Monday 31 October 2011

एफ .एस. आय आणि शहर वाढ

 

प्रत्येक वस्तूची रचना करताना तिच्यापेक्षा मोठ्या वस्तूच्या संदर्भात तिचा विचार करावा- म्हणजे एखाद्या खोलीतील एक खुर्ची, एका घरातील एक खोली, वातावरणातील एक घर, शहराच्या योजनेतील वातावरण...... एलियल सारीनेन

पुणे मोठ मोठे कटआउट्स आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या अनावश्यक फलकांसाठी प्रसिद्ध आहे, अर्थात त्यातील काही फलक जनजागृतीसाठीही असतात, एफसी रस्त्यावरच्या अशाच एका फलकाने माझे लक्ष वेधून घेतले. त्यावर विकासक/अभियंत्यांच्या संघटनेची एक प्रश्नावली होती आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना काही प्रश्न विचारण्यात आले होते की शहरातील इमारतींचा एफएसआय वाढवणे योग्य आहे का आणि शहरातील पायाभूत सुविधा आधीच कमकुवत असताना आणि सध्याच्या लोकसंख्येसाठी अपुऱ्या असताना शहराची आणखी वाढ होऊ देणे योग्य आहे का. लोकसंख्या आणखी वाढू देणं, नव्या उद्योगांना तसंच विकासाला म्हणजेच नव्या इमारती होऊ देणं व्यवहार्य आहे का!
     व्यवसायाने अभियंता तसंच विकासक असल्यामुळे त्या फलकानं माझं लक्ष वेधून घेतलं आणि मी त्यावर विचार करु लागलो! शहर का व कसे वाढते? केवळ अतिरिक्त एफएसआय न देऊन आपण शहराची वाढ रोखू शकतो का? आपल्याला खरंच आपल्या शहरांची वाढ थांबवायची आहे का? मला असं वाटतं की तिसऱ्या प्रश्नामध्ये पहिल्या दोन प्रश्नांचं उत्तर दडलं आहे! आपल्याला या शहराची वाढ का थांबवायची आहे? एखादी रेल्वे जर खचाखच भरलेली असेल तर आणखी नवे  यात्रेकरु कुणालाच नको असतात! मात्र नव्या प्रवाशांना रोखण्याचा आपल्याला अधिकार आहे का, कारण काही काळापूर्वी आपणही रेल्वेमध्ये नवीन प्रवासीच होतो? एका मर्यादेनंतर कुठल्याच डब्यात जागा राहणार नाही आणि सर्वच प्रवाशांना त्रास होईल हे मान्य आहे. मात्र रेल्वेला आणखी डबे जोडले जाऊ शकतात किंवा पुढची गाडीही पकडता येते. मात्र पुणे शहरासाठी आपल्याला असा पर्याय आहे का? शहराकडे होणारे स्थलांतर हे काही नवीन नाही, शहरांमध्ये पायाभूत सुविधांची कमरता आहे मात्र लहान गावे आणि खेड्यांमध्ये त्यांचा अभाव आहे. एखाद्या गोष्टीचा अभाव असण्यासाठी तुमच्याकडे काहीतरी मूलभूत असलं पाहिजे मात्र अनेक गावांमध्ये मूलभूत सुविधाच नाहीत त्यामुळे अधिकाधिक लोक शहरात स्थलांतरित होत आहेत ज्यामुळे ही शहरं महानगरं बनताहेत! कुणीही आपलं मूळ ठिकाण इच्छेनं सोडत नाही, बहुतेक वेळा तो नाइलाजानं घेतलेला निर्णय असतो, सध्याचा महागाईचा दर बघता शहरातील जीवन गावातील जीवनापेक्षा जास्त महाग असतं हे तथ्य आहे. म्हणूनच एखादी व्यक्ती आपल्या गावातून, खेड्यातून बाहेर पडून शहरात का येते हा अभ्यासण्यासारखा प्रश्न आहे.
     लोक शहरात स्थलांतर करताहेत हे स्वीरल्यानंतर आपण त्यावर आळा कसा घालणार हा मुद्दा आहे? आपण इथे कुठल्या प्रकारची यंत्रणा विकसित केली आहे आणि ही यंत्रणा कार्यरत ठेवण्यासाठी कशाची गरज आहे याचा विचार करा? आपल्याकडे शहरासाठी विकासाच्या योजना आहेत आणि त्यामध्ये पुढील २० वर्षांचा विचार करण्यात आला आहे असे म्हटले जाते. हे जर खरे असेल तर मग शहरातील लोकसंख्या अतिशय वाढत असल्याबद्दल आपण का चिंता करत आहोत! विकास योजना तयार करताना याचा विचार नक्कीच करण्यात आला असेल, ज्यामध्ये या लोकसंख्येसाठी पायाभूत सुविधांचा समावेश आहे. आपण अतिशय संथपणे विकास योजना बनवतो आणि त्याहूनही संथपणे त्यांची अंमलबजावणी करतो. उदाहरणार्थ वाढीव पीएमसी मर्यादेच्या डीपीचे उदाहरण घ्या, त्याला गेल्या ७-८ वर्षात अजूनही मंजुरी मिळालेली नाही आणि प्रत्यक गट त्यावर आपलं रडगाणं गातोय! एक शहर म्हणून आपण जी योजना तयार केली आहे त्यालाच मंजुरी मिळवण्यात आपण अपयशी ठरलो आहोत आणि अतिरिक्त एफएसआय न देऊन आपण नवी वाढ रोखत आहोत.
     इथे एफएसआयची संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे, याचा अर्थ आहे चटई क्षेत्र निर्देशांक म्हणजे एखाद्या जमीनीवर तुम्ही किती बांधकाम करु शकता. पुणे शहरात तो सर्वसाधारणपणे १ आहे, म्हणजे आपण जमीनीएवढेच बांधकाम करु शकतो. गावठाणात म्हणजे जुन्या शहरात २ तर जिथे सध्या रहिवाशांची संख्या जास्त आहे तिथे तो २.३७५ पर्यंत आहे. वाड्यांसारख्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी तो कमी आहे. याशिवाय टीडीआरही दिला जो त्या जमीनीवरील एफएसआयच्या ०.६० पट असतो. मात्र प्रक्रियेतील विलंबामुळे टीडीआर ही बांधकाम व्यवसायातील दुर्मिळ बाब बनली आहे. या सगळ्या घटकांमुळे घरांच्या किंमतींवर कसा परिणाम होतो.
     हे शहर आधीच भविष्यातील महानगराप्रमाणे वाढले आहे आणि त्यामुळे आपल्या जीवनशैलीच्या मागण्याही वाढल्या आहेत. या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची आवश्यकता आहे आणि त्या मनुष्यबळाला राहण्यासाठी घरांची आवश्यकता असते. ज्या शहरामध्ये रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतात तिथे बांधकाम व्यवसायाची उलाढाल वाढते. पुण्यामध्ये माहिती तंत्रज्ञान, उत्पादन/ऑटो उद्योग, शिक्षण उद्योग आणि वेगाने वाढणारा सेवा उद्योग इत्यादी उद्योग आहे. हे सर्व उद्योग शहराची गरज आहेत कारण त्यामुळे शहरामध्ये हजारो लोकांना रोजगार मिळतो, या हजारो लोकांना घरांचीही गरज असते. ही घरे रास्त दरात, पाणी, सांडपाणी, वीज आणि दळणवळण अशा मूलभूत सुविधांसह मिळावीत अशी अपेक्षा असते. इथे आपण मनोरंजन, शिक्षण आणि वैद्यकीय अशा सांस्कृतिक तसंच सामाजिक सुविधांबद्दल विचारही करत नाही! आपण या पैलूकडे दुर्लक्ष करत आहोत आणि म्हणूनच लोक या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत की शहराची वाढच थांबवावी! सध्याच्या मागण्याच पूर्ण करता येत नसतील तर विस्तार करण्यात काय अर्थ आहे. तसं झालं तर आपण आपलाच घात करुन घेऊ असं माझं मत आहे. कारण विकास कामांसाठी आपल्याला पैसा हवा असतो आणि तो विकासामुळे विविध स्वरुपात महसूल म्हणून मिळणार आहे. आपण जुन्या संस्थांचा कर वाढवण्यासाठी काहीच करत नाही मग आपण जर नव्या उद्योगांवर प्रतिबंध घातला किंवा त्यावर बंधने घातली, आयटी पार्क किंवा बांधकाम थांबवले तर आपण पैसा कुठून उभारणार आहोत? पीएमसीच्या ताळेबंदातील बहुतेक आवक विकास शुल्क तसेच जकात कराद्वारे होते. आपण जर उत्पन्नाचा पर्यायी स्त्रोत शोधला तर काय होईल? मला असे वाटते उत्तर नाही असेल!
     शहराचा विकास होऊ दे आणि आपण त्यासाठी आजूबाजूच्या शहरांचे उदाहरण घेऊ, त्यांनी वाढत्या लोकसंख्येला कसे तोंड दिले हे पाहू. नागपूरपासून ते अहमदाबादपर्यंत अनेक उदाहरणे आहेत मात्र प्रश्न असा आहे की आपण खरोखरच अशा गोष्टींचा स्वीकार करायला तयार आहोत का? एकाच ठिकाणी जास्त लोकसंख्या वाढण्यामागे एफएसआय हा मुद्दा असल्यासारखे वाटते मात्र तो खरा गुन्हेगार नाही. उदा. हैदराबादमध्ये एफएसआयसारखी संकल्पनाच नाही, तुम्ही स्थानिक प्रशासनाला हप्ते देऊन, तसेच बांधकामाच्या दोन्ही बाजूंना जागा सोडणे, पार्किंग अशा नियमांचे पालन करुन तुम्हाला हवे तेवढे बांधकाम करु शकता आणि तरीही तिथे पायाभूत सुविधांविषयी समस्या नाहीत. तिथे घरांच्या किंमती नियंत्रणात असल्यामुळे अधिकाधिक कंपन्या त्या शहराचा पर्याय निवडत आहेत. इतरही अनेक शहरांनी एफएसआयबाबत उदार धोरण अवलंबले आहे आणि एफएसआय नियंत्रण असूनही आपल्याला जे प्रश्न भेडासवतात ते त्यांना नाहीत.
     मला वाटते व्यवस्थितपणे आणि वेळेत नियोजन करणे आणि नियोजनानंतर त्याची अंमलबजावणी करणे ही काळाची गरज आहे. वरील अवतरणात म्हटल्याप्रमाणे कुठले नियम/धोरणे आपला विकास थांबवतील किंवा कमी करतील हे ठरवण्यापूर्वी नियोजनाची संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. नाहीतर आपली अवस्था “शेखचिल्लीसारखी होईल, ज्याने तो ज्या फांदीवर बसला होता तीच कापली”!

संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स
एन्व्हो_पॉवर समिती, सीआरईडीएआय, पुणे
संजीवनीची विचारणी जाणून घेण्यासाठी कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्या!
संजीवनीची सामाजिक बाजू!




     
      


Friday 14 October 2011

आपले शहर आणि आपल्या विकास योजना



 
 
 
महान शहारांमध्ये, जागा तसंच ठिकाणं नियोजन करुन बांधलेली असतात: सार्वजनिक ठिकाणी चालणे, पाहणे, हा जेवढा त्या नियोजनाचा भाग किंवा हेतू आहे तेवढाच आत राहणे, खाणे, झोपणे, तुमच्या पादत्राण्यांची देशभाल करणे, प्रेम करणे किंवा संगीत ऐकणे हा देखील त्याचा भाग आहे. नागरिक या शब्दाचा संबंध शहरांशी आहे आणि आदर्श शहर नागरिकतेभोवती आणि सार्वजनिक जीवनातील सहभागाभोवती रचलेले असते.”… रिबेका सॉलनिट.

महान नियोजक रिबेका सॉलनिट यांनी केलेले हे आदर्श शहराचे वर्णन आहे. पण जेव्हा आपण आपल्या प्रिय शहराचे वर्णन करतो तेव्हा या विषयाचा विविध अंगांनी विचार करण्यात आला आहे का? वर्तमानपत्रामध्ये आपण डीपी (डेव्हलपमेंट) म्हणजे विकास नियोजन हा शब्द अनेक वेळा दिसतो त्यामुळे अगदी पाच वर्षांच्या मुलापासून ज्याने नुकतीच वाचायला सुरुवात केली आहे, ते वयोवृद्धापर्यंत जो आता वाचन थांबवण्याच्या बेतात आहे त्या सगळ्यांना डीपी शब्द माहिती असतो! मात्र त्यापैकी किती जणांना त्याचा खरा अर्थ किंवा त्यामागचे कारण कळाले आहे? कुठल्याही शहरासाठी डीपी हा शब्द अतिशय महत्वाचा आहे कारण तो शहराचे भविष्य ठरवणार आहे. आता बरेच जण म्हणतील त्यात काय मोठसं, आपलं पुणे शहर कुठलंही विकास नियोजन नसताना भरभराटीला आलं नाही का, अशा सुविधा नसतानाही आयटी किंवा ऑटोमोबाईल कंपन्या इथे येणं थांबणार आहे का? उत्तर आहे हो!  ते लगेच थांबणार नाही मात्र शहराच्या विकासाची व्यवस्थित योजना नसताना, शहर अतिरिक्त भार सहन करु शकणार नाही आणि सांडपाणी, पाणी, रस्ते यावर अतिरिक्त ताण पडल्याने ही व्यवस्था कोलमडून पडेल! यापैकी रस्त्यावरील वाढलेल्या वाहनांसारख्या अनेक बाबींचा आपल्याच आधीच अनुभव येत आहे. आपण कितीही मोठे रस्ते बांधले तरीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे नियोजन केले नाही आणि शहराचा विकास नियोजित पद्धतीने केला नाही तर खाजगी वाहनांसाठी रस्ते कधीही पुरेसे पडणार नाहीत! व्यवस्थित डीपी नसण्याचा आणि त्याचवेळी त्याची अंमलबजावणी न करण्याचा हा परिणाम आहे.
विकास नियोजन हे शहराचे भविष्य दाखवणाऱ्या आरशासारखे असते आणि त्यासाठी तुम्ही केवळ पीएमसीलाच दोष देऊ शकत नाही, कारण डीपी ही बहुआयामी बाब आहे. यामध्ये समजातील प्रत्यक घटकाचा समावेश असतो आणि त्याने योगदान देणे अपेक्षित असते. इथे मी तुम्हाला साधे उदाहरण देईन, काही वर्षांपूर्वी पीएमसीने पावसाच्या पाण्याच्या जलसंधारणाचे धोरण जाहीर केले आणि त्यासाठी सार्वजनिक सूचना मागवल्या . तुम्ही विचार करु शकता का, केवळ एक सूचना आली आणि ती सुद्धा क्रेडेई म्हणजेच तेव्हाच्या पीबीएपीकडून, जी पुण्याच्या बांधकाम व्यावसायिकांची संघटना होती! यातून सामान्य माणसाला या महत्वाच्या विषयाबद्दल फारसे काहीच माहिती नाही हे दिसून येते आणि शहरातील निकृष्ट राहणीमानाविषयी आपण एकमेकांना दोष देतो! सामान्य माणसाला याविषयी माहिती नसल्याबद्दल मी दोष देत नाही कारण त्यांना त्याविषयी कधीही माहिती देण्यात आलेली नाही! हे यंत्रणेचे अपयश आहे कारण विकास नियोजन करण्याची प्रक्रिया अधिक खुली करुन त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना समाविष्ट करुन घेणे हे तिचे प्रमुख काम आहे. अनेक स्वयंसेवी संस्था याविषयी जागरुक आहेत, ही सकारात्मक बाब आहे आणि डोंगर आणि बीडीपी आरक्षणाच्याबाबतीत आपण त्याचा परिणाम पाहिला आहे, आपल्या सार्वजनिक परिवहनाच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे. मात्र विकास योजना म्हणजे डोंगर, रस्ते, सांडपाणी आणि पाणी याबाबतीतच असते का?

इथेच समस्येचा केंद्रबिंदू आहे; वरील अवतरणात शहराचे किती पैलू असतात ज्याच्या वैशिष्ट्यांमुळे ते शहर चांगले आहे किंवा वाईट आहे हे ठरवले जाते आणि आपण शहराच्या दर्जाच्या बाबतीत कुठे आहोत किंवा केवळ शहराचे काही पैलूच चांगले आहेत हे समजून घेण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे हे सांगितले आहे.  जेव्हा आपण म्हणतो पुणे वाढत आहे आणि ती भविष्यातील देशाची आयटी किंवा शैक्षणिक राजधानी होईल तेव्हा ते शहराच्या प्रत्येक आघाडीवर दिसून यायला हवे, त्यानंतरच आपल्याला स्वतःचा अभिमान वाटेल.

हिरवळ आणि सुरक्षिततेसोबत शहरामध्ये चांगल्या पायाभूत सुविधा हव्यात ज्यामुळे ते राहण्यासाठी एक चांगले शहर होईल. अशा सर्व गोष्टींचा विकास नियोजन करताना विचार होणे आणि नंतर त्यांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. यापैकी काही मुद्द्यांवर आपण इथे चर्चा करणार आहोत आणि केवळ पुणेच नाही तर कुठलेही गाव, शहर किंवा महानगराचा विचार करतांना या विषयांचा विचार होणे आवश्यक आहे. रस्त्यांचे जाळे, पाणी किंवा डोंगर अशा महत्वाच्या विषयांशिवाय आपण पाच मूलभूत गोष्टींचा विचार करु आणि त्या आहेत खाजगी बस स्थानक, कचरापेट्या, सार्वजनिक शौचालये, माहिती केंद्रे आणि फटाक्याची दुकाने किंवा अगदी गणपती अथवा इतर सणांसाठी घातलेले मंडप अशी मोसमी केंद्रे!

शहराला उद्योगांसाठी कामगारांना घरापासून कामाच्या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या खाजगी वाहनांची जुनी परंपरा आहे. टेल्को, बजाज यांनी सर्वप्रथम अशी सेवा सुरु केली आणि अनेक कॉल सेंटर्सपासून ते आयटी उद्योग आणि शाळेच्या बस अशी ही समांतर वाहतूक व्यवस्था आहे जी खाजगी तत्वावर चालवली जाते. मात्र त्यासाठी कुठलेही निश्चित थांबे किंवा प्रवाशांना घेण्यासाठी स्थानक नाही. याचा परिणाम म्हणून या बस कुठेही रस्त्यात मध्येच थांबतात त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होते. या वाहनांचे पार्किंग ही सुद्धा एक समस्या आहे. विकास नियोजनामध्ये त्यांचे महत्व लक्षात घेऊन त्यांचा विचार करणे आणि त्यांचा समावेश करुन घेणे आवश्यक आहे.

त्यानंतर येतात कचरापेट्या, कुठल्या ना कुठल्या स्वरुपात कचरा निर्माण करण्यामध्ये आपल्या सगळ्यांचाच सहभाग असतो मात्र कुणालाच त्यांच्या आवारात कचरापेटी नको असते. त्याचे कारण स्वाभाविक आहे ज्या पद्धतीने त्यांचे व्यवस्थापन केले जाते, त्यामुळेच बहुतेक कचरापेटया रस्त्यावर असतात किंवा पदपदाथाची जागा अडवतात. हे दृष्य आपण आजच नाही तर अनेक वर्षांपासून पाहतोय आणि कचरापेट्यांसाठी योग्य जागा शोधण्याची आणि या कचरापेट्या त्रासदायक न बनता त्या ज्यासाठी बसवण्यात आल्या आहेत तो हेतू पूर्ण होईल हे पाहण्यासाठी एक यंत्रणा बसवण्याची तीव्र गरज आहे. यासाठी आपण भूतकाळातील चुकांपासून शिकून त्यांचे नियोजन योग्य पद्धतीने करु शकतो.

केवळ महिलांसाठीच्याच नाही तर पुरुषांसाठीच्या सार्वजनिक शौचालयांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. अतिशय निकड असेल तेव्हाच शहाणा माणूस या अशा दर्जाच्या सुविधा वापरेल आणि इथेच या यंत्रणेचे अपयश आहे. त्यांची चुकीची रचना आणि खराब देखभाल यामुळे लोकांना त्यांच्या जवळपास ती नको असतात. आपण याबाबतीत जरा चाकोरीबाहेर विचार केला पाहिजे. दुबईमध्ये रेस्तराँ किंवा दुकान अशा प्रत्येक व्यावसायिक उपक्रमासाठी मग ते कितीही लहान असेल तरीही शौचालयाची सुविधा असणे आवश्यक आहे आणि ती सर्वांसाठी खुली असते. यामुळे जागा वाचते आणि सार्वजनिक शौचालयांच्या देखभालीचा खर्च वाचतो. आपल्याकडच्या लोकसंख्येचा विचार करता हे आवश्यक आहे हे मान्य आहे मात्र ४ कोटींची लोकसंख्या असताना सार्वजनिक शौचालये किती आहेत याचा आपण विचार करायला हवा, हे गंभीर आहे, प्रत्येक शहराने आपल्या नागरिकांना देणे आवश्यक असलेल्या चांगल्या नागरी पायाभूत सुविधांमध्ये हा महत्वाचा घटक आहे.

तुम्ही कधीही सिंगापूरला गेलात तर आकर्षक रंगाची, स्वच्छ आणि स्वागत करणारी माहिती केंद्र ठिकठकाणी दिसतात जी पर्यटकांना किंवा अगदी नागरिकांनाही शहराविषयी आणि त्यांच्या सेवांविषयी आवश्यक असलेली माहिती देतात. काही दिवसांपूर्वी स्थानिक प्रशासनाने काही प्रमुख रस्त्यांवर अशी माहिती केंद्र उभारली मात्र ती दोन बाबतीत  अपयशी ठरली एक म्हणजे त्यांची संख्या अतिशय कमी होती आणि दुसरे म्हणजे ते भेट देणाऱ्यांना देत असलेल्या सुविधा. बहुतेक ठिकाणी पुरेसे कर्मचारी नव्हते किंवा साधने नव्हती आणि त्या केंद्रांमध्ये बाहेरच्या व्यक्तिला किंवा भेट देणाऱ्याला हवी असलेली माहिती नव्हती. तिथे इंटरनेट आणि शहरातील महत्वाच्या ठिकाणांबद्दल सर्व माहिती हवी विक्रीसाठीचे नकाशे व्यवस्थित मांडून ठेवलेले पाहिजेत, या केंद्रांवरही आपण शौचालयाची तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा देऊ शकतो. विकास योजनेमध्ये शहरात सर्वत्र अशा केंद्रांची सोय हवी.

पुणे हे अतिशय सामाजिक आणि सांस्कृतिक शहर आहे आणि हाच या शहराचा कणा आहे! याच कारणामुळे शहरात वर्षभर विविध सार्वजनिक उपक्रम होत असतात मग तो गणेशोत्सव असो, रमझान , दुर्गापूजा किंवा श्रावणातली पुंढरपूरची वारी, सर्व सणांना अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. गणपतीचे दिवस आले की त्यांचे मंडप आणि त्यामुळे रस्तावरील लोकांना होणारा त्रास यावर चर्चा सुरु होते. दिवाळीच्या फटाक्यांच्या दुकानांच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे, ही दुकाने पदपदावर आणि रस्त्यांवर दसऱ्यापासूनच अतिक्रमण करतात. आता अनेक वर्षांच्या अनुभवातून आपल्याला ही दुकाने काही काळासाठी उभारली जातात हे माहिती आहे मग आपण त्यांना कायमची एक जागा का देत नाही त्यामुळे त्यांना त्याची जागा निश्चित करण्यात अडचण येणार नाही आणि दरवर्षी हा त्रास होणार नाही? प्रत्येक वर्षी शेकडो दुकाने म्हात्रे पुलाजवळच्या नदीजवळच्या रस्त्यावर थाटली जातात, यामुळे केवळ या रस्त्यावर प्रवास करणेच अवघड होत नाही तर सुरक्षिततेच्या दृष्टीने फटाक्यांसारखे स्फोटक पदार्थ उघड्या रस्त्यावर विकणे धोकादायक आहे!

असे अनेक लहान मुद्दे जेव्हा आपण एकत्र मांडतो तेव्हा त्यांची एक मोठी समस्या बनते आणि इथेच नियोजनाची भूमिका महत्वाची असते म्हणजे लहान समस्यांचा आधी विचार करुन त्यांना अधिक मोठे बनू न देणे आवश्यक असते. असे झाले तरच आपले भविष्य आनंदी आणि आरोग्यपूर्ण असेल. शहरासोबतच लोकसंख्या वाढतेय आणि समस्याही आणखी वाढत जातील म्हणूनच विकास नियोजन शहरासाठीच नाही तर शहरातील प्रत्येक नागरिकासाठी महत्वाचे आहे. म्हणूनच आपण याबाबतीत जागरुक होऊन आपले मत व्यक्त केले पाहिजे. तरच आपल्याला आदर्श नागरिक असल्याचा, आपल्या शहराचा अभिमान वाटेल.

संजय देशपांडे

संजीवनी डेव्हलपर्स
एन्व्हो-पॉवर समिती, सीआरईडीएआय, पुणे

संजीवनीची विचारसरणी जाणून घेण्यासाठी कृपया माझ्या ब्लॉगला भेट द्या!

संजीवनीची सामाजिक बाजू!
http://www.flickr.com/photos/16939159@N05/sets/72157626002106936/

शहराविषयीच्या तुमच्या कुठल्याही तक्रारींसाठी, खालील लिंकवर लॉग-ऑन करा
http://www.punecorporation.org/GRS/Complaint/LaunchComplaintCitizen.aspx

हिरवाईचा विचार करा, जीवनाचा विचार करा

www.sanjeevanideve.com