Friday 25 September 2015

पाऊस त्यांचा आणि आपला !

























काही लोक पावसात चालतात, काही केवळ ओले होतात “…रॉजर मिलर

रॉजर डीन मिलर, सिनियर हे अमेरिकी गायक, गीतकार, संगीतकार, अभिनेता होते, ते त्यांच्या हाँकी-टाँकने-प्रभावित नाविन्यपूर्ण गाण्यांसाठी सर्वाधिक ओळखले जात. त्यांनी पावसाचे इतके सहज-सुंदर वर्णन केले आहे यात काही विशेष नाही! माझा पत्रकार मित्र अभिजीत घोरपडे त्याच्या वैयक्तिक कामासाठी माझ्याकडे आला होता व आमची पाऊस या विषयावर व त्याच्या लोकांवरील परिणामाविषयी चर्चा सुरु झाली. याची दोन कारणे होती, एक म्हणजे मुसळधार पावसामुळे बैठक पुढे ढकलण्यात आली होती. मी व अभिजीत आम्हाला दोघांनाही निसर्गाशी संबंधित प्रत्येक गोष्टीत अतिशय रस आहे. विशेष म्हणजे अभिजीत एका मासिकासाठी पाण्याविषयी लिहीत होता, प्रामुख्याने पावसाच्या पाण्याविषयी लिहायचे होते. मी आजपर्यंत कुठल्याही विषयावर सहज म्हणून लिहीलेले नाही, तरीही मी त्याला म्हणलो की मला पावसाविषयी माझे मत व्यक्त करावेसे वाटते, तो देखील मला म्हणाला का नाही, प्रयत्न करुन बघ! खरंतर रॉजर यांच्या म्हणण्याप्रमाणे, पावसाचा विचार करायचा झाला तर मी केवळ जे ओले होतात त्यांच्यापैकी एक आहे; ती सोमवारची सकाळ होती, म्हणजे आठवड्याची सुरुवात जी बऱ्याच जणांसाठी विशेषतः कार्यालयात जाणाऱ्या लोकांसाठी फारशी आनंददायक नसते! पुण्यातील पावसाने आपल्या ख्यातीप्रमाणे कामकाजाच्या वेळी आकाशातून बरसायला सुरुवात केली. मी माझ्या कार्यालयाच्या इमारतीजवळच राहतो, मात्र माझे बहुतेक कर्मचारी कार्यालयात येताना ओल्या कपड्यांनिशी, पावसावर चडफडत येत होते. त्याच दिवशी सकाळी मी बॅडमिंटन खेळून जेव्हा वैशालीमध्ये एक कप चहा पिण्यासाठी गेलो होतो तेव्हाही दृश्य फारसे वेगळे नव्हते, व वेटरची पाण्याच्या थारोळ्यातून वाट काढत लगबग चालली होती, अर्थातच त्यांच्या तोंडी वरुण देवतेसाठी फार काही चांगले शब्द नव्हते! मला माझे तरुणपणाचे दिवस आठवले, माझ्याकडे तेव्हा दुचाकी होती, त्यामुळे मी माझ्या कर्मचाऱ्यांच्या भावना समजू शकतो कारण पावसात भिजून व दिवसभर ओल्या कपड्यांनी काम करणे फार काही चांगली कल्पना नाही. दुचाकीवर कोणत्याही प्रकारचा रेनकोट घातला तरीही तुमचा चेहरा व तुमचे शूज ओले होतातच व ती अतिशय त्रासदायक भावना असते! मी वैशालीतून गाडीने माझ्या कार्यालयात चाललो होतो, रस्त्यात पाऊस सुरुच होता, मी माझ्या एसी कारच्या खिडकीतून रिक्षावाले, दुचाकी चालक, रस्त्यावरील फेरीवाले व पादचाऱ्यांचे चेहरे पाहत होतो; पाऊस तोच मात्र त्याचा वेगवेगळ्या लोकांवर कसा वेगवेगळा परिणाम होतो हे पाहणे रोचक होते. या सर्व लोकांच्या चेहऱ्यावर पावसामुळे नक्कीच आनंदाची भावना नव्हती तर पावसामुळे वाहतुकीचा खोळंबा झाल्याने वैतागल्याची भावना होती, चेहऱ्यावरुन ओघळणाऱ्या पावसाच्या थेंबांसोबत इच्छित ठिकाणी लवकरात लवकर पोहोचण्याचा ताणही होता! मला खात्री आहे पावसाची कितीही गरज असली तरीही यापैकी कोणत्याही चेहऱ्यांवर पावसाच्या स्वागताचे भाव नव्हते! त्यानंतर काही शाळकरी मुले पाहिली, ती पावसात हसत, खिदळत चालली होती, त्यानंतर काही महाविद्यालयीन मुले पावसात बाईक चालविण्याचा आनंद उपभोगत होती; त्यांच्यासाठी तो चित्तथरारक अनुभव होता! त्यांना पाहून मलाही माझे महाविद्यालयीन दिवस आठवले, तेव्हा पाऊस अतिशय आवडायचा, अर्थात मला स्वतःला पावसात भिजण्याची फारशी हौस नाही मात्र मित्रांचा आग्रह मान्य करावाच लागतो! मला सकाळी फेरफटका मारायला जाता येत नाही म्हणून मला पाऊस फारसा आवडत नाही, अर्थात जिममध्ये जायचा, ट्रेड-मिल वापरायचा पर्याय उपलब्ध असतो, मी तो वापरतोही, मात्र मला पाऊस नसताना स्वच्छ आकाशाखाली फेरफटका मारायला आवडते, हे मान्य केलेच पाहिजे. निसरड्या पदपथांवर (बांधलेले असतील तर), आजूबाजूला वाहनांमुळे उडणारा चिखल चुकवत, एखाद्या उघड्या खड्ड्यात आपण पडणार तर नाही ना असा विचार करत चालणे म्हणजे आपल्या शहरामध्ये एक शिक्षाच असते.

त्यानंतर मला वॉट्स ऍपवरील सर्व संदेश तसेच प्रसार माध्यमांमध्ये दुष्काळ व पाण्याच्या कमतरतेविषयी व पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाण्याच्या कमतरतेविषयी मथळे आठवले. राज्याच्या अनेक भागांमध्ये परिस्थिती अतिशय गंभीर आहे कारण यावर्षी अगदी थोडा किंवा अजिबात पाऊस झालेला नाही! एकीकडे लोक पावसासाठी प्रार्थना करत असताना शहरातील लोक पावसाला कशा प्रतिक्रिया देतात हे पाहून जरा मजा वाटते! मला माहिती आहे की एसी कारमध्ये बसून फिरताना, कार्यालय व घर अगदी जवळ असताना, माझ्यासाठी अशी टिप्पणी करणे सोपे आहे, मात्र माझ्या बांधकामाच्या ठिकाणीही पावसामुळे त्रासच होतो! एका बांधकामाच्या ठिकाणी खोदकाम सुरु होते पावसामुळे खोदून कडेला रचलेली माती खाली आली त्यामुळे कुंपणाच्या भिंतीचा पाया उघडा पडला व त्याचे बरेच नुकसान झाले. सुदैवाने तिथे कुणीही राहात नव्हते किंवा काम करत नव्हते म्हणून आर्थिक वगळता इतर कोणतेही नुकसान झाले नाही, मात्र बांधकामावरील लोकांना तसेच मजुरांना पाऊसाचा अतिशय तिटकारा वाटतो! पत्र्याच्या झोपडीत, काँक्रीट किंवा तात्पुरत्या सारवलेल्या जमीनीवर राहणे काही सोपे नाही. जास्त पाऊस पडला की जमीनीतली ओल संपूर्ण झोपडीत पसरते, अशा झोपड्यांमध्ये राहणाऱ्या अनेक कुटुंबाचे आंथरुणापासून कपड्यांपर्यंत सर्वकाही ओले होते. त्यांना कपडे कुठे सुकवायचे हा देखील प्रश्न असतो, कारण त्यांच्याकडे काही ड्रायरसोबत वॉशिंग मशीन सेवेला हजर नसते!

झोपड्यांमध्ये राहणाऱ्या लाखो लोकांचीही अशीच स्थिती असते, या झोपड्यांना आपण शहराला जडलेला कर्करोग म्हणतो, मात्र कुणीही स्वेच्छेने झोपडीत राहात नाही. इथे तर परिस्थिती आणखी वाईट असते कारण केवळ जमीन व छपरालाच ओल लागत नाही तर सांडपाण्याच्या वाहिन्याही तुंबतात व त्यावर कचरा तरंगू लागतो, हे पाणी झोपडपट्टीवासियांच्या पत्र्यांच्या झोपड्यांमध्ये शिरते, त्यामुळे तिथे सर्वप्रकारची रोगराई पसरते. तसेच शॉर्ट सर्किटमुळे अपघाताचा धोका असतो कारण इथे विजेची जोडणी देताना सुरक्षेचा काहीही विचार केला जात नाही, त्यामुळे अपघात होऊन जीव जाण्याचा अतिशय धोका असतो! वाड्यात व चाळीत राहाणाऱ्यांचीही अशीच परिस्थिती असते, झोपडपट्टीवासियांपेक्षा ते थोडेसे बऱ्या स्थितीत असले तरीही प्रत्येक मोसमी पावसात हजारो जुन्यापुराण्या वाड्यांचे माती व लाकडाचे बांधकाम अधिक सडते किंवा त्याची पडझड होते. हे अस्वच्छ तर आहेत मात्र हे जीवासाठी धोकादायकही आहे कारण प्रत्येक पावसात दोन/तीन जुने वाडे कोसळतात, त्यात जीवित हानी तर होतेच तसेच अनेक कुटुंबांचा निवारा गेल्याने ते रस्त्यावर येतात!

मात्र हाच पाऊस अनेक लोकांसाठी थेट व लाखो किंबहुना कोट्यवधी लोकांसाठी अप्रत्यक्षपणे वरदान आहे. त्यांना थेट फायदा होतो त्यामध्ये शेतकरी, तसेच जलसिंचन विभाग तसेच पीएमसीसारख्या प्रशासकीय संस्थांचा समावेश होतो, हातात पाणी असल्याने ते लोकांना अधिक सहजपणे तोंड देऊ शकतात. पावसामुळे राजकारणीही खुश होतात कारण त्यामुळे त्यांना चिडलेल्या मतदारांना तोंड द्यावे लागत नाही, अर्थात दैनंदिन जीवनाविषयी इतर प्रश्न असतातच. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा होतो, मात्र प्रत्येक पावसामुळे होतोच असे नाही; मी काही शेतकरी नाही मात्र थोड्याशा सामान्य ज्ञानाच्याआधारे सांगू शकते की पिकाच्या चक्रानुसारच पाऊस आला तर त्याचा उपयोग होतो. पेरणी व पीक वाढण्याच्या काळात पाऊस आवश्यक असतो, पिके तयार झाल्यावर कापणीच्या वेळी तो आला तर हाती आलेले पीक वाया जाते व प्रचंड नुकसान होते! ग्रामीण भागातल्या पावसाची वेगळीच तऱ्हा असते; सांडपाणी व रस्त्यासारख्या पायाभूत सुविधा चांगल्या नसतात त्यामुळे गावात जगणे अतिशय अवघड होते. तरीही पाणी ही जीवनरेखा आहे कारण आपल्या राज्यात आजही अनेक गावांमध्ये पाऊस हाच पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत आहे. मी विदर्भातील अतिशय दुष्काळी भागातला आहे व जवळपास तीस वर्षांपूर्वी उन्हाळ्यामध्ये पाणी बादलीवर विकले जायचे! कुणीही त्याचा दर्जा विचारत नसे कारण जे काही मिळेल ते नशीबच अशी परिस्थिती होती, त्या काळात बिसलेरी वगैरे बाटलीबंद पाणी उपलब्ध नव्हते व मला शंका वाटते आजही किती लोकांना तो पर्याय परवडेल! गावांमध्ये पावसाळ्यात पुण्यापेक्षा वेगळी परिस्थिती असते, खुल्या शेतांमुळे मुसळधार पाऊस जेव्हा होतो तेव्हा सगळीकडे पाणी भरते व सांडपाण्याची व्यवस्था नसल्यामुळे गुरुत्वाकर्षणानुसार जिकडे ओढले जाईल त्या दिशेने पाणी वाहत जाते. रस्ते वाहून जातात व अनेक दिवस गावाचा शेजारील गावांशी संपर्क तुटतो, त्यामुळे अन्न व भाज्यांसारख्या जीवनावश्यक गोष्टींचीही कमतरता भासते. मात्र इथे तुम्हाला पावसामुळे वैतागलेले चेहरे दिसणार नाही कारण शहरातील लोकांपेक्षा हे लोक पावसावर अधिक अवलंबून असतात व पाऊस पडला तरच आपल्याला दीर्घ काळ तग घरता येईल हे त्यांना माहिती असते.

तुम्हाला पाऊस खरच अनुभवायाचा असेल तर जंगलात जा, तिथे तो वेगळेच रुप धारण करतो. जंगलामध्ये झाडे, गवत, प्राणी व कीटक असे सर्वजण पावसाचे आनंदाने स्वागत करतात कारण ते त्यांचे जीवन असते. एका पावसाने संपूर्ण जंगलाचा चेहरा मोहराच पालटतो व जंगल हिरवाईच्या विविध छटांमध्ये न्हाऊन निघते.
यावरुन मला एक टीव्हीवरील सुंदर जाहिरात आठवली, माझ्यामते ती टाईडची होती. एक माणूस पांढराशुभ्र शर्ट घालून कार्यालयात चालला असतो, जोरदार पाऊस पडून गेलेला असतो व पावसातची भुरभूर सुरु असल्यामुळे तो हातात छत्री धरुन चाललेला असतो, जेणेकरुन त्याचा पांढरा शर्ट कोणत्याही डागापासून वाचावा. अचानक एक लहान मुलगा पळत येतो व त्याच्याशेजारी पाण्याच्या डबक्यात उडी मारतो, एका क्षणात त्या माणसाचा पांढरा शर्ट चिखलाच्या पाण्याने माखतो! त्या माणसाच्या व शाळकरी मुलाच्या चेहऱ्यावरील भाव एवढे नेमके होते की तुम्हाला तुमचे शाळकरी दिवस आठवत राहतात जेव्हा तुम्ही रस्त्यावरील पाण्याच्या डबक्यात उड्या मारल्या असतील! पावसाची अशी गंमत आहे; तो पडला नाही तर तुम्ही अडचणीत येता, तुम्हाला तो हवा असतो मात्र त्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झालेला तुम्हाला नको असतो! मला असे वाटते हेच आपल्या शहरी जीवनाचं दुर्दैव आहे कारण आपण प्रत्येक गोष्ट नफा व फायद्याच्या भाषेत मोजतो. इथे आपल्याला आपले लक्ष्य गाठताना पाऊस नेहमीच अडथळा वाटको, मग एखाद्या बैठकीला जायचं असेल किंवा बांधकामाच्या ठिकाणी सतत सुरु असलेलं काही काम असेल किंवा आपली उत्पादनं विकायची असतील. आपल्याला गरज लागेल तेव्हा पाणी हवं असतं, ते देखील आपल्याला सोयीच्या स्वरुपात, म्हणजे काही वेळा बिसलेरीच्या बाटलीत, काही वेळा टँकरनी किंवा अगदी बर्फाच्या तुकड्यांच्या रुपातही; आपल्याला अंघोळीच्या वेळी शॉवर हवा असतो, तो देखील आपल्याला आराम देणाऱ्या तापमानाप्रमाणेच. मात्र या सगळ्यात आपण विसरतो की पाणी हे निसर्गाचे एक रुप आहे व जेव्हा निसर्ग ज्या रुपात तुमच्याकडे येतो त्याच रुपात त्याचा आनंद घेतला पाहिजे. तो विनाश घेऊन आला तरी तो त्याचा दोष नाही तर ते आपलं अपयश आहे कारण आपण त्याचा योग्यप्रकारे वापर करु शकत नाही.

मला असे वाटते, त्या टीव्हीवरील जाहिरातीतल्या कार्यालयात जाणाऱ्या माणसाप्रमाणे आपण आपल्या धकाधकीच्या जीवनात पावसाचा आनंद घेणे विसरुन गेलो आहोत, विचार करा बरं तुम्ही दोन्ही हातांनी खुल्या दिलानं पावसाचं शेवटचं स्वागत कधी केलं होतं, त्याचे पहिले काही थेंब चेहऱ्यावर झेलले, हळूच त्यातलं थोडेसं प्यायलं हे आठवतंय का! आठवायचा प्रयत्न करा तुम्ही आकाशामध्ये शेवटचं इंद्रधनुष्य कधी पाहिलं होतं, व हातातलं काम बाजूला ठेवून त्याचं सौंदर्य न्याहाळलं होतं! माझ्या बालपणी पहिल्या पावसात लाल रंगाचे मखमखी अंगाचे किडे असायचे व आम्ही त्यांच्या मखमली त्वचेला स्पर्श करायचो, ती मज्जा मला अजूनही आठवते. पहिल्या पावसानंतर येणारा जमीनीचा वास, आपल्यापैकी कितीतरी जणांच्या मनात अजूनही दरवळतोय? आपल्या शहरी जीवनामध्ये आपला जमीनीच्या प्रत्येक इंचावर डोळा आहे व याप्रक्रियेमध्ये तो सुगंधच हरवलाय! आता आपण पावसासोबत जगायला शिकलं पाहिजे व देवाने आपल्याला दिलेल्या प्रत्येक थेंबाचा वापर करायचा प्रयत्न केला पाहिजे, यामुळे पाण्याचा योग्यप्रकारे वापर होईलच, पण जीवनाचा खरा अर्थ कळेल मग ते केवळ पावसात भिजणे राहणार नाही!


संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्सhttps://mail.google.com/mail/u/0/images/cleardot.gif


Monday 14 September 2015

पुण्याचे पाणी पळाले कुठे ?

























मला असं वाटतं पाण्याकडे निरखून पाहिल तर जीवनाचा अर्थ कळेल कारण पाण्याकडून  एखादी व्यक्ती कितीतरी गोष्टी शिकू शकते.” … निकोलस स्पार्क्स

निकोलस स्पार्क्स हा अमेरिकी लेखक व कादंबरीकार आहे. त्याच्या अठरा कादंबऱ्या व दोन ललितेतर पुस्तके प्रकाशित झाल आहेत. त्याच्या काही कादंबऱ्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम विक्री झाली आहे, व त्याच्या दहा भावनाप्रधान-नाट्यपूर्ण कादंबऱ्यांचे चित्रपटात रुपांतर करण्यात आले आहे, जे तिकीटबारीवर अतिशय यशस्वी ठरले आहेत. तो ललितेतर लेखन करणारा लेखक असला तरीही त्याचे वरील शब्द नक्कीच भावनाप्रधान आहेत व आपल्या प्रिय पुणे शहरासाठी एखाद्या कल्पित कथेप्रमाणे आहेत, मी जेव्हा पुणे शहर म्हणतो तेव्हा त्यामध्ये आपल्या प्रशासकांपासून ते शहरातील सामान्य माणसापर्यंत सर्वांचा समावेश होतो! याचे कारण म्हणजे आपण पाणी रोज पाहतो मात्र आपण पाण्यापासून एकही गोष्ट शिकत नाही! अलिकडेच करण्यात आलेल्या पाणी कपातीचे उदाहरण घ्या, पाणी कपात टाळता येणार नाही त्यामुळे त्याविषयी मला काहीही बोलायचे नाही मात्र त्या पाणी कपातीचा काय परिणाम होतो याचं मला नेहमी कुतूहल वाटतं. लहानपणी आम्हाला अनेक म्हणी उदाहरणासह शिकवल्या जायच्या. उदाहरणार्थ काखेत कळसा आणि गावाला वळसा म्हणजे एखादी गोष्टी तुमच्या जवळपास असूनही त्यासाठी सगळीकडे शोध घेणे, याचं उदाहण म्हणजे एखाद्या मुलाचं पेन त्याच्या शाळेच्या दप्तरातच असतं, मात्र त्यासाठी तो संपूर्ण शाळेत शोध घेतो! मी जेव्हा नेहमीची पाणी कपात व त्यावरुन होत असलेल्या गदारोळाविषयीच्या बातम्या ऐकल्या तेव्हा मला माझ्या लहानपणीच्या अजुन काही म्हणी आठवल्या त्या म्हणजे बैल गेला आणि झोपा केलातहान लागल्यावर विहीर खोदणे. पहिल्या म्हणीचा अर्थ असा होतो की बैल पळून गेला तरी त्याचा मालक झोपा काढतोय व दुसऱ्या म्हणीचा असा अर्थ होतो की गरज पडल्यावर एखादी गोष्ट करायला लागणे! मला असं वाटतं या म्हणी आपल्यासाठी चपखल आहेत, कारण आपल्याला अशा बातम्या व त्यावरील नेहमीचे आरोप प्रत्यारोप तसंच पाणी पुरवठ्याविषयी वृत्तपत्रांमधील मथळे वाचायची सवय झाली आहे! एकीकडे स्मार्ट शहरासाठी आपल्या शहराला नामांकन मिळाले म्हणून आपण पाठ थोपटून घेत आहोत व दुसरीकडे आपण पाणी पुरवठ्याचे व्यवस्थापनही करु शकत नाही जी कोणत्याही शहराची मूलभूत गरज आहे!

यातला विनोदाचा भाग म्हणजे प्रत्येक स्वयंसेवी संस्थेला, औद्योगिक संघटनांना तसेच महानगपालिकेलाही पाणी कपातीच्या वेळीच पाणी वाचवा यासारख्या मोहिमांची आठवण होते! किंबहुना यावर्षी पावसाने पाण्याच्या दृष्टीने तथाकथित समृद्ध असलेल्या पुणे शहरातील प्रत्येक नागरिकाचे डोळे उघडले आहेत व मला आनंद वाटतो की या वर्षी सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडला आहे! अनेकांना माझी टिप्पणी आवडणार नाही; बऱ्याच जणांना तो पुणेकरांचा अपमान सुद्धा  वाटेल मात्र मला प्रामाणिकपणे असे वाटते की पाण्याच्या बाबतीत आपण त्याच गोष्टींची पुनरावृत्ती करतो! गेल्या काही वर्षातली परिस्थिती पाहा जेव्हा पाऊस चांगला झाला  व मला अगदी स्पष्टपणे आठवते की दोन वर्षांपूर्वी संपूर्ण जून महिन्यात व जुलैच्या मध्यापर्यंत पाऊस पडला नव्हता. त्यावेळी आपण पाण्याविषयी आत्तासारखेच मथळे वाचले होते व पाणी वाचविण्याविषयी अशीच ओरड झाली होती! पीएमसी व जिल्हाधिकारी कार्यालयाने नेहमीप्रमाणे बांधकामांना, कार स्वच्छता केंद्रांना, जवळपास सर्व तरणतलाव इत्यादींना पाणी पुरवठा बंद करण्याची घोषणा केली! त्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली म्हणून पाणी कपात जाहीर करण्यात आली म्हणजे एक दिवसाआड पाणी पुरवठा जाहीर करण्यात आला! पुन्हा नेहमीप्रमाणे राजकीय नेत्यांनी बांधकामांना पाणी पुरवठा होतच असल्याची ओरड सुरु केली, त्यामुळे प्रशासनाने त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले. मात्र कार स्वच्छता केंद्रांना होत असलेल्या पाणी पुरवठ्याविषयी कुणी चकार शब्दही काढला नाही, ही केंद्रे कुणाच्या आशीर्वादाने चालतात हे सगळेजण जाणतातच! मला खरोखरच या शहराची व नागरिकांची कीव येते, असे आणखी किती दिवस आपण स्वतःलाच फसवणार आहोत व आरशात दिसणाऱ्या आपल्या प्रतिबिंबाकडे दुर्लक्ष करणार आहोत, तरीही तो चेहरा कुरुप दिसतोय हे आपण स्वीकारत नाही! नंतरच्या महिन्यांमध्ये पावसाची कमतरचा भरुन निघाली, त्यामुळे तोपर्यंत करण्यात आलेल्या सर्व घोषणा सगळे जण विसरले, पाणी वाचवा मोहीम थंड पडली व शहरात पुन्हा पाणी वाया घालवा मोहीम सुरु झाली! म्हणूनच यावर्षी, जूनच्या उत्तरार्धापर्यंत तसेच अगदी जुलैमध्येही पाऊस पडला नाही, तेव्हा हे नेहमीचंच आहे आहे व नंतर पाऊस नक्की पडेल अशा विचाराने त्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं! आता ऑगस्ट व सप्टेंबरही संपला आहे व आपण मॉन्सूनच्या परतीच्या सरींवरच अवलंबून आहोत, आपण पाण्याबाबत आतातरी जागरुक झालो आहोत का असा प्रश्न मला पडतो!

पाणी किंवा पाऊस नाही तर आपला त्याविषयीचा दृष्टिकोन ही खरी समस्या आहे, म्हणूनच मी म्हणालो की या वर्षी सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला हे एका अर्थाने चांगलेच झाले, म्हणजे आतातरी आपल्याला पाण्याशिवाय जगणं म्हणजे काय हे समजेल! मी महाराष्ट्रातील पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या विदर्भाच्या ग्रामीण भागातून आलो आहे; त्यामुळे पाणी कमी असेल किंवा अजिबात नसेल तर जीवन कसं असतं हे मला माहिती आहे. वाईट गोष्ट म्हणजे ज्या पाण्याचे दुसरे नाव जीवन असे आहे त्याबाबत पुण्यातच नाही तर संपूर्ण राज्यात आपण भूतकाळातून काहीही शिकलो नाही. यावर्षी परिस्थिती आणखी अवघड आहे व ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणामामुळे किंवा इतर घटकांमुळे पावसाचे स्वरुप बदलत चालले आहे, व ही परिस्थिती अशीच राहणार आहे असे तज्ञांचे मत आहे. गेल्या वर्षी प्रत्येक महिन्यात पाऊस पडला व आता मॉन्सूनमध्ये आपल्याला पाण्याचा तुटवडा जाणवत आहे, तर वर्षभर हे पावसाचे पाणी पुरणार आहे का? पावसाचे बदललेले स्वरुप विचारात घेता आपण आत्तापर्यंत पावसाचे पाणी साठविण्यासाठी जी धोरणे वापरत आहोत ती बदलणे आवश्यक आहे (अर्थात आपल्याकडे अशी काही धोरणे अस्तित्वात असतील तर). त्याचशिवाय पाणी वाचवा ही केवळ पाऊस पडत नाही तेव्हा द्यायची एक लोकप्रिय घोषणा नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे! जल संवर्धन ही वर्षभर चालणारी प्रक्रिया आहे व या मोहिमेमध्ये समाजाच्या प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी समजून घेतली पाहिजे.

दिवाळीमध्ये गेल्यावर्षी, व दरवर्षी  फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची पातळी बरीच कमी झाली, याचे कारण म्हणजे फटाक्यांच्या प्रदूषाणाविषयी शाळकरी मुलांना जागरुक करण्यात आले. याप्रमाणे आपण शाळकरी मुलांना पाण्याचा प्रत्येक थेंब साठविण्याविषयी व त्याची बचत करण्यात त्यांची काय भूमिका आहे याविषयी जागरुक करु शकतो! पाणी बचत निर्देशांसारखे एखादे साधन तयार करा ज्याद्वारे आपल्याला प्रत्येक व्यक्ती दररोज किती पाणी वापरते व त्याविषयी जागरुक झाल्याने तो किंवा ती त्यात किती बचत करु शकतात हे समजेल. शाळकरी मुलांना त्यांच्या घरातील प्रत्येक व्यक्तिच्या जल बचत निर्देशांकाची नोंद करायला व ते शाळेत सादर करायला सांगा व सर्वांत चांगल्या निर्देशांकासाठी विशेष मार्क द्या! तसेच शाळेमध्ये आठवड्यातील किमान एक तास ध्वनीचित्रफितींद्वारे पाणी व त्याचे महत्व, दुष्काळग्रस्त गावांमधील दृश्ये शहरांमधील शाळकरी मुलांना दाखवली तर त्यांना या समस्येचे गांभीर्य समजेल. आपण शाळकरी मुलांसाठी पाणी या विषयावर आधारित प्रश्न मंजूषा, कविता लेखन व निबंध लेखन स्पर्धा आयोजित करु शकतो. थोडक्यात त्यांना पाण्याचे महत्व समजावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न झाले पाहिजेत व हा उपक्रम वर्षभर सुरु असला पाहिजे केवळ पाण्याची कमतरता असेल त्यावेळी नाही!
 त्यानंतर केवळ पीएमसीच नाही तर राज्य सरकारच्या विविध विभागांनीही पाण्याची बचत करणे अपेक्षित आहे. खरे सांगायचे तर आपल्याकडे पाण्याविषयी धोरणे तयार करणारे एकच प्राधिकरण नाही जे पाणी पुरवठा तसेच त्याचा वापर व संवर्धन यासाठी जबाबदार असेल, त्यामुळेच आपण या आघाडीवर अपयशी ठरलो आहोत! आपल्याकडे सध्या अनेक वेगवेगळे विभाग आहेत जे जलसिंचनापासून ते भूजलापर्यंत वेगवेगळे विषय हाताळतात, त्याशिवाय हा विषय हाताळणाऱ्या स्थानिक प्रशासकीय संस्था आहेत तसेच जीवन प्राधिकरण आहे, मात्र कुणी नेमके काय करायचे आहे या खेळात, कुणीच काहीच करत नाही हे तथ्य आहे, नाहीतर आपल्याला आज राज्यभर पाणी टंचाईला तोंड द्यावे लागले नसते. या वर्षीची पाणी टंचाई केवळ राज्याच्या एखाद्या विशिष्ट भागात किंवा पट्ट्यात नाही तर जवळपास संपूर्ण राज्यात आहे, चांगला पाऊस पडणाऱ्या पट्ट्यांनाही पाणी टंचाईचा फटका बसला आहे! आतापर्यंत प्रत्येकवेळी चारपैकी एका महिन्यात चांगला पाऊस झाल्याने त्याने पावसाची उणीव भरुन काढली त्यामुळे निसर्गानेच सर्व विभागांचे अपयश झाकले, मात्र असे म्हणतात की नाकर्त्यांना देवही मदत करत नाही; पाण्याच्या बाबतीत आपले कर्तव्य पार पाडण्याबाबत आपण जो नाकर्तेपणा दाखवला आहे, त्यामुळे आता देवानेही आपली साथ सोडल्यासारखी वाटते!

 आता आपल्या राज्यातील प्रत्येक गावासाठी, शहरासाठी व महानगरांसाठी पाण्याचे धोरण तयार करण्याची वेळ आली आहे, ज्यामध्ये स्रोत, मागणी तसेच त्याचा वापर कशाप्रकारे होतो म्हणजेच पिण्यासाठी, औद्योगिक, कृषी इत्यादींचा समावेश होतो, प्रत्येक वापरकर्ता त्यांना जेवढे पाणी वाटून दिले आहे ते योग्यप्रकारे वापरतात का व त्यात बचत करतात का हे तपासले पाहिजे! या आघाडीवर पुणे शहराचे उदाहरण पाहू व त्या आघाडीवर काय परिस्थिती आहे याचे विश्लेषण करु म्हणजे आपण जल व्यवस्थापनात किती मागे आहोत हे आपल्याला जाणवेल! आपल्याला नेमके किती पाणी हवे आहे व आपण ते कसे देणार आहोत हे आपल्याला माहिती नाही. असे सांगितले जाते की पीएमसीला सोळा टीएमसी पाणी आवश्यक आहे किंवा प्रत्येक वर्षी जलसिंचन विभागाला तेवढ्या पाण्याचा उपसा करावा लागतो, मात्र यापैकी वापरकर्ते प्रत्यक्षात किती पाणी वापरतात, किती पाण्याचे संवर्धन केले जाते किंवा किती पाण्याचा पुन्हा वापर केला जातो, याविषयी काही आकडेवारी उपलब्ध आहे का? पाण्याच्या समान वितरणाचे काय कारण, बाणेर किंवा बालेवाडी यासारख्या महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट गावांमध्ये जलवाहिन्यांचे जाळेही नाही, त्यामुळे पीएमसीला जे काही पाणी मिळते ते केवळ शहरातील दोन तृतींश  लोकसंख्येसाठीच वापरले जाते. या क्षेत्रांमध्ये जलवाहिनीचे काम पूर्ण झाले तर काय होईल, त्यानंतर पाण्याचे प्रमाण पुरेल का व आणखी अठ्ठावीस गावे महापालिकेच्या हद्दीत विलीन करायची आहेत त्यांचे काय? शहरामध्ये समाविष्ट होणाऱ्या या नव्या भागासाठी आपण पाणी कुठून आणणार आहोत! पाणी जरी नंतर मिळणार असले तरीही जलवाहिन्यांचे जाळे तयार करायला काय हरकत आहे? पर्यावरणविषयक परवानगीच्या प्रक्रियेमध्ये तांत्रिक समिती विकासकाला प्रश्न विचारते की पाणी पुरवठ्याची काय सोय आहे, टँकरद्वारे पाणी पुरवठा किंवा कूपनलिका हा कायमस्वरुपी पुरवठा मानला जात नाही! या प्रश्नाची उत्तरे विकासकाला कशी देता येतील कारण पाणी, सांडपाणी व विजेसारख्या मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी नियोजन किंवा प्रशासकीय संस्थेची आहे. नाहीतर जोपर्यंत सरकार या जमिनींना पाणीपुरवठा करत नाही तोपर्यंत तो ना विकास विभाग म्हणून घोषित करा म्हणजे कुणीही या जमिनी विकत घेणार नाही. त्याचशिवाय सरकारने विकास शुल्काच्या नावावर कोट्यवधी रुपये घेऊ नयेत, जे बांधकाम व्यावसायिकांना म्हणजेच पर्यायाने सामान्य माणसाला द्यावे लागतात, व त्यानंतरही एकेक बाटली पाण्यासाठी वणवण फिरावे लागते!
त्यानंतर लोकप्रियता मिळविण्यासाठी प्रशासन बांधकाम योजनांना पाणीपुरवठा न करण्यासारख्या अल्पकालीन उपाययोजना करते! शहरातील प्रत्येक हॉटेल, उपहारगृह, अवैध झोपडपट्ट्या, उद्योग किंवा आयटी पार्कना हे का लागू होत नाही, जे बांधकाम उद्योगापेक्षा बरेच अधिक पाणी वापरतात! मला असे वाटते की प्रशासकांनी प्रसिद्धी माध्यमांना चटपटीत बातम्या देण्यासाठी किंवा अडचणीत असलेल्या तथाकथित सामान्य माणसासाठी असे हलक्या दर्जाचे डावपेच करु नयेत! परिस्थितीचा लाभ घेऊन आपण मीटरशिवाय पाणी पुरवठा नाही सारख्या योजना का राबवत नाही! आपण किती पाण्याचा पुरवठा करत आहोत किंवा किती पाणी वापरत आहोत हे माहिती असल्याशिवाय आपण व्यक्तिच्या किंवा सार्वजनिक संस्थेच्या पाण्याच्या वापरावर नियंत्रण कसे ठेवू शकतो? वर्षानुवर्षे पाणी पट्टी”, तेवढीच आहे ती वाढविण्याचा विचार करा तसेच मालमत्ता कराच्या देयकामध्ये जलवाहिन्यांचे जाळे तयार करण्यासाठीचे शुल्क समाविष्ट करा  व त्याचा त्याच कारणासाठी वापर करा

रिअल इस्टेट दृष्टीने सुद्धा पाणी हा फार महत्वाचा मुद्दा आहे कारण पुण्याची वाढ होण्यात येथील मुबलक पाणी पुरवठा हि एक जमेची बाजू आहे म्हणूनच रिअल इस्टेट उदयोगानी सुद्धा या विषयी ग्राहकांमध्ये व सामान्य नागरिकांमध्ये जन जागृतीला हातभार लावलाच पाहिजे!
शेवटचा व अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे दीर्घकालीन जल संवर्धन धोरण तयार करणे व ते अंमलबजावणीच्या योजनेसह जाहीर करणे. हे खरोखरच अतिशय अवघड काम आहे कारण प्रत्येक भागानुसार परिस्थिती वेगळी असेल, किंबहुना काही ठिकाणी नवीन स्रोत तयार करण्यापासून सुरुवात करावी लागेल व त्यानंतर संवर्धनाच्या उपाययोजना स्वीकाराव्या लागतील व त्यांचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याचे पाहावे लागेल. जलस्रोतांची त्याचप्रमाणे संवर्धन यंत्रणेची ठराविक काळाने तपासणी केली जावी ज्यामध्ये पावसाच्या पाण्याच्या संवर्धनापासून ते पाण्यावर पुनर्प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांपर्यंत ते शेत तळ्यासारख्या प्रकल्पांना होणारा पुरवठा मोजण्यापर्यंत, प्रत्येक प्रयत्न योग्यप्रकारे कार्य करत असल्याची खात्री केली पाहिजे व त्याची माहिती नोंदवून ती आकडेवारीही आपल्याकडे असली पाहिजे! पाण्याशी संबंधित सर्व बाबी एकाच नियंत्रणाखाली आल्या पाहिजेत, म्हणूनच तसे करण्यासाठी एक यंत्रणा तयार केली पाहिजे. निकोलस स्पार्कच्या म्हणण्याप्रमाणे, पाणी केवळ वाया घालविण्याऐवजी आपण त्याकडून काही शिकले पाहिजे, आपण वर्षानुवर्षे ज्याप्रमाणे पाणी वाया घालवतोय त्याचप्रमाणे घालवत राहिलो तर एक दिवस आपल्याकडे वाया घालवायलाही काही शिल्लक राहणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे! त्याचसाठी प्रत्येक व्यक्तिचे योगदान अतिशय महत्वाचे आहे, तो किंवा ती कोणत्याही शहरातील, गावातील किंवा महानगरातील असू शकतात, कारण पाण्याला कोणताही धर्म नसतो!

 smd156812@gmail.com



संजीवनी डेव्हलपर्स

Saturday 5 September 2015

तेल अविव ते पुणे ,स्मार्टनेस हाच फरक !





















“केवळ आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असणे म्हणजे स्मार्टनेस नाही तर आपल्या आजूबाजूचा परिसर अधिक चांगला बनविण्यासाठी त्याचा वापर करून घेणे म्हणजे स्मार्टनेस” ………. श्री. जोहर शेरॉन

ज्यांना श्री. जोहर म्हणजे कोण हे माहिती नाही, त्यांच्यासाठी सांगतो, श्री. जोहर शेरॉन, हे तेल अविव महापालिकेचे चीफ नॉलेज ऑफिसर  (पीएमसीच काय आपल्या शहरातील कोणत्याही कंपनीमध्ये सुद्धा हे पद असल्याचे ऐकिवात नाही) आहेत. मी त्यांना व्यक्तिगत ओळखत नाही मात्र त्यांनी तेल अविवला जगातले सर्वोत्तम स्मार्ट शहर कसे बनवले हे त्यांच्या तोंडून ऐकायची संधी मला मिळाली! सकाळ वृत्तपत्राने या कार्यक्रमाचे आयोजन केले होतो, जो त्यांच्या विविध सामाजिक कार्यक्रमांपैकी एक होता; असे कार्यक्रम कोणत्याही स्मार्ट शहराचा महत्वाचा पैलू असतात. या कार्यक्रमाचा उद्देश हे शहर अधिक चांगले बनविण्यासाठी काय करता येईल याविषयी चर्चा करणे हा होता व त्यासाठी जगभरातल्या प्रयत्नांची माहिती घेणे महत्वाचे आहे! सध्या माध्यमांपासून ते शहराच्या प्रशासनापर्यंत ते राजकारण्यांपर्यंत, सगळ्यांच्या चर्चेचा एकच विषय आहे तो म्हणजे स्मार्ट शहर. हे नक्कीच या संकल्पनेचे यश म्हटले पाहिजे, कारण प्रत्येकालाच त्याची माहिती असेल तर हे स्वप्न नक्कीच साकार होऊ शकेल. किमान वर उल्लेख केलेल्या सादरीकरणातून तरी असेच वाटत होते, कार्यक्रमाला या विषयाशी संबंधित सर्व मान्यवर उपस्थित होते. स्वयंसेवी संस्थांपासून ते नोकरशहा, राजकारणी, समाजातील सामान्य व्यक्ती ते अगदी विद्यार्थ्यांपर्यंत सर्वजण हजर होते! हा खऱ्या अर्थाने सार्वजनिक मंच होता व लोकांना स्मार्ट शहराविषयी जाणून घ्यायची उत्सुकता होती हे चांगले लक्षण आहे. सध्या तरी स्मार्ट शहर हत्ती व आंधळ्या माणसांच्या गोष्टीसारखे वाटते म्हणजे प्रत्येक माणूस हत्तीच्या ज्या अवयवला स्पर्श करतो त्याप्रमाणे त्याचे वर्णन करतो. मी सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये एक श्रोता म्हणून गेलो होतो व मी आत्तापर्यंत केलेला थोडाफार प्रवास, नगर नियोजनातील काही तज्ञ व्यक्तिंशी केलेली चर्चा यामुळे या विषयावर माझी स्वतःची काही मते आहेत!

सर्वप्रथम मला सादरीकरणामध्ये काय पहायला मिळाले ते सांगतो; सादरीकरण अतिशय साधे व मुद्देसूद होते. ज्यांना तेल अविवविषयी माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो की, ईस्रायलची राजधानी असलेले हे शहर आकाराने व लोकसंख्येने पुण्यापेक्षा खूपच लहान आहे. या शहराची लोकसंख्या जेमतेम ४ ते ५ लाख आहे, जी पुण्याच्या एक दशमांश आहे. तेथील लोकसंख्येची घनता अधिक आहे व त्यांनी त्यांची संसाधने व तंत्रज्ञानाच्या मदतीने शहराचे स्मार्ट शहरात रुपांतर केले आहे. श्री. जोहर यांनी हा प्रवास कसा सुरु झाला हे समजावून सांगितले व त्यांनी स्पेनमधले स्मार्ट शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बार्सिलोनासारख्या इतर शहरांचा अभ्यास केला. त्यांनी प्रामुख्याने तीन आघाड्या निश्चित केल्या व त्यांच्या लक्षात आले कि सर्वकाही नागरिक ते नागरिक, सरकार ते नागरिक व सरकार ते सरकार या घटकांमधील परस्पर नातेसंबंधांवर किंवा संवादावर किंवा संगणकाच्या भाषेत सांगायचं तर इंटरफेसवर सर्वकाही अवलंबून आहे! त्यानंतर नागरिकांच्या दररोजच्या जगण्यासाठीचा खर्च व कष्ट कमी करणे हे उद्दिष्ट ठेवले ज्यामुळे आपोआपच प्रत्येक इंटरफेसमधील वेळ वाचला. उदाहरणार्थ एखाद्याला जन्माची किंवा नवजात बालकाची नोंदणी करायची असेल तर त्याला ते ऑनलाईन किंवा कमीत कमी दस्तऐवजात करता येईल. त्यानंतर ही माहिती संबंधित सर्व विभागांना दिली जाईल म्हणजे कुणालाही माहितीसाठी एकमेकांच्या मागे लागावे लागणार नाही, जे आपल्याकडे होताना दिसते. दुसरे म्हणजे त्यांनी डेटाचं महत्व जाणलं, यात सर्व प्रकारचा डेटा आला म्हणजे शहरातील सायकलींच्या संख्येपासून ते किशोरवयीन मुलांची संख्या किती आहे इथपर्यंत सर्वप्रकारचा डेटा त्यांना गोळा केला व त्यानंतर शहरातील जागेच्या उपयोगापासून ते रहदारी व्यवस्थापनापर्यंत विविध प्रकारची शहराविषयीक नागरी धोरणे तयार करण्यासाठी त्याचा वापर केला !

त्यानंतर तेल अविवच्या प्रत्येक नागरिकाला स्मार्ट शहर या संकल्पनेची माहिती करुन देणे, नेमक्या समस्या कुठे येत आहेत हे ओळखणे व महानगरपालिका सर्व समस्या सोडवु शकणार नाही हे स्वीकारणे हा भाग आला. त्यासाठी नागरिकांना महानगरपालिकेच्या कामकाजात जास्तीत जास्त सहभागी करुन घेणे आवश्यक होते, म्हणजे अगदी अर्थसंकल्प तयार करण्यापासून ते जागांचा वापर करण्यापर्यंत! आणि हो हे सर्व काही निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींमार्फत करण्यात आले, म्हणजेच इथे निवडून आलेल्या सदस्यांनी वैयक्तिक हितापेक्षाही शहराच्या हिताला प्राधान्य दिले, पुढील निवडणुकांमध्ये खात्रीशीरपणे निवडून येण्याचा हाच एकमेव मार्ग होता हे त्यांना  लक्षात आले! म्हणजेच शहराची जबाबदारी प्रत्येकावर आहे व अधिक महत्वाचे म्हणजे प्रत्येकाने हे समजून घेतले व प्रतिसाद दिला! त्यानंतर महानगरपालिकेने नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत कारण ते अप्रत्यक्षपणे सेवा पुरवठादार आहेत त्यांनी केवळ नागरिकांच्या सूचना किंवा तक्रारी किंवा अपेक्षांनुसार प्रतिक्रिया देण्यापेक्षा स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे! या पार्श्वभूमीवर पुण्यातली परिस्थिती काय आहे हे पाहू! कोणत्याही शब्दकोशामध्ये ज्याप्रमाणे शहाण्याला मूर्ख, बुद्धिमानला निर्बुद्ध असे विरुद्धार्थी शब्द असतात त्याप्रमाणे स्मार्टनेसला कोणताही विरुद्धार्थी शब्द नाही! या शब्दाची वर्गवारी करता येऊ शकते म्हणजे जास्त स्मार्ट, कमी स्मार्ट किंवा अतिशय जास्त स्मार्ट वगैरे! एखादी व्यक्ती किती स्मार्ट आहे याचे वर्णन करताना ती कमी किंवा अधिक स्मार्ट आहे असं आपण म्हणतो त्यासाठी इंग्रजीमध्ये अनस्मार्ट किंवा नो स्मार्ट सारखे शब्द वापरले जात नाहीत! शहराच्या बाबतीतही हेच लागू होते!

हे समजावून घेण्यासाठी आपण एका शहरामध्ये रस्त्यावर गाडीखाली मरण पावलेल्या कुत्र्याचे उदाहरण घेऊ, सामान्यपणे प्रत्येक शहरामध्ये असे अपघात होतात, कुत्र्याचा मृतदेह रस्त्यावर पडलेला आपण पाहिला असेल. पहिल्या उदाहरणामध्ये, शहरात कुणीतरी आपोआप याची दखल घेईल व एक जबाबदार चमू घटनास्थळी पोहोचेल व कुत्र्याचा मृतदेह तातडीने उचलून नेईल व रस्ता लगेच स्वच्छ केला जाईल, रस्त्यावरील वाहतूक लगेच सुरळीत होईल व नागरिकांना त्याचा काहीही त्रास होणार नाही. दुसऱ्या उदाहरणामध्ये, कुणीतरी दखल घेईल व जबाबदार चमूला कळवेल व तो चमू वेळेत घटनास्थळी पोहोचेल व योग्य ती कारवाई करेल. तिसऱ्या उदाहरणामध्ये चमूला कळविले जाईल मात्र ते वेळेत प्रतिसाद देणार नाहीत, ज्या व्यक्तिने दखल घेतली आहे तिला कुत्र्याचा मृतदेह हलविला जाईपर्यंत वारंवार चमूकडे पाठपुरावा करावा लागेल. चौथ्या प्रकरणामध्ये ज्या व्यक्तिने दखल घेतली आहे त्याला आपण मृत कुत्र्याविषयी कुणाला कळविले पाहिजे हे देखील माहिती नसेल व तो यंत्रणेतील सर्वांना संपर्क करत राहील व प्रत्येकजण ही आपली जबाबदारी नाही अशी टाळाटाळ करत राहील! पाचव्या उदाहरणात कुत्र्याचा मृतदेह रस्त्यावर पडला असताना कुणीही दखल घेणार नाही व कुणीही कुणालाही कळविणार नाही किंवा काही करायचा प्रयत्न करणार नाही, कुत्र्याचा मृतदेह रस्त्यावर कुजत पडेल व येणारे-जाणारे बाजूने जातील व यंत्रणेला दोष देत राहतील!
 हे कोणत्याही शहरात होऊ शकते, आता इथे स्मार्टनेसचा काय संबंध असा प्रश्न कुणीही विचारेल! कुत्र्याचा वाहनामुळे मृत्यू झाल्यानंतर रस्त्यावर परिस्थितीची पाच उदाहरणे आपण पाहिली. पहिल्या उदाहरणारमध्ये ते शहर सर्वात स्मार्ट होते कारण कुणीही कुणालाही संपर्क करावा लागला नाही, यंत्रणेने स्वतःच दखल घेतली व जबाबदार चमुने स्वतः आपली जबाबदारी पार पाडली. त्यानंतरच्या उदाहरणांमध्ये स्मार्टनेसचा निर्देशांक कमी झाल्याचे दिसते कारण कुणीही काहीही पाऊल उचलण्याची तसदी घेत नाही, तर एकमेकांवर आरोप करतात मात्र ते देखील याच व्यवस्थेचा भाग आहेत हे विसरतात! आपले शहर स्मार्टनेसच्या निर्देशकाच्या बाबतीत तळाशी आहे असे मला या सादरीकरणातून समजले, शहराकडे महानगरपालिका किंवा त्यासारखी यंत्रणा असली पाहिजे; तिने केवळ प्रतिसाद  देऊ नयेत तर पुढाकार घ्यावा, यालाच स्मार्टनेस म्हणता येईल! काही वेळा व्यवस्थेच्या मागे लागावे लागते हे मान्य केले तरीही तिने प्रतिसाद दिला पाहिजे, नागरिकांशी संपर्क येणारी व्यवस्था अशीच असली पाहिजे! पाचव्या उदाहरणात जे झाले ते आपण आपल्या शहरामध्ये कितीतरी वेळा अनुभवले आहे त्यामुळे आपल्याला त्याची सवय झाली आहे. उदाहरणार्थ रस्ता खणलेला असतो व तो अनेक दिवस तसाच असतो किंवा सांडपाण्याची वाहिनी फुटते व सांडपाणी वाहत असते व त्यामुळे अनेक दिवस नदी किंवा आजूबाजूचे क्षेत्र दूषित होते. दररोज एकाच ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होतो व आपल्यासाठी ती नेहमीची बाब होते, अशा कितीतरी गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात व आपल्याला असे वाटते आपण त्यासाठी जबाबदार नाही तर दुसरे कुणीतरी त्यासाठी जबाबदार आहे!

आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी प्रसिद्धी माध्यमांमध्ये स्मार्ट शहराविषयी विविध क्षेत्रातील अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या व त्यापैकी प्रत्येकाने जबाबदारी एकमेकांवर ढकलली होती म्हणजे, “हे त्यांनी केले पाहिजे वगैरेसारखी विधाने करण्यात आली होती! उदाहरणार्थ एका व्यावसायिकाने टिप्पणी केली होती की पुणे महानगरपालिकेने तसेच राजकारण्यांनी स्मार्ट शहर हा त्यांचा कार्यक्रम आहे असा विचार करुन त्याची अंमलबजावणी केली पाहिजे! एका ज्येष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याचे म्हणणे होते की इथे विविध उद्योग येणे महत्वाचे आहे म्हणूनच येथे आयटी उद्योग आले पाहिजेत. राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याचे म्हणणे होते की नागरिकांनी हे शक्य केले पाहिजे. एका स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीचे म्हणणे होते की सरकारने सार्वजनिक वाहतूक सशक्त बनविली पाहिजे. एका लोकनियुक्त प्रतिनिधीचे असे म्हणणे होते की पीएमसीच्या कर्मचाऱ्यांना जनतेला योग्य प्रकारे सेवा देण्यासाठी जबाबदार धरले पाहिजे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या एका सरकारी कर्मचाऱ्याचे असे म्हणणे होते की पीएमसीने शहर नियंत्रित करण्यासाठी आरटीओकडे असलेला डेटा वापरावा कारण त्यांच्याकडे सर्व वाहनांची नोंदणी केलेली असते! डॉक्टरांचे असे म्हणणे होते की सरकारने प्रत्येक घरापर्यंत पोहोचणारी सार्वजनिक आरोग्य सेवा उभारली पाहिजे. 

वास्तुविद्याविशारदांनी निसर्गपूरक इमारती उभारणे व पर्यावरण संवेदनशील नियोजन करणे आवश्यक असल्याची गरज व्यक्त केली. शिक्षण क्षेत्रातल्या एका व्यक्तिने शिक्षण संस्थांसाठी  निसर्गपूरक व ज्ञानकेंद्रित परिसर आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. एका विद्यार्थ्याने टिप्पणी केली की शहरातील झोपडपट्ट्या विकसित केल्या पाहिजेत कारण स्मार्ट शहरातील त्या मोठ्या अडथळा आहेत. अनेक जणांचे असे मत होते की स्मार्ट शहरासाठी राजकीय इच्छाशक्तिची गरज आहे, अशाप्रकारे ही यादी वाढतच होती! मला आश्चर्य वाटले की काही मोजकेच सन्माननीय अपवाद वगळता सादरीकरणासाठी हजर असलेल्या कुणीही, होय मला माझी जबाबदारी समजली आहे व हे शहर स्मार्ट व्हावे यासाठी मी माझ्यापासून सुरुवात करेन असे म्हटले नाही! श्री. जोहर वारंवार हेच सांगत होते की तेल अविवला एक स्मार्ट शहर बनविण्यात कुणा एका व्यक्तिची किंवा विभागाची किंवा संघटनेची भूमिका नव्हती, तर संपूर्ण शहराने ते एक स्वप्न पाहिले, प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून घेतली व ते साध्य केले! स्मार्टनेस उपजत नसतो तर, त्यासाठी प्रत्येकाने या प्रक्रियेतील आपली भूमिका समजावून घेतली पाहिजे. आपल्याला एका क्लिकवर सर्व डेटा उपलब्ध होऊ शकतो मात्र तो डेटा मिळविण्यासाठी व त्याचा वापर करण्यासाठी कुणालातरी क्लिक करावे लागते! कुणीही बाहेरची व्यक्ती येऊन आपल्यासाठी हे करणार नाही. आपल्यापैकी किती जणांना आपले घर महानगरपालिकेच्या कोणत्या क्रमांकाच्या प्रभागात येते व आपल्या दैनंदिन कामांसाठी कोण जबाबदार आहे हे माहिती आहे? पीएमसीच्या संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध आहे मात्र आपल्यापैकी किती जणांनी तिचा वापर केला आहे व आपल्या सेलफोनमध्ये तो साठवून ठेवला आहे? ज्यांनी वापरुन पाहिला आहे त्यांचे म्हणणे असते की कुणीही उत्तर देत नाही, ठीक आहे मात्र निवडणुकीच्या वेळी तुमच्या घरी मते मागायला येणाऱ्या उमेदवारांकडे तुम्ही या समस्या मांडता का?
मला असे वाटते की सर्वप्रथम आपण स्मार्टनेस म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. मला असे वाटते की स्मार्टनेस म्हणजे आपली जबाबदारी समजून घेणे व त्यानुसार कृती करणे व मला असे वाटते की मला माझे शहर स्मार्ट शहर बनवायचे असेल तर मी सुरुवात माझ्या घरापासून तसेच कार्यालयापासून केली पाहिजे! स्मार्टनेस हा एक दृष्टिकोन आहे; एखादी व्यक्ती स्मार्ट असेल तर तिच्या प्रत्येक घटकातून ते दिसून येते ज्यामध्ये कपडे घालण्यापासून ते इतर व्यक्तिंशी ती कसा संवाद साधते याचा समावेश असतो. कोणतेही शहर अत्याधुनिक साधनांनी, मोबाईल्सनी किंवा संकेतस्थळांनी स्मार्ट होत नाही तर प्रत्येक नागरिकांच्या वर्तनाने होते, मला असे वाटते तेल अविव व पुण्यातला मुख्य फरक हाच आहे, त्यांना स्मार्टनेस म्हणजे काय हे नेमके समजले आहे व आपण अजूनही विचार करतोय की कुणीतरी स्मार्ट होईल व त्यानंतर हे शहर स्मार्ट बनेल! हे सत्य स्वीकारण्याची वेळ आता आली आहे व त्यासाठी आपल्याला कोणतीही स्पर्धा करायची गरज नाही, कारण या दिशेने काम करत राहिल्यास कुठलेही शहर स्मार्ट शहर होऊ शकते. केवळ निधी मिळविण्यासाठी नाही किंवा स्मार्ट शहराची ओळख मिळावी म्हणून नाही तर प्रत्येकाच्या मनात स्मार्टनेसची भावना असेल तरच हे स्मार्ट शहर होऊ शकते. ते व्हावे हीच सदिच्छा!


संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स