Wednesday 19 December 2018

रिअल ईस्टेटचे नववर्ष ; आशादायी पण आव्हानात्मक!























उगवत्या वर्षाच्या क्षितिजावरून आशेचा किरण हसून कुजबूजतो, हे वर्ष आणखीनच आनंदी असणार आहे.”... आल्फ्रेड लॉर्ड टेनिसन.

आल्फ्रेड टेनिसन, पहिला बॅरन टेनिसन एफआरएस हा विख्यात  ब्रिटीश कवी होता. राणी व्हिक्टोरियाच्या कार्यकाळात तो ग्रेट ब्रिटन व आर्यलंडचा पोएट लॉरेट होता व तो अजूनही ब्रिटनमधल्या सर्वात लोकप्रिय कवींपैकी एक मानला जातो. खरंतर टेनिसनविषयी सांगायची काही गरज नाही कारण तो समकालीन सर्वोत्तम कवींपैकी एक मानला जातो, आणि ईतर कोणाला नसली तरी रिअल इस्टेटला (पुण्यातल्या) सध्यातरी टेनिसनच्या या आशादायी शब्दांची फार गरज आहे! “अच्छे दिनविषयी पूर्णपणे आदर राखत सांगावसं वाटतं, आगामी वर्षात राज्यात व केंद्रात निवडणुका आहेत. या सरकारनं (मोदी सरकार) चाडेचार वर्षांपूर्वी सत्तेवर आल्यावर जशी धोरणे राबविली त्यामुळे रिअल इस्टेटचे दर स्थिरच नाही तर कमीच झाले आहेत. मात्र या सरकारनं रिअल इस्टेटसाठी एक इंडस्ट्री म्हणून काय केलं याकडे मला लक्षं वेधून घ्यायचं आहे. इथे सामान्य पुणेकर म्हणतील रिअल इस्टेटचं काय झालं म्हणजेच बांधकाम व्यावसायिकांचं काय झालं याच्याशी त्यांना काय करायचं आहे. शेवटी त्याचा जो काही अंत्य परिणाम झाला तो जास्त महत्वाचा आहे, म्हणजेच घरांचे (सदनिकांचे) दर कमी झाले आहेत ही वस्तुस्थिती आहे. सदनिका खरेदी करणाऱ्यांसाठी हे अच्छे दिन नाहीत का, कारण काही वर्षांपुर्वी घरांच्या किमती सतत वाढत असल्यामुळे घरे सामान्य ग्राहकाच्या आवाक्याबाहेर गेली होती! आता घराच्या किमती नक्कीच कमी झाल्या आहेत, मात्र त्या अजूनही ग्राहकांच्या (सामान्य माणसाच्या) आवाक्यात आहेत का या रिअल इस्टेटच्या आणखी एका मुद्यावर विचार झाला पाहिजे. रिअल इस्टेटचे दर कमी होण्याचे दोन पैलू आहे, खरंतर ते आपले वजन कमी होण्यासारखे आहे. मी दिलेलं उदाहरण पाहून गोंधळात पडलात? आपल्या सगळ्यांना जास्त वजन (शरीराचं) आरोग्यसाठी धोकादायक असतं हे माहिती असतं व सगळे डॉक्टर वजन कमी करायचा व वजन हे बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्सनुसार (शरीराची उंची व वजन यांचा अनुपात) असावं असाच सल्ला देतात. मात्र योग्य आहाराद्वारे व व्यायामाद्वारे वजन कमी झाले पाहिजे कारण वजन मधुमेहासारख्या आजारानेही कमी होऊ शकते पण आपल्याला अशा प्रकारे वजन कमी होणे हे चांगल्या किंवा आरोग्यपूर्ण जीवनशैलीचं लक्षण म्हणता येईल का, अर्थातच नाही. म्हणुनच सगळ्यांविषयी पूर्णपणे आदर राखत असं म्हणावसं वाटतं की, रिअल इस्टेटमध्येही घरांच्या कमी झालेल्या दरांचीही अशीच परिस्थिती आहे, घरांचे भाव आपोआप कमी झालेही नाहीत तर हे आजारपणाचेच लक्षण आहे.

मला कल्पना आहे, बरेच जण उपरोधानं म्हणतील की इतकी वर्षं जेव्हा रिअल इस्टेटनी (बांधकाम व्यावसायिकांनी) मालमत्तेचे वाढते दर व त्याच्याशी संबंधित लाभ उपभोगले, तेव्हा ते सुदृढ नाही असं तुम्ही म्हटला नाही! मी त्याचं समर्थन करत नाही व ती भाववाढ सुद्धा चुकीचीच होती. पण एक चूक दुसऱ्या चुकीचं समर्थन करू शकत नाही; रिअल इस्टेटमध्येही सध्याचे दर कमी होण्याचंही असंच कारण आहे. एकीकडे जमीनीचे दर, सिमेंट/स्टील/रेतीसारख्या मूलभूत बांधकाम साहित्याचे, डिझेलचे दर वाढत आहेत. त्यात सरकारही रिअल इस्टेटला पिळुन काढायची (माफ करा पण माझ्या मनात हाच शब्द आला) एकही संधी सोडत नाही. सरकार तयार घरांवर शून्य जीएसटी सारखी चुकीची धोरणे असो वा, आयकराची धोरणं असो वा, मुद्रांक शुल्क वाढ असो  रिअल ईस्टेटचेची गळचेपी करते, स्थानिक प्रशासकीय संस्थाही(पुणे महानगरपालिका/पिंपरी चिंचवड महानगरपालिका/पुणे महानगरप्रदेशविकास प्राधिकरण) विविध करांमध्ये सतत वाढ करत असतात.तसेच आपण बांधकामाच्या मजुरी खर्चाकडे दुर्लक्ष करू शकत नाही, त्यात बांधकाम मजुरांच्या रोजंदारीपासून ते विपणन, लेखापाल ते बांधकामावरील अभियंत्यांपर्यंत सगळ्यांचा समावेश होतो. मी 750 रुपये महिना पगारावर बांधकाम अभियंता म्हणून कारकिर्दीची सुरूवात केली आणि मी पुणे विद्यापीठाचा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झालेला अभियंता होतो. तुम्ही आजकाल अभियांत्रिकीच्या किंवा कोणत्याही शाखेच्या पदवीधर व्यक्तीला मुलाखतीसाठी बोलवा व ते किती पगार मागतात ते बघा, म्हणजे तुम्हाला या वरखर्चांची कल्पना येईल. रिअल इस्टेट क्षेत्रं सरकारी बँकांचं (गुंतवणूकदारांचं नाही) लाडकं क्षेत्रं कधीच नव्हतं. म्हणूनच व्याजदर व परतफेडीच्या अटी अतिशय कडक असायच्या. त्या आता आणखी कडक झाल्या आहेत. त्यामुळेच अंतिम उत्पादन म्हणजेच घराला होणारा वित्तपुरवठा अधिक महाग झालाय मात्र रिअल इस्टेट खाजगी गुंतवणूकदारांचं नेहमीच आवडीचं क्षेत्र राहिलं आहे पण त्याचं प्रेमही फुकट नसायचं. कुणाही बांधकाम व्यावसायिकाला खाजगी वित्तपुरवठादाराच्या अटी विचारा, म्हणजे तो तुम्हाला सांगेल की बांधकाम व्यावसायिक होण्यापेक्षा तो गुंतवणूकदार झाला असता तर बरं झालं असतं. मात्र उंदीर जसे बुडत्या जहाजातून पळ काढतात तसंच गेल्या काही वर्षात गुंतवणूकदारांनी रिअल इस्टेटकडे पाठ फिरवली, अर्थात सगळ्यांनाच आपला जीव वाचवता आला नाही, पण ती आणखी वेगळी गोष्ट आहे. रिअल इस्टेटमधून खाजगी गुंतवणूकदारांचा पैसा निघून गेला हे एका अर्थानं चांगलंच झालं कारण त्यामुळे चढ्या व्याजदरांचं ओझं तरी कमी झालं, पण मग जमीनी खरेदी करण्यासाठी व प्रकल्पाच्या बांधकामासाठी निधी कुठून येणार? इथे आता बरेच जण म्हणतील की प्री-लाँच, सॉफ्ट-लाँच, आगाऊ बुकिंग तसंच बांधकामासाठी ग्राहकांकडून पैसे घेण्याचं काय झालं? इथेच खरी गोची आहे. सरकारच्या रेरा किंवा तयार घरांवर जीएसटी आकारायचा नाही अशा धोरणांमुळे वरील गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत. आगाऊ आरक्षणाच्या किंवा बांधकामाच्या टप्प्यात ग्राहकच मिळत नाहीत (प्रकल्प अगदी मोक्याच्या ठिकाणी असेल तरच असतात, जे आता दुर्मिळ होत चाललंय); त्यामुळे विकासकाला फक्त दोनच पर्याय असतात एकतर स्वतःच्या खर्चानं जमीन खरेदी करणं व स्वतःच्याच खर्चानं प्रकल्प उभारणं. किंवा प्रकल्प जाहीर करणं व बांधकाम सुरू केल्यावर ग्राहक मिळतील व सदनिकांच्या आरक्षणातून बांधकाम खर्च निघेल अशी आशा करणं.
याच टप्प्यावर प्रकल्पाच्या बांधकामामध्ये (म्हणजेच बांधकाम खर्चामध्ये) आणखी एक खर्च समाविष्ट होतो तो म्हणजे विपणनाचा अर्थातच जाहिरातीचा खर्चबाजारातला अलिकडचा कल पाहता बांधकाम व्यावसायिकांपुढचं सर्वात मोठं आव्हान (किंवा मनातली भीती) म्हणजे ते बनवत असलेल्या घरांच्या योग्य ग्राहकांपर्यंत कसं पोहोचायचं! मी जेव्हा म्हणतो की योग्य ग्राहक तेव्हा त्याचा अर्थ रिअल इस्टेटनी (म्हणजेच बांधकाम व्यावसायिकांनी) त्यांनी बनवलेल्या उत्पादनासाठी (घरे) ग्राहक शोधणे, त्याच्यापर्यंत पोहोचणे व त्याला ते खरेदी करण्यासाठी मनविणे असा होतो. बाजाराच्या बदललेल्या परिस्थितीत, सामान्य मध्यमवर्गाचं घराला प्राधान्य अजिबात नसतं जो पूर्वी या घरांचा मुख्य ग्राहक होता. गुंतवणूकदार असतीलही, पण कोणताही चित्रपट हा काळा बाजार करणाऱ्यांच्या जोरावर नाही तर खऱ्या प्रेक्षकांमुळे उत्तम व्यवसाय करतो. त्याचप्रमाणे गुंतवणूकदारांनी कितीही घरं आरक्षित केली तरी, ती घरं ग्राहकांनी खरेदी करून त्यात राहणं आवश्यक असतं. खरंतर वर्षानुवर्षं हे सुरळीतपणे सुरू होतं कारण, बहुतेक भारतीयांचं पहिलं प्राधान्य घराला होतं. आता मात्र अशी परिस्थिती नाही, किमान सध्यातरी नाही. तुम्ही अगदी मागच्या दशकात एखाद्या मध्यमवयीन जोडप्याला विचारलं असतं की त्यांना आधी काय करायला आवडेल (खरेदी, खर्च किंवा बचत), त्यापैकी ऐंशी टक्के जोडप्यांनी उत्तर दिलं असतं की घर खरेदी करणं! आधी घर घ्यायचंय म्हटल्यावर कार, सेल फोन खरेदी करणं इत्यादी लांबणीवर टाकलं जायचं, मात्र आता अनेक जोडपी घर खरेदी करणं लांबणीवर टाकतात. याची तीन कारणं आहेत; पहिलं म्हणजे घर खरेदी करणाऱ्यांचा (घर शोधणाऱ्यांचा) वयोगट बदललाय, ती विशीतली किंवा तिशीतली मंडळी आहेत. या सगळ्यांना आज आयुष्य भरभरून जगायचं असतं, त्यांना उद्याची चिंता नसते. घराचे हप्ते भरण्यापेक्षा ते उंची गाड्या किंवा आधुनिक गॅजेटचे हप्ते भरणं पसंत करतात. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यासाठी मुलांच्या शिक्षणाच्या खर्चासारख्या इतर गोष्टी महत्वाच्या असतात. त्यांना त्यासाठी बचत करायची असते. शेवटची गोष्ट म्हणजे राहत्या घराचं भाडं कर्जाच्या मासीक हप्त्यापेक्षा कमी असेल तर त्यांची भाड्याच्या घरात राहायला काही हरकत नसते. भाडं भरणं त्यांच्यासाठी हप्ता भरण्यासारखं बंधनकारक ओझं नसतं, नोकरीत काही अडचण आली म्हणजे कमी पगाराची नोकरी मिळाली तर त्यांना आणखी कमी भाडं असलेल्या घरात राहायला जाण्यात काही अडचण नसतेही विशीतली/तिशीतली पिढी घर खरेदी करण्याच्या बाबतीत फारशी भावनिक नसते. त्यांना स्वतःचे घर खरेदी करण्यात फुकाचा अभिमान किंवा सुरक्षिततेची भावना वगैरे वाटत नाही. आधीच्या पिढीच्याबाबतीत म्हणजे सध्या जे पन्नाशीत आहेत त्यांच्या बाबतीत हे होतं! रिअल इस्टेटसमोरचं (म्हणजे बांधकाम व्यावसायिकांचं) हेच सर्वात मोठं आव्हान आहे की या आजच्या तरूण पिढीला घर खरेदी करा म्हणून कसं पटवायचं. ही पिढी अगदी हुशार आहे, त्यांचा हिशेब तयार असतो त्यामुळे ते जाहिरातींवर (डोळे झाकून) विश्वास ठेवत नाहीत. खरंतर या पिढीला त्यांचे घर सगळ्या आरामदायक सुखसोयी, दर्जेदार बांधकाम असलेलं हवे आहे व व त्याचा ताबा वेळेत हवा आहे, चांगल्या ठिकाणी हवं आहे व त्यांना परवडेल असं हवं आहे! ते बरेच प्रश्न विचारतात (बहुतेकवेळा अवघड) व कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी गुगलवर सगळी माहिती गोळा करतात, विशेषतः जेव्हा घरासारखी महागडी गोष्ट घ्यायची असते! म्हणुनच आता इथे मुद्दा येतो रिअल इस्टेटमधल्या सर्वात महाग घटकाचा, ज्यासाठी हा व्यवसाय कधीच तयार नव्हता तो म्हणजे विपणनाचा खर्च. याबाबतीत पूर्णपणे अनिश्चितता आहे कारण तुम्ही एखाद्या सिमेंट सप्लायर्सला 400 रुपये दिल्यावर तुम्हाला 50 किलो सिमेंटची गोणी मिळेल याची खात्री असते. मात्र तुम्ही एखाद्या जाहिरात मोहीमेवर अगदी दहा लाख रुपये खर्च करूनही त्यामुळे तुमच्या किती सदनिका आरक्षित होतील याची खात्री नसते, अशावेळी तुम्ही बिल्डर म्हणुन काय करावं?

आणि शेवटी हे सगळे खर्च शेवटी घराच्या किमतीतच समाविष्ट केले जातात. पण कुणी असा विचार केला आहे का की घराशी संबंधित सगळ्याच वस्तुंच्या किंमती वाढत असतानाही घरांचे दर कसे कमी होत आहेत? याच कारणानं मी रिअल इस्टेटच्या कमी होणाऱ्या किमती सुदृढ नाहीत असं म्हटलं. सकृतदर्शनी वापरकर्त्यांसाठी हे चांगलंय असं वाटत असलं तरीही या संपूर्ण उद्योगाचं काय ज्यावर लाखो लोक अवलंबून आहेत. त्यात पुरवठादार, कंत्राटदार, एजंट व अगदी सरकारचाही समावेश होतो ज्याला रिअल इस्टेटमधल्या व्यवहारातून प्रचंड महसूल मिळतो. दुसरीकडे प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुका जिंकण्यासाठी नोकऱ्या तसंच शिक्षणामध्ये आरक्षण, शेतकऱ्यांना तसंच इतर वर्गांना कर्जमाफी द्यायच्या घोषणा करतो, पण रिअल इस्टेटचा विचार कुणी करत नाही. माझा आरक्षणाला किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध नाही (मला या देशात रहायचे असेल तर, मी अशी हिंमत करू शकत नाही). मात्र मी वर्तमानपत्रात वाचतोय की मध्यप्रदेशातल्या नवीन सरकारनं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केलीय ज्यामुळे त्या राज्याच्या सरकारी तिजोरीवर वार्षीक जवळपास 64,000 कोटी रुपयांचं ओझं वाढणार आहे. निवडणुका जवळ आहेत हे पाहता आपलं राज्य सरकारही अशाप्रकारची घोषणा जाहीर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी रिअल इस्टेटसाठी पायाभूत सुविधा बांधण्यासाठी पैसा कुठून येईल. कारण हा सगळा भार दुभत्या गाईवरच म्हणजेच रिअल इस्टेट व इतर व्यवसायांवर (म्हणजेच उद्योगांवर) टाकला जाईल, यामुळे घरे अधिक महाग होतील. त्यानंतरही एखादा बांधकाम व्यावसायिक त्याच्या प्रकल्पातील घरांचे दर कमी करत असेल तर प्रचंड नफा मिळत असल्यामुळे तो असं करतोय असं नाही तर फक्त तग धरून राहण्यासाठी तो दर कमी करतोय. मात्र अशी बांधकाम सुरू असलेली किंवा तयार घरं संपल्यानंतर नवीन प्रकल्पांचं काय? मला असं वाटतं रिअल इस्टेटपेक्षाही मायबाप सरकारनं याची जास्त काळजी केली पाहिजे. आपली स्थिती इसापनीतीतल्या (लोक कथा) गोष्टीसारखी झालीय, ज्यात सोन्याची अंडी देणारी कोंबडी असलेला एक माणूस अति हव्यासापायी सगळी अंडी एकाचवेळी मिळावीत म्हणून तिला मारून टाकतो, त्यामुळे त्याला सोन्याची अंडी मिळणंच बंद होतं, इथे रिअल ईस्टेटचं तसच काहीसं होतंय !
खरं म्हणजे पुण्यामध्ये मोठ्या संख्येनं नोकऱ्या उपलब्ध असल्यामुळे इथे मोठ्याप्रमाणावर स्थलांतर होते आहे!. ही लोकसंख्या भाड्याच्या घरात राहायला तयार असली तरीही ती घरं भाड्यानं देण्यासाठी कुणालातरी ती घरं आधी खरेदी करावी लागतील. असं म्हणतात कुणाचातरी तोटा झाल्यानं, कुणाचातरी फायदा होत असतो. याच तर्कानं महाराष्ट्रातल्या अनेक गंभीर समस्यांपैकी बेरोजगारी एक महत्वाचा मुद्दा आहे. पुण्यात मात्र ऑटो उद्योग, सेवा उद्योग तसंच शिक्षण उद्योग (अनेकांना हा शब्द आवडणार नाही मात्र ही वस्तुस्थिती आहे) व इतरही अनेक उद्योगरूपानी लाखो रोजगार उपलब्ध आहेत. अर्थातच या सगळ्या लोकांना त्यांच्या डोक्यांवर छप्पर आहे व रिअल इस्टेट उद्योगालाच हे काम करावे लागेल. रिअल इस्टेटने मात्र आणखी एक पैलू लक्षात घेतला पाहिजे, तुम्ही पैशाच्या जोरावर इमारती बांधू शकता, मात्र तुम्ही फक्त पैशांनी प्रतिमा व चारित्र्य निर्माण करू शकत नाही तर तुम्ही तो पैसा कसा खर्च करता यातुनच ते घडत असतं. मला असं वाटतं रिअल इस्टेटनं (बांधकाम व्यावसायिकांनी) आत्तापर्यंत एवढं शहाणपण तरी नक्कीच शिकले असेल !

रिअल इस्टेटनं नवीन वर्षाचं स्वागत सकारात्मक व व्यावसायिक दृष्टिकोनातून करायची गरज आहे. तसंच नफ्याची हौसपण थोडी कमी केली पाहिजे. आता इतरांच्या पैशातून दाम दुप्पट होण्याचे दिवस गेले. इथून पुढेही हा उद्योग नक्कीच टिकेल व वाढेलपण मात्र  इतर कुठल्याही उद्योगाप्रमाणे रास्त    नफ्यावर! त्याचप्रमाणे ग्राहकांच्या विचारप्रक्रियेची नेमकी समज हवी. एका मोबाईल कंपनीच्या जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे नो उल्लू बनाईंग दृष्टिकोनच असला पाहिजे! बाजाराच्या गरजांचा अभ्यास करा, वरखर्चावर नियंत्रण ठेवा, दर्जेदार बांधकाम व वेळेत ताबा द्या, ग्राहक सहजपणे घर खरेदी करू शकेल असे दर ठेवा, ग्राहकाला घर खरेदीला प्राधान्य देणे महत्वाचे आहे हे पटवून द्या व हो त्यासाठी शक्य त्या सगळ्या माध्यमांद्वारे तुमच्या ग्राहकांच्या संपर्कात राहा. जी कंपनी व्यवसायाच्या या मूलभूत नियमांचं पालन करेल ती केवळ टिकणारच नाही तर त्यासोबत थोडे पैसेही कमवेल, अच्छे दिनयाहून वेगळे काय असू शकतात?

संजय देशपांडे
Mobile: 09822037109






Thursday 13 December 2018

पन्नाशीत प्रवेश करताना !


























"जो मनुष्य शिकणं थांबवतो तोच म्हातारा होतो, मग तो वीस वर्षांचा असेल किंवा ऐंशी वर्षांचा. सतत शिकत राहणारा कुणीही व्यक्ती तरुणच राहतो”… हेन्री फोर्ड.

मी, माझी पन्नास वर्षं पूर्ण करताना हेन्री फोर्डसारख्या माणसाशिवाय आणखी कुणाचं अवतरण वापरू शकलो असतो! ते जगाचा निरोप घेईपर्यंत सतत काहीतरी शिकत, जगाला काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत तरुणच राहिले. मी गेल्या काही वाढदिवसांपासून आवर्जुन एक गोष्ट करतो ती म्हणजे पुढच्या पिढीसाठी (म्हणजे माझी मुलं, पुतणे आणि भाचे मंडळींसाठी) वय वाढण्याविषयी काहीतरी लिहीतो. एक अर्थानं तो सरलेल्या वर्षांचा आढावाच असतो. मी यंदा पन्नास वर्षं पूर्ण करतोय, त्यामुळे माझ्यासाठीही हा एक  स्वतःचा घेतलेला शोधच होता. असं पाहिलं तर पन्नास हा फक्त एक आकडा आहे, पण आपणच काही आकड्यांना विशेष महत्व देतो उदाहरणार्थ, चित्रपट व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं तर शंभर करोडचा आकडा महत्वाचा ठरतो. आधी चित्रपटगृहात चित्रपटाचे पन्नास आठवडे किंवा सत्तर आठवडे पूर्ण झाल्यावर सिल्व्हर किंवा गोल्डन ज्युबली साजरी व्हायची. त्याचशिवाय आपल्याला क्रिकेटमधलं शतक किंवा हॅटट्रिक (सलग तीन चेंडूंमध्ये गडी बाद करणं) कशी विसरता येईल. फुटबॉलमध्येही गोलच्या बाबतीत अशी हॅटट्रिक होते. खरंच आपलं आयुष्य अशा विशेष आकडेवारीनं भरलेलं आहे. मला असं वाटतं हेच माणसाचं वैशिष्ट्य आहे आणि माणूस व ईतर प्राण्यांमधला फरकही. आपल्याला या आकडेवारीला वेगवेगळी विशेषणं लावायला आवडतं. एखाद्या वाघोबानं दहावा वाढदिवस विशेष म्हणून साजरा केल्याचं किंवा एखाद्या ह्त्तीच्या जोडप्यानं लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजरा केल्याचं ऐकलंय का? पण त्याचबरोबर आयुष्यातल्या या विशेष टप्प्यांना आकडेवारीत मोजायच्या आपल्या सवयीमुळे आपण जगण्यातली गंमत घालवून बसतो. जसे की नव्याण्णववर बाद होणाऱ्या एखाद्या फलंदाजाच्या व त्याच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला या आकड्याचं महत्व व तो गाठता न आल्यामुळे झालेलं दुःख जाणवेल. काही लोकप्रिय अभिनेत्यांच्या, निर्मात्यांच्या व दिग्दर्शकांच्या  एखाद्या चित्रपटाच्या बाबतीतही असं होतं. हा सिनेमा नव्वद करोडपर्यंत व्यवसाय  करतो पण शंभर करोडचा आकडा मात्र पार करत नाही, त्यामुळेच तो चित्रपट आपटल्याचं मानलं जातं. आपण माणसं खरंच विचित्रं असतो, आपण आपला आनंद किंवा दुःख कुठल्याशा आकडेवारीमध्ये मोजतो  आणि  म्हणूनच आपण जगण्यातली मजा स्वतःच्या हातानेच घालवतो.

आपण मनाला या आकडेवारीच्या जंजाळात इतकं गुरफटून टाकलं असतं की रात्री झोपल्यानंतरही आपल्या डोक्यात आकडेवारीच असते व सकाळी उठल्यानंतरही कुठली आकडेवारी पूर्ण करायची आहे हाच विचार असतो. मग तो आपल्या गृहकर्जाचा किंवा कारचा हप्ता असेल किंवा पगारवाढ असेल किंवा आपल्या मुलांची परीक्षेतली टक्केवारी असेल, पेट्रोलचे  प्रति लिटर दर असतील, किंवा समभागांचे खालीवर होणारे दर. त्याचशिवाय फेसबुक किंवा इस्टाग्रामवरच्या आपल्या पोस्टला मिळणाऱ्या लाईकची आकडेवारी कशी विसरता येईल. आपलं आयुष्यच असं झालंय की, आपण जागे असताना (काही जण तर  स्वप्नातही) कुठल्या तरी आकडेवारीविषयीच विचार करत असतो. या सगळ्याचा विचार केल्यानंतर, मी पन्नास वर्षं पूर्ण झाली म्हणून विशेष वाटत असल्याबद्दल स्वतःला दोष देऊ शकत नाही. मला असं वाटतं की मी सामान्य माणसासारखाच विचार करतोय. आपल्याला आजकालच्या वॉट्सऍप किंवा फेसबुकच्या कीबोर्डची एवढी सवय झालेली असते की मी एमएस वर्डमध्ये वरील वाक्य टाईप केल्यानंतर, स्माईली की शोधत होतो! कारण इमोजी व स्माईली वापरताना आपण खरंखुरं हसू किंवा मनापासून हसणं विसरून गेलो आहोत. मी अलिकडेच एक लेख वाचला होता, ज्यामध्ये वाचकांना एखाद्याच्या अपयशमुळे (खरंतर आपल्याला यामुळे नेहमीच हसू येतं) किंवा उपहासानं नाही तर ते शेवटचं मनापासुन खळखळून कधी हसू आलं हे आठवायला सांगितलं होतं. अगदी आपण जे हसतो ते सुद्धा आपल्या हृदयाला स्पर्श करत नाही. कारण फक्त ओठ पसरवणं म्हणजे हसू नाही याची स्वतःला आठवण करून द्यायची वेळ झालीय. मोठं होण्यातली आणखी एक रोचक गोष्ट म्हणजे तुम्हाला कितीतरी लोक भेटतात. तुमचं वाचन समृद्ध असेल तर तुम्ही याबाबतीत अधिक सुदैवी असता (मी खरंच वाचनाच्या बाबतीत सुदैवी आहे), कारण पुस्तकातली पात्रं सुद्धा तुम्हाला विविध लोकांना भेटण्याचा अनुभव देतात. तुम्हाला त्यांचा जीवनाचा दृष्टिकोन समजून घेता येतो. तुम्ही त्यांच्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहू शकता. मुलांनो तुम्ही वाचनाची आवड जोपासावी असं मला मनापासून वाटतं, कारण जग तुमच्याकडून सगळं काही काढून घेऊ शकतं पण तुम्हाला वाचनातून मिळालेलं ज्ञान काढून घेऊ शकत नाही. वाचनामुळे तुम्हाला एकाच ठिकाणी बसून कितीतरी ठिकाणांना भेट देता येते व अनेक लोकांना भेटता येतं. अगदी ओशोपासून अनेक तत्वज्ञांनी स्वतःतलं लहान मूल जिवंत ठेवा असं म्हटलंय. मला असं वाटतं वयानं मोठं होण्यातलं खरं यश किंवा मोठं होण्याचा योग्य मार्ग तोच आहे. योगायोगानं अलीकडेच माझ्या वाचण्यात गेम ऑफ थ्रोन्स (जीओटी) नावाची पुस्तकमालिका आलीय. यातील  आठ कादंबऱ्यांमध्ये जवळपास सात हजार पानं आहेत. ही पुस्तकं वाचताना आपली दोनशेहून अधिक पात्रांशी ओळख होते. गेम ऑफ थ्रोन्सचं तत्वज्ञान म्हणजे, तुम्हाला राज्य करायचं असेल तर तुमच्यातलं लहान मूल  मारून  टाका! !” कारण त्या लहान मुलाच्या निष्पापणामुळे तुम्हाला कठोर (म्हणजेच व्यवहार्य) निर्णय घेता येणार नाही व शेवटी तुमच्यातलं ते लहान मूलच शासनकर्ता म्हणून (राजा म्हणून) तुमच्या अपयशाला कारणीभूत ठरेल. सकृतदर्शनी गेम ऑफ थ्रोन्सचं तत्वज्ञान विचित्रं, अतिशय कठोर किंवा स्वार्थी वाटतं, पण शांत मनानं विचार केला तर ते खरं असल्याचंही जाणवतं. तुम्ही जेव्हा कशामुळेतरी अस्वस्थ असाल किंवा तुम्हाला वाईट वाटत असेल, तर त्याचं कारण काय आहे किंवा खरंतर कोण आहे असा विचार करा? याचं कारण माझ्यातला मोठा झालेला माणूस आहे का, त्यानं ज्या माणसांना आपलं मानलं त्यांनी त्याला फसवल्यासारखं वाटतंय का, तर अर्थातच नाही. कारण मोठ्या झालेल्या माणसानं आयुष्याचे सगळे टप्पे पाहिले आहेत, ज्यात विश्वासघात व पाठीमागून हल्ला करणे हेच टिकून राहण्याचे मार्ग आहेत. तो अशा हल्ल्यांध्येही टिकला आहे व पन्नास वर्षं जगला आहे. या माणसाला जग वाईटच वागणार आहे हे माहिती असतं, त्याच्या बाबतीत काही चांगलं घडेल असं त्याला वाटत नसतं. अशावेळी तो जगाच्या वागणुकीबद्दल कसा चिडू शकतो किंवा अस्वस्थ होऊ शकतो. खरंतर आपल्यातलं ते लहान  मूलच  भोवतालच्या चांगुलपणाला किंवा वाईटपणाला प्रतिसाद देत असतं, कारण ते मूल जगाकडे अतिशय सरळ दृष्टिकोनातून पाहतं, म्हणजेच प्रत्येक गोष्ट ही चांगली किंवा वाईट असते व त्यासाठीची प्रतिक्रियाही तात्काळ दिली जाते. एखाद्या चांगल्या गोष्टीमुळे ते मूल मनापासून हसतं तर वाईट गोष्टींमुळे त्याला त्रास होतो व डोळ्यात पाणी येतं. पण लहान मूल वाईट घटनासुद्धा अतिशय लवकर विसरून जातं पण मोठ्यांना तसं जमत नाही. ओशो व गेम ऑफ थ्रोन्सच्या तत्वज्ञानात हाच फरक आहे.

तुम्ही जेव्हा म्हणता स्वतःतलं मूल जिवंत ठेवा तेव्हा त्याचा अर्थ मुलाच्या चांगल्या गोष्टी (म्हणजे सवयी) आत्मसात करा, उदाहरणार्थ लहान मूल लहानशा गोष्टीवरही मनापासून हसतं. एखादं रांगणारं मूल पाहा, एखादी उडणारी चिमणी, पंख फडफडणारं फुलपाखरू पाहूनही ते हसतं, त्याचं हसू पाहून तुम्ही क्षणभर सगळ्या चिंता विसरता. तुम्ही एखाद्या मुलावर ओरडलात किंवा त्याचं खेळणं हिसकावून घेतलंत तर ते लगेच रडायला लागेल, मात्र ते काही वेळातच आजूबाजूला असलेल्या दुसऱ्या एखाद्या गोष्टीमुळे हसायला लागेल. म्हणजेच एखादं मूल फार काळ रुसून बसू शकत नाही, आपणही असंच व्हायला पाहिजे. आपल्या बाबतीत काहीतरी वाईट घडलं की आपल्यातलं लहान मूल अस्वस्थ होतं, जे स्वाभाविक आहे. पण आपल्यातला मोठा माणूस आपलं मन नेहमी अस्वस्थ ठेवतो, त्या वाईट आठवणी धरून ठेवतो, सोडून देत नाही. या प्रक्रियेत तो मोठा माणुस माझ्यातल्या लहान मुलाला फक्त वाईट गोष्टींचाच विचार करायला लावतो, त्यामुळेच मला भोवतालच्या चांगल्या गोष्टी ऐकूही येत नाहीत व दिसतंही नाहीत व एकप्रकारे माझ्यातलं लहान मूल नष्ट होतं. म्हणूनच मी वॉल्ट डिज्ने, मार्व्हल स्टुडिओ (म्हणजे स्टॅनली), डीसी कॉमिक्स (बॅटमॅन, सुपरमॅन), हॅरी पॉटर, तसंच मला पुस्तकातून भेटलेल्या असंख्य पात्रांचा, हो अगदी गेम ऑफ थ्रोन्सचाही अतिशय ऋणी आहे. नाहीतर मला स्वतःतलं लहान मूल मारून टाकण्याचे दुष्परिणाम  कसे समजले असते? या यादीत आणखी एकाचा समावेश करावा लागेल तो म्हणजे कराटे किड नावाचा सिनेमा. तुम्ही बुचकळ्यात पडला असाल की हे काय आहे? तर या सगळ्या चित्रपटांनी किंवा पुस्तकांनी मला शाळा किंवा महाविद्यालयांसारखं शिकवण्याचं काम केलंय. मी अर्थातच माझ्या खऱ्या आयुष्यातल्या शिक्षकांचा, माझ्या पालकांचा तसंच मित्रमंडळींचा ऋणी आहेच. पण वर नमूद केलल्या चित्रपटांमुळे व पुस्तकांमुळे मला आयुष्य ऊमजलं, जे मला कुठल्याही शाळेनं शिकवलं नसतं ते त्यांनी शिकवलं. मार्व्हलनं मला शिकवलं की मोठ्या शक्तिसोबत मोठ्या जबाबदाऱ्याही येतात”. डीसी कॉमिक्सनं मला शिकवलं की, “तुम्ही कोण आहात यापेक्षाही तुम्ही जे आहात त्यातून तुम्ही काय करता, यावरून तुमचं व्यक्तिमत्व ठरत असतं”. डिस्नेनं मला शिकवलं की, “शूर व दयाळू व्हा म्हणजे जादू आपोआप होईल”. हॅरी पॉटरनं मला शिकवलं की, “शत्रूविरुद्ध लढायला धैर्य लागतं पण त्यापेक्षाही कितीतरी धैर्य तुमच्या स्वतःच्या मित्रांविरुद्ध उभं राहायला लागतं” (भगवद्गीताही हेच सांगते). गेम ऑफ थ्रोन्सनं मला शिकवलं की माझ्यातलं मूल मला कमजोर करू शकतं किंवा मला बळ देऊ शकतं, त्या लहान मुलाचा वापर कसा करायचाय हे माझ्यावर अवलंबून आहे. आपल्यातला वयानं मोठा माणूस जगावर राज्य करण्यासाठी लहान मूल बाजूला सारण्याचा प्रयत्न करत असताना, ओशो आणि इतर अनेकांनी मला माझ्यातल्या मुलाचा आदर करायला सांगितला.

सरते शेवटी, कराटे किड! मी कालच एका लग्नाच्या स्वागत समारंभासाठी निघालो होतो आणि तुम्हा दोघांना लवकर तयार व्हायचा आग्रह करत होतो. मी शूज घालत असताना, टीव्हीवर कराटे किडमधलं शेवटचं मारामारीचं दृश्य सुरू होतं. मी हा चित्रपट किमान दहा वेळा तरी पाहिला असेल, तरीही शूज घालायचं विसरून माझे डोळे टीव्ही स्क्रिनवर खिळले होते. मार्शल आर्ट स्पर्धेचा उपांत्य फेरीचा सामना असतो आणि ड्रे पार्करचा (जेडन स्मिथ, साधारण दहा वर्षांचं पात्रं) गुडघा दुखावला जातो. अंतिम सामना खेळण्यासाठी सक्षम नसल्याचं जाहीर झाल्यानं, तो पलंगावर वेदनेनं विव्हळत असतो. तो त्याचे प्रशिक्षक श्री. हॅन (जॅकी चॅननं हे अप्रतिम पात्रं साकारलंय) यांना त्याची इजा बरी करण्यासाठी चायनीज उपचार पद्धती  वापरायला सांगतो म्हणजे त्याला अंतिम सामन्यात खेळता येईल. जॅकी चॅन त्याला विचारतो, “ड्रे कशासाठी, तू सगळं काही सिद्ध केलंयस. तू ज्या प्रकारे लढ़लास त्याचा तुझ्या परिवाराला अभिमान वाटेल, आणखी एक फेरी जिंकल्यानं काय साध्य होईल?” ड्रे उत्तर देतो, “मला अजूनही त्या दुसऱ्या मार्शल आर्ट शाळेतल्या अंतिम फेरीत खेळणाऱ्या मुलाची भीती वाटते आणि आज काहीही झालं तरी, मला मनात भीती घेऊन घरी जायचं नाही!” मला असं वाटतं आपल्या सगळ्यांमध्ये एक लहानगा ड्रे आहे ज्याला कशाना कशाचीतरी भीती वाटते, जो आरशात स्वतःचा चेहरा पाहण्याचं टाळतो. तो फक्त मनातल्या भीतीमुळे आपल्यापासून आयुष्यातला सगळा आनंद व मजा हिरावून नेतो. या लहानग्या ड्रेला भीतीला सामोरे जाण्याचे धैर्य देणे हे आपल्यातल्या मोठ्या माणसाचं कर्तव्य आहे, कारण तोच ही भीती घालवू शकतो. पन्नाशीत प्रवेश करणं म्हणजे आता कुणीही तुम्हाला तरूण म्हणणार नाही, तर हा प्रवास आता काका ते आजोबा म्हणायचा आहे, हा विचारच कुणाही माणसाला हादरवून सोडणारा असतो. पण मुलांनो तुम्हाला एक सांगू, आज इथवर वाटचाल करताना मला एक गोष्ट लक्षात आलीय की, माझ्यातला व्यवहार्य मोठा माणूस आणि भावनिक लहान मूल एकाच वेळी गुण्यागोविंदानं नांदू शकले तर मला माझ्या भूतकाळाची लाजही वाटणार नाही आणि भविष्याकडे पाहायची भीतीही वाटणार नाही. मला आत्तापर्यंत जगावर सत्ता गाजवण्यासाठी माझ्यातलं लहान मूल मारायची गरज वाटली नाही. किंबहुना माझ्यातल्या या लहान मुलामुळेच मला समजलं की तुम्ही निष्पापपणा जिवंत ठेवून, तसंच इतरांना आनंद व सुख देऊनच जगावर राज्य करू शकता. आपल्याला मोठ्या माणसाला हे आपल्यातल्या लहान मुलाकडूनच शिकता येऊ शकतं. आणखी एक गोष्ट, तुम्हाला जाणतेपणी किंवा अजाणतेपणी अधिक चांगली व्यक्ती होण्यासाठी मदत केलेल्या प्रत्येक माणसाचे आवर्जुन आभार माना. हा काळ अतिशय कठीण आहे व अतिशय कमी लोक तुम्हाला मोठं होण्याच्या प्रक्रियेत आपणहून मदत करतील. यासाठी तुम्ही जे लोक तुम्हाला आहे तसं स्वीकारतात व तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर विश्वास ठेवू शकता. मी त्या बाबतीतही अतिशय नशीबवान राहिलो आहे. आज मी तुम्हाला जे काही सांगतोय ते माझ्याभोवती असलेल्या अशाच माणसांमुळे. मी तुमच्यासाठी लिहीलेला हा लेख तेही कदाचित वाचत असतील व मनातल्या मनात हसत असतील. खामगावसारख्या एका लहानशा गावतला एक मुलगा, ज्याला ते संज्या, चंकी, पांड्या, देशू अशा वेगवेगळ्या नावानं हाका मारायचे, तो आता त्यांना तत्वज्ञान सुद्धा शिकवतोय याचं त्यांना हसू येत असेल. त्यांना असं हसण्याचा हक्क आहे, कारण त्यांनी जे काही शिकवलं त्यामुळेच आज पन्नाशीचा झालेला हा मुलगा हे सगळं करू शकला. मुलांनो आज तुमच्याकडे पाहताना मी किती वर्षं मागे सोडलीत याची मला जाणीव होतेय. मी माझ्या भूतकाळाबद्दल आनंदी व समाधानी आहे. मित्रांनो आयुष्यानं मला हा महत्वाचा टप्पा ओलांडताना

 तुम्ही सगळ्यांनी  दिलेली ती सर्वोत्तम भेट आहे