Sunday 25 August 2013

गुन्हा आणि शहर !




















शक्तिशाली लोकांसाठी, इतर करतात ते गुन्हे असतात.”...नोआम चॉमस्की

या अमेरिकी भाषातज्ञ, तत्वज्ञ, कार्यकर्ता व बहुआयामी व्यक्तिमत्वाचे हे शब्द आपल्या सध्याच्या परिस्थितीला किती चपखलपणे लागू होतात! आपले शहर एकेकाळी निवृत्तवेतनधारकांचा स्वर्ग होता, ते दिवस आता सरले आहेत! हे शहर कुणालाही कोणलाही भुरळ पाडणारे होते, इथले सुरक्षित वातावरण तसेच संस्कृती यामुळे लोक या शहरावर प्रेम करायचे. इथे संस्कृती, आदर, शांतता या शब्दांची जागा पैसा, वाढ, समृद्धी या शब्दांनी कशी घेतली हे पाहणे खरोखर आवश्यक आहे! देशातील इतर महानगरांप्रमाणेच पुण्याचीही सर्वच पातळ्यांवर झपाट्याने वाढ झाली मात्र ही वाढ संस्कृती, आदर किंवा शांतता या तीन घटकांच्या बाबतीत झाली नाही. हे सर्वकाही केवळ वीस वर्षांच्या म्हणजे १९९०-२०१० या कालावधीत झाले आहे व या आघाड्यांवरील अधःपतन अधिकाधिक ठळक होत आहे. एकीकडे आपली प्रगती दाखविणारे मॉल, आयटी पार्क, मोठी निवासी संकुले, मल्टीप्लेक्स, शैक्षणिक संस्था आहेत व त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. दुसरीकडे आपल्या वृत्तपत्रांमध्ये सर्व प्रकारच्या गुन्हांच्या बातम्या दिसतात, त्यामध्ये बॉम्बस्फोट, खून, दरोडा, वाहनांमुळे रस्त्यांवर होणारे अपघात, बलात्कार अशा अनेक बातम्या असतात! सोन्याची साखळी खेचण्यासारखे गुन्हे तर नेहमीचे झाले आहेत, त्यामुळे आपल्याला त्याविषयी काही वाटतच नाही. प्रत्येक पोलीस प्रमुख आजकाल मनुष्यबळाची कमतरता, पोलिसांकडील अपुरी साधने व पोलीस दलाकडे पायाभूत सुविधांची कमतरता अशा समस्यांचे रडगाणे गात असतो. रस्त्यांवर विविध ठिकाणी लावलेल्या कॅमे-याद्वारे घेण्यात आलेली लाखो चित्रे पाहून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई करण्याबाबत संबंधित अधिका-यांमध्ये चाललेला वाद आपण पाहिला आहे! सरकारमधील कोणत्याही वरिष्ठ अधिका-यांनी या गंभीर प्रश्नाबाबत काहीही पावले उचलेली नाहीत, जो थेट शहराच्या सुरक्षेशी निगडित आहे!
आपण प्रत्येक नेत्याची आश्वासने ऐकतो की संपूर्ण शहरात सीसी टीव्ही कॅमेरे लावू, मात्र त्यानंतर त्यासाठी किती पैसे द्यायचे व त्याच्या निविदेविषयी कोण निर्णय घेईल हे ठरविण्यात अनेक वर्षे जातात! हे सर्व नवीन नाही, देशातील प्रत्येक महानगराची हीच कहाणी आहे. मात्र राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या शहराची अशी गत झाल्यानंतर सुरक्षा व शांतता या जीवनाच्या मूलभूत घटकांबाबत चिंता निर्माण होते. जेव्हा बाँबस्फोटांसारख्या पार्श्वभूमीवर आपले शासनकर्ते अशाप्रकारची आश्वासने देतात व ती पूर्ण करीत नाहीत तेव्हा ती फसवणूक होत नाही का, जो एक गुन्हाच आहे!
वर नमूद केल्याप्रमाणे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे, साखळी खेचणे, घरफोडी, रस्त्यावरील टोळ्यांमध्ये होणा-या चकमकी व खून या शहरासाठी नेहमीच्या बाबी झाल्या आहेत. मात्र जेव्हा भाडोत्री मारेकरु समाजातील प्रतिष्ठित व्यक्तिची हत्या करतात तेव्हा आपल्या संपूर्ण यंत्रणेचा व शहराच्या भवितव्याचा विचार करायची वेळ खरोखर आली आहे असे जाणवते! आपल्या शहरासाठी ही घटनादेखील नवीन नाही कारण मेजर जनरल वैद्य यांची सुमारे २५ वर्षांपूर्वी अशाचप्रकारे रस्त्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती, मात्र ते एक दहशतवादी कृत्य होते. श्री दाभोलकरांच्या बाबतीत जे झाले ते समजासाठी अतिशय धक्कादायक आहे कारण ते दहशतवादाचा बळी ठरलेले नाहीत तर राज्यातील किंबहुना शहरातीलच एखाद्या गटाने त्यांना मारले असण्याची शक्यता आहे! दाभोलकर सरांच्या दुःखद अंताविषयी थोडेसे बोलले पाहिजे...
इथे कुठेतरी यंत्रणाही जबाबदार आहे, ज्यामध्ये अशा घटना सहजपणे होऊ शकतात. आज दाभोलकर सरांची हत्या झाली उद्या त्याजागी दुस-या कुणाची हत्या होऊ शकते. ज्या व्यक्ती आपली मते माध्यमांद्वारे स्पष्टपणे मांडतात त्यांच्या चेह-याला काळे फासणे, भांडारकर संस्थेत काही वर्षापूर्वी करण्यात आलेली मोडतोड, किंवा राजकीय कार्यकर्त्यांनी एखाद्या महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांच्या कार्यालयात धुडगूस घालण्यासारखे सत्ता केंद्रांद्वारे केले जाणारे अनेक गुन्हे घडतात! हे सर्व काय दर्शवतात? पोलीस स्वतःहून अगदी लहानसहान राजकीय नेत्याला स्वतःहून संरक्षण देतात, मग श्री. दाभोलकरांच्या जीवाला धोका होता तरीही त्यांना संरक्षण का देण्यात आले नाही? पोलिसांना त्यांचा निर्णय योग्य होता असे वाटत असेल तर मग या हत्येच्या पार्श्वभूमीवर अचानक काही सामाजिक कार्यकर्त्यांना संरक्षण का देण्यात आले आहे? पोलिसांना हा धोका आधी का ओळखता आला नाही व सर्वात महत्वाचे म्हणजे जेव्हा दाभोलकरांना सुरक्षा देण्यात आली नव्हती व त्यांची हत्या झाली तेव्हा हे सगळे मी दाभोलकर आहे अशा टोप्या घातलेले तथाकथित कार्यकर्ते कुठे होते? श्री. दाभोलकरांना सुरक्षा देण्यासाठी अशी निदर्शने का करण्यात आली नाहीत, ज्यामुळे कदाचित त्यांचा जीव वाचला असता?  या घटनेचे माध्यमांमध्ये अनेक पडसाद उमटतील पुणे बंद वगैरे करुन निषेध केला जाईल मात्र प्रत्येक वेळी अशा कृत्यांमागील खरे गुन्हेगार, तसेच अशी कृत्ये करणा-या मारेक-यांना लवकरात लवकर अटक होत नाही व त्यांना जास्तीत जास्त कडक शिक्षा होत नाही तोपर्यंत अशा दाभोलकर सरांसारख्या लोकांचा नाहक जीव जाईल!
दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या, समाजातील सधन व निर्धन लोकांमधील वाढती दरी यामुळे अधिक लोक गुन्ह्यांकडे वळत आहेत व पोलीस प्रत्येकाला सुरक्षा देऊ शकत नाहीत ही वस्तुस्थिती असल्याचे मान्य आहे. आपण स्वतःही आपल्या सुरक्षेबाबत अतिशय निष्काळजी असतो, हे वारंवार दिसून आले आहे. गृहसंकुलातील निवासी त्यांच्या घराच्या सजावटीवर हजारो रुपये खर्च करतील मात्र प्रवेशद्वारापाशी किंवा सामाईक जागेत सुरक्षा कॅमेरे बसविणार नाहीत. ते चोवीस तासांच्या चांगल्या सुरक्षा सेवेसाठीही पैसे देत नाहीत, ही सगळी सरकारची किंवा पोलिसांची जबाबदारी असल्याचे त्यांना वाटते! सुरक्षेच्या बाबतीत आपण अतिशय निष्काळजी असतो व आपल्याला कोणताही त्रास न होता सुरक्षेची जबाबदारी कुणीतरी घ्यावी असे आपल्याला वाटते. एफसी रस्त्यावर पार्किंगला मनाई करण्यात आल्याविरुद्ध निदर्शने करण्यात आली हे त्याचे एक उदाहरण आहे. पार्किंगसाठी पर्यायी सोय असली पाहिजे हे मान्य आहे मात्र इतर ठिकाणी जाणा-यांची सुरक्षा सर्वात महत्वाची आहे जे बाँबस्फोटासारख्या घटनांचे संभाव्य लक्ष्य असू शकतात! अशा घटनांना आपली प्रतिक्रिया हा देखील चिंतेचा विषय आहे, बरेचजण गुन्हा झालेल्या ठिकाणांची छायाचित्रे काढण्यात व ती सोशल मीडियावर टाकण्यात गुंतलेले असतात, असे करणे अवैध असल्याचेही त्यांच्या लक्षात येत नाही. केवळ गुन्हेगार हीच समस्या नाही तर आपण गुन्ह्याला ज्या प्रकारे प्रतिकार करतो ती देखील एक समस्या आहे. आपण एखादी दुर्घटना घडल्यानंतर जागे होतो व ते देखील अगदी अल्पावधीसाठी! दिवसेंदिवस कायद्याचा धाक कमी होत चालला आहे, मग येथे पार्किंग करु नये असे लिहीलेल्या फलकाखालीच गाडी लावणे असो किंवा काही रुपयांसाठी कुणाला मारण्याची सुपारी घेणे असो, कायदा आपल्या हातात आहे ही मानसिकताच समाजासाठी घातक आहे! त्यास वेळीच आळा घातला नाही तर आपण केवळ अशा कृत्यांचा निषेधच करत राहू, जी एक नेहमीची बाब होईल. वरील अवतरणात म्हटल्याप्रमाणे जे शासनकर्ते कायद्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करत आहेत व केवळ आपली खुर्ची सुरक्षित ठेवण्यात गुंतलेले आहेत त्यांच्या कृत्यांचा भस्मासूर एकदिवस त्यांनाच गिळंकृत करुन टाकेल, मात्र तोपर्यंत सर्वांसाठीच फार उशीर झालेला असेल. कोणत्याही शहराचे यश ते शहर नागरिकांसाठी किती सुरक्षित व शांत आहे यावर अवलंबून असते व ते शहराच्या संस्कृतीद्वारेच ठरते. सामान्य माणसासाठी हे शहर सुरक्षित करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे, आपण वेळीच कृती केली नाही तर आपले काहीही भविष्य नसेल!
https://mail.google.com/mail/u/0/images/cleardot.gif

संजय देशपांडे


संजीवनी डेव्हलपर्स






No comments:

Post a Comment