Tuesday 31 March 2015

नोकरशाही, लोकप्रतिनिधी कोठे आहे लोकशाही !Bureaucracy Aristocracy where is Democracy !
























तुम्ही काही पाप करणार असाल तर देवाविरुद्ध पाप करा, नोकरशाहीविरुद्ध करु नका; कारण देव एकवेळ तुम्हाला माफ करेल मात्र नोकरशाही करणार नाही                                            ….हायमन रिकोव्हर

हायमन जॉर्ज रिकोव्हर यांना आण्विक नौदलाचे जनकही मानले जाते, ते अमेरिकेचे नौदल प्रमुख होते, त्यांनी मूळ नाविक आण्विक प्रणोदक विकास कार्यक्रम निर्देशित केला व तीन दशके नाविक अणुभट्टी निर्देशक म्हणून त्याचे संचालन केले. माझे अनेक मित्र जे चांगले नोकरशहा आहेत ते वरुन नाराजी दाखवत असले तरी वरील अवतरण वाचून मनातल्या मनात हसत असतील. मात्र तरीही हायमन यांनी जे म्हटले आहे तेच सामान्य माणसाचे नोकरशहांविषयी मत आहे ज्यांना आपण शासकीय सेवक म्हणतो! शासकीय सेवेतील अनेक जण हे मान्य करणार नाहीत मात्र तरीही जेव्हा शासकीय सेवेच्या कनिष्ट प्रवर्गातील शिपायांसारख्या पदांसाठी किंवा अगदी वनरक्षकासाठीही पदव्युत्तर पदवी घेतलेल्या उमेदवारांचे अर्ज येतात तेव्हा शासकीय सेवेत काहीतरी जादू आहे हे तुम्हाला मान्य करावंच लागतं! याची दोन कारणे आहेत एक म्हणजे पगाराची शाश्वती असते व दुसरे म्हणजे तुम्ही कसेही काम केले तरी देवही तुम्हाला नोकरीवरुन काढू शकत नाही! या दोन कारणांमुळेच सरकारी सेवकांची अशी भावना असते की सामान्य माणूस त्यांना हातही लावू शकत नाही. आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे सामान्य माणसाच्या जीवनाशी संबंधित बहुतेक दैनंदिन विषयांच्या बाबतीत त्यांची एकाधिकारशाही असते. उदाहरणार्थ मला माझ्या कुठल्याही प्रकल्पाची योजना मंजूर करुन घ्यायची असले तर पीएमसीशिवाय ते कोण करु शकते किंवा मला माझी जमीन एनए म्हणजे अकृषी जमीन करायची असेल तर केवळ जिल्हाधिकारी ते करु शकतात किंवा मला वीज जोडणी हवी असेल तर एमएसईबीशिवाय कुणीही ते करु शकत नाही किंवा मला चालक परवाना हवा असेल तर आरटीओकडूनच घ्यावा लागतो तसेच जमीनीचा एखादा तुकडा दुस-याच्या नावावर करायचा असेल तर केवळ तलाठीच करु शकतो जो महसूल विभागातील सर्वात कनिष्ट श्रेणीतील अधिकारी आहे. एवढेच काय मला माझ्या मालमत्तेची विक्री नोंदवायची असेल किंवा विवाहाची नोंदणी करायची असेल तर ती सरकारी निबंधकाकडेच करावी लागते! अशा कामांची यादी न संपणारी आहे शालेय शिक्षक असो किंवा लक्षाधीश व्यावसायिक, त्याला कोणत्या ना कोणत्या शासकीय प्रतिनिधीला शरण यावेच लागते ज्यांना आपण नोकरशाह म्हणतो! मला मान्य आहे की त्यांनी सामान्य माणसाला सेवा देणे अपेक्षित आहे मात्र त्या सामान्य माणसाला विचारा ते नोकरशहांच्या सेवेबाबत आनंदी आहेत का? सरकारी सेवकांना कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय जनतेची सेवा करता यावी यासाठी ब्रिटीश व्यवस्थेमध्ये त्यांना संरक्षण देण्यात आले. मात्र दुर्दैवाने ब्रिटीश गेल्यानंतरही सरकारी सेवकांना संरक्षण देण्याचा मूळ उद्देशच हरवला व आता असा दृष्टिकोन विकसित झाला आहे नोकरशहा देवापेक्षाही मोठा आहे व त्याचा किंवा तिचाच शब्द अंतिम असेल!

दोन दशकांपूर्वीपर्यंत म्हणजे १९९० पर्यंत हे ठीक होते, केंद्रीय पातळीवर असो, राज्य पातळीवर असो किंवा तालुका पातळीवर असो या नोकरशहांचीच सत्ता होती त्यानंतर लोकप्रतिनिधींचं वर्चस्व वाढलं. हे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी होते व खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे नगर सेवक अशा विविध प्रकारच्या लोकप्रतिनिधींचा त्यामध्ये समावेश होता. हळूहळू या प्रजातीला असं जाणवायला लागलं की नोकरशहा हे जनतेचे सेवक आहेत व आपल्याला जनतेने निवडून दिले आहे म्हणजेच आपणच जनता आहोत! अर्थात यात काहीच वावगे नाही कारण त्यालाच आदर्श लोकशाही म्हणतात; की एकीकडे नोकरशहा त्यांची प्रशासकीय जबाबदारी पार पाडत आहेत व लोकप्रतिनिधी त्यांच्यावर नियंत्रण ठेवत असतील तर ते योग्य मार्गानेच जात आहेत व शेवटी हे सगळे सामान्य माणसाच्या हितासाठीच चालले आहे!

आता बरेच जण गोंधळात पडले असतील की या लेखाचा नेमका विषय काय आहे त्यांच्यासाठी सांगतो, की अलिकडेच मी आपल्या प्रिय पुणे शहराविषयी अतिशय रोचक बातमी वाचली. मी त्या प्रकरणाच्या तपशीलात जाणार नाही कारण तो प्रस्तुत लेखाचा विषय नाही. ती बातमी एका इमारतीविषयी होती जिच्या काही मजल्यांचे बांधकाम अवैध होते व त्या इमारतीच्या मालकाने कोणत्याही परवानगीशिवाय बांधकाम करुन ते मजले वापरायला सुरुवात केली होती. स्वाभाविकपणे नेहमी जसं होतं तसंच यावेळी झालं की आता प्रत्येक जण एकमेकांकडे बोट दाखवत आहेत व या अवैध कामासाठी आपला विभाग कसा जबाबदार नाही याचे स्पष्टीकरण देत आहेत. मात्र नोकरशाहीच्या अलिखित नियमानुसार, “प्रत्येक चुकीसाठी एक बळीचा बकरा असतो! या नियमानुसारच पीएमसीच्या वरिष्ठ अधिका-यांची चौकशी करण्यात आली व परिणामी काही कनिष्ठ अभियंत्यांना सेवेतून निलंबित (हटविण्यात आले नाही) करण्यात आले व इतर काही जणांची बढती थांबविण्यात आली. सकृतदर्शनी कुणाही सामान्य माणसाला हे अतिशय विचित्र वाटेल कारण या व्यवस्थेतील कुणीतरी जबाबदार असलेच पाहिजे, ज्यांची गुन्हा घडण्यापूर्वी तो नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी होती व असे करण्यात जे अपयशी ठरले त्यांना शिक्षा होणे आवश्यक आहे व म्हणूनच त्याला किंवा त्यांना शिक्षा देण्यात आली! इथेच या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण लागले कारण नोकरशहांना किंवा त्यापैकी काही जणांना शिक्षा देण्यात आली होती त्यामुळे असे कसे होऊ शकते याबाबत आरडाओरड सुरु झाली! हे स्वघोषित अस्पर्शनीय नोकरशहा आता स्वतः कात्रीत सापडले होते! हे काही बरोबर नाही व ते वृत्त याच संदर्भात होते. या नोकरशहांच्या तथाकथित संघटना एकत्र झाल्या व त्यांनी माध्यमांसमोर तसेच त्यांच्या वरिष्ठांसमोर दावा केला की ते दोषी नाहीत तर लोकप्रतिनिधी दोषी आहे कारण त्यांनीच सदर इमारतीमधील गैरप्रकारांकडे दुर्लक्ष करण्यासाठी दबाव आणला, हे लोकप्रतिनिधीच दोषी आहेत व त्यांनाही शिक्षा व्हावी!

अरेरे आपले नोकरशहा किती बिचारे आहेत ना, आता कुणी प्रजाती त्यांच्यावर दबाव आणू शकते हे त्यांना जाणवायला लागलं आहे व शेवटी ते देखील अस्पर्शनीय नाहीत! आता पुन्हा सामान्य माणूस म्हणेल की यामध्ये काय नवीन आहे? किंबहुना यावेळी हे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे त्यामुळे आता लोकप्रतिनिधी व सरकारी सेवक हे दोघेही एकमेकांकडे बोट दाखवत आहेत, अशावेळी या नोकरशहांना लोकप्रतिनिधींची नावे जाहीर करण्यापासून कुणी रोखले आहे जे त्यांना इमारतीमधील अवैध बाबींकडे दुर्लक्ष करण्यासाठी दबाव टाकत होते? हे प्रकरण प्रकाशात आलेच नसते व काही अधिका-यांना शिक्षा झाली नसती तर या लोकांनी असे आरोप केले असते का? आपल्या आजूबाजूला अनेक गैरप्रकार घडत असतात, प्रत्येक वेळी नोकरशहांवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी दबाव येतो का? गेल्या पावसाळ्यात पुण्याच्या उपनगरीय रस्त्यावर तुंबलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह गेल्याने दोन लोकांचा जीव गेला. नेहमीप्रमाणे चौकशी सुरु करण्यात आली, मात्र एमएसईबीच्या कुणाही अधिका-याला किंवा ज्यांनी पाणी तुंबू दिले त्यांना शिक्षा झाल्याचे ऐकीवात नाही. दरवर्षी पावसाच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा व्हावा याची व्यवस्था करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात तरीही शहरात ठिकठिकाणी पाणी साचते! नवीन रस्ते खणले जातात व अनेक अपघात होतात, सार्वजनिक पैशाच्या अपव्ययासाठी कुणाला दोष द्यायचा? मुंबई-बंगलोर उपमार्गाचा कोणताही सेवा मार्ग नाही व दररोज हजारो दुचाकीस्वार त्यावरुन प्रवास करतात तेव्हा अवजड वाहनांमुळे अपघात होऊन त्यांच्या डोक्यावर सतत मृत्युची टांगती तलवार असते; या तथाकथित नोकरशहांना सेवा मार्ग बनविण्यापासून कुणी रोखले आहे? जी कायदेशीर कामे करणे आवश्यक आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते त्यांचे काय, त्यासाठी त्यांच्यावर कुणी दबाव आणण्याची काय गरज आहे? एखाद्या बेकायदा कामाकडे आपल्या सोयीने दुर्लक्ष करायचे व त्यानंतर निवडून आलेल्या सदस्यांकडे बोट दाखवायचे की त्यांच्या दबावामुळे आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले असे म्हणणे अतिशय सोपे आहे!

अर्थात त्यांच्या या दाव्यात काही तथ्य नाही असे नाही, जनतेचे तथाकथित प्रतिनिधीही अशा अशा प्रकारच्या कामांमध्ये गुंतलेले असतात, मात्र ती जनतेसाठी असतात, नाही का? त्यांना असे वाटते की जनतेला जे हवे आहे ते दिले पाहिजे मग ते अवैध बांधकामे नियमित करणे असो किंवा फेरीवाल्यांनी अडवलेले रस्ते असोत, लोकप्रतिनिधींना केवळ एक गोष्ट माहिती असते जनतेला जे हवे आहे ते देणे! आपल्या देशामध्ये स्वहित हे प्रत्येक गोष्टीपेक्षा वरचढ आहे त्यामुळे प्रत्येक कायदा हा आपल्यासाठी अडथळा आहे! म्हणूनच आपले निवडून आलेले प्रतिनिधी कधीही सरकारी सेवकांवर चांगल्या गोष्टींसाठी दबाव टाकत नाहीत ज्या सार्वजनिक हिताच्या आहेत, प्रश्न जेव्हा केवळ वैयक्तिक हिताचा असतो तेव्हाच दबाव टाकला जातो! शहरामध्ये एमएसईबीच्या विजेच्या तारांसाठी रस्ते खणण्याचे आणखी एक प्रकरण पाहा, प्रशासनाने कमी दराने एमएसईबीच्या विजेच्या तारा घालण्याची परवानगी दिली आहे कारण ती समाजासाठी आवश्यक सेवा आहे. इथे सर्व लोकप्रतिनिधी एकत्र आले व त्यांना या निर्णयाला स्थगिती दिली, विजेच्या तारांसाठी रस्ते खणणे महाग केले; ज्यासाठी नागरिकांनाच अधिक पैसे द्यावे लागणार आहेत! अशी अनेक उदाहरणे आहेत, जेथे नोकशहा व लोकप्रतिनिधींनी एकमेकांविरुद्ध भूमिका घेतली आहे, इथे त्यांच्या वैयक्तिक हिताविरुद्ध सार्वजनिक हित पणाला लागले होते, यामुळे ते एकमेकांचे विरोधक असल्याचे चित्र निर्माण झाले आहे! या दोन्ही वर्गात माझे अनेक मित्र आहेत ज्यांना कदाचित हा लेख आवडणार नाही मात्र लोकांना जे वाटते, ते जो विचार करतात ते मी इथे मांडले आहे, यात वैयक्तिक कुणालाही दोष द्यायचा हेतू नाही. मी ज्या व्यवसायामध्ये आहे त्याविषयी फारसे काही आदराने बोलले जात नाही, तरीही मी ते स्वीकारले पाहिजे कारण माझे मत हे तथ्य किंवा समाजाचे मत असेल असे नाही!

लोकप्रतिनिधींकडून येणा-या दबावाला बळी न पडता आपले काम करता यावे यासाठीच नोकरशहांना व्यवस्थेमध्ये सुरक्षा देण्यात आली आहे, मात्र जेव्हा लोकप्रतिनिधींकडून एखादा आदेश किंवा विनंती केली जाते तेव्हा ते अतिशय सोयीस्करपणे ही बाब विसरतात! असे करणेही स्वाभाविक आहे कारण पदोन्नतीपासून ते बदलीपर्यंत, तथाकथित मलईदार पदे मिळण्याचे सर्व अधिकार या लोकप्रतिनिधींच्या हातात असतात, त्यामुळे वरील वृत्ताप्रमाणे कुणा मूर्खाने एखादा घोटाळा उघड करेपर्यंत व दोन्ही वर्गातील साटेलोटे संपेपर्यंत एकमेकांकडे कानाडोळा करणेच दोघांच्याही फायद्याचे असते!

नोकरशाही व लोकप्रतिनिधी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत याची जाणीव आता लोकांना झाली पाहिजे; हे नाणे आपले जीवन आरामदायक बनविण्यासाठी चलन म्हणून वापरणे अपेक्षित आहे मात्र दुर्दैवाने ते एकमेकांच्या हिताविरुद्ध काम करताहेत व त्याचे नुकसान आपल्याला भोगावे लागत आहे!

ज्या बातमीमुळे मी हा लेख लिहायला उद्युक्त झालो त्याकडे फारसं कुणाचं लक्ष गेलं नाही व ज्यांनी ती वाचली असेल त्यांच्याही ती विस्मरणात गेली असेल, मात्र ती बातमी खरोखर डोळे उघडणारी होती! या अस्पर्शनीय लोकांचा खरा चेहरा समोर आला ज्यांच्यावर चुकीच्या गोष्टी करण्यासाठी दबाव टाकता येतो, तर मग त्यांच्यावर योग्य गोष्टी करण्यासाठी दबाव का आणू नये! त्यांच्यावर दबाव आणणा-या व्यक्ती आपल्या लोकप्रतिनिधीच आहेत, त्यामुळे आता आपली ताकद जाणून घेणे आपल्यावर आहे नाहीतर नोकरशहा व लोकप्रतिनिधींच्या या साट्यालोट्यात आपलं मरण होईल. आज कुणी अज्ञात व्यक्ती त्यांच्या निष्काळजीपणाचा व आपल्याला कुणी हात लावू शकत नाही या दृष्टिकोनाचा बळी ठरली आहे, उद्या कदाचित त्या जागी आपल्या कुटुंबातील कुणीतरी असू शकते व त्यावेळी कारवाई करण्यासाठी फार उशीर झाला असेल! म्हणूनच त्यापूर्वीच पाऊल उचलू व या नोकरशहांना व लोकप्रतिनिधींवर त्यांचे जे काम आहे ते करण्यासाठी दबाव टाकू नाहीतर लवकरच सामान्य माणसाचे म्हणजेच लोकशाहीचे अस्तित्वच नष्ट होईल व त्यासाठी केवळ आपण जबाबदार असू!

संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स




Thursday 26 March 2015

स्मार्ट शहर का मृत शहर ?



























खरोखरच निरुत्साही, निष्क्रिय शहरांमध्ये स्वतःच्याच विध्वंसाची बिजे असतात व दुसरे फारसे काहीही नसते. मात्र उत्साही, वैविध्यपूर्ण, जोशपूर्ण शहरांमध्ये त्यांच्या स्वतःच्या पुनर्निमाणाची बिजे असतात, स्वतःशिवाय इतर समस्या व गरजांना समोरे जाण्याची ऊर्जा असते.”… जेना जेकब

जेना जेकब ही अमेरिकी-कॅनडियन पत्रकार, लेखिका व कार्यकर्ती होती व ती शहरांच्या अभ्यासावरील तिच्या प्रभावासाठी सर्वाधिक ओळखली जाते. द डेथ अँड लाईफ ऑफ ग्रेट अमेरिकन सिटीज या तिच्या अतिशय प्रभावी पुस्तकामध्ये नागरी नूतनीकरणाने शहरातील बहुतेक नागरिकांच्या गरजा विचारात घेतल्या नाही असे मत मांडण्यात आले आहे. हे पुस्तक नागरी नियोजनाशी संबंधित प्रत्येकासाठी अतिशय महत्वाचे पुस्तक आहे. वरील विधान हे तिच्या अनेक विधानांपैकी एक आहे जे शहरी जीवनाचे सखोल व वास्तववादी तसेच तात्विक वर्णन करते!

माझी एक पत्रकार मैत्रिण बर्नाली पुणे येथील एका पाक्षिकासाठी काम करते, त्यात त्यांनी एक स्तंभ सुरु केला आहे ज्यामध्ये नागरिकांना दैनंदिन जीवनामध्ये त्यांच्या भोवताली ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्याविषयी लिहीले जाईल. तिने मला विचारले की त्या स्तंभासाठी मला काही लिहीता येईल का. माझ्यातल्या लेखकासाठी ही संधी म्हणजे नेकी और पूँछ पूँछ या हिंदीतल्या म्हणीसारखी होती, म्हणजेच मला स्वतःचं मत व्यक्त करण्यासाठी यापेक्षा आणखी चांगली संधी कोणती असू शकते, कारण आपण पुणेकरांना (निम्म आयुष्य पुण्यात काढल्यानंतर मला स्वतःला पुणेकर म्हणवून घ्यायला आवडतं, मात्र अजून मी एक दशमांशही पुणेकर नाही) आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक गोष्टीत समस्या शोधायला आवडतेच! आपले बरेचदा बरोबर असते हे मान्य केले तरीही कट्टर पुणेकर अगदी परिपूर्ण गोष्टीतही चुका काढू शकतात! इथे तर मला आपणहून  कुणीतरी माझ्या भोवतालच्या समस्यांविषयी विचारत होतं. ज्या शहरामध्ये लाखो लोक झोपडपट्ट्यांमध्ये किंवा बेकायदा बांधकामांमध्ये राहात आहेत, ज्यांना कोणतीही सार्वजनिक आरोग्य सुविधा नाही किंवा व्यवस्थित शिक्षण उपलब्ध नाही, सार्वजनिक वाहतूक वगैरेंसारख्या चैनीच्या बाबी तर त्यांच्यापासून अतिशय दूर असताना, माझी परिस्थिती नक्कीच चांगली आहे. माझं ब-यापैकी चांगल्या वस्तीत घर आहे, माझं स्वतःचं वाहन आहे त्यामुळे मला सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून राहायची गरज नाही. माझे उत्पन्न चांगले असल्यामुळे मला व माझ्या कुटुंबाला चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत व माझी मुले चांगल्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. अशा परिस्थितीत मी एक आनंदी नागरिक आहे का, सामान्य व्याख्यानुसार विचार केला तर मी असायला पाहिजे, मात्र एवढेच पुरेसे आहे का? एक नागरिक म्हणून मी नेहमी हा प्रश्न स्वतःला विचारतो की पुण्यासारख्या शहरातील माझ्या शहरी जीवनातील अनेक अदृश्य अडथळ्यांचे काय! मला मान्य आहे की अनेक लहान गावांपेक्षा व शहरांपेक्षा आपली परिस्थिती नक्कीच चांगली आहे, मात्र आपण जेवढे कर भरतो त्या तुलनेत त्याचे परिणाम फारसे चांगले नाहीत! एक नागरिक म्हणून मी व माझे कुटुंब आनंदी झाले की माझी जबाबदारी संपत नाही, तर माझ्या आजूबाजूला असलेल्या लोकांनाही एक चांगले आयुष्य मिळाले पाहिजे जी केवळ महापालिकेचीच नाही तर माझीही जबाबदारी आहे! अनेक गोष्टींची अतिशय सहजपणे काळजी घेता येईल, मात्र कुणीही काळजी घेत नाही म्हणून कुणीही काही करत नाही अशी परिस्थिती आहे! यातील बहुतेक समस्या संपूर्ण शहराच्या आहेत, केवळ एखाद्या परिसराच्या नाहीत!

मी ज्या भागात राहतो त्याचे उदाहरण घ्या, हा शहराचा मध्यवर्ती भाग आहे कर्वे रस्ता, हा भाग नदीपासून जवळ असल्यामुळे शांत आहे व येथे नदीलगत हरीत पट्टा आहे! मात्र हा हरीत पट्टा सर्व प्रकारच्या व्यावसायिक हेतूने वापरला जात आहे उदाहरणार्थ लग्नसमारंभांसाठी, प्रदर्शनांसाठी व हॉटेलसाठी ज्यामुळे हा हरित पट्टा ठेवण्याचा मूळ उद्देशच अपयशी ठरतो! या ठिकाणी लोकांची सतत वर्दळ असल्यामुळे लावली जाणारी वाहने व, डिजेंसह मोठ मोठे स्पिकर लावून काढल्या जाणा-या मिरवणुकींमुळे वाहतुकीची कोंडी होते! हा हरित पट्टा ज्या कारणासाठी आरक्षित ठेवण्यात आला होता त्यासाठीच वापरला जावा याची महापालिका खात्री का करु शकत नाही? तशी खात्री करता येत नसेल तर मग हा व्यावसायिक विभाग म्हणून रुपांतरित करा व वाहनतळाचे व इतर अनेक नियमांचे पालन करुन अशाप्रकारे वापर करण्यास परवानगी द्या! आजूबाजूच्या नागरिकांनी वारंवार सर्व माहितीतल्या अधिका-यांकडे तक्रार केली आहे मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही! ध्वनीप्रदूषणाच्या जोडीलाच फटाक्यांमुळे वायूप्रदूषणही होत असते! ही केवळ माझ्या भागातलीच नाही तर संपूर्ण शहराची समस्या आहे कारण हजारो हॉटेल्स व व्यावसायिक आस्थापनांना वाहने लावण्यासाठी पुरेशी जागाच नाही व जी काही जागा आहे त्यावर इतर कारणांनी अतिक्रमण झाले आहे व अशा ठिकाणी येणारे सर्वजण रस्त्यावर वाहने लावतात जिथे लाखो वाहनांची आधीच गर्दी आहे!

त्यानंतर म्हात्रे पुलापासून ते राजाराम पुलापासूनचा पट्टा फॉर्म्युला वनचा ट्रॅक असावा अशीच बहुतेक त्यावर वाहने चालवणा-या लोकांची समजूत असावी! रस्त्याची स्थिती चांगली आहे मात्र वाहनचालकांचे व त्यांच्या वाहन चालविण्याच्या नागरी संवेदनेचे काय! वाहतूक पोलीस असतात मात्र ते हेल्मेट किंवा परवाना तपासतात, वेगाची मर्यादा तोडण्यासंदर्भात कोणतेही गुन्हे नोंदवले जात नाहीत! तेथे गतिरोधक व विभाजक का बसवले जात नाहीत असा प्रश्न मला पडतो. या पट्ट्यामध्ये गेल्या सात वर्षात सत्तर एक अपघात झाले असतील मात्र हा वाहतूक पोलीसांचा विषय आहे असे पीएमसीचे म्हणणे आहे व वाहतूक पोलीस म्हणतात की हे पीएमसीचे काम आहेगतिरोधक हा तर एक विनोदाचाच विषय आहे कारण तुम्हाला पुण्यात विविध प्रकारचे गतिरोधक दिसतील! काही असे बांधलेले असतात की ते शोधावे लागतात तर काही अशा प्रकारे बांधलेले असतात की चालकाला त्यांच्या वाहनाची गतीच नाही तर वाहनच तुटेल अशी भीती वाटतेतसेच पुढे गतिरोधक आहे अशी सूचना देणारा फलक क्वचितच असतो त्यामुळे चालकाला गतिरोधकावर लक्ष ठेवावे लागते व ब-याच जणांना त्याचा अंदाज येत नाही, ज्यामुळे गतिरोधकांमुळेच अपघात होऊ शकतो! होय एक नागरिक म्हणून हा विषय माझाच वाटतो, जे रस्त्यांवर वाहने चालवतात त्या सर्वांसाठी ही एक मोठी समस्या आहे!

माझ्या घराच्या मागेच एक नाला आहे जो पूर्वी पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी वापरला जात असे व त्याच्या काठावर विविध प्रकारची दाट झाडी होती, जेथे खंड्या पक्षी (किंगफिशर) व मैनेसारखे अनेक पक्षी येत असत. मात्र आता त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे ज्यामुळे आजूबाजूची जैवविविधता नष्ट झाली आहे, आता त्या नाल्यातून सांडपाणी वाहते, कचरा टाकलेला असतो व आजूबाजूला डुकरे व भटकी कुत्री फिरत असतात! नदीचीही अशीच परिस्थिती आहे जी माझ्या परिसराचा एक भाग आहे व हीच नदी आपल्या शहरातील बहुतेक भागातून वाहते! नदीचे पाणी अतिशय प्रदूषित आहे ज्यावर केवळ पतंग व कावळे व डास घोंगावतात! आपली नदी स्वच्छ व सुंदर का असू शकत नाही कारण पुण्याला शहरातून वाहणा-या सर्वात लांब नदीचे वरदान लाभले आहे मात्र तोच या परिसरासाठी शाप ठरला आहे! मला ही केवळ माझीच नाही तर संपूर्ण शहराची समस्या असल्याचे वाटते!

त्यानंतर आजूबाजूला ओसंडून वाहणा-या कचराकुंड्या हे दृश्य नकोसे वाटते. वेळेवर कचरा उचलला जात नाही. तुम्ही शहराच्या कोणत्याही भागात जा, तुम्हाला रस्त्याच्या कडेला किंवा रस्त्याला लागू असलेल्या मोकळ्या जागेत कच-याचे ढीग साठलेले दिसतील! प्रत्येक सोसायटीने त्यांच्या आवारातच गांडुळ खत तयार करुन ओल्या कच-यावर प्रक्रिया करणे अपेक्षित आहे व पीएमसी केवळ कोरडा कचराच नेईल. तरीही आपल्यासारखे नागरिक ओला कचरा कचराकुंडीतच टाकतात किंवा रस्त्यावर उघड्यावर टाकतात व आपल्या महानगरपालिकेकडे यासाठीही काहीही तोडगा नाही! ही माझ्या शहराची समस्या आहे व मी त्यासाठी जबाबदार आहे!

गाय व म्हशींसारख्या पाळीव प्राण्यांची वेगळीच कथा आहे, ते पदपथावर इकडे तिकडे फिरत असतात, रस्त्यावर ठिकठिकाणी शेण पडलेले असते, कुणीही या प्राण्यांच्या मालकांवर कोणतीही कारवाई करत नाहीत, कारण त्यांनी आपल्या प्राण्यांसाठी पदपथाचा वापर केला तर तो स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी त्यांची आहेआपल्या शासनकर्त्यांच्या कृपेने रस्त्याच्या, पदपथाच्या प्रत्येक इंचाचे काँक्रिटीकरण केले जात आहे ज्यामुळे मातीच उरलेली नाही ज्यात एकेकाळी शेण मिसळून जात असे व नैसर्गिकपणे त्याचा विल्हेवाट लावली जाई! आता ते अनेक दिवस तसेच राहते व त्याची दुर्गंधी येऊ लागते ज्यामुळे आजूबाजूचा परिसर अस्वच्छ होतो. पावसाळ्यामध्ये तर आणखीनच वाईट परिस्थिती असते गाईच्या शेणामुळे पादपथ इतके निसरडे होतात की कुणीही त्यावर चालायची हिंमत करणार नाही व बिचा-या पादचा-यांना रस्त्यावरुनच चालावे लागत असल्यामुळे अधिक अपघात होतात. या समस्येकडे कुणीही लक्ष देत नाही व मला असे वाटते आपल्या शहराच्या स्वच्छतेला तसेच सौंदर्याला लागलेले हे गालबोट आहे व ही माझ्या भोवतालची समस्या आहे! भटक्या कुत्र्यांचीही समस्या अशीच आहे जवळ नदी असल्यामुळे ते दिवसा नदीकाठी आसरा घेतात व रात्री उशीरा व पहाटे डीपी रस्त्यावर भटकत असतात त्यामुळे डीपी रस्त्यावरुन येणा-या जाणा-यांचे अतिशय हाल होतात! या भटक्या कुत्र्यांची दहशत संपूर्ण शहरात आहे व कुणाकडेही त्यावर तोडगा नाही हे सत्य आहे. रात्री ही कुत्री प्रत्येक दुचाकी वाहनाचा पाठलाग करतात व बिचा-या दुचाकीस्वारांना पाठलाग करणा-या कुत्र्यांना टाळताना अपघाताला सामोरे जावे लागते. शहरामध्ये नेमकी किती भटकी कुत्री आहेत व त्यांना आळा घालण्यासाठी कोणते उपाय केले जात आहेत याची नेमकी कोणतीही आकडेवारी नाही.

खणून ठेवलेले रस्ते हा आपल्या शहरी जीवनाचा एक भाग झालाय. एखादे दिवशी रस्त्याचे डांबरीकरण केले जाते; डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण करताना तिथे रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या बाजूने अजिबात जागा सोडली जात नाही त्यामुळे पावसाचे पाणी त्यांच्या मूळांपर्यंत झिरपायला काही वावच नसतो, जे अतिशय चुकीचे आहे. त्यानंतर दुस-याच दिवशी तोच रस्ता खणायला सुरुवात होते, कधी तो गॅस पाईपलाईनसाठी खणला जातो तर कधी ऑप्टिकल फायबर लाईनसाठी खणला जातो तर कधी एमएसईबीच्या विजेच्या तारांसाठी खणला जातो. या शहरातील प्रत्येक नागरिकाला एकच प्रश्न विचारावासा वाटतो की डांबरीकरण करण्यापूर्वीच ही सगळी कामे का केली जात नाहीत? या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेच नसते व आपला पैसाही खड्ड्यात जातो हे वेगळे सांगायची गरज नाहीखणून झाल्यानंतर पुन्हा रस्ते बुजवून त्यावर डांबरीकरण करण्याचे काम असे काही केले जाते की भीक नको पण कुत्रे आवर किंवा औषध आजाराहून जास्त त्रासदायक असे म्हणायची वेळ येते. रस्ता एका दिवसात खणला जातो मात्र दुरुस्तीचे काम कितीतरी महिने चालते, त्यामुळे धूळ किंवा खणलेले साहित्य रस्त्यावर उघडेच ठेवले असल्याने वाहने घसरुन अनेकवेळा अपघात व्हायची शक्यता असते!

सार्वजनिक मुता-या किंवा शौचालये ही आणखी एक समस्या आहे ज्याकडे सर्वजण कानाडोळा करतात! एकतर ठराविक अंतराने अशा सुविधा नाहीत व त्या असल्या तरी त्यांची परिस्थिती इतकी वाईट आहे की अगदी अंध, बहिरा व संवेदनाहीन व्यक्तिही त्या वापरण्याची हिंमत करणार नाही. किंबहुना या शौचालयांच्या देखभालीवर कुणाचे नियंत्रण आहे या प्रश्नाचे उत्तर कुणीच देत नाही! मला असे वाटते स्थानिक नगरसेवक तसेच पीएमसीच्या अधिका-यांना त्यांच्या प्रभागातील तसेच अधिकारक्षेत्रातील शौचालये किंवा मुता-या किमान दररोज किमान एकदा तरी वापरणे बंधनकारक केले पाहिजे, म्हणजे त्यांची किती दयनीय अवस्था आहे याची त्यांना जाणीव होईलही सार्वजनिक शौचालये कुठे आहेत हे दाखवणारा फलक कुठल्याही परिसरात नाही, ज्यामुळे लोक पादपथ किंवा रस्त्याच्याकडेला लघुशंका करतात, ज्यामुळे शहर आणखी घाण होते! या सार्वजनिक शौचालयांच्या आजूबाजूला राहणा-या नागरिकांचाही तितकाच दोष आहे कारण त्यांच्यापैकी ती वापरण्यायोग्य स्थितीत ठेवण्यासाठी कुणीही यंत्रणेवर दबाव आणलेला नाही, किंवा त्यांच्यापैकी कुणीही पुढे येऊन थोडे पैसे गोळा करुन त्यांची देखभाल करण्याचा प्रयत्न केला नाही!

माझी मुले कधीच मोकळ्या मैदानात खेळू शकलेली नाहीत कारण माझ्या परिसरात मैदानच नाही; म्हणजेच डेक्कन ते कोथरुड या परिसरात सार्वजनिक मैदान नाही असे मला म्हणायचे आहे. ते केवळ रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांच्या गर्दीत खेळू शकतात किंवा रस्त्यांवर खेळून त्यांचा जीव धोक्यात घालू शकतात. आपल्याकडे एखाद्या परिसरातील नागरिकांना खेळण्यासाठी पुरेशी मोठी सार्वजनिक मैदाने का नाहीत? याचे उत्तरही कुणी देत नाही!

शहरातल्या दैनंदिन समस्यांची यादी अमर्याद आहे, आपल्या तोंड द्याव्या लागणा-या समस्यांचा विचार करुन माझा मेंदू थकून जातो तरीही आपण अभिमानाने पुणेकर म्हणून मिरवत असतो! डीपी म्हणजेच विकास योजना तयार केल्या जातात, त्यांची मुदत चुकते त्या रद्द होतात व आपण पुन्हा नवीन डीपी तयार करतो मात्र या दैनंदिन समस्यांचं काय? मात्र या शहरातील नागरिकांना स्वच्छ सार्वजनिक शौचालये देण्यासाठी आपल्याला एखाद्या धोरणाची किंवा डीपीची गरज का लागते? आपण सध्याच्या रस्त्यांची देखभाल करु शकत नाही व तरीही नवी रस्त्यांची योजना आखतो किंवा सध्याचे रस्ते रुंद करण्याचा विचार करतो! आपण सध्या असलेल्या हिरव्या पट्ट्यांचा हिरवाईसाठी वापर करु शकत नाही व आपण जैवविविधतेसाठी नवीन आरक्षण करतो जे कालांतराने विविध प्रकारच्या झोपड्यांमध्ये रुपांतरित होईल! ही केवळ एखाद्या प्रभागाची किंवा शहरातील एखाद्या भागाची समस्या नाही, संपूर्ण शहराला याचा त्रास होतोय किंबहुना ही जखम भळभळतेय असंच म्हणावं लागेल. मात्र प्रत्येकजण त्यासाठी एकमेकांना दोष देताहेत किंवा तो त्यांचा विषय नाहीच अशाप्रकारे त्या भळभळणा-या जखमेकडे दुर्लक्ष करतात!

माध्यमे या समस्यांविषयी ओरड करतात मात्र त्यामध्ये सातत्य नसते किंवा काही कारवाई करण्यात आली तर त्यांच्या बातमीचा परिणाम कसा झाला हे दाखवण्याचाच प्रयत्न अधिक असतो! यासाठीच संबंधित यंत्रणेवर दबावगट म्हणून काम करण्यासाठी एक मंच तयार करणे ही काळाची गरज आहे, ज्याद्वारे यंत्रणेला काम करावे लागेल नाहीतर शिक्षा भोगावी लागेल!

एकीकडे आपण हुशार शहर बनण्याविषयी चर्चा करत आहोत मात्र नागरिकांना सेवा देण्याचा विचार केल्यास आपण मठ्ठ शहर आहोत हे सत्य आहे. कुठेतरी या मठ्ठपणाची मोठी किंमती या शहरातल्या प्रत्येक उद्योगाला भरावी लागणार आहे, प्रामुख्याने रिअल इस्टेटला! पुणे हे राहण्यासाठी अतिशय चांगले शहर आहे असे समजून लोक इथे येत असत ते दिवस आता गेले. अनेक समस्या असलेले शहर असा याचा नावलौकिक आता झाला, आपण जोपर्यंत सत्य स्वीकारुन त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न करत नाही तोपर्यंत आपण मठ्ठ शहरावरुन मृत शहर झालेले असू! मात्र नागरिकांचा दृष्टिकोन पाहता असे जाणवते की आपले हृदय धडधडत आहे म्हणून आपण जिवंत आहोत मात्र शहराप्रती आपल्या संवेदना व मन मृत झाले आहे! आपण स्वतःला पूर्वेचे ऑक्स्फर्ड म्हणवतो मात्र शहराची जवळपास निम्मी लोकसंख्या मतदानाचा त्यांचा मूलभूत हक्क बजावण्यासाठी घराबाहेरही पडत नाही; म्हणूनच आपले शहर लवकरच एक शवागार होईल यात काहीही आश्चर्य नाही, कारण मृतदेहांची तीच तर जागा आहे !


संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स




Sunday 22 March 2015

वाघांच्या पलीकडले ताडोबा !



















जंगलातल्या वाघाला तुम्ही कॅमे-यात कशा प्रकारे  बंदीस्त करता त्यापेक्षा त्या क्षणांचा आनंद तुम्ही घेतला आहे ना हे जास्त महत्वाचे आहे...संजय

मार्च महिन्याच्या मध्यावरची ती एक सकाळ होती आणि ताडोबामधील तो प्रसिद्ध उन्हाळा अजून सुरू व्हायचा होता.मोहार्ली गेटमधून माझ्या जिप्सीनं प्रवेश करताच आम्हाला जामुनझारीच्या बाजूने भेकर (बार्कींग डीअर ) विशिष्ट प्रकारे ओरडण्याचा  आवाज आला. त्यामुळे बांबूच्या झाडांमधून असलेल्या वळणदार रस्त्यावर आमच्या गाडीचा प्रवास सुरू झाला. आमच्या नजरा त्या घनदाट झाडीत अपेक्षित पिवळ्या आणि काळ्या पट्ट्यांचा शोध घेऊ लागल्या कारण या रंगामुळे जंगलात  वाघ कोणाच्या दृष्टीस पडणं कठीण असतं. अचानक आमच्या गाडीपुढे आम्हाला एक मोठा काळा प्राणी चालतां ना दिसला. जिप्सीच्या चाकांचा आवाज येताच तो थांबला आणि मागे वळला. क्षणभरासाठी माझा श्वासही थांबला. ते पूर्ण वाढ झालेले नर अस्वल होते. अस्वलांच्या विक्षिप्त सवयीप्रमाणे पुढील दिशेला चालत जाण्याऐवजी १८० अंशांचे वळण घेत ते थेट आमच्या दिशेने चालत येऊ लागले. नर अस्वलाला समोरा-समोर पाहणे माझ्या स्वप्नापलिकडले होते, मी माझा कॅमेरा काढला आणि माझ्या वाढलेल्या श्वासांच्या वेगाने त्याचे फोटो काढू लागलो. तुम्ही ज्याची कधी कल्पनाही केली नसेल तेच समोर आले तर....त्यामुळे माझी ताडोबाची सफर अशा अनोख्या पद्धतीने सुरू झाली. ताडोबाच्या जंगलात दरवेळी फक्त मलाच नाही तर प्रत्येकाला काहीतरी पहिल्यांदाच बघायला मिळते, फक्त त्यासाठी आपल्यात संयम असावा लागतो आणि जेव्हा ते येतं तेव्हा ते अनुभवण्याची समयसूचकता हवी.

 मित्रांनो मी गेल्या अनेक वर्षापासून जंगलांची सफर करत आहे आणि दरवेळी ही जंगले मला काहीतरी नवीन देत आहेत. पुढे ताडोबातील पांढरपौनी इथे आम्ही वाघीण बघायला मिळेल याची वाट पाहत होतो. पण एका कर्णकर्कश आवाजाकडे आमचे लक्ष वेधले गेले. आमच्या मागे असलेल्या गवतातून तो आवाज येत होता, दोन जंगली कावळे एका छोटयाशा वस्तूवरुन भांडत होता. कॅमे-याच्या माध्यमातून जेव्हा मी जवळून पाहिले तेव्हा मला जाणवले की हे एक दुर्मिळ नाट्य घडते आहे आणि आम्ही त्या कावळ्यांवर आमचे सारे लक्ष केंद्रीत केले. एका वटवाघूळाला कावळे जिवंत खात असल्याचे ते दृश्य होते. त्या वटवाघुळाची जात मला ओळखता आली नाही. ते बिचारे वटवाघुळ जीव वाचवण्यासाठी धडपडत होते, पण आपल्या तीक्ष्ण चोचीने ते कावळे त्या वटवाघुळावर तुटून पडले. आमच्यासोबत असलेल्या मार्गदर्शकानेही गेल्या १५ वर्षाच्या काळात आपण कावळ्यांनी जिवंत वटवाघुळ खाल्ल्याची घटना पहिल्यांदाच पाहिली असल्याचे सांगितले.
वरील घटना हे क्रौर्य असले तरी निसर्गाचा भाग आहे, आपण फक्त त्याचे कौतुक करु शकतो. हे कमी होते की काय म्हणून जंगलाने आम्हाला आणखी एक मोठा आश्चर्याचा धक्का दिला. आमची जिप्सी मोहार्ली रेंजमधून कोल्सा रेंजमध्ये निघाली असताना चालकाने अचानक गाडीचा वेग कमी केला, समोर रस्त्यावर एक पूर्ण वाढ झालेला गवा पडला होता, त्याला कोणी मारले आहे हे समजण्यास आम्हाला एक सेकंदही लागला नाही. आमच्या विरुद्ध दिशेला उभ्या असलेल्या एकमेव जिप्सीने लाईट चमकवून शिकारी जवळपास असल्याचा इशारा आम्हाला दिला. तेवढ्यात झाडीतुन एक वाघीण तिथे आली आणि ती आपल्या भक्ष्यावर तुटून पडली. एवढेच नाही तर ईतर भक्षकांच्या भीतीने तो मेलेला गवा रस्त्याच्या पलिकडे दाट झाडीत खेचून नेण्याचा प्रयत्न ती करु लागली, पण तिला ते शक्य झाले नाही. हा सारा घटनाक्रम आपल्या कॅमे-यात कैद करण्यासाठी मी  स्तब्ध होऊन क्लिक करत राहिलो. एखाद्या वन्यप्रेमी व्यक्तीसाठी हा सारा अनुभव स्वप्नवत होता, पण तो बिचारा गवा  मात्र निष्प्राण  डोळ्यांनी तिथे मरुन पडला होता. वन्यप्रेमींसाठी आपली स्वप्न पूर्ण करणारे असे हे ताडोबा अरण्य... फक्त ती स्वप्न सत्यात उतरताना पाहण्यासाठी आपण तयार असले पाहिजे.

विक्रम पोतदार हा माझा मित्र आणि एक कुशल वन्यजीव छायाचित्रकार माझ्या सोबत होता. माझ्यापेक्षा खुपच चांगला छायाचित्रकार असलेला विक्रम ते संपूर्ण दृश्य पाहून आनंदून गेला होता. आमच्या विरुद्ध दिशेला तीन जिप्सी उभ्या होत्या. माझ्या छायाचित्रांमधून त्या जिप्सी वगळणे मला शक्य होते, पण त्यातील काही जिप्सी मी छायाचित्रांमध्ये जाणीवपूर्वक येऊ दिल्या कारण फक्त व्यावसायिक छायाचित्रकारांनाच नाही तर जंगल सफरीसाठी पहिल्यांदाच आलेल्या सामान्य पर्यटकांनाही असा अनुभव मिळू शकतो हे मला दाखवून द्यायचे होते कारण जंगल हे फक्त काही मोजक्या लोकांचे नाही तर प्रत्येकाचे आहे.आपल्यासमोर घडणा-या घटनेत आपण दंग होऊन जातो, ते क्षण असे असतात की जणू काळ तिथेच थांबतोया जादूलाच जंगल म्हणतात. जंगलातील हे अनुभव कोणत्याही कॅमे-यात बंद करता येत नाहीत म्हणूनच हे अनुभव कथन करण्यासाठी मी स्वत: माझी उदाहरणे द्यायला सुरूवात केली.  जंगलातील प्रत्येक सहलीत अशा अनेक घटना घडतात आणि जंगल सफर करणा-यांचे अनुभव सारखेच असतात पण त्यात काहीतरी वेगळेपणाही असतो. जेव्हा फेसबुकसारख्या समाज माध्यमांवर मी काढलेली छायाचित्रे टाकतो तेव्हा मी किती भाग्यवान आहे किंवा त्यांना अशी दृश्य बघता आली नाहीत अशा कॉमेंट्स येतात, पण जंगलात कोणीही कमनशिबी नसतो.मी असे म्हणेन की काही जण थोडे जास्त भाग्यवान असतात आणि प्रत्येक क्षण हा वेगळा आणि एकमेवाद्वितीय असतो. एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जंगल म्हणजे फक्त वाघ नाही तर त्यापेक्षा खूप काही आहे आणि ताडोबा आपल्याला तेच शिकवत असते. माझे पुढील अनुभव सांगण्याआधी थोडी पार्श्वभूमी सांगतो. ताडोबा अरण्याबाबत पर्यटकांना माहिती व्हावी या विशेष हेतुने माझा जागतिक दर्जाचा छायाचित्रकार मित्र विक्रम पोतदार याच्या सोबत मी ताडोबामध्ये होतो.

ताडोबा हे प्रसिद्ध आहे मी मान्य करतो पण बहुतांश पर्यटक हे ताडोबामध्ये फक्त  वाघ बघण्यासाठी येतात, छायाचित्र काढतात आणि वाघाचे दर्शन झाल्याने सेलिब्रेट करतात आणि निघून जातात, बस्स एवढंच! पण ताडोबाच्या संरक्षणाची महत्त्वाची जबाबदारी असलेल्या अधिका-यांशी झालेल्या चर्चेतून आम्हाला जाणवले की पर्यटकांना ताडोबा काय आहे आणि समाजासाठी जंगलाचे महत्व त्यांना आधी समजावून घेऊ द्या, तसेच ताडोबासारख्या जंगलाबाबत प्रत्येकाची जबाबदारी काय आहे याची जाणीव त्यांना होऊ द्या. त्यामुळेच ताडोबा नेमके काय आहे ते त्यांच्यापुढे मांडणे महत्त्वाचे आहे. हा विचार माझ्या मनात माझ्या गेल्यावेळच्या ताडोबा भेटीतून आला.एक तरुण अधिकारी गजेंद्र नरवणे यांनी आम्हाला अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या एका सुरक्षा रक्षकाची गोष्ट सांगितली. या हल्ल्यात तो सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला होता आणि त्याच्या उपचाराचा खर्चही खूप होता. तेव्हा मी असा मुद्दा मांडला की ही घटना ताडोबाला भेट देणा-या पर्यटकांपुढे का मांडली गेली नाही, या कारणासाठी ते नक्कीच मदत करतील. हीच संकल्पना मग पुढे आली कारण आज ताडोबाच काय पण राज्यातील कोणतेही जंगल आणि पर्यटकांमध्ये कोणता दुवाच अस्तित्वात नाही. एकदा पर्यटक जंगलाच्या दरवाजातून बाहेर पडून सिमेंच्या जगात पोहोचले की या जंगलाने आपल्याला दिलेला आनंद ते विसरुन जातात. आपण जर कोणत्या तरी मार्गाने प्रत्येक पर्यटकाच्या संपर्कात राहिलो तर जंगलाबाबतच्या समस्यांवर त्यांची मदत घेता येईल तसेच त्यांच्या भोवतालच्या जंगलाचे रक्षण करण्याचे प्रयत्नही ते त्यांच्या परिने करतील. आमच्या चर्चेचा हा सारांश होता. त्यामुळे आम्ही हे मुद्दे क्षेत्र संचालक श्री. गरड, एपीसीसीएफ श्री. कळसकर आणि श्री. मोई पोक्कीम या पूर्व महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा केली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आम्हाला या संकल्पनेवर काम करण्यास सांगितले. या चर्चेमुळे आमच्या या ताडोबा  भेटीची सुरूवात झाली.चार दिवस ताडोबा जंगलाच्या विविध विभागांमधून आम्ही फिरत होतो. जंगलातील वनसंपदा, भौगोलिक रचना, प्राण्याची ठिकाणे, ताडोबाशी संबंधित लोक या सगळ्यांची छायाचित्र आम्ही घेतली. ताडोबाशी कोणत्याही प्रकारे संबंध असलेल्या प्रत्येकाशी आम्ही संवाद साधला. ताडोबासारख्या मोठ्या आकाराच्या जंगलाचा व्याप सांभाळणे जिकीरीचे काम आहे आणि त्यासाठी बऱ्याच मूलभूत सुविधांची गरज असते. यात पर्यटकांसाठी रस्ते बांधणीपासून ते वनकर्मचा-यांसाठी कल्याणकारी कामांचा समावेश होतो. उदा. जंगलाच्या आतमध्ये वनसंरक्षक आणि कामगारांसाठी राहण्याची सोय करणे व  ईतर अनेक आणि या सर्वांसाठी पैशाची आवश्यकता असते. या सगळ्यासाठी सरकारतर्फे निधीची तरतूद केली जाते हे मान्य, पण तो निधी योग्यवेळेस योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचणे गरजेचे असते. जंगलातील अनेकांशी चर्चा केल्यानंतर आम्हाला एक गोष्ट जाणवली की प्रत्यक्षात जंगलात काम करणारे कर्मचारी आणि त्यांचे वरिष्ठ यांच्यात संवादाचा अभाव आहे. तसा प्रत्येक संस्थेत वरपासून खालपर्यंत संवादाचा थोडाफार अभाव असतो. पण वनविभागात मात्र अधिकारी वर्ग आणि जंगलातील गार्ड किंवा fa^रेस्टर यांच्या राहण्याच्या परिस्थितीत बरीच  तफावत असते. जसे मी नेहमी म्हणतो सुरक्षित अशा जिप्सीतून जंगलाची सफर करणे, फोटो काढणे आणि त्यानंतर तुमच्या आरामदायी अशा निवा-यात आराम करण्यासाठी परतणे हे खूप सोपे आहे. पण त्याच जंगलात जेव्हा तुम्हाला दिवसाचे २४ तास आणि वर्षाचे ३६५ दिवस ४८ डिग्री सेल्सिअस तापमान, मुसळधार पाऊस आणि थंडीमध्येही रहावे लागते तेव्हा त्याच जंगलाचा तुम्हाला तिटकारा यायला लागतो. त्यामुळेच ताडोबाच्या आतील भागात कनिष्ठ पातळीवर होणारी नेमणूक ही शिक्षा समजली जाते अशी भावना त्या कर्मचा-यांनी आमच्यापाशी व्यक्त केली. परिणामी प्रत्यक्ष जंगलात काम करणारे कर्मचारी सतत बदलत असतात. यावरुन व्यवस्थेमधील पोकळी दिसून येते. जर आपल्याला ताडोबा जागतिक पातळीवर न्यायचे असेल तर या गोष्टी सुधाराव्या लागतील. त्यानंतर अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सुरक्षारक्षकाची कथेप्रमाणे बाहेरील समाज अनेक मार्गांनी आपल्या जंगलाचे रक्षण करणा-या या लोकांच्या मदतीसाठी एकत्र येऊ शकतो. अनेकजण जंगलाशी संबंधित समस्यांवर काम आणि सहकार्य करायला तयार आहेत. पण त्यांनी सरकारला थेट पैसा द्यावा अशी अपेक्षा करता येणार नाही कारण सामान्यांचा सरकारवर विश्वास नाही हे कटु सत्य आहे. पण आपण जर त्यांना जंगलामधल्या सेवा सुविधांसाठी थेट पैसे देण्यास सांगितले तर आपण दिलेल्या पैशांचा होणारा चांगला उपयोग पाहून ते तयार होतात. उदा. कोलसा भागात सौरपंपांसह कूपनलिकेची गरज आहे मग आपण एखाद्या एजन्सीकडे काम देऊन लोकांनी त्या कंत्राटदाराला थेट पैसे देऊन वनविभागाच्या देखरेखीखाली काम पूर्ण करुन घेऊ शकतो. अशाप्रकारच्या देणग्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्या कूपनलिकांवर देणगीदारांची नावे लिहिण्याचा पर्यायही आपण देऊ शकतो.नुकतेच कान्हा जंगलात आम्ही जंगलातील मजुरांसाठी जंगलात वापरता येणा-या बुटांचे वाटप केले, अशाप्रकारे उपक्रम समाजाच्या निधीतून राबवले जाऊ शकतात. पर्यटकांसमोर ताडोबाचे योग्य विपणन करण्यामागे हे आणखी एक कारण आहे.

खरेतर विपणन हा योग्य शब्द नाही पण ताडोबाचे वैभव लोकांपर्यंत पोहोचवणे असा त्याचा मतितार्थ आहे. सध्या ताडोबा हे वाघांचे राज्य आहे पण हे तेवढ्यापुरतच मर्यादित आहे का? दरवर्षी इथे हजारो पर्यटक येतात, वाघांचे फोटो काढतात, त्यांच्या सिमेंट काँक्रीटच्या जंगलात आनंदाने परत जातात आणि थोड्याच दिवसात ताडोबाला विसरतात. पर्यटकांनी ताडोबाला पुन्हा भेट देण्याबरोबरच त्यांनी ताडोबाच्या कायम संपर्कात रहावे यासाठी आपल्याला काही करायची गरज आहे.ज्यांनी ताडोबाला भेट दिली आहे त्यांच्यासाठी हे आहे... आणि ज्यांनी आतापर्यंत भेट दिली नाही, त्यांच्या पर्यटनाच्या यादीमध्ये ताडोबाचे नाव सर्वात आधी असेल यासाठी आपण प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी आपण ताडोबाला प्रायोगिक प्रकल्प बनवला पाहिजे आणि त्यानंतर हाच उपक्रम भोर, पेंच, मेळघाट आणि राज्यातील इतर जंगलांमध्येही राबवता येऊ शकतो.प्राथमिक स्तरावर आम्ही खालील गोष्टी सुचवल्या आहेत-
सगळ्यांत आधी इंटरनेटचे ज्ञान असलेल्या आणि संगणक तज्ज्ञ अशा दोन व्यक्तींचा एक गट तयार करावा. महत्त्वाचे म्हणजे गरड सर आणि पोकिम सर यांच्यासारख्या उच्चस्तरीय अधिका-यांचा त्या गटावर दबाव असणे. दुसरे म्हणजे नियोजनपूर्वक आणि वेगाने कृती करणे. यासाठी मी काही उपयुक्त सूचना तुम्हाला सांगत आहे-
१.      ताडोबाची एक सचित्र माहिती पुस्तिका आणि लेख तयार करा. यातून ताडोबा हे केवळ वाघांसाठीच नाही तर आपल्या जगासाठीही किती महत्त्वाचे आहे ते समजेल. ताडोबासारखी ठिकाणे ही माणसासाठी निसर्गाची भेट आहे हे त्यांना समजू द्या. पण या दैवी देणगीचं संवर्धन करण्यासाठी पगारी लोकांव्यतिरिक्त आणखीही बरंच काही करण्याची आवश्यकता आहे.या माहितीपुस्तिकेत वरिष्ठ वनाधिका-यांचे संदेश असतील, तसेच ताडोबाला आवश्यक असलेल्या सोयी सुविधा आणि प्रत्येक सदस्याचे योगदान याचा समावेश असेल. हे अत्यंत सोप्या भाषेत असेल तेच त्यात उदाहरणे आणि विक्रमने काढलेली छायाचित्रे असतील. ही माहितीपुस्तिका पर्यटक ताडोबामधून परत जाताना स्मरणिका म्हणून सोबत नेतील. आपण शुल्कामध्येच या माहितीपुस्तिकेच्या किंमतीचा समावेश करू तसेच तीन किंवा त्यापेक्षा जास्त सफारींवर माहितीपुस्तिका मोफत अशी योजनाही राबवू. त्याशिवाय एक खास माहितीपुस्तिका बनवून प्रवेशद्वारावर विक्रीला ठावता येईल. यातून ताडोबाला उत्पन्न मिळू शकेल.
२.    ताडोबाला भेट देणा-या सर्वांचे इ-मेल आपल्याकडे आहेत. जी-मेलवर एक ग्रूप बनवून आपण एक इ-कॅलेंडरही बनवू शकतो. हे इ-कॅलेंडर सर्व सदस्यांना दर महिन्याला पाठवले जाईल, त्यात ताडोबामधील त्या महिन्याचे सर्वोत्कृष्ट छायाचित्र आणि घडामोडी यांचा समावेश असेल. या कॅलेंडरसोबतच ताडोबाचे बातमीपत्रही असेल. आपण राबवत असलेल्या कल्याणकारी उपक्रमांमध्ये संचालक आणि इतर लोकही योगदान देऊ शकतात. आपल्याला येणा-या अडचणी आणि आपण ताडोबाचे संवर्धन करण्यासाठी त्यातून कसा मार्ग काढतो, हेही त्यात असेल. हे छोटं असलं तरी मुद्देसूद असेल. यामुळे पर्यटकांच्या संपर्कात राहणे शक्य होईल. कारण सध्या प्रत्येकजण स्मार्टफोन वापरतो आणि त्यावर ई-मेल उपलब्ध असते. अशाच एका स्वंयसेवी संघटनेच्या इ-कॅलेंडरची लिंक पाठवित आहे.
3. या महिन्यात ताडोबामध्ये सामाजिक स्तरावर काय घडले याची माहिती आपण या माध्यमातून देऊ शकतो. तसेच ताडोबासाठी लोक कशा प्रकारे योगदान देऊ शकतात याबाबत आवाहन करू शकतो. अनेक लोक मदत करायला उत्सुक असतात, पण आपल्या पैशाचा विनियोग योग्य प्रकारे होईल की नाही याबद्दल ते साशंक असतात. आपल्या कार्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवत राहिल्यास, त्यांचा पैसा योग्य हातांमध्ये असल्याचा विश्वास त्यांना वाटेल.
४. ताडोबाचे राज्य, राष्ट्र आणि जगासाठी असलेलं महत्त्व, ताडोबाची वैशिष्ट्ये आणि ताडोबाची कार्यपद्धती याबद्दलचे ४० मिनिटांचे सादरीकरण आपण तयार करू. ताडोबात काम करणा-या सदस्यांचे संदेश, भरपूर दृश्यं, तसंच ताडोबामधील वनस्पतींबाबतची माहिती तसंच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ताडोबापुढे असलेली आव्हाने यांची सामग्र माहिती देणारे ते एक कलात्मक सादरीकरण असावे. दोन जणांचा एक गट मोठ्या शहरांमधील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सादरीकरणासाठी आपण पाठवूया. त्यामुळे लोकांना विशेषत: तरुणांना ताडोबाच्या आत नेमके काय आहे याची माहिती होईल. आपण याची सुरूवात प्रायोगिक तत्वावर पुण्यापासून तयार करू. आणि त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील वन्यप्रेमी आणि सँक्च्युरी एशियाज नेटवर्क आणि किर्लोस्कर फाऊंडेशनसारख्या स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून देशातील मोठ्या शहरांपर्यंत पोहोचता येईल.
५. केसरी आणि वीणा वर्ल्डसारख्या पर्यटन संस्थांपुढे आपण सादरीकरण करु. या संस्थांचे पर्यटक आणि त्यांचे आंतरराष्ट्रीय जाळे या माध्यमातून ताडोबाची आंतरराष्ट्रीय पातळीवर जाहिरात करु शकतो.  आपल्याला खूप ही करता येऊ शकते, पण त्यासाठी आपल्याकडे चांगली दृश्य माहिती आणि लिखित माहिती असणे गरजेचे आहे. तसेच हे सर्व पर्यटकांना उपलब्ध करुन देणे आणि त्यांच्या संपर्कात राहणे महत्त्वाचे आहे. ताडोबा हे आधीच प्रसिद्ध आहे. आता फक्त यामागील लोकांच्या प्रयत्नांची माहिती पर्यटकांना करुन देणे आणि त्याही पुढे जाऊन आधी राज्यातील आणि नंतर देशातील प्रत्येक पर्यटकाच्या तसेच नागरिकाच्या मनात हे रुजवावे लागेल हा पुढचा टप्पा असेल.
६. ताडोबाचे फेसबुक पेज बनवल्यास त्यावर लोक आपले अनुभव,छायाचित्र आणि ताडोबासाठी योगदान देऊ शकतील.
७. ताडोबामध्ये मार्गदर्शकांच्या दोन श्रेणी आपल्या तयार करता येतील. मार्गदर्शक हे जंगल आणि पर्यटकांमधील दुवा असतात.तसेच ताडोबामध्ये परदेशी त्याचप्रमाणे अहिंदी भाषक राज्यांमधीलपर्यटकही भेट देतात. त्यांच्याशी उत्तम इंग्रजी बोलणारे मार्गदर्शक नेमण्याची हीच वेळ आहे. आपण या मार्गदर्शकांना अधिक चांगले मानधन देऊ शकतो आणि ते ग्राहकांकडून वसूल करु शकतो. जगभरात जिथे जास्त पर्यटक भेट देतात आणि भाषा ही एक अडचण असते तिथे विशिष्ट भाषा बोलणारे मार्गदर्शक नेमण्याची पद्धत आहे. यामळे स्थानिक मुलांनासुद्धा शिक्षण आणि इंग्रजीवर प्रभुत्व मिळून चांगला रोजगार मिळू शकतो.
८. आपण मोहार्ली गेटपासून ते ताडोबा तलावापर्यंत आणि परत तेलियापर्यंत मुख्य रस्त्या दाखवणारा दीड तासाच्या छोट्या सहलींचा विचार करु शकतो. बसमधून होणा-या सहली शाळकरी विद्यार्थ्यांसाठी अगदी कमी शुल्कात असतील आणि दुपारच्यावेळी ताडोबा जेव्हा बंद असते ती वेळ सोडून अशा सहली आयोजित करता येऊ शकतात. यामुळे जास्तीत जास्त मुले ताडोबा बघू शकतील आणि ते भविष्यात हीच मुले जंगलाचे रक्षक बनतील.
९. प्रवेशद्वारावर उत्तम स्वच्छतागृहाच्या सोयीसह माहिती देण्यासाठी संवाद केंद्र असणे आवश्यक आहे. या केंद्रात पर्यटक तसेच व्यावसायिक छायाचित्रकारांची छायाचित्रे लावलेली असतील. स्थानिक खेड्यांमधील जीवनाचे दर्शन घडवणारी माहिती छायाचित्रांसह तिथे लावलेली असेल. ताडोबाशी संबंधित चलचित्र बघता येतील असे खुले प्रेक्षागृह असणे आवश्यक आहे.

१०. ताडोबाबाबत दुर्लक्षिला जाणारा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मोहार्ली गावाची स्वच्छता. येथील लोक सकाळचे सर्व नैसर्गिक विधी उघड्यावर ताडोबाकडे जाणा-या मुख्य रस्त्यावर करतात.ताडोबासारख्या आंतरराष्ट्रीय प्रतिमा असलेल्यापर्यटनस्थळासाठी ही बाब नक्कीच चांगली नाही. हाच प्रकार ताडोबाच्या परिसरातील कच-याचा आहे. हा सगळा कचरा रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेवर टाकला जातो आणि हा प्रकार ताडोबामधील जैवविविधतेच्यादृष्टीनं अत्यंत घातक आहे. या अत्यंत मूलभूत गोष्टी आहेत आणि एकदा आपण यावर काम करायला लागलो की नंतर या प्रक्रियेत समावेश असलेल्या इतर गोष्टींवरही मार्ग काढू शकतो. लोकांपर्यंत जंगल पोहोचणे महत्त्वाचे आहे. समाजात  दोनप्रकारचे लोक असतात एक म्हणजे ताडोबासारख्या विशेष राखीव जंगलांना भेट देणारे आणि दुसरे ज्यांनी आपल्या आयुष्यात कधीही जंगल बघितलेले नाही. परत पहिल्या प्रकारात जंगलात वाघ बघितलेले आणि न बघितलेले लोकही मोडतात. ज्यांनी वाघ बघितलेला आहे त्यांना त्यांची जबाबदारी समजावून देण्याची ताकद वाघातच असते. पण आपले उद्दिष्ट जास्तीत जास्त लोकांनी जंगलाला भेट देणे आणि वनसंरक्षणाच्या जबाबदाराची जाणीव निर्माण करणे हे आहे.

मान्य आहे की वाघ हा ताडोबाचा राजदुतच आहे मात्र ताडोबामध्ये वाघाशिवायही बरंच काही आहे. अगदी लहानशा पक्षांपासून ते फुलपाखरांपर्यंत ते रंग बदलणा-या रबराच्या झाडापर्यंत, जंगल चैतन्यानं ओथंबलेलं असतं व जंगलाची ही बाजू समजून घेतली की आपला आजूबाजूला बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो! ताडोबाने पर्यटकांना वाघ पाहण्याचा आनंद देण्यासोबतच आपण निसर्गाचं देणं लागतो ही जाणीव रुजवली पाहिजे. ही जाणीव रुजल्यानंतर आपल्यापैकी प्रत्येक जण जंगलाचा दूत होईल व ताडोबातल्या वाघांसाठी यापेक्षा अधिक चांगली गोष्ट कोणती असू शकते!

शेवटी माझ्या ताडोबा भेटीतला थोडासा व्यक्तिगत अनुभव सांगतो जी माझी व्यक्तिगत कमाईच  आहे, प्रवेशद्वारापाशी एक कँटर म्हणजे खुली बस उभी होती जी पर्यटकांना जंगलाची सफर घडवते, त्या बसवर एका डरकाळणा-या वाघीणीचं चित्र होतं! ते छायाचित्र अगदी ओळखीचं वाटलं व नंतर मला जाणीव झाली की ते मीच काढलेलं होतं! आता हा आनंद शब्दात कसा व्यक्त करता येईल! ही भावना व्यक्त करण्यासारखी नाही तर स्वतः अनुभवण्यासारखी आहे! मी काढलेलं वाघीणीचं चित्र ताडोबामध्ये पर्यटकांसाठीच्या बसवर प्रदर्शित करण्यात आलं होतं हे पाहून मला अतिशय आनंद झाला! अशा लहान गोष्टी आपल्या ला  जो अवर्णनीय आनंद देतात त्या कितीही बालीशपणाच्या वाटल्या तरीही आपण त्या करत राहिलं पाहिजे व आपल्याला जे आवडतं ते जोपासलं पाहिजे कारण त्यातूनच तुम्हाला निखळ आनंद मिळतो! मला असं वाटतं ताडोबासारख्या ठिकाणांहून मिळणारा हा आनंद अनमोल आहे आणि तो अनुभवण्यासाठी तरी तेथे जायलाच हवं !

संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स