आणि तो तुमच्यासाठी सर्वोत्तम विरंगुळा ठरतो, जो  भरपूर नियोजन करुनही मिळाला नसता! माझ्या बॅडमिंटनच्या ग्रूपसोबत नुकत्यात झालेल्या कोकण सहलीत मला असाच अनुभव आला. मी जंगलप्रेमी आहे आणि मला मोकळा वेळ मिळेल तेव्हा सुटीमध्ये बहुतेकवेळा जंगलात गेलो आहे. त्यामुळे जेव्हा कोकणाची सहल आयोजित करण्यात आली तेव्हा मी फारसा उत्सुक नव्हतो, कारण तिकडे काय बघायचं असा माझा दृष्टीकोन होता. मला मान्य आहे की माझ्या या प्रश्नावर बरेचजण नाक मुरडतील मात्र एका मद्याच्या जाहिरातीत विचारलेल्या हॅव आय मेड इट लार्ज या प्रश्नाप्रमाणे माझं मन प्रश्न विचारत होतं  खरोखरच तिथे जायलाच हवं का?" मात्र मला माझ्या अपेक्षेच्या उलट अतिशय चांगला अनुभव आला, तिथे केवळ एकदाच नाही तर पुन्हा पुन्हा भेट देण्यासारखे आहे, पण तिथल्या मूलभूत सोयी सुविधांविषयी मला वाईट वाटलं. सरकारी निरुत्साह, तसंच निसर्ग सौंदर्याच्या या खाणीकडे स्थानिक प्रशासनाच्या होणाऱ्या दुर्लक्षामुळे त्याला म्हणावी तशी चालना मिळत नाही!
आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये उतरलो होतो ते अलिबाग ते मुरुड या समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या रस्त्याला लागून होतं आणि ते इको-सॅव्ही (निसर्गास पूरक) असल्याचा दावा करतं. हा पूर्ण रस्ता किनाऱ्याला लागून आहे आणि या किनाऱ्यांना लागून असलेली सर्व संपत्ती खाजगी मालकीची आहे. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला सह्याद्रीच्या रांगा आणि दाट जंगल आहे. हिरवाईच्या विविध छटांमध्ये एका डोंगरावर हे रिसॉर्ट वसलेले आहे. इथल्या बहुतेक मालमत्ता खाजकी मालकीच्या असलेल्यामुळे त्या भागातल्या समुद्र किनाऱ्यांवर  सामान्य लोकांना जाता येत नाही. याचे फायदे तसेच तोटेही आहेत. फायदा म्हणजे हे समुद्र किनारे जनतेसाठी खुले नसल्याने ते तुलनेने बरेच स्वच्छ आहेत मात्र त्याचवेळी तोटा म्हणजे ते केवळ पाहुणे आणि पर्यटकांपुरतेच मर्यादित राहतात! पूर्ण सहलभर मी इको-टुरिझम आणि सरकारने त्याविषयी केलेल्या घोषणेविषयी कुठे काही बघायला मिळतंय का हे बघत होतो. कारण याविषयी वृत्तपत्रांमध्ये आणि प्रसिद्धीमाध्यमांमध्ये बरंच काही वाचलं होतं आणि पाहिलं होतं. पण दुर्दैवानं मला त्याची झलकही पहायला मिळाली नाही त्यामुळे इको-टुरिझमचा प्रयोग पाहणं तर लांबच राहिलं! आपण आपल्याकडे पर्यटन विभाग असल्याचं म्हणतो मात्र त्या विभागाविषयी पूर्ण आदर बाळगून मला असं सांगावसं वाटतं की ते कुठे कमी पडताहेत हे त्यांना माहिती नाही! सर्वात महत्वाची अडचण म्हणजे  रस्तांची वाईट परिस्थिती, पुणे ते अलिबाग-काशिद हा रस्ता १५०  किलोमीटरपेक्षा अधिक नसावा आणि तेवढं अंतर पार करायला आम्हाला साडेचार तासांहून अधिक वेळ लागला, आणि सतत गाडीचं काहीतरी नुकसान होईल ही टांगती तलवार होतीच. सुस्थितीतील रस्ते ही पर्यटनाची अतिशय मूलभूत आणि प्राथमिक गरज आहे हे आपण बहुतेक विसरले आहोत. जेव्हा लोकांनी आपल्याला भेट द्यावी असे आपल्याला वाटते तेव्हा त्यांचा तिथपर्यंतचा प्रवास सोपा आणि कमीत कमी त्रासाचा व्हावा, याचा इथे विचार झालेला दिसत नाही. तुम्हाला जिथे जायचे आहे त्या रस्ताचे मार्गदर्शन करणारे फलक दिसत नाहीत, तुम्ही त्या ठिकाणी काय काय पाहू शकाल याविषयी काहीही माहिती उपलब्ध नाही. तुम्हाला स्थानिकांचा सल्ला किंवा तिथे आधी जाऊन आलेल्या एखाद्या व्यक्तिचे मत यावरच अवलंबून रहावे लागते. आपण अशा प्रकारची माहिती व्यवस्थित नकाशासहित देणारी केंद्रं रस्त्यावर ठिकठिकाणी का सुरु करु शकत नाही? त्यामुळे पर्यटकांना होणारा बराचसा त्रास कमी होईल. युरोप किंवा अमेरिकेमध्ये रस्त्यावर ठिकठिकाणी प्रसाधनगृह, पेट्रोल पंप, उपहारगृह असतात, तशाच प्रकारे आपल्याकडे असावं अशी मी अपेक्षा करत नाही, मात्र किमान माहिती देणारी केंद्रं असणं आवश्यक आहे. पर्यटन खातं रस्तांच्या खराब स्थितीविषयी संबंधित खात्याला जाब का विचारत नाही आणि अशा परिस्थितीमुळे पर्यटक पुन्हा येत नाहीत त्यामुळे त्यांचा महसूल बुडत असल्याबद्दल त्यांना दोषी का धरत नाही, कारण एखाद्या ठिकाणी पोहोचायला उशीर झाल्याने साहजिकच पर्यटकाच्या मनात त्या ठिकाणाविषयी फारशी चांगली प्रतिमा निर्माण होत नाही!

रस्त्याला लागून असलेल्या काही विश्रामगृहांमध्ये एमटीडीसीशी (महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग) संलग्न असे फलक लावलेले दिसतात पण ते केवळ नाममात्र आहेत! त्याठिकाणी फोन किंवा आजूबाजूच्या प्रेक्षणीय स्थळांची यादी अशा मूलभूत सुविधाही नाहीत! स्वच्छतेकडे आपल्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही, मात्र पर्यटक पुन्हा पुन्हा आणि नियमितपणे यावेत असे वाटत असेल तर स्वच्छतेचा विशिष्ट दर्जा राखणे आवश्यक आहे. चांगले आणि स्वच्छ शौचायल ही अशा ठिकाणांची मूलभूत गरज आहे जिचा बऱ्याच ठिकाणी अभाव आहे. आजूबाजूच्या ठिकाणांविषयीच्या माहितीबाबतही अशीच परिस्थिती आहे, यजमानांनी त्याविषयी माहिती नसते, त्यामुळे ते पर्यटकांना मार्गदर्शन करु शकत नाहीत, त्यामुळे त्यांची  नकारात्मक प्रतिमा निर्माण होते.
या समुद्र किनाऱ्याला अतिशय उत्तम आणि घनदाट जंगल लाभलं आहे, कोकण यासाठीच प्रसिद्ध आहे. मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी की त्याची प्रसिद्धी होत नाही आणि वन व पर्यटन या सरकारी विभागांनी  याठिकाणच्या संधी शोधण्यासाठी काहीही केलेलं नाही. गोवा महामार्गावर असलेलं कर्नाळा पक्षी अभयारण्य वगळता पर्यटकांना याभागातील अभयारण्ये बघण्यासाठी कुठलीही सोय उपलब्ध नाही. वन आणि पर्यटन खात्याने एकत्रितपणे पर्यटकांना सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यामुळेच उत्पन्नात मोठी वाढ होईल, तसेच लोकांना समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या जंगलाची, त्यातील संपन्न जैवविविधतेची जाणीव होईल. मध्यप्रदेश, कर्नाटक किंवा उत्तरांचल या राज्यांनी कान्हा, बांदीपूर किंवा कॉर्बेट यासारख्या अभयारण्यामधून त्यांच्या वनसंपत्तीचे उत्तम प्रदर्शन केले आहे! आपल्याकडे इतकी नैसर्गिक संपन्नता असूनही आपण पर्यटकांसमोर त्याला व्यवस्थित सादर करु शकत नाही हे आपलं दुर्दैव आहे. पर्यटक ही ठिकाणे कशी पाहू शकतील याची माहिती कुठेही उपलब्ध नाही किंवा त्यांचा मागोवा घेण्यासाठीही काही पर्याय नाही. रस्त्याच्या एका बाजूला असलेली घनदाट हिरवाई आणि समुद्र किनाऱ्यावर घिरट्या मारणाऱ्या समुद्री गरुडाचे क्वचित होणारे दर्शन यावरच पर्यटकांना समाधान मानावे लागते. वनखात्याने पुढाकार घेऊन कोकणाला भेट देणाऱ्या सर्व पर्यटकांसाठी ही निसर्गसौंदर्याची खाण खुली केली पाहिजे म्हणजे त्यांनाही आजूबाजूच्या निसर्गाविषयी जाणून घेता येईल. हेच ठिकाण जर सिंगापूर किंवा मलेशियासारख्या देशामध्ये असतं तर त्याचं प्रसिद्ध पर्यटन ठिकाण करण्यासाठी त्यांनी किती प्रयत्न केले असते याची मी कल्पनाही करु शकत नाही!
दुसरी अतिशय दुःखी करणारी बाब म्हणजे पर्यटक स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि दारुच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या असा कचरा इथे टाकतात. बहुतेक स्थानिक प्रशासनांच्या पायाभूत सुविधा अतिशय कमकुवत आहेत आणि हा अतिरिक्त कचरा त्यांच्यावरचं ओझं आणखीनंच वाढवतो, त्यामुळे रस्त्याच्या कडेला तसेच सार्वजनिक समुद्र किनाऱ्यांवर प्रचंड कचरा साचतो. हे प्रसिद्ध पर्यटक ठिकाण आहे कारण आपल्या शहरी भागात आढळणार नाही असं स्वच्छ आणि शुद्ध निसर्ग सौंदर्य इथे आहे, त्यामुळे ते टिकवण्यासाठी आपण इथली स्वच्छता कायम राखली पाहिजे हे आपल्याला विसरुन चालणार नाही. आपण हे जर विसरलो तर आपण आपलीच नैसर्गिक संपत्ती नष्ट करु आणि मग आपल्याला सरकारवर चांगल्या मूलभूत सुविधा न पुरवल्याचा आरोप करण्याचा काही हक्क राहणार नाही! वॅल्डो इमर्सनने म्हटल्याप्रमाणे, निसर्ग आपल्याला जो आनंद देतो त्याबदल्यात काहीही मागत नाही, केवळ तो निसर्ग तसाच ठेवावा एवढीच अपेक्षा असते!


संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स
एन्व्हो-पॉवर समिती, सीआरईडीएआय, पुणे

संजीवनीची विचारसरणी जाणून घेण्यासाठी कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्या

संजीवनीची सामाजिक बाजू!
http://www.flickr.com/photos/16939159@N05/sets/72157626002106936/

शहराविषयीच्या तुमच्या कुठल्याही तक्रारींसाठी, खालील लिंकवर लॉग-ऑन करा
http://www.punecorporation.org/GRS/Complaint/LaunchComplaintCitizen.aspx

हिरवाईचा विचार करा, जीवनाचा विचार करा

www.sanjeevanideve.com

No comments:

Post a Comment