Sunday 18 May 2014

हर जंगल कुछ कहता है !














































मी जेव्हा प्राण्यांचा डोळ्यात पाहतो तेव्हा मला प्राणी दिसत नाहीत, मी एक सजीव, एक मित्र पाहतो व मला त्या डोळ्यात एक आत्मा जाणवतो... ए.डी.विल्यम्स.

कुणाही वन्यजीव प्रेमीचे या महान लेखकाच्या शब्दांविषयी दुमत नसेल! दरवेळी जंगल तेच असले तरी गोष्ट वेगळी असते, इतकी जबरदस्त ताकद जंगलांमध्ये आहे! या गोष्टींमुळेच मला जेव्हा कधी संधी मिळते तेव्हा माझे पाय आपोआप जंगलाकडे खेचले जातात. आपल्या आयुष्यात संधी नेहमीच अवचित येतात केवळ आपण तो क्षण साधण्यासाठी सतत तयार असले पाहिजे! मलाही अलिकडेच काही वन्यप्रेमींसोबत पेंच व ताडोबाच्या जंगलांमध्ये जाण्याची संधी मिळाली. त्यावेळी माझ्यासोबत किर्लोस्कर उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा श्री. अतुल किर्लोस्कर, वन्यजीव तज्ञ किरण पुरंदरे, अनुज खरे, वन अधिकारी राजेंद्र कदम, देशातील सर्वोत्तम वन्यजीव छायाचित्रकारांपैकी एक विक्रम पोद्दार असे सर्वजण होते! किलोस्कर उद्योग समूह पर्यावरणाविषयक संवेदनशीलतेविषयी ओळखला जातो. पेंच जंगल व नेचर वॉक चालविणा-या अनुज यांनी या समूहाच्या व्यवस्थापकीय संचालकांसाठी मध्यप्रदेशातील पेंच येथील भेट आयोजित केली होती, ज्याद्वारे वनविभागाला काही मदत होऊ शकेल. कोणताही व्याघ्र प्रकल्प चालविणे महाकाय काम आहे. अनेकांना असे वाटते की ते प्राणिसंग्रहालय चालविण्यासारखे आहे मात्र ते अजिबात खरे नाही. व्याघ्र प्रकल्प हा जंगलाचा संरक्षित भाग असतो, मात्र या संरक्षणाला कोणत्याही प्रत्यक्ष सीमा नसतात, या सीमा केवळ कागदी नकाशांवरच असतात. प्राण्यांना कोणत्याही सीमा माहिती नसतात व मनुष्य-प्राण्यांमधला संघर्ष अभयारण्यासाठी सर्वात मोठा धोका आहे.  आम्ही एकप्रकारे पेंच राष्ट्रीय अभयारण्याचे पाहुणे होतो व वनविभागाच्या विश्रामगृहात राहात होतो, तिथे मोबाईलचे नेटवर्क किंवा वृत्तपत्रे किंवा दूरचित्रवाहिन्या असा बाह्य जगाशी काहीएक संबंध नव्हता, तो जंगलाचा खराखुरा अनुभव होता! अभयारण्याचे क्षेत्र संचालक श्री आलोक कुमार यांनी आम्हाला अभयारण्याची प्रशासकीय बाजू दाखविण्यामध्ये अतिशय स्वारस्य दाखविले. यावेळी वनविभागाच्या चमूशी अतिशय चांगला संवाद झाला यामध्ये श्री. जोशी, अभयारण्याचे एसपी, श्री. तैवाडे, गेम रेंजर व श्री. तिवारी उप रेंजर यांचा समावेश होता. त्यांनी आम्हाला अभयारण्याचा विस्तार, त्यातील व आजूबाजूच्या परिसरातील वनस्पती व प्राणी, त्यांच्या समस्या व त्या सोडविण्यासाठी वनविभागाने केलेले प्रयत्न याविषयी सविस्तर सादरीकरण दिले! यातील मुख्य समस्या म्हणजे अभयारण्यातील हरिणांची संख्या जवळपास ५०,००० आहे जे वाघासारख्या प्राण्यांचे भक्ष्य असतात मात्र या हरिणांसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर गवतही लागते. त्यांच्यासाठी कुरणे तयार करणे हे एक मोठे काम आहे.

यावेळी आम्हाला एका वाघिणीला पेंचहून पन्ना अभयारण्यामध्ये हलविण्याविषयी अतिशय रोचक गोष्ट ऐकायला मिळाली. करमाझीरीर गावातल्या लोकांना त्या वाघिणीची अतिशय सवय झाली होती व ती गावासाठी सुलक्षणी ठरली होती, तिला पाहायला अनेक पर्यटक येत, त्यामुळे तिला पेंचमधून इतरत्र हलविण्यासाठी अतिशय विरोध झाला. तेव्हा श्री आलोक कुमार यांनी गावक-यांना विश्वासात घेतले व त्यांना सांगितले की, ये तो आपकी बेटी है और एक दिन घर छोडके जाना ही है, तो आप प्यार से उसे बिदा किजियेम्हणजेच ही तर तुमची मुलगी आहे, एक दिवस तिला घर सोडून नव-याच्या घरी जावेच लागते तर तिला प्रेमाने-आनंदाने निरोप द्या! ही युक्ती कामी आली! अशा गोष्टी केवळ जंगलातच घडू शकतात व यातून एक प्रकारे ma^नेजमेंटचे शिक्षणच मिळते !

आणखी एक महत्वाची समस्या म्हणजे पेंच नदीमध्ये अवैध मासेमारीचा धोका सतत असतो, ही नदी या अभयारण्याला मध्यप्रदेश व महाराष्ट्रात विभागते. एवढ्या मोठ्या अभयारण्यासाठी अवैध मासेमारी हा कसा धोका असू शकतो असा विचार करुन आम्ही आधी हसलो मात्र त्यातील अर्थकारण धक्कादायक आहे! जोशी यांनी समजून सांगितल्यावर आम्ही थक्क झालो; ते म्हणाले जवळ २०० नौका अवैध मासेमारी करतात, एक नाव दररोज साधारण दिवसाला १००० किग्रॅ मासे पकडते. या माशांमध्ये रोहू, काटला इत्यादींचा समावेश होतो. स्थानिक बाजारापेठेत हे मासे ४०-५० रुपये प्रति किलो दराने विकले जातात. त्यानंतर अनेक निर्यातदार हे मासे जवळपासच्या गावात व तिथून जबलपूर, सिवनी व नागपूर या शहरांना पाठवतात. तिथे हे मासे १५०-२०० रुपये प्रति किलो अशा दराने विकले जातात. म्हणजे २०० नौकांनी दररोज १००० किग्रॅ मासे पकडले तर एकूण उलाढाल दररोज २ कोटी रुपयांचा घरात जाते व वर्षाला ७०० कोटी रुपयांच्या घरात जाते! आता तुम्हाला समजेल की एवढी मोठी समस्या का आहे! अभयारण्याच्या आजूबाजूला राहणारे हजारो लोक, अनेक राजकारणी तसेच सरकारी अधिकारीही हा जाळ्यात सहभागी आहेत नाहीतर असे होणे शक्यच नाही. या लोकांशी लढण्याचे प्रचंड मोठे काम वनविभागासमोर आहे, या लोकांचे स्वतःचे खबरे असतात जे त्यांना धाडीविषयी आगाऊ सूचना देतात, त्यानंतर कोळी त्यांची नाव पाण्यात बुडवून ठेवतात व पोबारा करतात. त्यांना नाव कुठे बुडवून ठेवली आहे हे नेमके माहिती असते, दुस-या दिवशी ते परत येतात, नाव काढून पुन्हा मासेमारीला सुरुवात होते. मासेमारीमुळे नदीतील जैवविविधतेचे संतुलन ढासळते कारण दरवर्षी अभयारण्यामध्ये स्थलांतर करणा-या पक्ष्यांचे ते भक्ष्य आहे व मासेमारीमुळे हे जीवनचक्र बिघडते. तसेच जंगलातील शिकार बाहेर घेऊन जाण्यासाठी होणा-या हालचालीमुळे संपूर्ण वन्यजीवन विचलित होते. आम्ही वन संरक्षकांना स्कूबा डायव्हिंगचे प्रशिक्षण देण्याची व त्यांच्यासाठी स्कूबा डायव्हर्सच्या सूटची सोय करण्याची संकल्पना मांडली. यामुळे वनसंरक्षण कोळ्यांनी नौका कुठे बुडवून ठेवल्या आहेत हे शोधून त्य नष्ट करु शकतील. अशाप्रकारे बोटीच नष्ट केल्यामुळे अवैध मासेमारीचे चक्र संपुष्टात येऊ शकेल. जंगलामध्ये करता येतील अशा कितीतरी गोष्टी आहेत!!
आम्ही आजूबाजूच्या जंगलांना भेट दिली व मनुष्य व प्राण्यांमधील संघर्ष कमीत कमी व्हावा यासाठी वन विभाग करत असलेले प्रयत्न पाहिले. याचे कारण म्हणजे केवळ मजेसाठी एक दिवस येऊन वाघ पाहणे वेगळी गोष्ट आहे व वाघ मुक्तपणे फिरतो त्याठिकाणी दिवस-रात्र राहणे ही वेगळी गोष्ट आहे. विचार करा आपल्यापैकी किती जण किमान एका दिवसासाठी तरी असे करु शकतील व इथे आपण संपूर्ण आयुष्य अशा प्रकारे घालविणा-या व्यक्तिंविषयी बोलत आहोत! अभयारण्याच्या कर्मचा-यांकडे अभयारण्याच्या सीमेवर राहणा-या लोकांना प्राण्यांचे शत्रू नव्हे तर मित्र बनविण्याचे अतिशय मोठे काम आहे येथे जंगलाला कुंपणाची भिंत घालण्यासारखी कामे केली जातात ज्यामुळे हरिण व रान डुक्करांचे कळप आजुबाजुच्या शेतांमध्ये शिरुन पिकांचे नुकसान करु शकत नाहीत व गावक-यांना प्राण्यांचे मित्र बनवितात !
आम्ही जास्तीत जास्त जंगलातील जागांना भेट देण्याचा प्रयत्न केला. घनदाट जंगलांमधील वन संरक्षक राहतात त्या चौक्या व त्यांची जीवनशैली पाहिली. जंगल हे प्राण्यांसाठी व तसेच वनविभागाच्या जमूसाठी एक चांगले स्थान व्हावे यासाठी अभयारण्याचा चमू झटक आहे, त्यांच्या कामाचा भार कशाप्रकारे थोडाफार हलका करता येईल हाच यामागचा उद्देश होता!
या संपूर्ण कालावधीमध्ये आम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळत होता तेव्हा आम्ही जंगलात फेरफटका मारत होतो, सफारीमध्ये ज्या गोष्टी पाहता येत नाहीत त्या मी पाहायचा प्रयत्न करत होतो कारण भरपूर वेळ होता, व हा फेरफटका केवळ व्याघ्र दर्शन करणा-या सफारींसारखा नव्हता! या भेटीतले काही अनुभव देत आहे...

एक धडा कोल्ह्याचा !
मध्यप्रदेशातील पेंचमध्ये उन्हाळ्यातील एका उष्ण दिवशी आम्ही एका कोल्ह्याला लाल रानकोंबडा मारताना पाहिले. पाठलाग व शिकार करताना थकल्यामुळे कोल्हा एका तलावाजवळ विश्रांती घेत होता. कोल्ह्याने त्याच्या डोक्यावर घिरट्या घालणा-या कावळ्यांपासून वाचण्यासाठी आपली शिकार तळ्याच्या पाण्यात ठेवली. आश्चर्य म्हणजे पाण्याच्या प्रवाहामुळे शिकार तळ्याच्या मध्यापर्यंत पोहोचली, बिचारा कोल्हा आता अडचणीच आला कारण तळे खोल होते व त्यात भरपूर चिखल होता. शिकार परत मिळविण्याच्या निश्चयाने त्याने तळ्याला चक्कर मारली व शिकारीसाठी आपला जीव धोक्यात घालायचा निर्णय घेतला व पाण्यात उडी मारली, भरपूर झटापटीनंतर त्याला शेवटी शिकार मिळाली व असा मूर्खपणा पुन्हा कधीही करायचा नाही अशी शपथ घेऊन त्याने तिथून पोबारा केला! इतक्या परिश्रमाने मिळालेली शिकार कधीच हातातून सोडायची नाही हा धडा तो नक्कीच शिकला असेल! आम्ही जवळपास अर्धा तास चाललेल्या या नाट्यमय घडामोडींची छायाचित्रे घेतली. अशा घटनांमुळे जंगल जिवंत होते व आम्ही परत जाताना पुन्हा येण्याचे आश्वासन देतो!
शानदार वन्यजीवन !

वन्य श्वान ही एक अतिशय चमत्कारिक प्रजाती आहे त्यांच्याविषयी फारसा अभ्यास झालेला नाही तसेच दस्तऐवजात नोंदही झालेली नाही! मात्र जंगलात सर्वजण त्यांना टरकतात, अगदी वाघही त्यांच्यापासून एक अंतर राखून असतो! काही वेळा तुम्ही त्यांना दिवसभर आळसावून पडून राहतात, डबक्यात खेळत असतात व दुस-या दिवशी ते गायब होतात व अनेक दिवस ते तुमच्या दृष्टिसही पडत नाहीत! आम्ही अतिशय सुदैवी होतो कारण आम्ही एक चितळ खाणा-या जवळपास ३० वन्य श्वानांचा कळप दिसला. त्यांना असे कळपात पाहणे चित्तछरारक असते, प्रत्येकजण शिकार खाण्यासाठी उत्सुक होता मात्र पहिला घास घेण्याचा ज्येष्ठ सदस्यांचा मान राखला जात होता! आपल्यासारख्या तथाकथित माणसांना यातून कितीतरी शिकण्यासारखे आहे!
मला प्रत्यक्ष पाहा!

वाघ/वाघिणीला पाहणे हे कोणत्याही वन्यजीव प्रेमीचे स्वप्न असते! मी पेंचनंतर ताडोबाला भेट दिली, तेथील प्रसिद्ध तेलियाचे चार बछडे आता लहान राहिलेले नाहीत; किंबहुना या भागातील त्या राजकन्या झाल्या आहेत. वाघ शोधण्यातील खरी मजा त्यांच्या पाउलखुण शोधण्यात आहे, कुणाही प्राण्याचा इशारा नाही, माग काढत त्या जंगलाच्या राणीपुढे उभे ठाकणे व तिला प्रत्यक्ष पाहणे यातील मजा काही औरच! तिची डौलदार चाल पाहणेही आनंददायक असते मात्र तुम्ही वन्यजीव निरीक्षणातील तुमचा अनुभव वापरुन तिच्या हालचालींचा योग्य अंदाज बांधणे हे त्यापेक्षाही आनंददायक असते!

आधुनिक कावळ्याची गोष्टच जणु !

मध्यप्रदेशातील पेंचमध्ये जुनावणी नावाचा लहानसा मातीचा बंधारा आहे. चारही बाजूने डोंगराने वेढलेल्या या ठिकाणी वाघ हमखास दिसतात, तिथे मी एका बगळ्याने बेडूक पकडलेला पाहिला; ही अतिशय सामान्य घटना होती मात्र त्यानंतर जे काही घडले ते अतिशय रोचक होते! बगळ्याने तो जिवंत बेडूक पाण्याच्या काठाशी नेला व त्याचा मागील पाय पाण्यात बुडविला व पुन्हा मान वर उललली, असे ५-६ वेळा झाले! त्यानंतर माझ्या लक्षात आले की बगळ्यासाठी तो बेडूक गिळण्यास अतिशय मोठा होता व त्याने चोच उघडली असती तर तो निसटला असता. म्हणून त्याने बेडकाचा मागील पाय पाण्याला टेकू दिला, म्हणजे बेडकाला असे वाटेल की त्याला सोडून देण्यात आले आहे व तो स्वतःला पुढे ढकलेल म्हणजेच प्रत्यक्षात तो बगळ्याच्या तोंडात जाईल!!! जंगलातल्या या अशाच क्षणांमुळे आपल्याला येथे पुन्हा पुन्हा यावेसे वाटते!! वा जंगलातील अशी घटना आपल्याला आयुष्य शिकवतात, जसे येथे पुढे जाणे म्हणजे प्रगती नव्हे हे मी शिकलो !

जंगल हा आश्चर्यांचा खजिना आहे!
ताडोबातील दुपारचा फेरफटका थोडासा कंटाळवाणा होता, उकडत होते, सूर्य ढगांपलिकडे असल्याने जंगल शांत होते व आम्हीही ढेपाळलेले होतो, मात्र अनेक वर्षांच्या अनुभवाने मी शिकलो आहे की जंगल तुम्हाला फार काळ असे ढेपाळलेले राहू देत नाही! माझा अंदाज खरा ठरला, माझी जिप्सी अग्निरेषा ओलांडत होती तेव्हा एक काळा कळप हळूहळू आमच्या दिशेने सरकत होता, तो मादी अस्वलांचा कळप होता!! जणू तो क्षण टिपण्यासाठीच सूर्य ढगातून बाहेर आला व एक लांबून व एक अगदी जवळून छायाचित्र घेता आले, हे मी अस्वलांचे आत्तापर्यंत सर्वात जवळून घेतलेले पहिले छायाचित्र होते, कारण त्यांच्या काळ्याभोर केसांमुळे तपशील टिपण्यासाठी कॅमेरा एकाठिकाणी केंद्रित करणे अतिशय अवघड असते! पुन्हा एकदा जंगलाच्या पेटा-यातून आणखी एक आश्चर्य समोर आले! अशावेळी लोक ज्याप्रकारे वागतात ते अतिशय दुःखदायक होते, अनेकदा प्राणी अग्निरेषेचा वापर रस्ता ओलांडण्यासाठी करतात व इथे बहुतेक जिप्सीचालक नेमक्या अग्निरेषेवरच वाहने थांबवत होते, त्यामुळे प्राण्यांना त्रास होत होता व मार्ग बदलावा लागत होता. वन विभागाने अशा ठिकाणी थांबू नका असे फलक लावणे आवश्यक आहे कारण अशा अग्निरेषांवर प्राण्यांना मोकळेपणाने रस्ता ओलांडता येतो!

जंगल सतत देते!

असे म्हणतात की जंगल तुम्हाला कधीही दुःखी राहू देत नाही! मी मलबार धनेश पक्षाच्या एका चांगल्या छायाचित्राच्या शोधात होतो. मध्यप्रदेशातील पेंचमध्ये भरारी घेणारा मोठा व सुंदर धनेश मी अनेकदा पाहिला मात्र या पक्षाचे एक चांगले छायाचित्र मला मिळू शकले नाही. मी जेव्हा अभयारण्यातील करमझिरी येथील विश्रामगृहात परत आलो व सुरक्षा रक्षकाशी बोलत होतो तेव्हा तो म्हणाला "सहाब यहां झरने के बाजू मे जो बरगद का पेड है वहा आके बैठता है दोपहरको" म्हणजे तुम्ही जो पक्षी शोधत आहात तो वडाच्या झाडावर दररोज दुपारी येऊन बसतो! मी झटपट माझे दुपारचे जेवण उरकले व वडाच्या झाडाकडे निघालो व खरोखरच तिथे धनेश पक्षी होता!! मला छायाचित्रे देण्यासाठीच तो जणू खुणावत होता व आरामात बसला होता:)
माझा जंगलावरील विश्वास पुन्हा एकदा बळकट झाला की ते आनंद शोधण्यासाठीचे सर्वोत्तम ठिकाण आहे!!

जंगलातील सौंदर्य म्हणजे तुम्हाला प्रत्येक क्षण एकदाच अनुभवता येतो, तो चुकल्यास क्षण हातातून निसटून जातो! त्यामुळे तुम्हाला अतिशय जागरुक असावे लागते व तुम्हाला त्यात स्वारस्य असले पाहिजे! जंगलांच्या भेटीतून आपल्याला हेच शिकायला मिळते की तुमच्या आजूबाजूला घडणा-या अगदी लहानशा गोष्टीकडेही लक्ष द्या. जंगलात अशा अनेक गोष्टी असतात ज्यांचा अनुभव तुम्ही केवळ एक व्यक्ती म्हणून घेऊ शकता व केवळ एकदाच घडणा-या गोष्टीचे छायाचित्र घेण्याची संधी मिळणे हा देखील असाच एख अनुभव आहे! हा अनुभव शब्दात व्यक्त करता येणार नाही; ज्या व्यक्तिने हा अनुभव घेतला आहेत केवळ त्यालाच ते समजू शकेल.
सर्वात शेवटी श्री. अतुल किर्लोस्करांविषयी थोडेसे, ज्यांना मी अतुलदा असे म्हणतो. त्यांना कदाचित लेखाचा हा भाग फारसा आवडणार नाही कारण ज्यांना स्वतः विषयी फारसे बोललेले आवडत नाही असे हे व्यक्तिमत्व आहे, मात्र माझ्या जंगलाच्या प्रत्येक सफारीतून मी काहीतरी शिकलो आहे व एका उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा असलेल्या व्यक्तिसोबत अशाप्रकारे जंगलाचा अनुभव घेणे म्हणजे दुग्धशर्करा योग होता. या प्रवासात धाब्यावरील कळकट कपातून चहा पिताना असो किंवा तळपत्या उन्हात जंगलातील पायपीट असो, त्यांनी आपले पद किंवा संपत्तीचा बडेजाव कधीही मिरवला नाही. अगदी लहानशी गोष्ट जाणून घेण्याविषयीही ते उत्सुक असत व कोणत्याही विषयावरील त्यांची प्रतिक्रिया अतिशय संयत असे! मला खात्री आहे की अतुलदांसारख्या पदावरील अधिकाधिक मंडळींनी जंगलास भेटी दिल्या, तिथल्या समस्या जाणून घेतल्या व मदत केली तर केवळ जंगलांसाठीच नाही तर वन्यजीव प्रेमींसाठीही ती सर्वोत्तम बाब असेल!

या अनुभवांसोबत मी मध्यप्रदेशातील पेंचचा निरोप घेतला, लवकरात लवकर परत येण्याचे आश्वासन देऊन!!

संजय देशपांडे


संजीवनी डेव्हलपर्स






No comments:

Post a Comment