Thursday 18 September 2014

परवडण्यासारखी घरे; आव्हाने व परिस्थीती





















परवडणे ही एक प्रकारची मानसिक स्थिती असते जी थेट माणसाच्या खिशाशी संबंधित असतेमार्क  ट्वेन.

माझे सिडकोमधील कॉलेज मित्र सुरेश ठाकूर यांनी मला काही दिवसांपूर्वी फोन केला व मी अभियंता दिनानिमित्त परवडण्यासारखी घरे या विषयावर व्याख्यान व सादरीकरण देऊ शकतो का असे विचारले. मी त्याला एका क्षणात होकार दिला. मात्र नंतर मी त्याविषयी विचार करु लागलो, कारण मला माझ्या प्रत्येक व्याख्यानापूर्वी नेहमी थोडासा ताण येतो. यावेळी मात्र मला अतिशय ताण आला, मी ठाक-याला हो म्हणून चूक केली असे मला वाटू लागले.......ठाक-या हे त्याचे कॉलेजमधील टोपण नाव....माझे टोपण नाव पांड्या! ज्यांना कल्पना नसेल त्यांच्यासाठी सांगतो सिडको म्हणजे शहर व औद्योगिक विकास महामंडळ, नवी मुंबईमध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी ८० च्या दशकात ही सरकारी संस्था स्थापन करण्यात आली. आता तिचा विस्तार शेकडो चौरस किलोमीटरपर्यंत झाला आहे व जवळपास ४०० तांत्रिक कर्मचारी व मेट्रो ते विमानतळापर्यंत अनेक मोठ मोठे प्रकल्प साकार करणा-या या संस्थेच्या कर्मचा-यांपुढे मी काय बोलणार असा प्रश्न मला पडला? हे व्याख्यान सिडकोच्या अभियंता संघटनेसाठी द्यायचे होते, त्यामुळे सगळे श्रोते अनेक वर्षांचा अनुभव गाठीशी असलेले अभियंते होते. सिडकोने स्वतःच हजारो घरे व इमारतींचे प्रकल्प पूर्ण केले आहेत, त्यामुळेच मला माझे काम अधिकाधिक अवघड वाटू लागले. पुन्हा ठाक-याचा फोन आला तेव्हा त्याने व्याख्यानाचा विषय तंत्रज्ञान, आकडे वगैरे बोडजपणे न मांडता हलक्या-फुलक्या पद्धतीने मांडावा अशी सूचना केली. तिथे मला हा विषय कसा मांडायचा आहे याविषयी थोडीशी कल्पना मिळाली व पुढील चार दिवस मी केवळ या व्याख्यानाचाच विचार करत होतो. मी माझ्या चमूसह या विषयावर माझ्याकडे उपलब्ध असलेल्या छायाचित्रांद्वारे एक संकल्पना तयार केली.  १५ सप्टेंबरला पोटात गोळा व धडधडना–या हृदयाचे ठोके ऐकत मी सिडकोला पोचलो . मी कधीच  माझे व्याख्यान लिहित नाही पण दिलेले व्याख्यान  लिहून तुमच्यापर्यंत पोचविण्याचा हा प्रयत्न ……

सिडकोतील अभियंत्या मित्रांनो
मी तुमचा आणि माझा मित्र व अभियंता सहकारी श्री. ठाकूर याचा अतिशय आभारी आहे. मी जवळपास २५ वर्षांपूर्वी अभियांत्रिकीच्या २-या व ३-या वर्षामध्ये असताना या महान संघटनेने बांधलेल्या प्रकल्पांना भेट द्यायचो, आज तोच अभियांत्रिकीचा विद्यार्थी तुमच्यासमोर तंत्रज्ञ म्हणून व्याख्यान द्यायला उभा आहे, ही माझ्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे! माझ्या अभियांत्रिकी शिक्षणाचे मला सार्थक झाल्यासारखे वाटते! मला सर्वप्रथम तुम्हाला सांगावेसे वाटते की निमंत्रण स्वीकारल्यानंतरही मी काहीतरी कारण देऊन ते नाकारण्याचा विचार करत होतो, कारण माझ्याकडे तुमच्यासमोर उभे राहून बांधकामा विषयी काहीतरी बोलण्याचे धाडस नव्हते.... मात्र धीर केला. मी आज इथे केवळ व्याख्यान देणार नाही किंवा सादरीकरण करणार नाही तर आपण विचारांची देवाणघेवाण करणार आहोत. आपण सगळे अतिशय अनुभवी आहात, त्यामुळे मी जे काही बोलतोय ते कदाचित नवीन नसेल, मी आज परवडणारी घरे याविषयावर बोलणार आहे, जी केवळ सिडकोचीच नाही तर संपूर्ण देशाची गरज आहे; बांधकाम व्यवसायात गेल्या २४ वर्षांत मला मिळालेल्या अनुभवातून मी हा विषय मांडणार आहे.

अन्न, वस्त्र व निवारा या समाजाच्या तीन मूलभूत गरजा आहेत, पहिल्या दोन गरजांसाठी आपण बरेच काम केले आहे मात्र आजही आपण शेवटच्या गरजेकडे दुर्लक्ष केले आहे ते म्हणजे घर! सर विश्वेश्वरैय्या यांचा आज जन्मदिवस, हा दिवस आपण अभियंता दिन म्हणून साजरा करतो, त्यांचे एक प्रसिद्ध वाक्य मला इथे सांगावेसे वाटतेअभियंता म्हणजे जो केवळ समस्या सोडवणारा नाही तर अभियंता म्हणजे जो भविष्यातील समस्या पाहू शकतो व ती टाळतो”! आपण परवडण्यासारख्या घरांची समस्या पाहू शकलो नाही हे सत्य आहे व आता ती सोडविण्याचा प्रयत्न करत आहोत, अर्थात उशीर झाला तरी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण परवडण्यासारखी घरे म्हणजे काय व आपण त्यामध्ये का अपयशी ठरलो आहोत हे समजून घेतले पाहिजे? मला नेहमी असे वाटते की आपण सत्य स्वीकारल्यानंतर ही समस्या अधिक चांगल्याप्रकारे सोडवू शकतो. मी आज तुम्हाला आपल्याला आजच्या विषयाशी संबंधित दोन गोष्टी सांगणार आहे.

आपण सर्वांनी बहुतेक इजिप्तच्या लोककथांमधील बुद्धिमान, चतुर मुल्ला नसिरुद्दीन या व्यक्तिरेखेविषयी ऐकले असेल. एके दिवशी मुल्लाने त्याचे गाढव विकायचे ठरवले व त्यासाठी तो मुलासह गावच्या बाजाराकडे निघाला. रस्त्यात एक माणूस त्यांना भेटला वसलाम वालेकुम करुन विचारले ते कुठे जात आहेत, हेतू जाणून घेतल्यानंतर त्याने मुल्लाला सुचवले की चालत जाण्याऐवजी गाढवावर बसून जा. मुल्लालाही त्याची सूचना पटली व तो गाढवावर बसून जाऊ लागला. काही अंतर चालून गेल्यानंतर त्यांना एक आणखी एक गावकरी भेटला व ते बाजारात का चालले आहेत हे ऐकल्यानंतर मुल्लाला रागवला व म्हणाला तुमचा लहान मुलगा चालतोय व तुम्ही गाढवावर बसून आरामात चालला आहात? मुल्लाला त्याची चूक पटली, तो गाढवावरुन उतरला व त्याच्या मुलाला बसवले. पुन्हा काही अंतर पुढे गेल्यानंतर त्यांना आणखी एक गावकरी भेटला व त्याने विचारले अरे मुल्ला तू मूर्ख आहेस का? असेही ते गाढव विकणारच आहेत तर मग वडील व मुलगा दोघेही त्यावर बसून बाजारात का जात नाहीत? त्यानंतर मुल्ला व त्यांचा मुलगा दोघेही गाढवावर बसले व पुढे जाऊ लागले. काही अंतर पुढे गेल्यानंतर आणखी एक गावकरी भेटला व नमस्कार वगैरे झाल्यानंतर मुल्लावर ओरडला व म्हणाला गाढवाने आयुष्यभर तुमची सेवा केली आहे आता तो वृद्ध झाल्याने त्याला विकण्यापूर्वीही त्याच्याशी इतक्या अमानवी व क्रूरपणे वागत आहात! त्यांनी गाढवाला खांद्यावर उचलून बाजारात न्यावे असा सल्ला दिला! त्याचे ऐकून मुल्ला व त्याच्या मुलाने गाढवाला खांद्यावर उचलण्याचा प्रयत्न केला, एका पुलावर हे सगळे  पोचले होते ,मात्र त्याला उचलण्याच्या प्रयत्नात गाढव घाबरुन पळू लागले व या गोंधळात नदीच्या पाण्यात पडले व वाहून गेले! इथे जमलेल्या सर्वांविषयी आदर व्यक्त करत असे सांगावेसे वाटते की आपल्या गोष्टीत परवडण्यासारखी घरे म्हणजे गाढव, मुल्ला म्हणजे आपले शासनकर्ते ज्यांना आपण निवडून दिले आहे व मुलगा म्हणजे सामान्य माणूस. गावकरी म्हणजे बांधकाम व्यवसायिक, स्वयंसेवी संघटना व सल्लागार. गोष्टीतल्या गाढवाचे जे झाले तीच गत परवडण्यासारख्या घरांची झाली आहे!

आणखी एक गोष्ट आहे आंधळ्या माणसाची आणि हत्तीची! यातील हत्ती म्हणजे परवडण्यासारखी घरे व आंधळा माणसे म्हणजे आपण सगळे, काहींना असे वाटते की एफएसआय वाढवला की परवडण्यासारखी घरे मिळतील, काहींना असे वाटते की उंच इमारतींमुळे परवडणारी घरे मिळतील व ही यादी वाढतच जाईल मात्र आपण याचा सर्वांगीण विचार केलेलाच नाही हे सत्य आहे, म्हणूनच आपल्याला ही संकल्पना समजलेली नाही!
परवडण्यासारख्या घरांचे विविध पैलू आहेत केवळ एकाच पैलुद्वारे त्याची व्याख्या करता येत नाही. आपल्याला थोडक्यात चर्चा करता येतील असे काही मुद्दे मी काढले आहेत ज्यावर आपण सविस्तर विचार करु शकतो. मी इतकेच करु शकतो!
परवडण्यासारखी म्हणजे काय हे ठरवणे
जमीन
पायाभूत सुविधा
आकार/नियोजन
जगण्याचा म्हणजे विविध सेवांचा खर्च
ग्राहकांपर्यंत वितरण
लोकसंख्या
पर्यावरण/जैवविविधता
यातील प्रत्येक मुद्याचा विचार करु, मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला अनेक गोष्टी माहिती असतील, मात्र एक अभियंता त्याच्याकडील माहितीचा कसा उपयोग करतो हे अधिक महत्वाचे असल्याचे विसरुन चालणार नाही!

परवडण्यासारखी म्हणजे काय हे ठरवणे
मार्क ट्वेन या महान विनोदी लेखकाने त्याच्या अवतरणात परवडण्यासारखे म्हणजे काय हे ठरवणे अतिशय अवघड असल्याचे म्हटले आहे कारण समाजामध्ये ही अतिशय व्यक्तिगत बाब आहे. मात्र इतर गोष्टींचा विचार करा तुम्हाला रस्त्याच्या कडेला एखाद्या टपरीत ५ रुपयाला चहा मिळू शकतो व ताज महालसारख्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ५०० रुपयांना चहा मिळतो, त्यातले आपल्याला काय परवडू शकते हे आपल्यावर आहे, मात्र चहा व ते पिण्याचे समाधान दोन्हींचे जवळपास सारखेच असते. त्याचप्रमाणे एखाद्याला कार खरेदी करायची असेल तर १.५० लाखात टाटा नॅनो खरेदी करता येते त्याचवेळी १.५० कोटी रुपयांची बीएमडब्ल्यूही असते, दोन्हींचाही उपयोग होतो व दोन्ही गाड्यांना मुंबई-पुणे प्रवासासाठी तीन-साडेतीन तास लागतात, आपल्याला काय परवडू शकते हे आपण ठरवायचे आहे. मात्र घरांच्या बाबतीत असे आहे का? माझ्या खिशात ५ कोटी रुपये असतील तर मी कुठेही घर खरेदी करु शकतो, मात्र माझ्या खिशात केवळ ५ लाखच असतील तर मी काय करु? आपल्या सर्वांना माहिती आहे की ५ लाखांमध्ये घर मिळू शकत नाही, इथेच आपण सिडको किंवा कोणत्याही सरकारी गृहनिर्माण योजनांचे एलआयजी, एमआयजी किंवा एचआयजीसारखे जुने पुराणे नियम बदलले पाहिजेत. आता केवळ दोन वर्ग आहेत एक शहरी गरीब व शहरी श्रीमंत, आपण शहरी गरिबांचे सरासरी उत्पन्न पाहता त्यांचा विचार केला पाहिजे. शिक्षण, कार्यालयापर्यंत जाण्यासाठीचा प्रवास, वैद्यकीय यासारखे जीवनातील इतर खर्चही वाढल्याचे विसरुन चालणार नाही.  अशा परिस्थितीत परवडण्यासारखेची व्याख्या करायची झाल्यास एखादे कुटुंब घरासाठी किती पैसे खर्च करु शकते हे ठरवले पाहिजे. त्यानंतर ग्राहकाला तसेच विकासकाला लहान कर्जे उपलब्ध करुन दिली पाहिजेत ज्यामुळे परवडणारी घरे घेणे शक्य होईल. त्याचवेळी सामान्य माणसाची क्रयशक्ती वाढवणेही तितकेच महत्वाचे आहे व आपण त्यासाठी काय करणार आहोत.

जमीन:  

यानंतर आपण गृहबांधणीच्या सर्वात महत्वाच्या घटकाचा विचार करु, तो म्हणजे जमीन! अगदी १०वीच्या भूगोलात आपण शिकलो आहोत की जमीनीचा संतुलित वापर सुदृढ समाजासाठी अतिशय महत्वाचा आहे, मात्र आपण या समस्येसाठी काय पावले उचलली आहेत. जमीन मर्यादित आहे व मागणी सतत वाढत जातेय, त्यामुळे वाढत्या लोकसंख्येची प्रत्यक्ष गरज विचारात घेऊन जमीनीचा वापर निश्चित करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण जुन्या प्रादेशिक विकास योजना म्हणजे आरपी व विकास योजना म्हणजे डीपीऐवजी एकच राज्य विकास योजना तयार करायला काय हरकत आहे, ज्यामध्ये राज्यातील प्रत्येक इंच जमीनीचा वापर कसा होईल हे ठरवले जाईल व त्यानुसार सूक्ष्म नियोजन केले जाईल? स्वातंत्र्य मिळून अडुसष्ट वर्षांनंतरही सरकारने हे का केले नाही, अनेक जिल्ह्यांमध्ये अजून आरपीही नाही व अशा परिस्थितीत आपण घरांसाठी जमीनी कशा देणार आहोत?
आपण एखाद्या हेतूने जमीन आरक्षित केल्यानंतर ती त्याच कारणाने वापरली जात आहे का हे पाहिले पाहिजे. अमेरिका व ब्रिटनसारख्या देशांमध्ये, घरांसाठी आरक्षित जमीन विकसित न करता तशाच ठेवल्यास त्यावर मोठा अतिरिक्त मालमत्ता कर आकारला जातो, ज्यामुळे जमीनीचा मालक ती जमीन ज्या कारणासाठी आरक्षित आहे त्यासाठी ती वापरतो यामुळे जमीनीच्या कमतरतेचा प्रश्न सुटतो. आपण अशा पद्धती का वापरु शकत नाही?
त्यानंतर मुद्दा येतो जमीनीच्या दरांचा केवळ उपलब्ध जमीनीसाठी अधिक एफएसआय दिल्याने तोडगा निघणार नाही, तो एफएसआय वापरण्यासाठी आपल्याला उंच इमारती बांधाव्या लागतील, मात्र त्यासाठी बांधकामाचा खर्च व इतर घटकांमुळे घरे परवडण्यासारखी राहात नाहीत, त्यामुळे घर बांधणीसाठी वेगाने अधिक जमीन लागते हा खरा मुद्दा आहे! त्याचवेळी जमीनीचे दर नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे, केवळ तिचे एमआरपी म्हणजेच किमान किरकोळ विक्री मूल्य नसते. आपला रेडी रेकनर (सिद्ध गणक) निर्देशांक जमीनीचे किमान दर दाखवतो मात्र कमाल दरावर कुणाचे नियंत्रण आहे का, एखाद्या माणसाकडे जमीन पडून असते व तिचे दर वाढत असतात, हे थांबले पाहिजे. अंतिम उत्पादन म्हणजेच घरासाठीही हाच नियम वापरला पाहिजे. आपण जमीनीचे दर निश्चित केल्याशिवाय व करेपर्यंत परवडण्यासारखी घरे हे एक स्वप्नच राहील! आपल्याकडे घरांच्या किंमती नियंत्रणात ठेवणारा नागरी जमीन धारणा कायदा होता, घरांच्या किमती वाढण्यासाठी आपण यूएलसीलाच जबाबदार धरले व हा कायदा रद्द केला, मात्र यामुळे नक्की काय परिणाम झाला याचे विश्लेषण आपण केले आहे का?

पायाभूत सुविधा:  
तीन प्रकारच्या पायाभूत सुविधा आहेत; एक म्हणजे प्रत्यक्ष म्हणजेच रस्ते, सार्वजनिक वाहतूक, पाणी, सांडपाणी, ऊर्जा, कचरा, उद्योग व नोक-या. दुसरा प्रकार म्हणजे सामाजिक, ज्यामध्ये मनोरंजन, कला, आरोग्य व शिक्षणाचा समावेश होतो.
जमीनीच्या किमतींमध्ये हा घटक अतिशय महत्वाचा आहे आधी अंडे की आधी कोंबडी या प्रश्नासारखेच आधी पायाभूत सुविधा की आधी घरे हा प्रश्न आहे. आपण आधी पायाभूत सुविधा उभारल्या तर जमीनीच्या किमती वाढतात व घरेही महाग होतात. मात्र पायाभूत सुविधाच नसतील तर घरे उपलब्ध होणार नाहीत व विकलीही जाणार नाहीत! यांचे संतुलन साधले पाहिजे कारण कोणत्याही ठिकाणच्या पायाभूत सुविधांमुळे विकासाचा लोलक कुठल्या दिशेने जाईल हे ठरते. उदाहरणार्थ विदर्भ किंवा मराठवाड्यासारख्या प्रदेशात पाणी नाही, सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प नाहीत, उद्योगधंदे नाहीत किंवा रस्त्यांचे जाळे नाही व नोक-याही नाहीत. म्हणूनच या भागातील लोकसंख्या सातत्याने पुणे, मुंबई, नाशिकसारख्या शहरांमध्ये स्थलांतर करते त्यामुळे या भागातील पायाभूत सुविधांवर ताण येतो व इथल्या जमीनींचे दर सतत वाढतच असतात. 
आपण संपूर्ण राज्यासाठी पायाभूत सुविधांचे व्यवस्थित नियोजन केले तर केवळ काही भागांवरच अतिरिक्त ताण पडणार नाही. पुरेशा पायाभूत सुविधा नसल्याने बांधकामाचा खर्च वाढतो उदाहरणार्थ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली नसेल तर लोक खाजगी वाहने घेतात व वाहने लावण्यासाठी जागा बांधावी लागते ज्यामुळे बांधकामाचा खर्च वाढतो. सिंगापूरमध्ये मोठमोठ्या संकुलांना पार्किंगसाठी एकही स्वतंत्र मजला नाही व कुणालाही खाजगी वाहनाची गरज पडत नाही. त्याशिवाय प्रत्येक परिसरासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प आहेत, ज्या योगे एक इमारतीवर हा ताण येत नाही.तिस-या प्रकारच्या पायाभूत सुविधा म्हणजे सरकारी पायाभूत सुविधा ज्याकडे आपले क्वचितच लक्ष जाते म्हणजेच घरांच्या विकासाचे नियंत्रण करणारी यंत्रणा. आपल्याकडे सध्या, म्हाडा, सिडको, नागरी विकास, नगर नियोजनासह महापालिका, नगरपालिका, जिल्हाधिकारी व बांधकाम विभाग अशा विविध संस्था आहेत; या सर्वांनी गृहनिर्माण धोरणांवर काम करणे व सामान्य माणसाला घरे उपलब्ध करुन देणे अपेक्षित आहे, मात्र त्याचा परिणाम काय झाला आहे? आपल्याला भोवताली घर बांधणीसंदर्भात पॉलिसी तयार करताना केवळ उशीर, वाद व गोंधळ दिसतो. घरबांधणीशी संबंधित सर्व बाबींसाठी एकच संस्था असावी, ती जिल्हास्तरीय संस्था असू शकते किंवा महसूल यंत्रणेनुसार तिची व्यवस्था असू शकते. यामुळे प्रकल्प मंजूरीची यंत्रणा जलद व सोपी होईल याची खात्री केली जाईल. सध्या विविध ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी व स्थानिक कायद्यांच्या गर्दीतून वाट काढण्यासाठी बराच वेळ लागतो त्यामुळे घरे परवडण्यासारखी राहात नाहीत.

घरांचा आकार/नियोजन:
घरे परवडावीत यासाठी झोपडपट्टी पुनर्विकासातील किंवा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील घरांसारखी लहान घरे बांधा अशी एक सर्वसाधारण संकल्पना आहे, ही घरे साधारण ३०० चौ. फुटांची असतात, माझ्यावर खरोखर विश्वास ठेवा हा एक विनोद आहे! बांधकाम खर्चाच्या दृष्टीने लहान घरे बांधणे व त्यांना विविध सुविधा देणे अवघड आहे, दुसरे म्हणजे एवढ्या लहान जागेत चार ते पाच जणांचे कुटुंब राहण्याची कल्पना तुम्ही करु शकता का. म्हणूनच लहान म्हणजे परवडण्यासारखे नाही, हे स्वीकारा! लोकांना राहण्यासाठी पुरेशी जागा द्या, त्यासाठी जागा व खर्च यांचा समतोल साधला जाईल अशा विविध नमुना योजना तयार करा. केवळ चार किंवा पाच पट एफएसआय देणे व उंच इमारती बांधणे हा उपाय नाही. कारण तसे करताना सेवांचा खर्च वाढतो हे तथ्य आहे. केवळ उंचीच नाही तर विस्तारही करणे आवश्यक आहे, लोकांना एकत्र येण्यासाठी भरपूर मोकळ्या जागा ठेवा व त्यानंतर खर्च काढा. अशा सामाईक जागांचे व भागांचे दर आपण कमी केले पाहिजेत म्हणजे नियोजक अशा अधिकाधिक जागा देतील. असे नियोजन करा ज्यामध्ये नैसर्गिक प्रकाश असेल व हवा खेळती असेल म्हणजे विजेची बचत होईल.

बांधकाम, पर्यायी साहित्य व पद्धती, संशोधन व विकास:
आपण पूर्वापार चालत आलेल्या काँक्रीट तंत्रज्ञानाला उत्तर शोधले पाहिजे कारण त्यातील घटक नैसर्गिक स्त्रोतांमधून मिळतात म्हणजेच वाळू, धातू, चिखल इत्यादी व ते एकेदिवशी संपणार आहेत, त्यादिवशी आपण काय करणार आहोत? त्याचप्रमाणे आपल्याला बांधकामाचा खर्च कमी करण्यासाठी बांधकामाच्या नव्या पद्धती आवश्यक आहेत. आपल्याकडे परवडण्यासारख्या घरांवर संशोधन करणारी एकही संशोधन व विकास संस्था नाही हे मोठे दुर्दैव आहे, जी पर्यायी साहित्य किंवा बांधकामाच्या पद्धतींविषयी माहिती गोळा करेल व घरबांधणीविषयी आवश्यक असलेल्या प्रत्येक घटकाविषयी माहिती संकलित करेल. लक्षात ठेवा कोणत्याही समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्याविषयी पुरेशी माहिती असली पाहिजे व सध्या आपल्याकडे नेमकी माहितीच उपलब्ध नाही. इथे सिडको, विकासकांची संघटना असलेल्या क्रेडईच्या सहकार्याने पुढाकार घेऊ शकते व परवडण्यासारखी घरे या विषयावर संशोधन व विकास करणारी एखादी संस्था उभारु शकते.

दैनंदिन खर्च/सेवा:
परवडणारे घर म्हणजे केवळ सुरुवातीला ज्याचे पैसे कमी द्यावे लागतात असे घर नाही तर त्याचा दैनंदिन खर्चही कमी असला पाहिजे! इथे गरज व देखभाल खर्च तसेच बांधकाम खर्च यांचा नाविन्यपूर्ण पद्धतीने समन्वय साधणे आवश्यक आहे, उदाहरणार्थ, सौरऊर्जेवर तापवलेले पाणी प्रत्येक मजल्यावर एका सामाईक ठिकाणी देणे. यामुळे पहिल्या टप्प्यात सर्व वाहिन्यांमधून थंड पाण्याचा अपव्यय कमी होईल आपण सौरऊर्जेवर चालणारे गरम पाण्याचे नळ सुरु केल्यानंतर वाहिन्या बसविण्याचा खर्चही कमी होईल. याचप्रकारे आपण प्रत्येक मजल्यावर सामाईक कपडे धुण्याच्या यंत्राचा विचार करु शकतो. एखादे गृहसंकुल दररोज ज्या सेवा वापरते त्यांच्या देखभालीचा खर्च कमी करण्यासाठी अशा अनेक गोष्टी केल्या जाऊ शकतात. आपण अपव्यय व गरज यात समतोल साधण्यासाठी नियोजन करु शकतो. पावसाचे पाणी मध्यभागी साठवून ते वापरण्याचा विचार करा, मोकळ्या-जागाही पावसाळी पाण्याच्या तळ्यांसाठी वापरल्या जाऊ शकतात, ज्यामुळे पाण्याची मागणी कमी होईल.सेवांची देखभाल करण्यासाठी स्वतंत्र व्यावसायिक संस्था असली पाहिजे व ही सेवा वापरणारा प्रत्येक जण त्यासाठी पैसे देईल अशी व्यवस्थाही असली पाहिजे. या सेवांची देखभाल करण्याचे काम नागरिकांनाच देऊन रोजगार निर्मिती करण्याचाही आपण विचार करु शकतो.

अंतिम वापरकर्त्यापर्यंत वितरण:
सर्वात शेवटी गरजू लोकांना परवडण्यासारखी घरे मिळावीत याची खात्री केली जाण्यासाठी एक यंत्रणा असली पाहिजे, ही घरे ज्या हेतूने बांधली आहेत ती त्यासाठी वापरली जात असल्याची खात्री करण्यासाठी ठराविक काळाने तपासणी किंवा ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे! ही घरे परवडण्यासारखी असावीत यासाठी त्यांचे वितरण करताना अनेक गोष्टींचा विचार केला जाऊ शकतो उदाहरणार्थ एकाच उद्योगात काम करणारे लोक जवळपास राहात असतील तर त्यांच्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय सहजपणे करता येईल, स्वतःचे खाजगी वाहन वापरण्यापेक्षा यामुळे बरीच बचत होईल! अशाप्रकारे उपलब्ध असलेल्या सर्व घरांची माहिती इंटरनेटवर प्रसिद्ध करा व अशा घरांसाठी कसा अर्ज करायचा, त्यांच्या वितरणाची प्रक्रिया यासारखी ताजी माहिती वेळोवेळी देत राहा, म्हणजे प्रत्येक गरजू सामान्य माणसाला ती माहिती मिळू शकेल. यातच परवडणा-या घरांचे यश आहे!

लोकसंख्या:
परवडण्यासारख्या घरांसाठी ही सर्वात मोठी समस्या आहे कारण जमीन वाढणार नाही व आपली लोकसंख्या मात्रा सातत्याने वाढतेय! आपली लोकसंख्या ज्या वेगाने वाढतेय त्या वेगाने आपण कधीही सर्वांना घर देऊ शकणार नाही, वरकरणी याचा परवडणा-या घरांशी काहीही संबंध नसल्याचे वाटेल मात्र प्रत्यक्षात त्यांचा थेट संबंध आहे! लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी तळागाळातून मोहीम चालवणे आवश्यक आहे व ती नियंत्रणात आणणे हे उद्दिष्ट असले पाहिजे. लोकसंख्येवर नियंत्रण न ठेवता आल्याने झोपडपट्ट्या वाढल्या आहेत कारण आपण या लोकांना परवडण्यासारखी घरे देऊ शकत नाही!

पर्यावरण व जैवविविधता संवर्धन:
परवडण्यासारखी घरे तयार करताना आपण या पृथ्वीवर एकटे नाही हे विसरु नका. पोपटापासून ते वाघापर्यंत अनेक प्रजाती आहेत व त्यांनाही घर हवे आहे, मात्र त्यांच्यासाठी पायाभूत सुविधा किंवा परवडणा-या घरांची सोय करण्यासाठी सिडको नाही! म्हणूनच आपण जेव्हा घरांची रचना करतो तेव्हा अशा सर्व प्रजातींसाठी जागा राहील हे व जैवविविधता राखली जाईल हे पाहण्याची जबाबदारी आपली आहे, तसे झाले तरच आपण त्याला आपले घर म्हणू शकू, नाहीतर आपण केवळ क्राँकिटची जंगले उभारु ज्यात कोणताही जिवंतपणा नसेल!
सर्वात शेवटचे म्हणजे परवडण्यासारखी घरे ही काळाची गरज आहे हे विकासकांनी विसरु नये, कारण कोणत्याही प्रकल्पातून आपण किती नफा मिळवायचा आहे हे आपणच ठरवायचे आहे! ही केवळ सरकारची जबाबदारी नाही तर आपल्यापैकी प्रत्येकाची आहे. शेवटी आपल्या तयार घरांचे विक्री मूल्य किती आहे याच्याशी जमीनीच्या किमती निगडित आहेत

माझे बोलणे संपवण्यापूर्वी, मला स्पायडरमॅन या माझ्या आवडत्या चित्रपटातील संवाद सांगावासा वाटतो, “विथ ग्रेड पॉवर्स कम्स अलाँग ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटीज, म्हणजे जास्त शक्तीं सोबत जास्त जबाबदा–या   अभियंता असणे ही आपल्याला आपल्या ज्ञानामुळे मिळालेली शक्ती असेल तर ती शक्ती आपण परवडण्यासारखी घरे तयार करण्यासाठी वापरली पाहिजे, म्हणजे या देशातील कोणत्याही कुटुंबाला स्वतःच्या घराची काळजी करावी लागणार नाही, ही आपल्या शक्तिसोबत आलेली जबाबदारी आहे! यासाठी आपण संघटित व्हावे व सर्वोत्तम काम करावे अशी माझी इच्छा आहे, श्री. विश्वेश्वरैय्या यांना ती खरी आदरांजली असेल! मला आज हा सन्मान देण्यासाठी पुन्हा एकदा आभार, हे क्षण आयुष्यभर माझ्या स्मरणात राहतील.

जय महाराष्ट्र, जय हिंद!

संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स

https://ssl.gstatic.com/ui/v1/icons/mail/images/cleardot.gif






https://ssl.gstatic.com/ui/v1/icons/mail/images/cleardot.gif






https://ssl.gstatic.com/ui/v1/icons/mail/images/cleardot.gif


No comments:

Post a Comment