Wednesday 31 August 2016

माळढोकच्या अस्तित्वाचा लढा !





























कुणीतरी अतिशय काळजी केल्याखेरीज काहीही बदलणार नाही, खरच नाही बदलणार ... द लॉरेक्स (या कार्टुनपटातून)

मला लॉरेक्ससारखे कॉर्टूनपट फार आवडतात व हे चित्रपट मनोरंजनासोबतच निसर्ग वाचवा यासारखा अतिशय उत्तम संदेशही देतात. मी जेव्हा डॉ. प्रमोद पाटलांना भेटलो तेव्हा मला लॉरेक्स या कार्टून पात्राचा वरील संवाद आठवला. मला असे वाटले की ते शब्द खरे झाले आहेत! केवळ एकोणतीस वयाचा हा तरुण डॉक्टर इतरांप्रमाणे आपल्या व्यवसायात जम बसविण्याचा प्रयत्न करण्याऐवजी माळढोक नावाच्या पक्ष्याच्या संवर्धनाची काळजी करण्याचे काम करतोय! याचं इंग्रजी नाव आहे द ग्रेट इंडियन बस्टर्ड, अशा नावाचा एखादा पक्षी असेल हे कुणाच्या गावीही नाही, अर्थात या नावाशी साधर्म्य असलेली एक  इंग्रजी शिवी मात्र सगळ्यांना माहिती आहे! आता बरेच जण म्हणतील त्यात काय विशेष? आपल्याला आयुष्यात एखाद्या पक्षाच्या मागे वेळ घालवण्यापेक्षा इतर महत्वाची कामे नाहीत का, कारण तो पक्षी काळा का गोरा हे माहिती नाही व तो कुठे राहतो याचीही माहिती नाही! त्याचवेळी अनेक जण कदाचित डॉ. प्रमोद यांच्या वेडेपणावर हसतील कारण त्यांनी त्यांची वैद्यकीय पदवी मानवी जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी वापरली पाहिजे जे माळरानावर राहणाऱ्या कुणा तपकिरी व पांढऱ्या रंगाच्या पक्षाला वाचविण्यापेक्षा अधिक महत्वाचे आहे. अर्थात, डॉ. प्रमोद यांच्यासंदर्भात आणखी उल्लेखनीय बाब म्हणजे पक्षांच्या संवर्धनासोबतच त्यांचे संशोधनकार्यही सुरु आहे जे आधुनिक जीवनात माणसासाठी सर्वात मोठा धोका असलेल्या मधुमेहाविषयी आहे. डॉ. प्रमोद यांच्या या वैशिष्ट्यामुळेच त्यांच्याविषयी तुम्हाला सांगावसं वाटलं, म्हणूनच आधी ते अतिशय तळमळीनं ज्या माळढोक पक्ष्यांच्या संवर्धनाचे कार्य करत आहेत त्याविषयी जाणून घेऊ. द ग्रेट इंडियन बस्टार्ड या पक्ष्याला मराठीत माळढोक असं म्हणतात.

प्रगती, विकास व शहरीकरणाविषयीच्या आपल्या तथाकथित जिव्हाळ्यामुळे माळढोकसारख्या अजुन किती प्राणी व पक्ष्यांच्या प्रजाती नामशेष होणार आहेत देवालाच माहीत. नामशेष होत चाललेल्या प्रजातींच्या यादीमध्ये माळढोक पक्ष्याचं नाव अग्रस्थानी आहे. तपकिरी व पांढरट करड्या रंगाचा आकारानं बराच मोठा माळढोक  पक्षी फक्त भारतातच आढळतो व आता जवळपास असे दोनशे ऐंशी पक्षीच शिल्लक राहीले आहेत. यात आणखी दुर्दैवाची बाब म्हणजे आपल्या तथाकथित वन्यप्रेमी महाराष्ट्र राज्यात फक्त पंधरा माळढोक पक्षी उरले आहेत. यातले काही नागपूरजवळ वरोरा येथे आहेत तर काही सोलापूरजवळ नानज येथे आहेत. कधीकाही हे पक्षी माळरान असलेल्या ठिकाणी सर्वत्र दिसायचे  पण आता भारतातल्या केवळ काही पट्ट्यांमध्ये ते अखेरचा श्वास घेताहेत. या एका पक्ष्यासाठी देशभरात जवळपास आठ अभयारण्ये आहेत मात्र त्यापैकी केवळ चार ते पाच अभयारण्यांमध्येच त्याचे अस्तित्व उरले आहे.

आता माळढोकचं काय वैशिष्ट्य आहे असे प्रश्न बरेचजण विचारतील, कारण आपल्या देशात पक्षांच्या हजारो प्रजाती आहेत. त्यातले अनेक पक्षी माळढोकपेक्षाही दिसायला सुंदर आणि आकर्षक आहेत. माळढोकपेक्षाही सुंदर व दुर्मिळ पक्षी असले तरीही माळढोकचं निवासस्थान हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. या पक्ष्यांना साधं गवत असलेलं खुलं माळरान हवं असतं जिथे फारशी झाडी नसते म्हणूनच त्यापैकी बरेच पक्षी राजस्थानात पाकिस्तानच्या सीमेला लागू असलेल्या जैसलमेरसारख्या रखरखीत भागात पण टिकून आहेत. या पक्ष्यांना शुष्क गवत असलेल्या माळरानासोबतच थोडासा एकांत हवा असतो जो आपण त्यांना देत नाही. माळढोक नामशेष होत चालले आहेत हे माणूस आपल्या भोवतालच्या पशू-पक्ष्यांच्या नैसर्गिक निवासस्थानावर अतिक्रमण करत असल्याचच एक  लक्षण आहे! आपण आपल्या भोवताली असलेल्या सर्व  सजीवांच्या प्रजातींना त्यांच्या गरजा फार काही मोठ्या नसतानाही, किती वेगाने नामशेष करत आहोत याचा हा एक ईशाराच आहे.  पूर्वी प्रत्येक गावाबाहेर किंवा शहराबाहेर गवताळ झुडपी माळरानं दिसायची; त्यावर माळढोकशिवाय ससा, मुंगूस,तरस,रानमांजर यासारखे प्राणीही दिसायचे. मात्र आता माळढोकसोबतच हे प्राणीही हळूहळू नामशेष होत चालले आहेत व त्याचं मुख्य मुख्य कारण आहे माणूस! माळढोक पक्षी प्रामुख्याने जमीनीवर राहतो व उघड्यावर अंडी देतो त्यामुळे त्याचे साप, कोल्हा, पाली असे बरेच शत्रू असतात. ही अंडी एखाद्या दगडासारखी असतात व तपकिरी खडकाळ पार्श्वभूमीत सहज लपून जातात. मात्र या नैसर्गिक शत्रूंशिवाय माणसाच्या रुपातल्या शत्रूपासून माळढोकला  वाचवणं अवघड आहे. आपण माळढोकची खाण्यासाठी शिकार करतो त्याचशिवाय इतर कारणांनीही ही प्रजाती नामशेष होत चालली आहे. सुरुवातीला आपण त्यांच्या घरावर शेकडो कारणांसाठी अतिक्रमण केले, रस्ते बांधले, कालवे खणले, घराच्या बांधकामांसाठी माळरानाचे भूखंड पाडले, उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या मारल्या ज्यामुळे माळढोकच नाही तर इतरही अनेक पक्ष्यांचा मृत्यू होतो. आपली जनावरं माळढोकांचे निवासस्थान असलेल्या माळरानावर तसंच त्यांना एकांत मिळणाऱ्या जागी चरतात, जमीनीवर घातलेल्या त्यांच्या अंड्यांचे नुकसान करतात. यात महत्वाचे म्हणजे, माळढोकाची मादी वर्षातून केवळ एकदाच गरोदर राहू शकतो व एकावेळी एकच अंडे देऊ शकते, यामुळे हा पक्षी नामशेष होण्याची अधिक भीती आहे! आपण माळढोकासाठी झुडपी गवताच्या माळरानांचं संवर्धन करू शकत नसू तर आपण हिरव्यागार जंगलांचं व त्यात राहणाऱ्या वाघांचं संवर्धन कसे करणार आहोत?
 या पार्श्वभूमीवर डॉ. प्रमोद यांच्यासारखी माणसं माळढोकाचं रक्षण करताहेत, काँक्रिटच्या जंगलात पक्षी टिकून राहावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताहेत! ते माळढोक पक्ष्याचं निवासस्थान असलेल्या भागाभोवतीच्या गावांमध्ये जातात व गावकऱ्यांना या पक्ष्याचं महत्व समजावून सांगतात. ते या भागातल्या शाळकरी मुलांना भेटतात व त्यांची माळढोकशी मैत्री व्हावी यासाठी प्रयत्न करतात. ते त्यांना पक्ष्यांवर व त्यांच्या शत्रूंवर विशेषतः शिकार करणाऱ्यांवर लक्ष ठेवायला सांगतात. ते वनविभागासोबत काम करतात व त्यांच्यापरीने जी काही मदत करता येईल ती करतात. दुर्बिणींपासून ते जॅकेटपर्यंत मूलभूत गोष्टी उपलब्ध करून देतात तसंच त्यांना या पक्ष्यांच्या निवासस्थानाचं संवर्धन करणं कसं आवश्यक आहे व माळढोक जगावा यासाठी काय काय करता येईल याची जाणीव करून देतात. ते माध्यमांमध्ये लेख लिहीतात व लोकांना पक्षांबाबतची त्यांची काय जबाबदारी आहे याची जाणीव करून देतात. ते शाळा/कॉलेजातील मुलांना पक्षांच्या संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी थोडा वेळ द्यायला सांगतात. आपण माळढोक पक्ष्यांना पिंजऱ्यात ठेवून जगवू शकत नाही तर आपण त्यांना मुक्त वातावरणात जगवलं पाहिजे. म्हणजेच भोवतालची गवताळ झुडपी माळरानं आपण टिकवून ठेवली पाहिजेत, तरच आपण वर नमूद केलेल्या काही प्रजाती टिकून राहतील.

 भारतातल्या सहा राज्यांपैकी महाराष्ट्र एक आहे जिथे माळढोक अजूनही दिसतात. पुण्यापासून २०० किलोमीटरवर उत्तर सोलापूरजवळ नानज येथे माळढोक अभयारण्य आहे. हे १९७९ साली अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले, म्हणजे इथे माळढोक पक्ष्यांच्या संवर्धनाला सर्वाधिक प्राधान्य दिले पाहिजे. मात्र याच्या हद्दीपासून ते सीमेच्या रक्षणापर्यंत सर्वच बाबतीत वाद आहेत. इथे उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या आहेत ज्या बिचाऱ्या पक्षांना उडताना दिसत नाहीत व या तारांना धडकून त्यांचा मृत्यू होतो. या अभयारण्यातून रस्ते जातात, तसेच कालवेही आहेत. सतत काहीना काही खोदकाम सुरु असतं त्यामुळे कुरणांची हानी होते व जनावरांना चरताही येत नाही तसंच या भागात माणसांची वर्दळ असते! परिणामी हा भाग अभयारण्य म्हणून घोषित असूनही इथे केवळ तीन माळढोक आहेत, ते सुद्धा क्वचितच दिसतात! कधीकधी मला खरंच प्रश्न पडतो की वन्यजीवन संवर्धनाच्या बाबतीत माणूस म्हणून आपली जबाबदारी आपल्याला समजली आहे का. आपल्याकडे सगळ्याप्रकारची क्षमता आहे यंत्रसामग्री आहे, पैसा आहे, मनुष्यबळ आहे, धोरणे तयार करण्यासाठी सत्ता आहे, तरीही आपण माळढोकसारख्या पक्षांना जगण्याचा व आनंदाने विहार करण्याचा हक्क देऊ शकत नाही! राजस्थान व महाराष्ट्रामध्ये एकाच पक्षाचं सरकार आहे, मात्र तरीही राजस्थानात माळढोक पक्ष्यांची संख्या जास्त असल्याने तिथून अंडी महाराष्ट्रात आणून ती उबवून इथे पक्ष्यांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न आपण करू शकत नाही. लक्षात ठेवा केवळ एखाद्या भागाला अभयारण्य म्हणून घोषित केल्यामुळे एखाद्या प्रजातीची संख्या वाढणार नाही. आपल्याकडे माळढोक पक्ष्याचं जेमतेम एकच जोडपं उरलं असेल व ते वर्षातून केवळ एकच अंडं घालू शकत असेल तर त्यांची संख्या वाढावी अशी अपेक्षा आपण कशी करू शकू? म्हणूनच आपल्या शासनकर्त्यांनी केवळ लोकप्रिय घोषणा न करता काहीतरी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे.

 अशा वेळी डॉ. प्रमोद यांच्या प्रयत्नांचा व समर्पणाचा आदर्श केवळ सरकारनेच नाही तर सर्वांनीच घेण्यासारखा आहे. कारण इतर लोक केवळ समाज माध्यमांवर माळढोक व इतर प्रजातींना वाचविण्यात सरकार कसं अपयशी ठरतंय याविषयी टीका करतात व आपलं काम संपलं आहे असं त्यांना वाटतं! जेव्हा आपल्याला काहीतरी करायची वेळ येते तेव्हा आपल्याकडे कारणं ठरलेली असतात, आपल्याला आपली नोकरी असते, आपला व्यवसाय असतो, मग एक नेहमीचा प्रश्न विचारला जातो की सरकार काय करतंय? डॉ. पाटलांनी मात्र वैद्यकीय क्षेत्रात असूनही स्वतःहून ही जबाबदारी घेतली आहे व पैसे कमावण्याचा मागे न लागता त्यांच्या अभ्यासाचा भाग नसलेल्या पक्ष्यांना वाचविण्यासाठी स्वतःचा वेळ देत आहेत. आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन काहीतरी करायला सुरुवात करू शकतो, आणि खरंतर आपल्याला खूप काही करण्यासारखं आहे. तुम्ही डॉ. पाटलांसारख्या माळढोक पक्ष्याचे संवर्धन करणाऱ्या माणसांना आर्थिक मदत देऊ शकता, तुम्ही माळढोक अभयारण्यांना भेट देऊ शकता व तिथे काम करणाऱ्या वन कर्मचारी किंवा गावकऱ्यांसारख्या माणसांना मदत करू शकता, तुम्ही समाजमाध्यमांवर लेख लिहून सरकारला किंवा तुमच्या ओळखीच्या प्रत्येक व्यक्तिला माळढोक जगावेत व त्यांचं निवासस्थान टिकून राहावं यासाठी त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देऊ शकता, अशा कितीतरी गोष्टी आहेत! भारताची लोकसंख्या एकशेवीस कोटींहून अधिक आहे, विचार करा डॉ. प्रमोद यांच्याप्रमाणे आपल्यापैकी प्रत्येकाने आजूबाजूच्या केवळ एका प्रजातीचे संवर्धन करायचे ठरवले व त्यासाठी प्रयत्न केले तर काय होईल! हा विचार म्हणजे दिवास्वप्न आहे असं तुम्ही म्हणाल, मात्र आपण अशी स्वप्न पाहिली नाहीत व माळढोक जगावेत यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले नाहीत तर बिचारे माळढोक ही अस्तित्वाची लढाई हरतील व नामशेष होतील. अशाप्रकारे एक एक प्रजाती नष्ट होत राहिल्या तर पृथ्वीवर फक्त काँक्रिटच्या जंगलांमध्ये राहणारी मानवी शरीरंच उरतील, मग आपल्याला कोण    वाचवेल?


संजय देशपांडे


संजीवनी डेव्हलपर्स




Sunday 21 August 2016

ऑलिम्पिकस,पदक आणि खूप काही !






















मी खाली पडलो तेव्हा, मला असं वाटलं, ओह. क्षणभर, माझी  स्पर्धा संपली होती, माझं स्वप्न संपलं होतं; मात्र मी निकरानं प्रयत्न करू लागलो. मी माझी मोठी मुलगी ऱ्हिआना हिला वचन दिलं होतं, की मी तिला पदक आणून देईन. माझ्या मनात विचार येत होते, नाही, मी तिला नाराज करू शकत नाही... मो फराह.

खरं सांगायचं तर मी इथे (रिओ) फक्त सुवर्ण पदक जिंकण्यासाठीच आलो होतो! आमचा देश पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला आहे व पहिल्या प्रयत्नातच आम्हाला सुवर्ण पदक मिळाले आहे व मला खूप छान वाटतंय; आमचा देश लहान व गरीब असेल मात्र तुमचा निर्धार ठाम असेल तर तुम्ही महाभयंकर युद्धानंतरही या क्रीडामहाकुंभामध्ये सहभागी होऊ शकता व पदकही जिंकू शकता”... मजिंदा केलमेंडी.
मो फराह या ब्रिटीश धावपटूने ऑलिम्पिकमध्ये १०,००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावल्यानंतर त्याच्या भावना व्यक्त केल्या. रिओ ऑलिम्पिकमध्ये धावपट्टीवर धावत असताना तो मध्येच  घसरून पडला त्यानंतरही त्याने परत  उभं राहत मोठा रोमहर्षक विजय मिळवला. अशाच भावना ज्युदोमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या कोसोव्होच्या मजिंदाने व्यक्त केल्या. या शब्दांमधून कोणत्याही खेळाडूसाठी या क्रीडामहामेळ्यात पदक जिंकण्याचं काय महत्वं आहे हे समजतं! मी जेव्हा हा ब्लॉग लिहायला सुरुवात केली, तेव्हा भारताने दोन पदके जिंकली होती व ती दोन्ही महिलांनी जिंकली होती. या दोन्ही महिलांनी आपापल्या परीने इतिहास रचला, साक्षी मलिक ही भारताला कुस्तीसाठी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणारी पहिली महिला ठरली व त्याच दिवशी सिंधूनं रौप्य पदक नक्की केलं व देशाला रौप्य पदक मिळवून देणारी पहिली महिला ठरली! या बॅडमिंटनपटूला रौप्यवर समाधान मानावं लागलं असलं तरी तिनं जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या खेळाडूला अखेरपर्यंत कडवी झुंज दिली, मात्र शेवटी ती सुवर्णपदकासाठीची लढत हरली! ती ज्या निकरानं लढली त्यानं सगळ्यांची मान अभिमानानं ताठ झाली, आकडेवारीनं सामन्याचा निकाल लागतो मात्र आपण घरी ज्या आठवणी घेऊन जातो त्यातून खरा विजेता ठरत असतो. माझ्यासारख्या १२० कोटी भारतीयांसाठी विशेषतः जे बॅडमिंटनचे केवळ चाहते नाहीत तर स्वतः खेळतात, ते सिंधू ज्याप्रकारे रिओमध्ये अंतिम सामन्यात खेळली त्याबद्दल नेहमी  तीचे ऋणी राहतील!
ऑलिम्पिक ही कोणत्याही प्रकारच्या खेळासाठी सर्वात महत्वाची क्रीडास्पर्धा आहे, मग मैदानी खेळ असोत किंवा पोहणे, अनेक खेळांविषयी आपल्याला केवळ ऑलिम्पिकमध्येच समजतं. प्रत्येक ऑलिम्पिकला विवादांचीही परंपरा आहे, मग क्रीडानगरीमधल्या सोयीसुविधा असोत किंवा यजमान देशावर आर्थिक परिणाम असोत किंवा सहभागी खेळाडुंचे डोपिंग घोटाळे असोत. हे सगळं असलं तरीही खेळाडुंच्या मनात, तसंच खेळाशी संबंधित प्रशिक्षक, भौतिक चिकित्सक, सहाय्यक कर्मचारी, स्वयंसेवक व जगभरातील चाहत्यांच्या मनात एका गोष्टीबद्दल अत्यंत आदर असतो, सगळ्यांना केवळ एकच ध्यास असतो, ते म्हणजे ऑलिम्पिक पदक! ग्रीकमध्येसायटियस, अल्टीयस, फोर्टियसम्हणजे, अधिक वेगाने, अधिक उत्तुंग अधिक सशक्त हे या स्पर्धेचं ब्रीदवाक्य आहे. या ब्रीदवाक्यामुळे आपल्याला प्रत्येकवेळी केवळ प्रतिस्पर्ध्यांहूनच नाही तर स्वतःहूनही अधिक चांगली कामगिरी करायची आहे याची जाणीव होते!
या विवादांमध्ये आपल्या देशाच्या बाबतीत आणखी एक गोष्ट नेहमी होते ती म्हणजे, आपल्या चमूच्या अपयशाबाबत टीका! यावेळीही तसंच झालं कारण पहिले अकरा दिवस कोणतंही पदक मिळालं नाही व नेमबाज बिंद्रा व जिमनॅस्ट दीपा यांच्याशिवाय कुणाची फारशी चांगली कामगिरी झाली नाही. परिणामी, आपल्याकडे पेज३ तज्ञांपासून ते सामान्यांपर्यंत प्रत्येकाने आपल्या खेळाडूंच्या पदक जिंकण्याच्या क्षमतेबाबत, अगदी रिओमध्ये जाण्याच्या त्यांच्या हेतूबाबतच शंका घ्यायला सुरुवात केली! अर्थात आपल्या खेळाडुंचे समर्थकही होते ज्यांनी श्रीमती पेज३ना खरमरित उत्तर दिलं. मात्र आपल्या खेळाडुंना झालंय तरी काय असं बऱ्याच जणांना वाटत होतं; कारण शंभराहून जास्त खेळाडू असलेल्या आपल्या पथकातून आपल्याला तोपर्यंत एकही पदक मिळालं नव्हतं? आता दोन मुलींनी पदक मिळविल्यामुळे टीकाकारांची तोंडं बंद झाली असली तरीही तेवढं पुरेसं आहे का हे सुद्धा तितकंच खरं आहे. आपल्या देशामध्ये यशाचं कुणीही विश्लेषण करत नाही, मात्र अपयशावर टीका करायला हजारो जण असतात हे दुर्दैवी तथ्य आहे. तसंच विजयामध्ये मुलगा किंवा मुलगी असा फरक का असावा असा प्रश्न आहे मात्र आपल्या देशामध्ये जिथे मुलगी वाचवा असा संदेश द्यावा लागतो तिथे असं होणं स्वाभाविक आहे! आता खरी गरज आहे ती साक्षी व सिंधू यांच्या यशाचं विश्लेषण करून त्यांच्यासारखे आणखी खेळाडू घडवण्याची. आपण क्रिकेट वगळता इतर खेळांचा इतिहास पाहिल्यास आपण कधीच आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्यपूर्ण कामगिरी केलेली नाही व ही चिंतेची बाब आहे. सिंधू व सायना जागतिक पातळीवर सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत त्यांच्यापुढे काय? आपल्याकडे बॉक्सिंगमध्ये मेरी कोम आहे मात्र नंतर कोण? ब्रिंदाला नेमबाजीत सुवर्णपदक मिळालं होतं मात्र त्या क्षमतेचा आणखी कोण आहे? मी केवळ ऑलिम्पिकविषयीच बोलत नाही तर जागतिक पातळीवरील यशाचं प्रमाण काय आहे याचा विचार करतोय, जेथे वैयक्तिक कामगिरी विचारात घेतली जाते. वर्षानुवर्षे अशा स्पर्धांमध्ये इथिओपिया किंवा केनिया किंवा जमैकासारख्या लहान देशांमधून अनेक खेळाडू चमकदार कामगिरी करतात, आपण मात्र थोडक्यावरच समाधान मानतो! मी काही अमेरिका, जर्मनी, इंग्लंड किंवा रशिया यासारख्या विकसित देशांशी तुलना करत नाही. अगदी चीननेही जागतिक पातळीवरील स्पर्धांमध्ये उशीरा प्रवेश करून चमकदार कामगिरी केली आहे, आपणही मग केवळ एखाद्याच सिंधू किंवा सानिया किंवा सुशीलकुमारवर का समाधानी राहायचं, ते सुद्धा केवळ एका स्पर्धेपुरतेच चमकतात!
क्रिकेट दुर्दैवाने ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट नाही मात्र आपली आणखी एका खेळावर मक्तेदारी होती तो म्हणजे हॉकी. आपल्याला या खेळात एकेकाळी सलग सात किंवा आठ सुवर्ण पदके मिळाली आहेत, अनेक वर्षं आपला या खेळात आपलं वर्चस्व होतं मात्र ते सुद्धा आता आपण पाश्चिमात्य देशांना देऊन टाकलंय, जे या खेळाची बाराखडी आपल्याकडूनच शिकलेत्यानंतर आपल्या अलिकडे कुस्तीत पदकं मिळू लागली होती मात्र निवडीवरून झालेला वादंग व त्यानंतर डोपिंगचा घोटाळा यामुळे तेही निसटलं. कुस्तीमध्ये आपल्याला नरसिंग यादवकडून मोठ्या अपेक्षा होत्या मात्र त्याच्यावर चार वर्षांचे निर्बंध लागल्याने त्याची कारकीर्द संपल्यात जमा आहे. त्याचसोबत डोपिंग प्रतिबंधक प्राधिकरणानं भारतातील संपूर्ण यंत्रणेविषयीच गंभीर प्रश्न उपस्थित केले, की जेथे खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाते तिथे कोणीही कसे प्रवेश करू शकते व प्रतिबंधित औषधे खेळाडूंच्या अन्नात घालू शकते! नाडा या आपल्या राष्ट्रीय डोपिंग प्रतिबंधक प्राधिकरणाने अशाप्रकारचा दावा केला होता त्यामुळे आपल्या क्रीडा व्यवस्थेतील त्रुटीच उघड झाल्या! त्यानंतर गोपीचंद यांनी सिंधूची तयारी कशी करून घेतली व तिला पदक कसं मिळालं हे सगळ्यांना समजलं हे अतिशय चांगलं झालं, कारण ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्यासाठी किती प्रयत्न व किती तयारी करावी लागते याची दखल सगळ्यांनी घेतली! आपण १२व्या दिवशी मिळालेल्या दोन पदकांचा उत्सव साजरा करतोय मात्र आपण पाठवलेल्या खेळाडुंच्या तुलनेत आपल्याला मिळालेल्या यशाचा अनुपात पाहिल्यास तो जेमतेम २% आहे असंच म्हणावं लागेल! यातली वाईट बाब म्हणजे ही कामगिरी गेल्या ऑलिम्पिकपेक्षाही वाईट आहे ज्यात आपल्याला सात पदकं मिळाली होती! म्हणजे हा उतरता आलेख आहे ज्याचा आपण गांभीर्यानं अभ्यास केला पाहिजे. म्हणूनच आंतराराष्ट्रीय पातळीवरील खेळांमधला आपला सातत्याचा अभाव मला ठळकपणे नमूद करावसा वाटतो! अमेरिका किंवा जमैका किंवा आपला शेजारी चीन यांच्यातला आणि आपल्याला एक फरक आपल्याला मिटवावा लागेल, तो म्हणजे या देशांमध्ये खेळाडुंची पुढची फळी लगेच तयार होत असते. एक लीन डॅन सुवर्णपदक पटकावत असताना चेन लाँग पुढील वर्षी सुवर्ण मिळविण्यासाठी तयार होत असतो व त्यानंतर आणखी कुणीतरी कनिष्ट पातळीवरील खेळाडू ऑलिम्पिकसाठी तयारी करत असतो, अशी यंत्रणा तिथे विकसित करण्यात आली आहे. या तुलनेत आपल्याकडे एका खाशाबा जाधवांना कुस्तीमध्ये कांस्य पदक मिळालं, त्यानंतर जवळपास तीस वर्षांनी आणखी वैयक्तिक पदक मिळालं. आपल्याकडे एक पीटी उषा ऍथलेटिक्समध्ये अंतिम फेरीत पोहोचली मात्र ललिता बाबरच्या रुपानं ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आपल्याला आणखी वीस वर्षं लागली! मला असं वाटतं ऑलिम्पिक पदक मिळविण्यासाठी आपण आपल्या यंत्रणेतील या त्रुटी दूर केल्या पाहिजेत. मी कुणाही खेळाडूच्या प्रयत्नांवर शंका घेत नाही जो या स्पर्धेसाठी पात्र ठरला, मात्र ऑलिम्पिक खेळातील ताण व दर्जा यासमोर टिकून राहणारे खेळाडू घडविण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेवर बोट ठेवतोय! जनुकीयदृष्ट्या विचार केला तर आपण वेस्टइंडियन किंवा जर्मन लोकांसारखे बळकट नाही, त्यामुळे त्यांना लढत द्यायची असेल तर आपण स्वतःला सशक्त केलं पाहिजे, हेच पहिलं आव्हान आहे!
यासाठी आपण आपल्या देशातली सामाजिक परिस्थिती कशी आहे याचा विचार केला पाहिजे, आपण आपल्या कुटुंबापासून किंवा पालकांपासून सुरुवात करू. मुलातील खेळाडू लहानपणीच ओळखणे व त्याला किंवा तिला उत्तम खेळाडू होण्याची संधी उपलब्ध करून देणे ही पालकांची जबाबदारी आहे! याबाबतीत विचार केला तर किती पालकांना त्यांच्या मुलाला किंवा मुलीला क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळाचा खेळाडू म्हणून कारकीर्द घडवू देणं परवडू शकतं? ज्यांना परवडू शकतं त्यातले किती पालक त्यांच्या मुलांना अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा एमबीए किंवा सरकारी सेवा यासारखे चाकोरीबद्ध मार्ग सोडून खेळात कारकिर्द करू देतात? आपल्याकडे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे फारसे खेळाडू तयार न होण्यामागचं कारण हेच आहे, कारण आपल्या मुलांसाठी खेळ हे करिअर असू शकतं असा आपल्याला विश्वासच नसतो! तळमळ, गुणवत्ता व या सर्व गोष्टी मान्य आहेत मात्र उत्तम पगार, आयुष्यात स्थिरस्थावर होणं यापुढे या सर्वांना मूठमाती दिली जाते कारण खेळात हे सगळं मिळेलच याची खात्री नसते! उदाहरणार्थ दत्तू भोकनाळ किंवा गिता फोगुत किंवा ललिता बाबर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यापूर्वी त्यांची नावं कुणाला माहिती होती का व या स्पर्धांमधून कोणत्याही पदकांशिवाय आल्यानंतर त्यांची काय स्थिती असेल याची कुणी शाश्वती देऊ शकतं का? ज्यांनी पदक जिंकलं आहे त्यांचं सरकार कौतुक करेल, त्यांना पैसे व नोकरी देईल मान्य आहे मात्र त्यानंतर काय?
खेळाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला तरूण मुलगा किंवा मुलगी ऑलिम्पिकमधल्या पदाची आशा कशी करणार? मुलं नऊ ते दहा वर्षांची असतानाच आपण त्यांच्यातली गुणवत्ता ओळखून त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे म्हणजे आपण त्यांच्याकडून अठरा वर्षं किंवा त्यापुढे सुवर्ण पदकाची आशा करू शकतो. वाहन उद्योगामध्ये ज्याप्रमाणे उत्पादन साळखी असते तसं हे खेळाडूंचं उत्पादन सातत्यानं सुरु राहिलं पाहिजे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय महाविद्यालयांसारख्या आपण क्रीडा अकादमी उभारल्या पाहिजेत व तिच्यातून दर्जेदार खेळाडू तयार होतील याची खात्री केली पाहिजे व त्यांना उज्जल भवितव्याचा भरवसा दिला पाहिजे! या संस्थांमधून चांगल्या खेळाडूंना शिष्यवृत्ती दिल्या जाव्यात तसंच तरुण खेळाडू विद्यार्थ्यांना काही दुखापत झाली तर विमा संरक्षणासारख्या सुविधाही दिल्या जाव्यात. खेळांच्या प्रशिक्षणासोबतच, क्रीडा संस्थांनी खेळाडूंना अंमली पदार्थांपासून लांब राहण्यासाठी व अतिशय तंदुरुस्त राहण्यासाठी प्रशिक्षित केलं पाहिजे; कारण आधुनिक युगातील खेळाडुंचे इजा व डोपिंग सर्वात वाईट शत्रू आहेत! युसेन बोल्टला सलग तीन ऑलिम्पिकमध्ये तीन स्पर्धांमध्ये नऊ सुवर्ण पदकं मिळाली म्हणून नाही तर त्यासाठी तो पंधरा वर्षं अंमली पदार्थांपासून दूर व अतिशय तंदुरुस्त राहू शकला म्हणून तो अतिशय महान आहे! आपल्याकडे सर्वोत्तम तंत्रज्ञ बनविण्यासाठी आयआयटी आहेत, सर्वोत्तम व्यवस्थापक घडविण्यासाठी आयआयएम आहेत, सर्वोत्तम डॉक्टर घडविण्यासाठी एम्स आहेत, याचप्रकारे स्थापत्यशास्त्र, विज्ञान, वाणिज्य अशा सर्व विषयांमध्ये विद्यार्थी घडविणाऱ्या उत्तमोत्तम संस्था आहेत, मात्र दर्जेदार खेळाडू घडविणाऱ्या संस्था कुठे आहेत व असतील तर नेमकं काय चुकतंय व त्यांच्या कामगिरीचं विश्लेषण कोण करणार? समाजाचा तसंच खेळाडूंचा दृष्टिकोनही तसाच आहे त्यांचे स्वतःचे खिसे भरले आहेत (अर्थात यामध्ये क्रिकेटपटूंशिवाय इतरांची संख्या कमी आहे), मात्र ज्याप्रमाणे आयआयटीमधल्या माजी विद्यार्थ्यांची संघटना आपल्या महाविद्यालयासाठी मोठं योगदान देते तसं या खेळाडूंचं काय योगदान आहे? ज्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी केली आहे असे कितीजण राज्यपातळीवरील तरुण खेळाडूंना नियमितपणे वेळ देतात, मार्गदर्शन करतात त्यांना खेळाविषयीची आपली तळमळ सांगतात? सर्वात महत्वाचं म्हणजे, समाज म्हणून एकत्रितपणे आपण आपल्या देशात खेळासाठी काय करत आहोत? किती कॉर्पोरेट संस्थांनी क्रिकेटव्यतिरिक्त फारशा प्रसिद्ध नसलेल्या खेळाडूंना प्रायोजित केलं आहे? आपण व्यवसाय करतो त्यामुळे स्पर्धा जिंकू शकेल अशाच घोड्यावर आपण पैसे लावतो मात्र इतर घोड्यांना गाढव म्हणायचा आपल्याला काय अधिकार आहे? त्याचवेळी प्रत्येक खेळात आयपीएलसारख्या स्पर्धा आवश्यक आहेत ज्यामुळे प्रत्येक खेळाडूला खेळायची संधी मिळेल तसेच पैसेही मिळतील. त्याचप्रमाणे चांगले प्रशिक्षक घडविणाऱ्या संस्थाही अतिशय आवश्यक आहेत, कारण चांगले खेळाडू घडविण्यासाठी आपल्याला उत्तम दर्जाचे प्रशिक्षक आवश्यक आहेत!
समाज माध्यमांमध्ये सध्या खेळाडू व त्यांच्या कामगिरीविषयीच्या सकारात्मक व नकारात्मक टीका-टिप्पण्यांना पूर आलाय, मात्र कुणी प्रत्यक्ष जीवनात स्वतःहून खेळासाठी किंवा खेळाडूंसाठी काही करायचा प्रयत्न केला आहे का? आपल्या देशाच्या ऑलिम्पिकमधल्या कामगिरीविषयी बोलायचा आपल्याला काय अधिकार आहे? मला असे वाटते रिओ ऑलिम्पिकमुळे अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. आपले माननीय पंतप्रधान आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचा ठसा उमटवण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत व त्यासाठी खेळाचा अतिशय उत्तमप्रकारे वापर करण्याचा ते सर्वतोपरी प्रयत्न करतील अशी आशा करू. त्यांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की मन की बात मधून ऑलिम्पिक पदकाची आशा करता येईल, मात्र ते प्रत्यक्ष जिंकण्यासाठी केवळ इच्छा, तळमळ व गुणवत्ता असून भागणार नाही. आपल्याकडे सुसंघटित पायाभूत सुविधा व प्रतिभावान खेळाडूंना पाठिंबा देणाऱ्या यंत्रणेची कमतरता आहे. आता, मला व्यक्तिशः ऑलिम्पिकमधून काय मिळालं? मला खेळाचा प्रत्येक क्षण अनुभवताना अतिशय मजा आली. मला अतिशय तंदुरुस्त राहण्याची व मी माझ्या कामामध्ये तसंच माझ्या परिसरासाठी सध्या जे करतोय त्यापेक्षा अधिक काहीतरी चांगलं करायची प्रेरणा मिळाली. आणखी एक गोष्ट, मी कोणत्या तरी खेळाला माझ्या परीने शक्य ती सर्व मदत करेन व आपल्या देशाला केवळ ऑलिम्पिकमध्येच नाही तर प्रत्येक स्पर्धेत पदक मिळाले यासाठी योगदान देईन; ऑलिम्पिकमधून मी हाच धडा घेतला. आपल्यापैकी प्रत्येकानं असाच निर्धार केला तर आपल्याला सायटीयस, अल्टीयस व फोर्टीयसचामतितार्थ कळला असं म्हणता येईल!

संजय देशपांडे


Mobile:09822037109




Wednesday 10 August 2016

मैत्री दिवस आणि नागपंचमी !






















तुम्ही काय साजरं करता, यावरून तुम्ही ज्या समाजात राहता तो कसा आहे ठरतं!”… अरिस्टॉटल.

या महान तत्ववेत्त्याची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही, ज्याने अतिशय साध्या सोप्या शब्दातून जीवनाचे तत्वज्ञान मांडले आहे. पुण्यातल्या एका आघाडीच्या दैनिकात अलिकडेच आलेल्या एक बातमीने मला सणांविषयीचे हे वरील विधान आठवले. ज्यांना हिंदू संस्कृतीबद्दल थोडीफार माहिती आहे ते श्रावण महिन्याचे महत्व जाणतात. या महिन्यापासून सणवार व व्रतवैकल्यांना सुरुवात होते. या महिन्यात अनेक लोक शंकराचा म्हणून सोमवार, सूर्याचा म्हणून रविवार असे उपवास करतात. श्रावणची सुरुवात होते ती नागपंचमी या विशेष सणापासून, श्रावणाच्या या पाचव्या दिवशी गावताल्या सगळ्या बायका नागोबाची पूजा करतात. या दिवशी बायका हातावर मेहंदी काढतात, नवीन कपडे घालतात, वेगवेगळे खेळ खेळतात व नागोबाच्या आरत्या म्हणतात. एक लहान मुलगी हे सगळं पाहून विचारते की काय चाललं आहे? हे ऐकून आई उत्तर देते की आज नागपंचमी आहे म्हणून मी मेहंदी लावली आहे. मुलगी विचारते नागपंचमी म्हणजे काय? आता आईनं तिला समजून सांगायला हवं होतं मात्र या गुगलच्या जमान्यात कुणी कुणाला समजावून सांगायच्या फंदात पडत नाही, म्हणून आईनं मुलीला उत्तर दिलं की आज नागोबाचा वाढदिवस आहे म्हणून आपण तो साजरा करतोय. त्या लहान मुलीला अतिशय आनंद झाला व ती म्हणाली चल मग आपण नागोबासाठी केक आणू! त्या दैनिकाच्या शहरातल्या किरकोळ घटनांची नोंद घेणाऱ्या स्तंभात हा लेख प्रसिद्ध झाला होता. तो वाचून अनेकांना त्या लहान मुलीच्या भाबडेपणाची गंमत वाटून नंतर त्यांनी त्या विषयाचा विचार सोडून दिला असेल. मी सुद्धा तेच केलं असतं मात्र नागपंचमीच्याच दिवशी अख्खं जग दुसरंच काहीतरी साजरं करत होतं ज्याचा नागपंचमीशी काहीच संबंध नव्हता ते म्हणजे फेंडशिप डे!

एफबी, वॉट्स-अॅप, चॅट-ऑन, इन्स्टाग्राम तसंच ट्विटर असताना, आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देणं, त्यांच्यासोबत छायाचित्रं काढणं अगदी सोपं झालंय. त्यामुळे त्यादिवशी ही सगळी समाज माध्यमं छायाचित्रं, मैत्रीचे संदेश यांनी ओसंडून वाहात होती. मात्र त्याच दिवशी नागपंचमी असल्याचं कुणाच्या गावीही नव्हतं. मी किशोरवयीन मुलांना दोष देत नाही कारण शहरी जीवनात त्यांना साधं गांडुळही दिसणं दुरापास्त झालं आहे त्यामुळे नागोबाचं दर्शन होणं दुर्मिळच. मात्र चाळीशीत असलेल्या तसंच लहान खेड्यांमधून किंवा गावांमधून आलेल्या माझ्या पिढीला नागपंचमीसारखे सण अगदी लख्ख आठवतात! त्यानंतर मी फेसबुक वर आज नागपंचमी असल्याचा संदेश दिला व नागांविषयी थोडी माहिती लिहीली त्यामुळे त्यादिवशी नागपंचमी असल्याची अनेकांना जाणीव झाली! हा प्रामुख्याने शेतकऱ्यांचा सण आहे ज्याचा नाग सर्वात जवळचा मित्र असतो. आपल्या देशात जिथे जवळपास पन्नास हजार लोक सर्पदंशामुळे मरण पावतात तिथे साप माणसाचा मित्र कसा असू शकतो असे बरेच जण विचारतात! अनेक लोक सर्पदंशामुळे मरण पावतात व इतर अनेक जणांना त्याचा त्रास होतो हे खरं असलं तरीही साप उंदरांना खातात व पिकांचे रक्षण करतात. उंदरांनी धान्य खाल्ल्यामुळे किती नुकसान होतं हे तुम्ही फक्त गुगल करा म्हणजे तुम्हाला उंदीरच मानवजातीचा सर्वात मोठा शत्रू आहे याची जाणीव होईल, उंदरामुळे पसरणारे साथीचे रोग हा तर एक स्वतंत्र विषय आहे.  उंदरांमुळे आपल्याला सर्पदंशासारखा थेट काही धोका नसल्यामुळे त्यांना खाऊन साप आपलं कसं रक्षण करतात याची आपल्याला जाणीव होत नाही. मात्र आपल्या पूर्वजांना याची जाणीव झाली होती, म्हणूनच त्यांनी त्याचे आभार मानण्यासाठी नागपंचमी सण साजरा करायला सुरुवात केली. आता तुम्हाला समाज म्हणून नागपंचमीचं काय महत्व आहे व आपल्या पूर्वजांच्या शहाणपणाची तसंच त्यांचं निसर्गाशी जे नातं होतं त्याची जाणीव झाली असेल!

नागपंचमीच्या या पैलुबद्दल विचार करताना मी इतर सणांचा विचार करू लागलो ज्यामध्ये आपण निसर्गाचे आभार मानतो, त्यातल्या विविध घटकांचा उत्सव साजरा करतो. मला आश्चर्य वाटलं की आपल्या भारतातला प्रत्येक महत्वाचा सण वा उत्सव कोणत्या ना कोणत्या प्राण्याशी, झाडाशी, पाण्याशी किंवा अग्निशी संबंधित आहे, म्हणजेच निसर्ग देवतेशी संबंधित आहे. आजकाल पर्यावरण संवर्धन, ग्लोबल वॉर्मिंग यासारख्या गोष्टींनी जागतिक महायुद्धापेक्षाही गंभीर स्वरूप धारण केलं आहे, अशा युगात आपल्या अशा सणांना खरंतरं विशेष महत्व आहे! बैल पोळा हे अशाच सणाचे एक उदाहरण आहे, या बैलाचा शेअर बाजाराल्या बुलशी, केवळ बाँबे स्टॉक इक्स्चेंज बाहेरचा बैलाचा पुतळा सोडला तर काहीही संबंध नाही. या दिवशी शेतकरी त्यांच्या बैलांची विशेष काळजी घेतात व त्यांना रंगीबेरंगी झूल पांघरतात, त्यांच्यासाठी गोडधोड करतात. एरवी शेतात प्रचंड मेहनत करणाऱ्या बैलाला पोळ्याच्या दिवशी कामाला जुंपलं जात नाही, प्रत्येक शेतकरी आपली बैलजोडी अख्ख्या गावातून वाजत गाजत मिरवतो. संध्याकाळी जेव्हा ते घरी परतात तेव्हा शेतकऱ्याची बायको त्यांचं औक्षण करते व त्यांचं जेवण झाल्यानंतरच संपूर्ण घरदार जेवतंहे सगळं लिहीताना सगळ्या जुन्या आठवणी आश्रूंच्या रुपात डोळ्यातून ओसंडल्या. हे दृश्य आता फक्त स्मृतींमध्येच राहीलं आहे, मी खरोखरच अतिशय सुदैवी आहे की आपल्या बैलाशी असलेलं नातं, प्रेमाचे बंध साजरा करणारा सण मला अनुभवता आला. या बाबतीत तरुण पिढी खरंच दुर्दैवी म्हणावी लागेल कारण ते कुठल्या   आनंदाला मुकले आहेत हेच त्यांना माहिती नाही!

अशाच सणाचं आणखी एक उत्तम उदाहरण म्हणजे वट सावित्री (वट म्हणजे वडाचं झाड), या दिवशी बायका वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात व पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात; निसर्गाप्रती आदर व्यक्त करणारा हा किती छान सण आहे! वडाचं झाड हे निसर्गचक्रातलं सर्वात महत्वाचं झाड आहे, त्याचं आयुष्य सर्वाधिक असतं, त्याचा विस्तार मोठा असतो, पक्षांपासून ते किटकांपर्यंत अनेक प्रजाती या झाडावर जगत असतात. आपल्या शीतल छायेनं ते सगळ्यांची काळजी घेतं, एक बहारदार वटवृक्षाकडे पाहिलं तरीही जीव सुखावतो. म्हणूनच मानवी जीवनात या झाडाला अनन्यसाधारण महत्व आहे! वट सावित्री सणाचा संबंध फक्त वडाच्या झाडाशी असला तरीही माणसाच्या आयुष्यात झाडांची भूमिका अतिशय महत्वाची असल्यामुळे त्यांचे एकप्रकारे प्रतिकात्मक आभार मानण्याची ही पद्धत आहे. जेव्हा एखादी बाई नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते तेव्हा त्याचा अर्थ त्याचं आयुष्य वडाच्या झाडासारखं मोठं असावं, त्याच्याकडून सर्वांच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा असते! वडाच्या झाडासारखं आयुष्य मिळावं यापेक्षा आणखी कोणती चांगली मनोकामना तुम्ही तुमच्या जीवन साथीदारासाठी करू शकता? यातून आपल्या पूर्वजांनी झाडांचं आपल्या आयुष्यातलं महत्व किती चांगल्याप्रकारे जाणलं होतं व त्याच्या संवर्धनाचे वेगवेगळे उपाय कसे केले होते हे सुद्धा समजतं; ज्या झाडाला तुमची बायको तुमच्या दीर्घायुष्यासाठी साकडं घालते तेच तुम्ही कसं कापाल!

मी जेवढा या पैलुचा जास्त विचार करू लागलो तेवढं हिंदू परंपरेतील आपल्या सणवारांचं निसर्गाच्या प्रत्येक घटकाशी किती घट्ट नातं आहे हे जाणवत गेलं. आपल्या देवी, देवतांचीही प्रतिकात्मक वाहनं प्राणी असतात किंवा ते त्यावर आरूढ झालेले असतात म्हणजेच शिवाचा नंदी, विष्णू शेषनागाखाली विश्रांती घेत असतात, माँ शेरावाली म्हणजेच दुर्गेचं वाहन वाघ आहे, आता तिच्याच वाहनाला कोण मारणार! शेवटचे म्हणजे दत्त गुरुंच्या भोवती कुत्री दिसतात. कुत्रा आपल्याला जीवनाचा एक अविभाज्य घटक असून तो आपला सर्वोत्तम मित्र व रक्षक आहे. महाराष्ट्रातल्या बैल पोळ्याप्रमाणे दक्षिणेत हत्तींशी संबंधित सण असतात, ज्यामध्ये हत्तींना सजवलं जातं व लोक दिवसभर त्यांची पूजा अर्चना करतात. त्यानंतर आपण होळी या सणाला कसे विसरू शकतो, प्रामुख्याने देशाच्या उत्तर भागात हा सण मोठा साजरा करतात व हा रंगांचा उत्सव आहे; हे रंग आपल्याला निसर्गाच्या सौंदर्याची जाणीव करून देतात. होळी हा अग्निचाही सण आहे, ज्यामध्ये आपण आपल्यातले सर्व दुर्गुण जाळून टाकतो. आपला सगळ्यात महत्वाचा सण म्हणजे दिवाळी, हा दिव्यांचा उत्सव आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस, त्यादिवशी आपण गायींची पूजा करतो. ज्या देशात कृषीवर आधारित अर्थ व्यवस्था आहे, त्यात गाई जीवनरेखेसारख्या आहेत व त्यांचे आभार मानण्यासाठी देशाच्या सर्वात महत्वाच्या सणाच्या पहिल्या दिवशी त्यांची पूजा करण्यापेक्षा आणखी चांगली पद्धत कोणती असू शकते!

मी या सणांविषयी जेवढा अधिक विचार करतो तेवढा माझा आपल्या पूर्वजांविषयीचा आदर दुणावतो. त्यांना निसर्गाचं, त्यातल्या प्रत्येक घटकाचं महत्वं समजलं होतं. म्हणूनच त्यांनी या घटकांचा उत्सव साजरा करायला सुरुवात केली. यामुळे एकप्रकारे या घटकांचं संवर्धनच होत गेलं, मग नद्या असोत किंवा समुद्र, अग्नि, झाडे किंवा वाघ! एवढंच नाही तर आपल्याकडे रक्षाबंधनासारखा सणही आहे जो बहीण-भावातलं प्रेम जपतो तसंच दिवाळी पाडवा पती-पत्नितले बंध आणखी घट्ट करतो! हिंदू परंपरेत गुरु-शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्व आहे, गुरु तुमच्या जीवनाला अर्थ देतो, ते परिपूर्ण करतो म्हणूनच गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आपण गुरुला वंदन करतो. ही परंपरा प्रत्येक स्वरुपातील गुरुचं किती महत्व आहे हेच अधोरेखित करते!

आपल्या या सणांच्या पार्श्वभूमीवर, पाश्चिमात्य संस्कृतीकडूनही आपल्याकडे फ्रेंडशिप डे, टीचर्स डे, मदर्स डे, फादर्स डे यासारखे अनेक उत्सव आले आहेत! ज्या नात्यांची मूल्ये आपण विसरलो आहोत त्यांची आठवण राहावी म्हणून हे दिवस साजरे करतात व आपणही त्यांचं अंधानुकरण करतो. त्याशिवाय आता जगभरात पर्यावरण दिवस किंवा अर्थ डे साजरा केला जातो, याद्वारे निसर्गाचं संवर्धन करायच्या आपल्या जबाबदारीची जाणीव आपल्याला होणं अपेक्षित आहे. मात्र आपण जर आपले नागपंचमी किंवा वट सावित्री यासारखे पारंपरिक सण त्यामागची भावना लक्षात घेऊन साजरे केले असते, तर आपल्याला कोणताही पर्यावरण दिवस साजरा करायची गरजच पडली नसती! हे सर्व दिवस साजरे करण्यात वाईट काहीच नाही, मात्र आपल्याला जो समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे त्यात दर महिन्याला असा किमान असा एक तरी सण आहे जो आपल्याला निसर्गाशी जोडतो. आपण केवळ त्या संस्कृतीचा आदर केला पाहिजे तरच आपला देश जगण्यासाठी एक चांगलं ठिकाण होईल; नाहीतर आपले सगळे सण समारंभ इतिहासाच्या पुस्तकात उरतील. आपण फक्त फादर्स डे किंवा मदर्स डेला, आपल्या मुलांच्या वॉट्स- अॅवरच्या शुभेच्छांची वाट पाहात राहू. रिस्टॉटलनी म्हटल्याप्रमाणे त्यासाठी आपणच जबाबदार असू कारण आपले सणही तसेच असतील


संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स




Thursday 4 August 2016

माननीय मुख्यमंत्री महोदय, बांधकाम व्यवसाय या राज्यात गुन्हा आहे का ?



















माननीय मुख्यमंत्री महोदय, 

"आपल्याला शहाणपण तीन पद्धतींनी शिकता येतं: एक म्हणजे आत्म चिंतनाद्वारे, जी सर्वात उत्तम पद्धत आहे, दुसरी म्हणजे अनुकरणाद्वारे जी सर्वात सोपी आहे; व तिसरी म्हणजे अनुभवाद्वारे, जी सर्वात कटू आहे" कन्फ्यूशियस

या महान चिनी तत्त्ववेत्त्याची वेगळी ओळख द्यायची गरज नाही. त्याची शिकवण वर्षानुवर्षे अगदी आधुनिक माणसालाही मार्गदर्शन करत आहे. शहाणपण शिकण्याच्या त्याच्या शेवटच्या पद्धतीची आठवण मला अलिकडेच एका अपघाताची बातमी वाचून झाली. या अपघातात नऊ बांधकाम मजुरांचा जीव गेलाच मात्र त्याचसोबत संपूर्ण रिअल इस्ट क्षेत्राला हादरवून सोडलं! मी या घटनेशी संबंधित बांधकाम व्यावसायिकांचं किंवा त्यामध्ये ज्यांचा समावेश होता त्या व्यक्तींचे समर्थन करत नाही. मी स्वतः बांधकाम व्यवसायिक असल्यामुळे मी तसं करायची हिंमत करू शकत नाही त्याचप्रमाणे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तिंविषयी सुद्धा मला पूर्ण सहानुभूती आहे. मी स्वतः एक अभियंता आहे व माझं जवळपास निम्म आयुष्य बांधकामाच्या ठिकाणी गेलंय त्यामुळे या अपघाताविषयी मला तुम्हाला लिहावसं वाटलं कारण एक व्यक्ती म्हणून मी तुमचा आदर करतो. अजुन एक कारण म्हणजे या अपघाताशी संबंधित दोन्ही विभाग तुमच्या अखत्यारित येतात ते म्हणजे नगर विकास व गृह; नगर विकास, कारण रिअल इस्टेटशी संबंधित सर्व काही हा विभाग नियंत्रित करतो व गृह जो पोलीस खाते नियंत्रित करतो, जे या अपघात प्रकरणी तपास करत आहे. मी माध्यमांकडून किंवा जनतेकडून किंवा तथाकथित स्वयंसेवी संघटनेकडून माझ्यासाठी किंवा जे आता कायद्याच्या दृष्टीने फरार मानले जात आहेत त्यांना सहानुभूती मिळावी अशी अपेक्षा करत नाही, मात्र त्यांची खरचं काय चूक आहे? ज्यामुळे नऊ लोकांचा जीव गेला त्या यंत्रणेचा ते भाग होते हे मान्य केलं तरी ते अव्वल दर्जाचे गुन्हेगार आहेत का हे मला तुम्हाला विचारायचं आहे व ते असतील तर या यंत्रणेशी संबंधित प्रत्येक व्यक्ती ज्याला आपण समाज असं म्हणतो, या गुन्ह्याची भागीदार आहे. आपल्या देशात जीवाला काहीच मोल नसतं हे आपण सगळेच जण जाणतो, विशेषतः सामान्य माणसाच्या जीवाला, मग तो चौदाव्या मजल्यावरून पडलेला एखादा मजूर असेल किंवा सावित्री नदीमध्ये वाहून गेलेल्या बसमधील प्रवासी असतील!
सर, या प्रकरणामध्ये सदर बांधकाम व्यावसायिक पोलीसांच्या भाषेमध्ये म्हणतात त्याप्रमाणे पहिल्या श्रेणीतील किंवा दहाव्या श्रेणीतील सुद्धा गुन्हेगार नाहीत, ती माझ्या तुमच्यासारखीच सामान्य माणसे आहेत जी आत्तापर्यंत आपआपला व्यवसाय करत होती ज्यावर शेकडो कुटुंबे पोसली जात होती व हजारो कुटुंबांना घरे बांधून मिळाली होती! त्यांची पार्श्वभूमीही इतर कोणत्याही सामान्य माणसासारखी स्वच्छ होती, व त्यांनी आत्तापर्यंत सिग्नल तोडण्यासारखा गुन्हाही केलेला नव्हता. हा त्यांचा पहिला प्रकल्प नव्हता, त्यांनी सदर प्रकल्प किंवा त्यांचे कोणतीही प्रकल्प एखाद्या सरकारी जमीनीवर किंवा नदीच्या पात्रात किंवा रस्त्यावर सुरु केलेला नव्हता व अर्थातच त्यांनी हे काम कोणतीही परवानगी न घेता सुरु केलेले नव्हते! आता प्रत्येक माध्यम व राजकीय व्यक्ती दावा करत आहे की तिथे बेकायदेशीर काम सुरु होते. मला याच व्यक्तिंना किंवा माध्यमांना प्रश्न विचारावासा वाटतो की याच बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पांच्या मोठ मोठ्या जाहिराती त्यांनी त्यांच्या वर्तमानपत्रात छापल्या नाहीत का? जेव्हा हे बांधकाम व्यावसायिक जाहिराती छापतात तेव्हा त्यांना कोणतेही माध्यम प्रकल्पाच्या मंजुरीविषयी विचारत नाही किंवा प्रकल्प कायदेशीर आहे किंवा बेकायदा आहे याची पडताळणी करण्याची तसदी घेत नाही. एक अपघात होताच हीच माध्यमे सर्व बांधकाम व्यावसायिकांना खलनायक ठरवून मोकळी होतात! यात आणखी एक विनोद म्हणजे हा अपघात झाला तेव्हाच आपल्या राज्य सरकारने विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील आत्तापर्यंतचे प्रत्येक अवैध बांधकाम वैध करण्याची घोषणा केली! सर आता जास्त दोषी कोण हे मला सांगा, हजारो अवैध बांधकामे वैध करण्याचा निर्णय घेणाऱ्या व्यक्तिंविरुद्ध भारतीय दंड विधानाचे कोणते कलम लावायचे कारण अशी अवैध बांधकामे त्यामध्ये राहणाऱ्या लाखो लोकांचा जीव घेऊ शकतात.

माध्यमांच्या किंवा तुमच्या पोलीस विभागाच्या दाव्याप्रमाणे हे बांधकाम व्यावसायिक इतके अट्टल गुन्हेगार असते, तर त्यांनी ज्या मजल्यावर अपघात झाला त्याच्या बांधकामासाठी परवानगी घेतली असती का व सर्व परवानग्या घेऊन त्यांचं बांधकाम अकराव्या मजल्यापर्यंत पोहोचलं असतं का हा खरा प्रश्न आहे? परवानगी हातात नसताना बांधकाम सुरु ठेवणे हे कायद्याचे उल्लंघन आहे हे मला मान्य आहे मात्र एखादा नामांकित बांधकाम व्यावसायिक असे पाऊल उचलण्याचा धोका का पत्करतो याचा आपण कधी विचार केला आहे का? आता, यावर माध्यमांची प्रतिक्रिया असेल की बांधकाम व्यावसायिकांना कायद्याची तसूभरही फिकीर नसते व कायदा तसंच हा कायदा ज्या यंत्रणेमध्ये अस्तित्वात आहे ती देखील विकत घेऊ शकतो असं वाटतं, प्रत्यक्षात मात्र जे कायद्याचे पालन करतात त्यांची कायद्याला तसूभरही काळजी नसते अशी वस्तुस्थिती आहे! इथे प्रत्येकालाच कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेविषयी सगळं काही माहिती आहे, मग ते तुमचं नगर विकास खातं असो.... ते कसं काम करतं हे सगळे जण जाणतात, त्याचे पीएमसी, पीसीएमसी, पीएमआरडीए असे वेगवेगळे चेहरे आहेत. सगळं काही वाईटच आहे असं माझं म्हणणं नाही मात्र हेच सत्य यंत्रणेच्या दुसऱ्या बाजूला म्हणजेच बांधकाम व्यावसायिकांनाही लागू होतं! पुण्यात एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी जसे लाल सिग्नल ओलांडले जातात तसंच या प्रकरणात एकच निष्कर्ष काढताना एकाच मुद्द्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे, ती म्हणजे मजल्यांची अवैधता! मी पुन्हा एकदा म्हणेन की पूर्ण जनता कायद्याचे उल्लंघन करत असेल म्हणजे ते वैध आहे व त्यांना माफ केलं जावं असं नसते, हे खरय पण फक्त एखादा नामांकित बांधकाम व्यावसायिक कायद्याचे उल्लंघन करायचा धोका का पत्करतो व मंजुरीशिवाय काम सुरु का ठेवतो याची कारणंही विचारात घेतली पाहिजेत.
त्यानंतरच अपघाताच्या बाबतीत कारागिरीचा पैलू पाहू, कामाच्या कोणत्याही पातळीत सुरक्षेची अत्यंत काळजी घेतली पाहिजे व आयुष्याचं मोल जाणलं पाहिजे मात्र याप्रकरणात जाणून बुजून चूक किंवा हत्या केलेली नाही. आपण सर्वजण रिअल इस्टेटमध्ये जे चालतं त्यानुसारच चालतो, हे बरोबर नसलं तरीही त्यासाठी खुनाचा ठपका नक्कीच ठेवता येणार नाही. मी देखील एक अभियंता आहे व मी बांधकामाच्या ठिकाणी वर्षानुवर्षे बांधकामासाठी ज्या मान्यताप्राप्त पद्धती आहेत त्या वापरून शक्य ती सर्व काळजी घ्यायचा प्रयत्न करतो मात्र तरीही एखादा अपघात होऊ शकतो, म्हणूनच त्याला अपघात असे म्हणतात! त्या प्रकल्पातली ती काही पहिली इमारत किंवा पहिली स्लॅब नव्हती, साधारण तेरा इमारतींच्या जवळपास पंधरा स्लॅब झालेल्या होत्या, म्हणजेच या प्रकल्पामध्ये जवळपास दोनशे स्लॅब तशाच प्रकारे काम करून घालण्यात आल्या होत्या. आता एखाद्याचा गुन्हेगारी हेतूच असता तर एवढे काम होईपर्यंत तो थांबला नसता व हेतूपूर्वक नऊ लोकांची हत्या करून सगळे काही गमावण्यासाठी एवढी गुंतवणूक केली नसती! काही वर्षांपूर्वी पीएमसीच्या हद्दीतच एका इमारतीचे बांधकाम कोसळून बारा लोकांचा जीव गेला होता, ती संपूर्ण इमारतच बेकायदा होती व तिचा मालक कुणी राजकीय नेता पीएमसीचा माजी नगरसेवकही होता. त्यावेळीसुद्धा इतका गदारोळ झाला नव्हता, त्यामागचे कारण आपल्याला सहज लक्षात येईल की त्या बांधकाम व्यावसायिकाची नामांकित बांधकाम कंपनी नव्हती, त्यानंतरही बांधकाम पद्धती निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यावेळी नगर विकास खात्याची ती जबाबदारी नव्हती का? जर अपघातग्रस्त इमारतीचे बांधकाम सदोष असेल व आपण आता असे म्हणत असू की स्लॅबचे उपधारक साहित्य म्हणजेच आधार देणारी रचना निकृष्ट दर्जाची होती तर नगर विकास खात्याच्या अखत्यारित पीएमसी व पीसीएमसीसारख्या संस्था असताना त्याच उपधारक (सेंटरिंग) साहित्याने त्याच ठिकाणी दोनशे स्लॅब घातल्या जात असताना या संस्था काय करत होत्या? माझ्यावर विश्वास ठेवा की ते बांधकाम व्यावसायिक काही वेगळे करत नव्हते. नागपूरपासून मुंबईपर्यंत, अगदी पीएमसीच्या इमारतीच्या बांधकामामध्ये तुम्हाला अपघात झालेल्या ठिकाणापेक्षा फारसं वेगळं बांधकाम दिसून येणार नाही. जर हे बांधकाम सदोष असेल तर बांधकामासाठी मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यासाठी आपण कशाची वाट पाहात आहोत?

त्यानंतर अतिशय मूलभूत प्रश्न म्हणजे जर हे बांधकाम व्यावसायिक गुन्हेगार नसतील व दोषी नसतील तर ते पोलीसांना शरण का आले नाहीत? याचं उत्तर अगदी सोपं आहे, कुणाचाही कायद्यावर विश्वास नाही, त्यांना न्याय मिळेल असा विश्वास त्यांना वाटतं नाही असंच याचं रोखठोक उत्तर आहे! हीच माणसं कशाला, सर मला अशी एक तरी व्यक्ती दाखवून द्या जी आपणहून पोलीसांना किंवा कायद्याला शरण जाते, कारण कन्फ्यूशियसनी म्हटल्याप्रमाणे, आपल्या भूतकाळानं आपल्याला ते शहाणपण फार कटू पद्धतीनं शिकवलं आहे! समाज माध्यमांमध्ये ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत तसंच माध्यमांमधून ताशेरे ओढले जात आहे, मला नाही वाटत त्यांनी शरण न येऊन काही चूक केली आहे. आपल्या तुरुंगांमध्ये विशेषतः सामान्य माणसाला कशाप्रकारची वागणूक दिली जाते हे आपल्याला माहिती आहे! त्यामुळेच ती बिचारी माणसं आपला जीव मुठीत घेऊन पळाली तर नवल नाही, मात्र दुर्दैवानी आता कायद्याच्या व माध्यमांच्या नजरेत ते फरार असलेले गुन्हेगार आहेत!

इथे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्या अतिशय जवळच्या एका मित्राचं लहानसं उदाहरण देतो, म्हणजे केवळ बांधकाम व्यवसायिकांच्याच नाही तर सामान्य माणसाच्या नजरेत कायदा काय हे समजेल! माझा मित्र अमेरिकेतून नोकरी सोडून भारतात व्यवसाय करण्यासाठी आला. दोन महिन्यांपूर्वी त्याच्या व्यावसायिक केंद्रामध्ये दोन माणसांनी आवश्यक ती सर्व माहिती व्यवस्थित भरून एक केबिन भाड्याने घेतली. दहा दिवसातच ते ती जागा सोडून निघून गेले व मित्राचे पाच दिवसांचे भाडे पण बुडवले. त्यांचा टॅक्सी भाड्याने देण्याचा व्यवसाय होता असे त्यांनी सांगितले होते. काही दिवसांपूर्वी पोलीसांनी मित्राला त्याच्या व्यावसायिक केंद्राजवळच्या पोलीस ठाण्यात बोलोवले, तिथे त्याला समजले की त्या दोघांनी प्रवासी टॅक्सीचा व्यवसाय देतो असे सांगून इतर काही जणांना फसवले होते. माझ्या मित्राने पोलीसांना सांगितले की त्या माणसांनी त्याचेही भाडे बुडवले, त्यावर पोलीसांनी त्याला सीसी टीव्हीचे चित्रण द्यायला सांगते. मात्र एक महिला उलटून गेल्यामुळे ते पुसले गेले होते. त्यानंतर पोलीसांनी माझ्या मित्रावरच गुन्हेगारांना मदत केल्याचा व त्या माणसांच्या नोंदी व्यवस्थित न ठेवल्याचा ठपका ठेवला व त्याला अटक होईल असे सांगितले. माझा मित्र व्यवसाय केंद्र भाडेपट्टी कायद्यांतर्गत येत नाही असे वकिलाने सांगितल्याचे पोलीसांना म्हणाला व त्या दोन फसवणूक करणाऱ्या माणसांच्या ज्या काही नोंदी उपलब्ध होत्या त्या पोलीसांना दिल्या, तरीही पोलीसांनी अटक होईलच असे सांगितले. त्यानंतर माझ्या मित्राने मला संपर्क केला, मी काही ज्येष्ठ अधिका-यांना संपर्क केला व त्यांनी माझ्या मित्राशी बोलून समस्या जाणून घेतली व त्याला सोडून द्यायला सांगितले. माझा मित्र पोलीसांच्या या अनुभवामुळे इतका वैतागला की त्याने परत अमेरिकेत जायचा निर्णय घेतला! मला असं वाटतं हा एक अनुभव पुरेसा बोलका आहे. लोक कार अपघात असो किंवा  बांधकामावरील अपघात असो लोक पोलीसांकडे जाण्याबाबत काय विचार करतात याचे हे उदाहरण आहे. आपल्या सगळ्यांनाच अशी अनेक उदाहरणे माहिती आहेत व लोक कायद्यापासून लांब का पळतात या प्रश्नाचे उत्तरही त्यामध्येच आहे असे मला वाटते! या पार्श्वभूमीवर मी माझ्या व्यवसायासंदर्भात एक चांगली गोष्ट केली ती म्हणजे मी माझ्या भागीदारी कंपनीतून माझ्या बायकोचे नाव काही वर्षांपूर्वीच कमी केले व मला त्याचा आनंदच वाटतो! तसेच मी एक प्रतिज्ञापत्रही केले आहे की माझ्या व्यवसायामधील कोणत्याही कृतीसाठी पूर्णपणे मीच जबाबदार असेन, कारण माझ्या व्यवसामध्ये माझी तरूण मुलेही भागीदार आहेत व उद्या माझ्या बांधकामाच्या ठिकाणी एखादा अपघात झाला तर माझ्या मुलांच्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात आयपीसी ४०३ अंतर्गत देण्यात आलेल्या शिक्षेने होऊ नये असे मला वाटते!
आता वर नमूद केलेल्या बांधकाम व्यवसायिकांची सर्व बांधकामे तसेच सदनिकांचे आरक्षण थांबविण्याची सूचना देण्यात आली आहे; असे करताना सदनिकाधारक सामान्य नागरिकांचा विचार करण्यात आलेला नाही, असे करून खरंच काही फायदा होईल का? हे म्हणजे एक पूल कोसळल्यानं संपूर्ण मुंबई गोवा महामार्गच बंद करण्यासारखं आहे! दोषी व्यक्तिंना शिक्षा देऊ नका असं माझं म्हणणं नाही मात्र खरोखच कुणाला व कशी शिक्षा केली जात आहे हे पाहणेही महत्वाचे आहे?

सर माझी एकच नम्र विनंती आहे की या लोकांना फक्त अट्टल गुन्हेगार घोषित करण्याऐवजी किंवा आयपीसीमधील खुनाचे गुन्हे लावण्याऐवजी, रिअल इस्टेटचं नियंत्रण करणारी संपूर्ण व्यवस्था सुधारण्यासाठी या संधीचा वापर करू, असं झालं तर तुम्ही खऱ्या अर्थाने नगर विकास व गृह विभागाचे नेतृत्व करत आहात असं म्हणता येईल. या अपघाताशी संबंधित व्यक्तिंपैकी कोण दोषी आहे याचा निवाडा करण्यासाठी मी कुणी न्यायाधीश नाही. मात्र आपल्या भावी पिढीने केवळ चार भिंती नाहीत तर समाज घडवावा असे आपल्याला वाटत असेल तर आधी त्यांच्या मनात आपण यंत्रणेविषयी विश्वास निर्माण केला पाहिजे. कन्फ्यूशियसचे विधान खोटे ठरवून शहाणपण सुखद अनुभवांमधूनही शिकता येते हे सांगण्यासाठी यापेक्षा अधिक चांगली वेळ कोणती असू शकते? मी काही चुकीचे बोललो असेन तर मला माफ करा, मात्र एक नागपूरकर म्हणून मी सरळ आणि निर्भीडपणे बोललो नाही तर कोण बोलेल! मात्र कुठेतरी आत असा असा विश्वास वाटतो, की आम्हाला सर्वांना जो बदल हवा आहे तो तुम्ही घडवू शकता, म्हणून बोलायची हिंमत केली, मी जास्त बोललो असेन तर मला माफ करा बॉस!

संजय देशपांडे

smd156812@gmail.com

संजीवनी डेव्हलपर्स