Thursday 24 August 2017

क्षितीजापार निघालेले जहाज ! (एका वडिलांचे मनोगत : )



































प्रिय रोहीत (दादा) ,

जहाज बंदरात सगळ्यात सुरक्षित असतं, मात्र बंदरात रहाण्यासाठी जहाजाची बांधणी केली जात नाही”… ग्रेस मरे हॉपर.

 खरच अमेरिकेच्या नौदलाचे रिअर ऍडमिरल हॉपर यांच्याशिवाय जहाज व त्याच्या असण्याच्या उद्देशाचे अधिक चांगल्याप्रकारे वर्णन कोण करू शकेल. दादा आज तू तुझं बंदर म्हणजे पुणे सोडून जाताना वरील अवतरण हजारो वेळा माझ्या मनात येऊन गेलं. बरोबर 22 वर्षं तुझं हे जहाज घररुपी बंदरात सुरक्षितरित्या नांगरलेले होते. मात्र एक दिवस या जहाजाला बंदर सोडून जावंच लागणार याची मला जाणीव होती आणि आता तो दिवस उजाडला आहे. मी देखील 13 वर्षांचा असताना जेव्हा माझं बंदर सोडून निघालो तेव्हा माझ्या वडिलांना काय वाटलं असेल हे माहिती नाही, मात्र मला आधीच्या पिढीचं कौतुक करावसं वाटतं की त्यांनी आम्हाला अनेकदा कठिण आव्हानांचा सामना करू दिला, मला आमच्या पिढीच्या बाबतीत मात्र तसं म्हणता येणार नाही. मला अजूनही 12 मे 95 हा दिवस आठवतोय, सारसबाग गणपती मंदिरासमोरच्या पाटणकर हॉस्पिटलच्या व्हरांड्यात मी बसलो होतो. मी तुला पहिल्यांदा पाहिलं तो क्षण आठवतोय आणि खरं सांगू तुझ्या जन्मानं माझ्यावर काय जबाबदारी आली आहे हे समजायलाही मी खूप तरूण होतो, मात्र तू जसा मोठा होत गेलास तसंच तुझ्यासोबतच मीसुद्धा ही जबाबदारी उचलायला शिकत गेलो, कदाचित थोडं उशिराच असेल, पण शिकलो नक्की!

 मी मागे वळून पाहतो तेव्हा मार्व्हल कॉमिक्सच्या चित्रपटांतील टायटल्सप्रमाणे तुझी विविध क्षणचित्रं माझ्या डोळ्यासमोरून सरकत जातात. मी तुला खूप वेळ देऊ शकलो असं नाही पण मला तुझं दोन वर्षांचं गुटगुटीत रुपडं आठवतंय. आपल्या सहकारनगरमधल्या घराच्या स्वयंपाकघराच्या दाराला लटकवलेल्या झोक्यात बसून तू झोके घेत असायचास, तसंच तुझा गणवेश घालून सिंबायसिस शाळेत जातानाचा पहिला दिवसही आठवतोय. इतर लहान मुलांसोबत तुला कार्टुन चित्रपटांना नेलेलं आठवतंय. मला अजूनही तू खारवलेल्या काजूचं पाकीट पाहिलं की तोंडाचा चंबू करून आनंदाने खारे काजू असं ओरडायचास हे आठवतंय.त्यानंतर दहावीच्या परीक्षेच्या वेळी तुझा अभ्यास घेतला, तुझी अभ्यासाची भीती घालवली, तुझी बाईक आल्यावर तुला झालेला आनंद, अशा कितीतरी आठवणी आहेत ज्या नेहमी माझ्या मनाला तजेला देत राहतील. मग जाणवायच्या आत अचानक तू मोठा झाला होतास , माझ्यापेक्षा उंच झालास, जिममध्ये जाऊन सिक्स पॅक बनवायला लागलास, दाढी ठेवलीस (खरं सांगू, मला ती कधीच आवडली नाही). दिवस कसे उडून गेले कळलंच नाही आणि आज तू जगात स्वतःचा मार्ग शोधायला निघाला आहेस. आजपर्यंत तुला सतत माझ्या अवतीभोवती, डोळ्यांसमोर पाहायची सवय आहे. मनात जाणवत होतं की आता तू खरच साता समुद्रापार जाण्याची वेळ येऊन ठेपलीय आणि तू आता आमच्यापासून कित्येक मैल दूर जाणार आहेस!

दादा मी अनेक वर्षांपासून तुला पत्र लिहीतोय, मी कधीकधी विचार करतो की माझ्या अशा उपदेशपर पत्रांची त्याला गरज उरली असेल का. पण तुला सांगावसं वाटतं की तू माझी अलिकडची काही पत्रं पाहिलीस तर तुला जाणवेल की हा माझा उपदेश नाही तर मी माझ्या भावना व्यक्त करतोय. कारण उपदेश असो किंवा सल्ला, मुलगा मोठा होईपर्यंत देणं ठीक आहे, त्यानंतर एक बाप केवळ आपल्या भावना व्यक्त करू शकतो. बापानं जे काही सांगितलंय त्यातून काय घ्यायचं आणि घ्यायचे का नाही हे मुलानं ठरवायचं असतं. तरीही एक वडील म्हणून मला माझ्या भावना तुझ्यापाशी व्यक्त करताना आनंद होतो, बाबा झाल्यावर तुलासुद्धा हे जाणवेल. अर्थात माझ्या वडिलांनी मला असं कधी काही सांगितलं नाही कारण माझ्या पिढीला किंवा त्यांच्या पिढीला याची सवयच नव्हती. माझी आधीची सगळी पत्र वाचलीस तर तुला कदाचित माझं बोलणं कंटाळवाणं वाटेल, तीच फिलॉसॉफी पुन्हा वेगळ्या शब्दात बोलतोय असं वाटेल, मात्र अनेक पिढ्या आल्या आणि गेल्या पण चांगल्या-वाईटाची व्याख्या बदललेली नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच मी तुला आणि रोहनला जे काही सांगतो, ते तुम्हाला चांगलं काय व वाईट काय हे समजावं व तुम्ही नेहमी चांगल्याची बाजू घ्यावी यासाठीच! तुला कदाचित हा एखाद्या डिस्नेच्या चित्रपटातला संवाद वाटेल पण त्याला पर्याय नाही. तुझ्या वडिलांना कार्टुनपट आणि त्यातलं तत्वज्ञान किती आवडतं तुला माहिती आहे. दादा, मी तुला कार्टुनपट पाहायला का घेऊन जायचो माहितीय कारण त्यांच्यासारखा उत्तम शिक्षक नाही. त्यातून तुला जे शिकायला मिळतं ते तुला मी किंवा कोणतीही शाळा शिकवू शकणार नाही. हे चित्रपट चांगलं, वाईट, नितीमत्ता, मूल्यं, भीती, धैर्य, मैत्री, कुटुंब, जबाबदारी अशा अनेक शब्दांचा अर्थ समजावतात आणि मग कुंग फू पांडामधल्या मनःशांतीच्या शोधात निघालेल्या मास्टर शिफूला आपण कसं विसरू शकतो? वरील सगळे शब्द केवळ काही अक्षरं किंवा संज्ञा नाहीत, तर त्यामुळेच आपल्या जीवनाला अर्थ मिळतो. शाळा किंवा कॉलेजात तुला ज्ञान मिळेल त्यामुळे तू पदवीधर होशील, ते ज्ञान वापरून समाजात तू यशस्वी म्हणून ओळखला जाशीलही, मात्र जोपर्यंत तुला वरील शब्दांचा योग्य अर्थ उमगत नाही तोपर्यंत तुझ्या ज्ञानामुळे मिळालेल्या यशाचा तुला खऱ्या अर्थानं आनंद उपभोगता येणार नाही, हे मी सांगु ईच्छितो.

 दादा तुला माहितीय मी पुण्यात वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी आलो तेव्हा माझ्याकडे काय होतं माहितीय? घरापासून दूर राहण्याचा तीन वर्षांचा अनुभव, कपड्यांचे जेमतेम चार जोड, मुंबईच्या फुटपाथवर घेतलेला नकली अदीदास बुटांचा जोड, एक गजराचं घड्याळ, एक रजई, एक गादी आणि एक सेकंड हँड लुना! तू आज तुझ्यासोबत काय घेऊन जातो आहेस हे तुला माहितीय; मात्र मी आजही या शहरात काय घेऊन आलो होतो हे विसरलेलो नाही. अर्थात मी कधीही माझं बालपण आणि तुझं आणि रोहनच बालपण यांची तुलना केलेली नाही व करणारही नाही, कारण प्रत्येक झाड आपल्या नशीबानं वाढत असतं असा मला विश्वास वाटतो. पण कधीही विसरू नकोस की तू कितीही उंच झालास, तुझ्या फांद्या कितीही विस्तारल्या तरी तुझी मुळं जमीनीत खोलवर रुजलेली असतील तरच तू कोणत्याही चक्रीवादळात टिकून राहू शकशील. तुझी उंची व विस्तार म्हणजे  तुझं  सुदृढ शरीर आहे अभिनयातला डिप्लोमा, तुझी पदवी, इंग्लंडमध्ये शिकण्याची संधी, एका सुखवस्तू कुटुंबात जन्माला आल्यामुळे मिळालेल्या सर्व सुखसोयी, स्वतःचे शूज, घड्याळ, स्वतःची कार व इतरही अशा अनेक गोष्टी आहेत ज्याची लाखो मुलं स्वप्नही पाहू शकत नाहीत. मात्र आकाशाला गवसणी घालताना, जबाबदारीची जाणीव ठेव, तुझ्यातला चांगुलपणा कायम ठेव, तुझं कुटुंब, तुझे मित्र तुझ्यावर खूप प्रेम करतात आणि तुझी काळजी करतात कारण या गोष्टीच तुझी पाळमुळं आहेत, हे लक्षात ठेव !

खरंतर तू एक वर्षभरासाठीच जाणार आहेत व आपल्या आयुष्याचा विचार करता एक वर्षं म्हणजे काही फार मोठा काळ नाही. मात्र जेव्हा कुणी आपल्या जवळची व्यक्ती दूर जाणार असते तेव्हा एक वर्षंही खूप मोठा काळ वाटू लागतो, आमचंही इथे असंच होणार आहे. तुझ्या आवडत्या ठिकाणी आता एकत्र जेवायला जाता येणार नाही किंवा तुला जे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर पहिल्याच दिवशी पाहायला आवडायचे ते पाहता येणार नाहीत. अशा अनेक लहान लहान गोष्टी आहेत ज्या तू जवळ नसताना खूप मोठ्या वाटतील. मात्र लक्षात ठेव तू एका नव्या देशात, नव्या जगात जातो आहेत. जास्तीत जास्त ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न कर, हा तुझ्या आयुष्यातला सर्वोत्तम काळ असेल आणि तुझ्या भोवतालच जगच तुला खूप काही शिकवून जाईल. तू तिथे एक मुलगा म्हणून जातोयस आणि परतशील तेव्हा एक उमदा तरूण असशील. परत येताना केवळ पाश्चिमात्य जगाचं ज्ञान, शिक्षण, पदवी, शिष्टाचार व सभ्यताच नाही तर त्यांचा जगण्याचा दृष्टिकोनही घेऊन ये, ज्यामुळे ते सर्वच आघाड्यांवर नसले तरी ते आपल्याहून अधिक चांगला समाज बनले आहेत. आपल्यात ज्या गोष्टींची कमतरता आहे ते शिकून ये आणि आपल्या चांगल्याच्या व्याख्येत जे बसत नाही किंवा आपल्याला रुचत नाही ते सोडून दे कारण विकसित समाजात सगळं काही बरोबरच असतं असं नाही.

सगळ्यात शेवटची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःची काळजी घे. तूझं जहाज गेले 22 वर्षं  घराच्या बंदरात होतं तेव्हा तुला काळजी हा शब्दच माहित नव्हता. तू जेव्हा पुन्हा या बंदरावर येशील तेव्हा नवनव्या क्षितीजांना गवसणी घालण्यासाठी सज्ज असशील हे पाहून मला आनंदच होईल एवढंच मला सांगावसं वाटतं, बाकी काहीच महत्वाचं नाही!

तुझे प्रिय बाबा

(संजय देशपांडे )
09822037109


1 comment:

  1. कर्ज! कर्ज !! कर्ज !!!
    आपण एक प्रतिष्ठित आणि मान्यताप्राप्त खाजगी कर्ज कंपनी शोधत आहात जो संपूर्ण आयुष्यासाठी कर्ज प्रदान करतो. आम्ही सर्व प्रकारचे कर्जे अतिशय वेगवान आणि सोप्या पद्धतीने, वैयक्तिक कर्ज, कार कर्ज, तारण कर्ज, विद्यार्थी कर्ज, व्यवसाय कर्ज, गुंतवणूक कर्ज, कर्ज एकत्रीकरण आणि बरेच काही देत आहोत. बँका आणि इतर वित्तीय संस्थांनी आपल्याला नाकारले आहे का? आपल्याला एकत्रीकरण कर्ज किंवा तारण गरजेची आहे का? आपल्या सर्व आर्थिक समस्यांना भूतकाळातील एक गोष्ट बनवण्यासाठी आम्ही येथे आहोत असे आणखी दिसत नाही. आम्ही 2% च्या दराने आर्थिक सहाय्य आवश्यक असलेल्या व्यक्तींसाठी आणि कंपन्यांना निधी देतो. आवश्यक सामाजिक सुरक्षा क्रमांक आवश्यक नाही क्रेडिट तपासणी आवश्यक, 100% हमी. मी तुम्हाला या माध्यमाचा उपयोग करून सांगू इच्छितो की आम्ही विश्वसनीय आणि सहायक मदत देतो आणि आम्हाला तुम्हाला कर्ज देण्यास आनंदच होईल.
    मग आम्हाला एक ईमेल पाठवा: (victoriaemmanuelloan@gmail.com) कर्जाकरता अर्ज करण्यासाठी

    ReplyDelete