Tuesday 28 April 2015

पुण्याचा ऐतिहासीक वारसा आहे कुठे?






















एका आईचे आपल्या मुलाशी जे नाते असते तेच एका व्यक्तिचे त्याच्या  ऐतिहासिक वारशाशी असते     जॉन हेन्रिक क्लार्क

जॉन हेन्रिक क्लार्क, हे अखिल-आफ्रिकी लेखक, इतिहासतज्ञ, प्राध्यापक, व ६० च्या दशकाच्या उत्तरार्धात अनेक आफ्रिकन व व्यावसायिक शिक्षण संस्थांचे प्रवर्तक होते. जॉन क्लार्कसारख्या व्यक्तिंमुळेच, अमेरिकेसारख्या देशाचा इतिहास अगदी अलिकडचा असूनही तिथे हजारो ऐतिहासिक वारसा स्थळांचे जतन करण्यात आले आहे; मी जाणीवपूर्वक ऐतिहासिक वारसा इमारती असा शब्द वापरला नाही व त्याचे कारण मी या लेखात पुढे सांगेन. माझ्यासाठी सर्वोत्तम भाग किंवा एक जमेची बाब म्हणजे मी बांधकाम व्यावसायिक असण्यासोबतच मला पर्यावरण क्षेत्रातील कामाचाही थोडाफार अनुभव असल्याने मी समाजाच्या अनेक वर्गांच्या संपर्कात येतो, अशी संधी एक सामान्य माणूस म्हणून मला मिळाली नसती! अशाच एका संपर्कामध्ये सेंट मेरीज शाळे च्या  काही विद्याथिर्नी मला त्यांच्या प्रकल्पासंदर्भात भेटल्या ज्याचा विषय होता पुण्याचा ऐतिहासिक वारसा. सर्वात आदरणीय व जुन्या शाळांपैकी असल्यामुळे सेंट मेरी शाळेची इमारत अशा ऐतिहासिक वारसा इमारतींपैकी एक आहे, मात्र या मुलींची प्रश्नावली कशा प्रकारची असेल याचे मला कुतूहल होते. शाळकरी किंवा महाविद्यालयीन मुलांशी गप्पा मारायला मला नेहमीच आवडतं कारण त्यांच्या कुतुहल व उत्साहामुळे त्यांच्या डोक्यातून काय बाहेर येईल हे जादुच्या टोपीतून काय येईल याचा अंदाज लावण्यासारखं असतं!
यावेळीही माझी निराशा झाली नाही कारण त्या विद्यार्थ्यांशी पुण्याच्या जे काही शिल्लक आहे अशा ऐतिहासिक वारशाविषयी जी चर्चा झाली त्यातूनच मी हा लेख लिहीला!
मुलींनी मला त्यांचे प्रश्न मेलद्वारे पाठवले होते व या मुलाखतीचे ध्वनीचित्रमुद्रण केले जाणार होते, ज्यात मला पाठविण्यात आलेल्या प्रश्नांविषयी माझे काय मत आहे किंवा काय उत्तर आहे हे सांगायचे होते. मी इथे माझे शिक्षण व काम यासारखे वैयक्तिक प्रश्न वगळून ऐतिहासिक वारशाशी संबंधित प्रश्न देत आहे
. पुण्याच्या ऐतिहासिक वारशाविषयी तुमचे काय मत आहे?
. या ऐतिहासिक वारसा स्थळांचे संवर्धन करण्यासाठी काय केले पाहिजे?
. तुमच्या मते त्यांच्या ढासळत्या परिस्थितीचे काय कारण आहे?
.   ऐतिहासिक वारशाचे जतन करताना, नव्या इमारतींचा विकास थांबविता येणार नाही. या दोन्हींमध्ये कशाप्रकारे संतुलन साधता येईल असे तुम्हाला वाटते?
. पुण्याच्या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी काय करता येईल असे तुम्हाला वाटते?
. तुम्हाला आम्हाला आणखी काही मार्गदर्शन करावेसे वाटते का?

या प्रश्नांमधूनच लेखात काय मांडले जाणार आहे याची झलक तुम्हाला मिळाली असेल मात्र मी उत्तर द्यायला सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांना एक प्रश्न विचारला जो त्यांच्याकडून किंबहुना त्यांच्या शिक्षकांकडून राहिला होता. तो प्रश्न म्हणजे तुम्ही ऐतिहासिक वारसा वास्तु किंवा स्थळाची व्याख्या कशी करता?” ९व्या इयत्तेतील वयोगटाकडून मला फार काही असाधारण उत्तरांची अपेक्षा नव्हती, केवळ यासंदर्भातील त्यांचे मत जाणून घ्यायचे होते. तांत्रिकदृष्ट्या बोलायचे झाले तर त्यांनी अतिशय चांगली कामगिरी केली, ऐतिहासिक वारसा इमारत म्हणजे जिला काही इतिहास आहे व तिचे वय जास्त आहे इत्यादी उत्तरे त्यांनी दिली. यात काहीच चुकीचे नव्हते, तुम्ही एखाद्या प्रौढ व्यक्तिला विचारले तरीही तिचे उत्तर साधारण असेच असेल. आपण जेव्हा पर्यावरण किंवा ऐतिहासिक वारसा यासारख्या विषयांचा विचार करतो तेव्हा आपला दृष्टिकोन चाकोरीबद्ध असतो, कारण आपल्याला चाकोरीबाहेरचा विचार करायला शिकवलंच जात नाही.
मी त्या मुलींना सांगितलं की ऐतिहासिक वारसा ही एखादी वास्तुच असली पाहिजे असं नाही तर मनुष्य किंवा पूर्णपणे निसर्गनिर्मित गोष्ट सुद्धा ऐतिहासिक वारसा स्थळ असू शकते! उदाहरणार्थ पुण्यातली सर्वात जुनी गोष्ट कोणती? त्यांनी उत्तर दिले शनिवारवाडा, याचे उत्तर खरंतर जेएम मार्गावरील पाताळेश्वर गुंफा आहे हे त्यांना माहिती नव्हते; अर्थात हे ब-याच जणांना माहिती नसते! मी त्यांना आपल्या नदीचे काय असे विचारले? यावर त्या हसल्या व नदी पुण्यात सर्वात जुनी असून शहराला सर्वोत्तमप्रकारे सेवा दिल्याचे त्यांनी मान्य केले. त्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही नदीचा विचार ऐतिहासिक वारसा म्हणून का केला नाहीविचार करा एंप्रेस उद्यानातील जुना वटवृक्ष असो, नदी असो किंवा पर्वती असो, आपल्याकडे कितीतरी नैसर्गिक स्थळे ऐतिहासिक वारसा आहेत व आपण ती विचारातही घेत नाही. अशा प्रकारे माझ्या उत्तरांना सुरुवात झाली. म्हणूनच माझ्या मते आपण सर्वप्रथम ऐतिहासिक वारसा म्हणजे काय हे निश्चित केले पाहिजे व आपण आपली व्याख्या केवळ काही इमारतींपुरतीच मर्यादित ठेवू नये ज्यामध्ये काही ऐतिहासिक व्यक्तिंचा निवास होता. तर इतिसाची साक्षीदार असलेले तसेच माणसाची कोणत्या ना कोणत्या प्रकारे सेवा केलेले प्रत्येक स्थळ किंवा अगदी परिसरही ऐतिहासिक वारसा मानला पाहिजे. मला असे वाटते ऐतिहासिक वारशाची व्याख्या तीच असली पाहिजे व हीच व्याख्या आपण मुलांच्या मनावर बिंबवली पाहिजे.
पुण्यातल्या ऐतिहासिक वारसा स्थळांची परिस्थिती आपण जाणतोच; आपण रस्ते, सार्वजनिक शौचालये यासारख्या दैनंदिन गरजेच्या गोष्टींची देखभाल करु शकत नाही तर मग काही जुन्यापुराण्या इमारती व स्थळांची देखभाल करायचा कुणाला वेळ किंवा रस आहे! आपल्या वर्तमानकाळाविषयी आपला दृष्टिकोन आपल्या वारशांना आपण कशी वागणूक देतो यातून दिसून येतो व आज आपण तो पाहात आहोत! मला शंका आहे की कुणाही शासकीय किंवा स्वयंसेवी संस्थेकडे पुण्यात नेमकी किती ऐतिहासिक वारसा स्थळे आहेत याची अचूक यादी असेल का, त्यांची परिस्थिती जाणून घेणे ही तर दूरची गोष्ट झाली! ज्या इमारतींचा आपल्याला विविध प्रकारे उपयोग झाला ज्यांना आपण ऐतिहासिक वारसा म्हणतो, त्यांची आपण देखभाल करु शकत नाही, तर मग नद्या किंवा पर्वतांची काय कथा? पुणे मनपा मध्ये एक ऐतिहासिक वारसा कक्ष आहे व राज्यपातळीवर पुरातत्वशास्त्र विभाग आहे ज्याने केवळ ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या वास्तु हाताळणेच अपेक्षित आहे. असे असुनही कुणीही ऐतिहासिक वारसा स्थळांची थेट जबाबदारी घेत नाही हे तथ्य आहे. सर्व ऐतिहासिक वारसा स्थळांची व इमारतींची एक यादीही आहे मात्र आपण त्यांचे काय करतो असे कोडे मला पडते! ऐतिहासिक वारसा स्थळांच्या ढासळत्या परिस्थितीचे कारण म्हणजे आजच्या समाजाचा आपल्या भूतकाळाविषयी दुर्लक्ष करण्याचा व भौतिकतावादी दृष्टिकोन. आपल्याला भौतिकदृष्ट्या लाभदायक आहेत असे वाटणा-या गोष्टींनाच आपण महत्व देतो! उदाहरणार्थ आपण मॉल किंवा मल्टिप्लेक्सची काळजी घेतो कारण त्या आपल्या बाजारहाटीच्या किंवा मनोरंजनाच्या गरजा पूर्ण करतात व यांच्याबाबतीत काही गैर आढळले तर आपण लगेच सोशल मिडियासकट सगळीकडे  त्यावर आवाज उठवतो मात्र शनिवारवाड्यासमोर पर्यटकांसाठी व्यवस्थित वाहनतळ नसेल किंवा शौचालय नसेल तर त्याची काळजी कुणालाही नसते कारण आपण विरंगुळ्यासाठी शनिवारवाड्यावर क्वचितच जातो! म्हणूनच आपली ऐतिहासिक वारसा स्थळे आपल्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तिंसारखी आहेत, आपल्याला त्यांची गरज नसते म्हणूनच आपण त्यांच्यासाठी काही करत नाही!

कोणत्याही ऐतिहासिक वारसा स्थळाचे जतन करणे म्हणजे ते जुन्या स्वरुपात ठेवणे असे नाही तर आपण त्याला कार्यरत ठेवले पाहिजे. शेरलॉक होम्सच्या प्रसिद्ध बेकर स्ट्रिट हाउसप्रमाणे, कोणतेही ठिकाण ज्या हेतूने वापरले जात होते त्या भावनेचे जतन झाले पाहिजे. अलिकडेच सर्व वर्तमानपत्रांमध्ये राज्य सरकार डॉ. आंबेडकर लंडनमध्ये ज्या घरात राहिले ते घर ताब्यात घेणार व त्यासाठी काही अब्ज पौंड खर्च केले जातील अशी एक मोठी बातमी होती. या निर्णयाविरुद्ध काही आकस नाही, मात्र डॉ आंबेडकर ज्या घरात जेमतेम दोन वर्ष राहिले त्यासाठी आपण काही अब्ज डॉलर खर्च करु शकतो, मात्र त्यांच्या जन्मस्थळाविषयी व जेथे त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य घालवले त्याचे काय? त्यांचा जन्म कुठे झाला व त्या ठिकाणाची परिस्थिती नेमकी कशी आहे हे कुणाला माहिती तरी आहे का व आता त्या ठिकाणाची परिस्थिती काय आहे? त्याचप्रमाणे पुण्यामध्ये लोकमान्य टिळक व आगरकर यासारख्या अनेक महान व्यक्तिंचे वास्तव्य होते, ही यादी वाढतच जाईल, त्यांच्या निवासस्थानांचे व त्यांनी जेथे काम केले त्या वास्तुंचे काय?

आधुनिक वास्तुरचनेच्या मदतीने नव्या व जुन्याचा अचूक मेळ घालून ऐतिहासिक वारसा स्थळांचे जतन करता येईल. मात्र शहराच्या मध्यवर्ती भागात जिथे शनिवार वाडा किंवा इतरही अनेक जुन्या इमारती आहेत तिथल्या इमारती पाहा. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला अगदी लागून बांधल्या जात असलेल्या उड्डाण पुलाचंच उदाहरण घ्या. अभियांत्रिकी महाविद्यालय अतिशय उत्तम ऐतिहासिक वारसा इमारत आहे. महाविद्यालयातल्या इमारतींच्या रचनेचा विचार करुन उड्डाण पूल बांधला जाऊ शकत नाही का? त्याशिवाय फर्ग्युसन महाविद्यालयाच्या नावाने प्रसिद्ध असलेला एफसी रस्ता विकसित करताना महाविद्यालयाच्या इमारतीच्या बांधकामाशी त्यांचे संतुलन राखता आले असते मात्र त्याची काळजी कुणाला आहे? एक लक्षात ठेवा आपण आज जी काही रचना करतोय व बांधतोय ती उद्याचा ऐतिहासिक वारसा असणार आहे. आपण त्यानुसारच नियोजन केले पाहिजे, कारण येत्या अनेक पिढ्या या इमारती वापरणार आहेत व तिचा ऐतिहासिक वारसा होण्यासाठी तिला काळाची परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे! आपल्याला अशा एका धोरणाची गरज आहे जे कोणत्याही ऐतिहासिक वारसा इमारतीच्या आजूबाजूचा परिसर विकसित करताना अडथळा ठरणार नाही. संपूर्ण परिसरच ऐतिहासिक वारसा स्थळांचे जतन करण्यात मदत करेल मात्र नदी किंवा पर्वती पाहा, या ठिकाणांच्या आजूबाजूला असलेल्या झोपडपट्ट्या, कच-याने तुंबलेली गटारे पाहा व आपल्याला असे वाटते की आपण ऐतिहासिक वारशाचे जतन करत आहोत!

आपल्याला ऐतिहासिक वारसा ओळखता आला पाहिजे व त्याचा आदर करता आला पाहिजे कारण तो आपल्या संस्कृतीचा कणा आहे. या ठिकाणांना आपल्या शहराच्या सुशोभिकरण योजनेचा एक भाग बनवा व त्यांच्यासाठी निधी देऊन तसेच खाजगी सहभागातून त्यांची देखभाल करा. शहराचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे काय महत्व आहे याविषयी सर्व भागधारकांना जागरुक करा, आपल्याला त्यांचा व्यावसायिक वापरही करता येईल. उदाहरणार्थ सिंगापूरच्या जुन्या शहराचा व भविष्यातील ऐतिहासिक वारसा स्थळांचा ऐतिहासिक वारसा नकाशा आहे, त्यांनी या स्थळांचा मार्ग तयार केला आहे. आपण अशा कल्पना का राबवत नाही? आपल्या आजूबाजूला असे अनेक देश आहेत ज्यांना ऐतिहासिक वारसा पर्यटनाचा व्यावसायिक फायदा झाला आहे, नेपाळ त्यापैकीच एक आहे! आपण अतिशय अभिमानाने स्वतःला ऐतिहासिक वारसा शहर म्हणून मिरवतो मात्र प्रत्यक्षात तो केवळ पोकळ दावा आहे! स्वतःला एक प्रश्न विचारा की कुणी बाहेरील व्यक्ती आपल्याकडे आली आणि आपल्याला पुण्याचा ऐतिहासिक वारसा दाखवायला सांगितला तर आपण तिला काय दाखवणार आहोत? म्हणूनच पर्यावरणाप्रमाणेच ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यालाही प्राधान्य द्या व आपल्या शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये त्याचा समावेश करा. आपण लवकरात लवकर या दिशेने विचार करायला सुरुवात केली पाहिजे कारण जे शहर किंवा जो देश आपल्या भूतकाळाचा आदर करत नाही तो लवकरच इतिहासजमा होतो! आपला ऐतिहासिक वारसा ही आपली सर्वोत्तम संपत्ती आहे व आपण हे समजून घेतले पाहिजे. घटना चिकित्सा म्हणून शहरातील मुख्य दहा ऐतिहासिक वारसा स्थळे घ्या, त्यांच्यावर काम करा, त्यांचा एक आदर्श नमुना तयार करा व त्यानंतर तेच सूत्र इतर सर्व ऐतिहासिक वारसा ठिकाणांसाठीही वापरा व हे लवकर करा. या शहरातल्या बिचा-या वारशांसाठी वेळ आधीच हातातून निघून गेली आहे. आता आपण पावले उचलली नाही तर आपल्याकडे या स्थळांची केवळ छायाचित्रे व त्याविषयीचे लेख उरतील व आपण कोणताही सामाजिक पैलू नसलेला समाज होऊ!

मी त्या मुलींना सांगितले की हा केवळ तुमचा आणखी एक शालेय प्रकल्प होऊ नये, तर तुम्ही हे जास्तीत जास्त व्यासपीठांवर सांगितले पाहिजे. माहिती देणे ही सुरुवात आहे, त्यामुळे कधी ना कधी, कुणामुळे तरी काही चांगला फरक पडेल. ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे वर्तमानकाळात इतिहासाचा एक भाग बनणे व तो पुढे नेणे. काय कमावले यापेक्षा आपण मागे काय सोडतो ते महत्वाचे असणार आहे, हे आपण स्वतःला बजावले पाहिजे, असे झाले तरच आपल्या ऐतिहासिक वारसा स्थळांसाठी काही आशा आहे!


संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्सhttps://mail.google.com/mail/u/0/images/cleardot.gif


Saturday 25 April 2015

जिम कॉर्बेट नावाचा स्वर्ग !




















मी जंगलातल्या अनेक रात्री तो खेळ पाहण्यात घालवल्या होत्या, मात्र मी पहिल्यांदाच एखाद्या नर-भक्षकाची रात्रभर वाट पाहत होतो. माझ्या समोरचा लांबलचक रस्ता चंद्रप्रकाशात न्हाऊन निघाला होता व दुतर्फा झाडांची गडद सावली त्यावर पडली होती, रात्रीच्या प्रकाशात वारा फांद्यांना हेलकावे देत होता व त्यामुळे सावल्याही हालत होत्या, मी त्याचवेळी डझनभर वाघ माझ्या दिशेने येताना मी पाहिले, मी आवेगाच्या भरात अशा ठिकाणी उभा राहिलो होती की आता मी फक्त त्या नरभक्षकाच्या दयेवरच होतो, याचा मला अतिशय पश्चाताप वाटू लागला. माझ्यात पुन्हा गावात जाऊन मी स्वतःहून ज्या कामाची जबाबदारी घेतली होती ते करायला मी अतिशय घाबरलो आहे हे सांगायचं धाडस नव्हतं, भीतीने तसंच थंडीने कुडकुडणा-या दातांनी, मी रात्रभर बसून होतो. बर्फाळ पर्वतरांगांमध्ये माझ्यासमोर हळूहळू पाहाट होत होती, गुडघे वर घेऊन त्यावर माझे डोके टेकवले, मी अशाच स्थितीत गाढ झोपलेला माझ्या माणसांना सापडलो; वाघाबद्दल मी काही ऐकलेही नाही व पाहिलेही नाही.”                … जिम कॉर्बेट

वरील शब्द महान जिम कॉर्बेट यांच्या पुस्तकातील आहेत जे मी विदर्भासारख्या दुर्गम भागात असताना दहा वर्षांच्या वयात वाचले होते! त्या वयात माझ्यासाठी जिम कॉर्बेट म्हणजे सुपर हिरोच होता, जो वाईट म्हणजे नरभक्षकांचा वाघांचा रात्र-रात्र पाठलाग करत असे (पूर्णपणे आदर बाळगून मला असे म्हणावेसे वाटते की खरतरं वाईट वाघ असा शब्दच नसतो), व आपल्या लेखनातून माझ्यासारख्या अनेकांना जंगलाचे दर्शन घडवत असे! खामगावमधल्या त्या मुलाला कधी स्वप्नातही वाटले नाही की तो त्याच जंगलाला भेट देईल ज्या जंगलात जवळपास सत्तर वर्षांपूर्वी कॉर्बेटने भटकंती केली होती, मात्र काहीवेळा न पाहिलेली स्वप्नेही सत्य होतात व माझेही झाले! मला केवळ एकदाच नाही तर पाच वेळा कॉर्बेटच्या भूमीला भेट देण्याचे सौभाग्य मिळाले! माझ्या सहावर्षांपूर्वीच्या भेटीपासून नुकत्याच दिलेल्या भेटीत बराच बदल झाल्याचे मला जाणवले, दिल्लीपासून कॉर्बेट अभयारण्याजवळच्या रामनगरपर्यंतच्या रस्त्याचे बहुतेक शहरीकरण झाले आहे व रस्ता अतिशय खराब परिस्थितीत आहे विशेषतः उत्तर प्रदेश राज्यातील भाग! आपल्या शासनकर्त्यांना आपल्या देशाला जागतिक नकाशावर न्यायचे आहे मात्र जिम कॉर्बेट अभयारण्यासारख्या ठिकाणी, जेथे जगभरातील पर्यटक येतात तिथे पोहोचण्यासाठी फारशी चांगली सोय नाही. आपल्याकडे विविध प्रकारची जंगले आहेत, आपण या सर्व जंगलांना जोडणारा मार्ग (मास्टर कॉरिडॉर) तयार करु शकतो, व ही जंगले एकमेकांशी रस्ते, विमानमार्ग व रेल्वे मार्गाने व्यवस्थित जोडू शकतो, म्हणजे सर्व महत्वाची वन्यजीवन ठिकाणे एकमेकांना जोडता येतील. कॉर्बेटचे उदाहरण घ्या ते केवळ दिल्लीला विमानमार्गाने जोडलेले आहे व दिल्लीहून रामनगरला पोहोचण्यासाठी आठ ते दहा तास लागतात! हा वेळ नक्कीच कमी करता येऊ शकतो म्हणजे पर्यटकांना अधिक वेळ जंगलांमध्ये घालवता येईल.

 एक वन्यजीव प्रेमी  म्हणून मला आणखी एक चिंतेचा विषय वाटतो तो म्हणजे कॉर्बेटच्या भोवताली वाढलेली रिसॉर्टहॉटेल्स! पर्यटकांना राहण्यासाठी जागा आवश्यक आहे हे मान्य आहे व एका बाबतीत कॉर्बेट अभयारण्य कान्हा, ताडोबा, रणथंबोर किंवा बांधवगडपेक्षा वेगळे आहे, ते म्हणजे अभयारण्याच्या भोवतालीही पर्यटकांना पाहण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. नैनिताल, अलमोडा, बिनसार व रानीखेत ही सर्व पर्यटन स्थळे कॉर्बेटपासून जवळ आहेत, त्यामुळे पर्यटकांना अभयारण्याची सफारी मिळाली नाही तर इतर पर्याय उपलब्ध असतात व म्हणूनच कॉर्बेटच्या भोवताली अशा रिसॉर्टची गरज आहे! मात्र या प्रक्रियेमध्ये निर्माण होणारा कचरा तसेच रहदारी वन्यजीवनासाठी अतिशय धोकादायक आहे, आता आपण या आघाडीवर संतुलन राखले पाहिजे नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाईल!  आपण स्वतंत्रपणे पर्यटन निवास क्षेत्र विकसित करु शकतो जे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तसेच जलप्रक्रिया प्रकल्पांनी सुसज्ज असेल तसेच या ठिकाणी दळणवळणाची व्यवस्थित सोय असेल. आपण ते पर्यटन गाव म्हणून विकसित करु शकतो व त्यानंतर मुख्य रस्त्याच्या दुतर्फा नव्या रिसॉर्टना आळा घालू शकतो किंवा परवाने देणे बंद करु शकतो.

 त्यानंतर मुद्दा येतो जंगल व भोवतालच्या परिसरात पायाभूत सुविधांचा, व या आघाडीवर कॉर्बेट कोणत्याही पार्कच्या पुढे आहे, अभयारण्याच्या प्रवेशद्वारापाशी व आतमध्ये चांगल्या स्वागत कक्षामुळे पर्यटकांचे जीवन सुसह्य होते. मात्र बिजरानी किंवा खिन्नौली व सरपडुली येथील सार्वजनिक शौचालयांची व्यवस्थित देखभाल झाली पाहिजे. या बाबतीत आपण कान्हाची पद्धत अवलंबू शकतो, या शौचालयांपाशी पूर्णवेळ कर्मचारी ठेवून आपण ती वापरण्यासाठी पर्यटकांना शुल्क आकारु शकतो! कॉर्बेटमधील सर्वोत्तम गोष्ट म्हणजे पर्यटकांना जंगलात राहता येते, जंगलातील विश्रामगृहे बरीच चांगल्या स्थितीत असल्याबद्दल पूर्ण गुण दिले पाहिजेत. धिकाला वगळता ब-याच ठिकाणी विजेची समस्या आहे व तेथे उच्च शक्तिच्या सौर ऊर्जेवर चालणा-या बॅटरींचा विचार करता येईल, ज्या कॅमे-याच्या बॅटरी प्रभारित करण्यासाठी वापरा येतील. इथली आणखी एक समस्या म्हणजे उन्हाळ्यामध्ये खोलीतली हवा खेळती राहात नाही. आपण सौर/वायू ऊर्जा कंपन्यांना ही विश्रामगृहे दत्तक देण्याचा विचार करु शकतो व त्याबदल्यात त्या विश्रामगृहात त्यांची जाहिरात करु शकतील, नाहीतर इथे राहणा-या व वीज वापरणा-या पर्यटकांना थोडे जास्त शुल्क आकारु शकतो! मात्र वन्य जीव पर्यटनात राहण्यासाठी या मूलभूत गरजा आहेत व थोडा चाकोरीबाहेरचा विचार करुन आपल्याला हे प्रश्न सोडवता येऊ शकतील!
तसेच बहुतेक पर्यटक वाघाला पाहण्याच्या उद्देशानेच येतात; हे ध्यानात घेऊन विशेषतः बिजरानी भागामधील कृत्रिम पाणवठे थोडे मोकळे ठेवले पाहिजेत म्हणजे तिथे वाघ असेल तर पर्यटकांना तो अधिक चांगल्या प्रकारे पाहता येईल. आपण या पाणवठ्यापासून सुरक्षित अंतर ठेवू शकतो म्हणजे पाणवठ्यापाशी येणा-या प्राण्यांना वाहनांच्या वर्दळीचा त्रास होणार नाही, मात्र सध्या बहुतेक जलाशय झुडुपांमध्ये किंवा झाडांमागे लपलेले आहेत त्यामुळे तिथले दृश्य पाहण्यात अडथळा येतो. आणखी एक बाब म्हणजे जंगलामध्ये नवीन मार्ग उघडणे, त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने काही निर्बंध घातलेले आहेत हे मान्य आहे मात्र आपण काही जुने मार्ग बंद करुन काही नवीन मार्ग सुरु करु शकतो. यामुळे वारंवार येणा-या पर्यटकांनाही सफारीत रस राहील कारण मला कदाचित त्याच मार्गावरुन फिरायला कंटाळा येईल, त्याशिवाय कॉर्बेटमधील जैवविविधता दाखवणे ही देखील त्यामागची कल्पना आहेत्याशिवाय एकदिवस कॉर्बेटच्या रक्षकांसोबत अशी योजना राबवून पर्यटकांना अभयारण्यातील चौकींवर राहण्याची परवानगी देण्याचाही विचार करता येईल! यामुळे लोकांना वनरक्षकांचे जीवन समजून घेता येईल, जे स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्यासाठी वन्यजीवनाचे रक्षण करतात व अशा योजनांमुळे प्रत्यक्ष अभयारण्यात काम  करणा-या कर्मचा-यांचे मनोधैर्य उंचावेल! अशा उपक्रमांमुळे पर्यटक व अभयारण्यांच्या कर्मचा-यांमधील संवाद अधिक सशक्त होईल व सामान्य माणसाला वन्य जीवनातल्या अडचणी समजल्यानंतर त्यासंदर्भातील कर्तव्य समजेल.

कॉर्बेटमध्ये वन्यजीवनाचा भरपूर अनुभव घेता येतो, तरीही मी अनेक मित्रांकडून ऐकले आहे की त्यांना कॉर्बेटमध्ये वाघ दिसला नाही व तेथे काहीही नाही! त्यासाठी आपण आपल्या वन्यजीव पर्यटन मोहिमेला दोष दिला पाहिजे जी केवळ वाघांवर केंद्रित आहे. आपण कॉर्बेट व पाण्याची कमतरता असलेल्या मध्य भारतातील अभयारण्यांमधील फरक समजावून घेतला पाहिजे. पाण्याच्या कमतरतेमुळे या अभयारण्यांमध्ये जलाशयांवर वाघ सहजपणे दिसून येतात, मात्र कॉर्बेटमध्ये तशी परिस्थिती नाही. इथे रामगंगा ही बारमाही नदी आहे व पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे व कॉर्बेट अतिशय विस्तीर्ण असल्याने वाघ किंवा बिबट्या दिसणे अवघड असते कारण त्यांचे सावज सगळीकडे चितळ, सांबर व लंगुरांच्या स्वरुपात उपलब्ध असते! त्यामुळेच वाघ उघड्यावर म्हणजे अगदी रस्त्यावर आल्याशिवाय सहजपणे दिसत नाहीत व चालत्या जिप्सींमुळे ते बिचकतात हे पण एक कारण आहे ! वाघांचे कान एक किलोमीटरवरुनही जिप्सीच्या टायरचा आवाज टिपू शकतात हे आपण समजून घेतले पाहिजे व तो पुढे चालत असेल तर शांतपणे रस्त्याच्या कडेला असलेल्या दाड झुडुपांमध्ये निघून जातो, आपण अगदी दहा पावलांवर असलो तरीही वाघ किती जवळ होता हे आपल्याला कळणारही नाही! त्याचवेळी इथे आढळणा-या पक्षांच्या प्रजातींचा विचार केल्यास, कॉर्बेटमध्ये एकाच ठिकाणी बहुतेक सर्वोत्तम व सर्वाधिक जैवविविधता उपलब्ध आहे हे लक्षात येईल. तसेच तुम्ही अभयारण्याबाहेर राहात असाल व केवळ एका किंवा दोन सफारींसाठी भेट देत असाल तर वाघ दिसण्यासाठी तुमचे नशीबच असले पाहिजे! तुम्ही अभयारण्यातील विश्राम गृहात राहात असाल व किमान चार सफारी करत असाल तर तुम्हाला जंगलाचा राजा दिसण्याची अधिक शक्यता असते! तसेच तुम्ही कॉर्बेटला कोणत्या हंगामात भेट देत आहात हे देखील महत्वाचे असते म्हणजे एप्रिल/मे मध्ये वाघ दिसण्याची शक्यता हिवाळ्यापेक्षा अधिक असते! मला असे वाटते ही सर्व माहिती देण्यासाठी किमान बिजरानी व धिकालाच्या प्रवेशद्वारांपाशी चांगली माहिती केंद्रे असली पाहिजे म्हणजे पर्यटकांना असे तपशील माहिती असतील व वाघ दिसला नाही म्हणून ते नाराज होणार नाहीत!
माझ्या कॉर्बेटच्या सफारीतील माझे काही अनुभव इथे देत आहे, मला कॉर्बेटमध्ये वाघ पाहण्याचे भाग्य मिळाले मात्र वाघापेक्षाही कितीतरी अधिक चित्तवेधक दृश्येही पाहायला मिळाली! या लेखामुळे तुम्हाला कॉर्बेट अधिक चांगल्याप्रकारे समजून घेता येईल असे मला वाटते
 एप्रिल महिन्यातला तळपता सूर्य घनदाट जंगलाने वेढलेल्या डोंगरामागून वर येतो व त्याच्या तेजाने सर्वकाही उजळून निघते, आमची जिप्सी धांगडी प्रवेशद्वारातून आत जाते व एका धुळीने माखलेल्या रस्त्यावरुन धिकालाच्या दिशेने जात असते, मी अथांग पसरलेली हिरवळ व डोंगरातून खळाळणारा रामगंगेचा प्रवाह डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करत असतो व त्या पार्श्वभुमीवर एक महाकाय हत्ती चालत असतो आपल्याच मस्तीत! कॉर्बेट नावाचे नाट्य सुरु झालेले असते व आता पुढील चार दिवस निसर्ग देवेतेने स्वतः लिहीलेल्या पटकथेत मी स्वतःला झोकून देणार असतो!”

 त्याआधी संध्याकाळी तुम्ही एका ठिकाणी तीन तास वाघाची वाट पाहात घालवलेले असतात व तो कुठेतरी जवळपासच आहे हे तुम्हाला माहिती असते, भांटाच्या झुडुपात शांतपणे वाट पाहतोय, त्याचे हिरवेगार डोळे तुमच्यावर रोखलेले असतात मात्र तुम्ही त्याला पाहू शकत नाही; मोर, सांबर व चितळांनी दिलेल्या इशा-यांमुळे तुम्हाला वातावरणात त्याचे अस्तित्व जाणवते! तुम्ही धुळीने माखलेल्या रस्त्यांवर त्याच्या पावलांचे ठसे पाहिलेले आहेत, तरीही तो समोर येत नाही, तो जणू काही तुमच्या सहनशीलतेचा अंत पाहतोय! तुम्ही जंगलातल्या विश्रामगृहावर परत जाता व त्याची स्वप्ने पाहात झोपता, पुन्हा सकाळी उठल्या उठल्या जिप्सीत बसून त्याच्या शोधात जाता, त्याच्या पाउलखुणांचा माग घेत काल संध्याकाळी तुम्ही जिथे तीन तास घालवलेत तिथेच पोहोचता, वाघ येण्याचे इशारे सगळीकडून ऐकू येत असतात व तुम्हाला मनातून जाणवतं की वाघ केवळ काही पावलांवर आहे व आता केवळ काही मिनिटे वाट पाहायची आहे व नशिबाची साथ , आणि तो अचानक रस्त्यावर येतो, एक नर वाघ डरकाळी फोडत तुमच्या दिशेनं चालत येतो; जंगलामध्ये याहून अधिक भाग्य काय असू शकतं, तुम्हाला आनंद होतो कारण यालाच जंगलामध्ये वाघाचा शोध घेणे असं म्हणतात!”

 मी या अभयारण्याला सहा वर्षांनी भेट देत होतो व इथे सगळं काही मी आधी आलो होतो तसंच किंवा त्यापेक्षा अधिक चांगलं होतं; सूर्य क्षितीजाला स्पर्श करतो तेव्हा हा परिसर केशरी रंगात न्हाऊन निघतो, रामगंगा जलाशय उन्हामुळे झळाळत असतो, या पार्श्वभूमीवर हत्तींच्या छायाकृती हलत असतात त्यांच्या चित्कारांनी वातावरण भरलेलं असतं! हे संपूर्ण दृश्य एखाद्या स्वप्नासारखं असतं जे मी दररोज दिवसं-रात्र पाहात असतो, ते पुन्हा साकार होतं!! मी कॉर्बेटला यापूर्वी, पाच वेळा भेट दिली आहे व प्रत्येक वेळी मी त्याच्या अधिकाधिक प्रेमात पडतो!”
 जंगलातल्या विश्रामगृहांची सर्वात चांगली बाब म्हणजे तुम्हाला इथे काळामिट्ट अंधार म्हणजे काय याची जाणीव होते! बिजरानीतल्या विश्रामगृहात मी रात्री उशीरा आकाश न्याहाळत होतो, स्वच्छ आकाशावर चांदण्यांची चादर अंथरलेली होती, अचानक विश्रामगृहाच्या सौर तारांच्या कुंपणाजवळ एका सांबराचा चित्कार आला व त्यानंतर चितळांनी इशारे दिले, म्हणजेच वाघ नक्कीच जवळपास होता! जंगलातल्या अंधारात तुम्ही किती असहाय्य असता याचा अनुभव तुम्ही कधी घेतलाय का कारण प्रत्येक प्राणी तुम्हाला पाहू शकतो मात्र तुम्ही कुणालाच पाहू शकत नाही! अशा वेळी केवळ आपल्या श्रवणेंद्रियांनी जंगलाचा अनुभव घेण्यातही मजा असते. आम्ही वाघ पाहू शकलो नाही मात्र त्याचं अस्तित्व निश्चितच अनुभवलं व तो एक अविस्मरणीय अनुभव होता!”

 तुम्ही बिजरानीच्या विश्रामगृहातून बाहेर पडून जंगलाच्या बाहेर जात आहात, वाघाची डरकाळी फोडणारी प्रतिमा तुमच्या मनात व कानात रेंगाळत आहे व अचानक थोड्या अंतरावर एका झाडावर तुम्हाला एक मोठा पक्षी अचानक दिसतो, तो महा धनेश पक्षी असतो, या आकाराच्या पक्षांमध्ये हा बहुधा सर्वात सुंदर पक्षी आहे, जवळपास ५०० मीटरच्या अंतरावर माझ्या ६०० मिमीच्या k^ मेरा लेन्सनी टिपण्यासाठी ते खूपच दूरचं दृश्य होतं मात्र एखाद्या नेमबाजाप्रमाणे मी ते टिपलं! मला त्याचं छायाचित्रं घेतल्याचा फार आनंद झाला कारण मी त्याला आधी कधीच पाहिलं नव्हतं व मी बरीच किंमत मोजून आणखी एक धडा शिकलो होतो त्याचा इथे उपयोग झाला, तो म्हणजे जंगलातून बाहेर पडेपर्यंत कॅमेरा बंद करुन ठेवायचा नाही!”

गहिरालपासून ते धिकालापर्यंत रामगंगा नदी रस्त्याला समांतर वाहते, ब-याच वळणांवर अनेक प्रवाह नदीला येऊन मिळतात ज्यामुळे पावसाळ्यात भरपूर पाणी रामगंगेला येऊन मिळते! प्रवाह नदीला मिळतो अशा एका ठिकाणी माझी नजर एका गरुडावर गेली त्याची कशावर तरी नजर होती, त्याच वेळी तिथे एक कोल्हा आला. आम्ही लेन्सने पाहात असताना आमची उत्सुकता वाढली, बहुतेक तेथे वाघाने टाकून दिलेली शिकार होती, मात्र शिकार करताना भरपूर कष्ट पडल्याने वाघ थोडावेळ खोल पाण्यात गेला होता व शिकार तशीच उघड्यावर पडलेली होती! गरुड व कोल्हा दोघांचाही त्या शिकारीवर डोळा होता, शिकार आपणच घेऊन जावी या विचारात दोघेही एकमेकांचा अंदाज घेत होते. मात्र लवकरच त्यांना जाणवलं की शिकार दोघांसाठीही पुरेशी आहे व त्यांच्यातला संघर्ष तिथेच संपला, त्यांनी शिकारीचा आपापला वाटा घेतला व तिथून निघून गेले! हे संपूर्ण नाट्य पंधरा मिनिटात घडलं, मात्र आम्ही आमच्या भोवतालचं सगळं काही विसरुन गेलो होतो, अगदी वाघालाही, जो दुपारी उशीरा तिथे आला! कॉर्बेटच्या जंगलाची ही अशी मजा आहे!”

 कॉर्बेटचं जंगल म्हणजे काय चिज आहे हे समजावं यासाठी मी केवळ माझे काही अनुभव इथे दिले आहेत. वाघांना पाहाणं हे कॉर्बेटमधलं सर्वोत्तम दृश्य असतं हे मान्य असलं तरीही आपण जेव्हा म्हणतो की आम्हाला वाघ दिसला नाही तेव्हा तो कॉर्बेट अभयारण्याचा दोष नसतो. तुमच्या आजूबाजूला वाघाचं अस्तित्व अनुभवायला शिका, त्याच्या पावलांचे ठसे पाहा, त्याची डरकाळी ऐका, जंगलातल्या प्राण्यांचे व पक्षांचे इशारे समजून घ्या, त्यानंतर तुम्हाला जंगलाचा अधिक चांगल्या प्रकारे व ख-या अर्थाने आनंद घेता येईल! आपल्याला जे मिळालं नाही त्याबद्दल आपण उघडपणे नाराजी व्यक्त करतो मात्र आपल्याला जे मिळालं त्याविषयी आपण आनंद व्यक्त करायला सोयीस्करपणे विसरतो! तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारा धिकालाच्या विस्तीर्ण कुरणांवर चरणारे हरिणांचे कळप पाहाताना तुम्ही मंत्रमुग्ध झाला नाहीत का? रामगंगा जलाशयावरील सूर्यास्ताच्या वेळचा नारंगी सूर्य व त्या पार्श्वभूमीवर हालणा-या हत्तींच्या छायाकृती पाहताना तुम्हाला भुरळ पडली नाही का? तुम्ही त्या चित्तवेधक धनेश पक्षाचे रंग किंवा लांब शेपटीच्या निखार पक्षाचे सौंदर्य न्याहाळले नाही का? तुम्ही स्वर्गीय नर्तक पक्ष्याला आकाशात भरारी घेताना पाहिलं नाही का जो निळ्याशार आकाशात पांढ-या लाटेप्रमाणे वाटतो? रात्री तुम्ही निरभ्र चांदण्यांनी भरलेले आकाश पाहिले नाही का व तुमच्या विश्रामगृहाच्या व-हांड्यातून त्या मोजण्याचा प्रयत्न केला नाही का? कॉर्बेटने अनेक प्रकारे उत्तमोत्तम दृश्ये दाखविण्याचा प्रयत्न केला आहे, जी आपल्याला आपल्या काँक्रिटच्या जंगलात पाहायला मिळणार नाहीत व तरीही आपण आपल्याला काहीही पाहायला मिळालं नाही अशी तक्रार करतो! माझ्या मते हा पूर्णपणे स्वार्थीपणा आहे!
मी अशा सफरींवरुन माझ्या काँक्रिटच्या जंगलात परत आल्यानंतर, सकाळी मॉर्निंग वॉकला चालताना माझे कान शेजारच्या झाडावरील पक्षांचा किलबिलाट टिपतात व मी अपेक्षेने आजूबाजूला पाहतो, मला अतिशय आनंद होतो कारण फांद्यांवर मला दयाळ पक्षांची जोडी नाचताना दिसते! जंगलाने मला माझ्या भोवताली असलेल्या वन्यजीवनाकडे पाहायला शिकवलं आहे, परिसर कोणताही असला तरीही तेथे पक्षांच्या, झाडांच्या, गवताच्या कितीतरी प्रजाती असतात व त्या पाहताना मी पुन्हा एकदा माझ्या शहरातले ताणतणाव विसरुन जंगलात जातो! मित्रांनो तुम्हा जेव्हा पुढच्या वेळेस कॉर्बेटला भेट द्याल तेव्हा जंगलाचा जास्तीत जास्त अनुभव घेण्याचा प्रयत्न करा, भांटसारख्या कलोरोडेण्ड्रोनच्या झुडुपांचा सुवास व पक्षांचा आवाज सोबत न्या, त्यानंतर तुम्हाला कॉर्बेटने वाघ दाखवला नाही अशी जाणीव कधीच होणार नाही, कारण लक्षात ठेवा वाघाने तुम्हाला नक्की पाहिले आहे

खाली दिलेल्या लिंकवर कृपया अधिक छायाचित्रे पाहा...

https://www.flickr.com/photos/16939159@N05/sets/72157649824312524/

https://www.flickr.com/photos/16939159@N05/sets/72157649783844074/ 


संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्सhttps://mail.google.com/mail/u/0/images/cleardot.gif